Categories
बुके वाचिते

चांदोबा, चांदोबा भागलास का?

हल्लीच्या मुलांचं बालपण आणि सत्तर-ऐंशीच्या दशकामध्ये जन्मलेल्या मुलांचं बालपण यातील फरक म्हणजे संजीव कपूरने केलेली बिर्याणी आणि युट्युबवर तो व्हिडो बघून घरी केलेली बिर्याणी यातल्या फरकाइतका आहे. खरं तर प्रत्येक पिढीमध्ये असा फरक येताच असतो पण या शतकाच्या सुरुवातीपासून तंत्रज्ञानाने जी अफाट प्रगती केली आहे त्यामुळे ही दरी रुंदावली आहे. त्या काळी टीव्ही नुकताच आलेला, त्यावर एकमेव च्यानल आपलं दूरदर्शन. ते सुद्धा २४ तास नाही तर फक्त संध्याकाळी. सिनेमातली गाणी फक्त गुरुवारी अर्धा तास आणि आठवड्याला मोजून दोन सिनेमे – शनिवारी मराठी आणि रविवारी हिंदी. रविवारी सकाळी  ‘स्टार ट्रेक’, ‘शेरलॉक होम्स’, ‘भारत एक खोज’. टीव्हीचं व्यसन वगैरे लागणं शक्य नव्हतं कारण व्यसन लागण्याइतका बिचारा चालू असायचाच नाही.

मग मुलांनी करायचं काय? या प्रश्नाचं आमच्या घरात योग्य उत्तर होतं याबद्दल आकाशातल्या बापाचे अनेक आभार. त्या काळात चांदोबा नावाचं मासिक मुलांसाठी निघायचं आणि आमच्या एका काकांनी १९६० पासूनचे सगळे अंक जमवून आम्हाला भेट दिले होते. त्या अंकांची किती पारायणे झाली त्याची गणती नाही पण वाचनाची आवड तिथे सुरु झाली.

परवा या अंकांचा गठ्ठा परत सापडला – अर्थात छापील अंक नव्हेत तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात. अंक चाळताना बऱ्याच नवीन गोष्टी लक्षात आल्या. या अंकांमध्ये छोट्या गोष्टी असायायच्याच, पण काही मोठ्या गोष्टी अनेक भागांमध्ये यायच्या. यातल्या विशेष आवडत्या म्हणजे ‘तिळ्या बहिणी’, ‘तीन मांत्रिक’ आणि ‘भल्लूक मांत्रिक’.

tin mantrik

या गोष्टींमध्ये मांत्रिक, जादूगार, राक्षस वगैरे मंडळींची रेलचेल असायची. जोडीला भस्मे, अंजने वगैरे जादुई साहित्य. जेवढ्या राजकन्या तितकेच राजपुत्र. म्हणजे वर तिळ्या बहिणी आहेत तर त्यांना राक्षसाच्या तावडीतून सोडवायला तिळे राजपुत्र म्हणजे शेवटी भागाकार करताना बाकी शून्य आली म्हणजे झालं. आजच्या काळात मुलांचं संगोपन कसं करावं यावर भरपूर माहिती आहे. त्या काळात पालकांना यावर विचार करायला फारसा वेळ नसायचा. चांदोबामध्येही बरेचदा राक्षसाचं शीर धडावेगळं व्हायचं. इतकंच नव्हे तर पानभर चित्र काढून ते धडावेगळं केलेलं शीर आणि आजूबाजूचा रक्ताचा सडा साग्रसंगीत दाखवलेला असायचा. सुदैवाने याचा आमच्या बालमनावर परिणाम होईल या भीतीने ही मासिकं आमच्या हातातून काढून घेतली गेली नाहीत आणि आम्हालाही हळूहळू पडलेल्या मुंडक्यांची सवय झाली. दर दोन पानावर मरे त्याला कोण रडे?

आज हे अंक चाळताना काही वेगळया गोष्टी जाणवतात. एखाद वेळेस अंकाच्या सुरुवातीला संपादक बालमित्रांशी हितगुज म्हणून दोन शब्द बोलायचे. नोव्हेंबर १९७५ च्या अंकात हे हितगुज आहे.

हे वाचलं आणि अंगावर काटा आला. इन-मिन चार वाक्यांचं प्रकरण.  दिवाळी आहे, मजा करा हे सांगताना संपादकांना “सर्व वस्तू बाजारात मिळू लागल्या आहेत” हे ठळकपणे नमूद करण्याची गरज भासते याचा अर्थ त्या काळात किती भीषण टंचाई असेल! प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांनी हिंदूमध्ये आणि इतरत्र बरीच वर्षे लेख लिहिले. त्यांचे हे लेख अनेक कारणांसाठी वाचनीय आहेत. तांदुळावरचं रेशनिंग संपल्यानंतर नारायण यांचा एक लेख आला होता. लेख नर्मविनोदी असला तरी त्यामागचं भीषण वास्तव जाणवल्यावाचून राहवत नाही. रेशनिंग सुरू होतं तेव्हा कुठेही लग्नसोहळा असेल तर पाहुण्यांना आपापला शिधा बरोबर घेऊन जावा लागत असे. अचानक अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची धाड पडली तर काय करायचं यासाठी हा खटाटोप. अधिकारी आले तर कचऱ्यात पत्रावळी किती यावरून किती धान्य वापरलं याचा हिशेब घेत असत आणि धान्यवापर मर्यादेत आहे किंवा नाही हे ठरवीत असत. कधीकधी समारंभ सुरू असताना यजमान एका रांगेतील लोकांना हळूच नेत्रपल्लवी करून बोलावीत. हे लोक शक्य तितक्या गोपनीयतेने एका अज्ञातस्थळी जात आणि गुपचुप जेवण उरकून येत. त्यांचं झाल्यावर मग पुढची रांग. आज काही टिचक्या मारल्या तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून हवी ती वस्तू दारात हजर होते. पण ब्रिटिश गेल्यावर आपला देश कंगाल झाला होता ही वस्तुस्थिती आहे.

याच अंकात एक दुःखद बातमीही आहे. चांदोबाचे संचालक श्री. चक्रपाणी यांच्या निधनाची बातमी.

श्री. चक्रपाणी आणि श्री. नागिरेड्डी यांनी त्या काळात आम्हा मुलांवर जे अनंत उपकार केले ते विसरणे शक्य नाही.

—-

परदेशांमध्ये आणि इथे काय फरक आहेत याबद्दल बरंच लिहून झालंय – स्वच्छ रस्ते, नियमित वाहतूक वगैरे वगैरे. पण तिथली एक गोष्ट फार विशेष आहे आणि त्याबद्दल फारसं वाचलेलं नाही. आजवर मी जितक्या देशामध्ये राहिलो – इटली, फ्रान्स, जपान – सगळीकडे प्रत्येक मुख्य शहरात किमान एक लायब्री होती. माझ्याकडे जी कागदपत्रे होती त्यांच्या आधारावर मला तत्काळ मेंबरशिप मिळाली आणि त्यासाठी एक पैसाही द्यावा लागला नाही. आठ-दहा पुस्तकं, डीव्हीडी, सीडी – महिनाभर वाचा, बघा, ऐका (पाश्चात्य शास्त्रीय संगीताच्या शिड्या मनसोक्त ऐकल्या). शिवाय त्यांच्याकडे नसेल एखादं पुस्तक तर बिचारे मागवायचे. पहिल्यांदा हा अनुभव घेतला तेव्हा मला हंबरडा फोडावासा वाटला. माझा आधीचा अनुभव पुणे विद्यापीठातील जयकर लायब्रीचा होता. तिथे हवी ती पुस्तके मिळायची मारामार होतीच​, शिवाय तुमचा विषय नसेल तर ते पुस्तक तुम्हाला घेता येणार नाही असा अजब औरंगजेबी नियमही होता. आम्ही सायन्सचे त्यामुळे कथा-कवितांचे दरवाजे आमच्यासाठी कायमचे बंद​. शिवाय आत जाऊन​ पुस्तकं चाळायला पवरानगी नव्हती. पुस्तकाचं नाव त्या बाईंना द्यायचं मग त्या आत जाऊन​ पुस्तक घेऊन येणार​. गोष्टीमधली चेटकीण ज्या तन्मयतेने जादुई पोपटाचं रक्षण करते त्याच तन्मयतेने त्या बाई पुस्तकांचं रक्षण करायच्या. चुकुन एखादा विद्यार्थी आत पुस्तकं चाळताना दिसला तर वस्सकन अंगावर यायच्या. आता परिस्थिती बदलली असेल अशी आशा आहे.

हवी ती पुस्तके मुबलक प्रमाणात सहज उपलब्ध असणे ही खरी सुबत्ता!

Categories
बुके वाचिते संगीत​

पीटरसाहेब आणि बुकर

कालच सर पीटर स्टोथार्ड यांची मुलाखत वाचली. त्यांचे शब्द इतके प्रभावी होते की आमचे डोळे दिपले, मग गागल लावून बाकीची मुलाखत वाचली. आता इथे तुम्ही विचाराल, हे पीटर स्टोथार्ड कोण? हे ‘टाइम्स लिटररी रिव्ह्यू’चे संपादक आहेत आणि बुकर पारितोषिक निवड समितीवर आहेत. यांची दैदिप्यमान​ मुक्ताफळं पुढीलप्रमाणे, “पुस्तकांचं परीक्षण करणारे बरेच ब्लॉग आहेत हे चांगलंच आहे पण समीक्षकांची मतं आणि इतरांची (पक्षी : फाल्तू जन्तेची) मतं यांच्या दर्जामध्ये फरक असतो. इतके ब्लॉगर्स कोणती भलभलती पुस्तकं चांगली आहेत म्हणून सांगतात आणि लोकं वाचतात. यामुळे साहित्याची हानी होते आहे. सामान्य ब्लॉगर लोक समीक्षकांची गळचेपी करत आहेत.” काढली का नाय इकेट? याला म्हणता स्नॉबरी. काही म्हणा, टोपीकर ज्या अत्युच्च दर्जाची स्नॉबरी करतो ती आपल्यासारख्या लोकांना जमणं कधीही शक्य नाही. ही पिढ्यानपिढ्या रक्तात मुरलेली स्नॉबरी आहे, देवा. ही सहजासहजी मिळत नाही. दोन-तीनशे वर्षे जगावर राज्य करायचं, सगळ्यांचे खजिने लुटायचे, आणि मग हे सगळं मागासलेल्या जगाच्या भल्यासाठीच केलं अशी मखलाशी करायची असे अनेक उपद्व्याप केल्यानंतर ही स्नॉबरी रक्तात येते. सोपं काम न्हाई ते भावा!

पीटरबाबा काय म्हन्तोय धेनात आलं का? अभिजात साहित्य म्हणजे काय हे आम्ही तुम्हाला सांगूच, पण अभिजात समीक्षा कोणती हे ही आम्ही ठरवणार. आम्ही जे ठरवून देऊ तेच तुम्ही भक्तिभावानं वाचायचं. आणि तुम्हाला एखादं पुस्तक आवडलंच तर लगेच कळफलक बडवत जगाला सांगायला जाऊ नका, तुमची तेवढी लायकी नाही.

पीटर साहेबांनी या वर्षी बुकरसाठी निवड करताना सात महिन्यात १४५ पुस्तकं वाचली. मी एक नंबरचा पुस्तकी किडा आहे पण हे वाचून मी बी पार हेलपाटलो बगा. २१० दिवसात १४५ पुस्तकं म्हणजे दीड दिवसाला एक पुस्तक. अशा वेगानं पीटरसाहेब पुस्तक वाचणार, त्यातलं कोणतं चांगलं ते ठरवणार, त्याला बक्षीस देणार आणि ते आम्ही ब्रह्मवाक्य मानायचं? काहून? शेवटी समीक्षक – जरी खत्रूड असला तरीही – माणूसच असतो ना? मागे शंभर कुत्रे लागल्यावर माणूस​ ज्या वेगाने पळत सुटतो तितक्या वेगानं पुस्तकं वाचताना समीक्षेचा दर्जा खालावू शकत नाही का? पुस्तकाचा दर्जा ठरवताना त्याची वाक्यरचना, आशय, शब्द या सर्वांकडे लक्ष देणं अपेक्षित असावं. असं स्पीड रीडिंग करताना हे शक्य होतं? बरं, मग पीटरसाहेब बाकी काही करतात की नाही? उत्तर आहे, नाही. त्यांना कोणत्याही खेळात रस नाही आणि आयुष्यभरात त्यांनी फक्त सहा चित्रपट बघितले आहेत. संगीतात त्यांना रस आहे की नाही माहीत नाही. इथे आणखी एक मुद्दा येतो. ज्या माणसाला पुस्तकं सोडून बाकीचं जगच माहीत नाही, त्याला त्या पुस्तकांमध्ये जर ते बाकीचं जग असेल तर त्यात काय रस असणार? एखादं पुस्तक चित्रपट किंवा खेळाच्या पार्श्वभूमीवर असेल तर ते चांगलं की वाईट हे ते कसं ठरवणार?

पूर्वीच्या काळी पुस्तकं, शिक्षण, ज्ञानसंवर्धन फक्त एका वर्गाची मक्तेदारी असायची. पीटरजींना तेच अपेक्षित आहे असं दिसतं. नाही म्हणायला मागच्या वर्षी बुकर निवड समितीच्या अध्यक्षा स्टेला रिमिंग्टन यांनी “जी पुस्तकं लोक वाचतील आणि त्यांचा आनंद घेतील अशा पुस्तकांना पारितोषिक देण्यात यावं” असं म्हणून सगळ्यांचीच विकेट काढली होती. त्याला उत्तर म्हणून पीटर म्हणतात की ‘रीडेबिलिटी’ तितकीशी महत्त्वाची नाही. आरं बाबा, रीडेबिलीटी महत्त्वाची नाही ना, मग लिहू दे की ब्लॉगर लोकांना लिहायचं ते? तुझ्या पोटात का दुखतंय? पोटात अशासाठी दुखतंय की यांची जड शब्दातली बद्धकोष्ठी समीक्षा कुणी वाचायला तयार नाही. बहुतेक ब्लॉगर सामान्य वाचक असतात, त्यांना जे आवडतं किंवा आवडत नाही ते प्रामाणिकपणे लिहितात, वाचणारे वाचतात. पीटरच्या लेखी रोलिंगसारखे लेखक म्हणजे कस्पटासमान. आणि हॅरी पॉटर इतकं लोकप्रिय झालं त्याचा अर्थ ते नक्कीच फालतू असणार, तरी चालले सगळे रोलिंगबाईंच्या मागे. म्हणूनच रोलिंगबाईंना बुकर मिळणं शक्य नाही. सात पुस्तकांमध्ये एक प्रतिसृष्टी निर्माण करून जगभरातल्या लोकांना गुंतवून ठेवणं – त्यात काय मोठं? लोकप्रिय आहे ना मग ते चीपच असणार. त्यापेक्षा कुणालाही कळणार नाही असं एखादं पुस्तक लिहून दाखवा. साहित्याच्या कक्षा रूंदावून दाखवा. टोलकिनला नोबेल नाकारणारे याच जातीचे. विक्रम सेठला आजपर्यंत बुकर नामांकन मिळालेलं नाही ही गोष्ट बुकर समितीसाठी लाजिरवाणी आहे.

पीटरसाहेबांच्या मते फक्त मनोरंजन करणारी पुस्तकं महत्त्वाची नाहीत. अभिजात साहित्य म्हणजे काय हे दाखवणं समीक्षकाचं काम आहे. हे जरी मान्य केलं तरी हे तथाकथित अभिजात साहित्य खरंच अभिजात आहे हे कशावरून? आणि यांनी सांगितलं म्हणून लोक ते वाचतील का? वाचणार नसतील तर काय उपयोग? दुसरं – साहित्य खरंच अभिजात असेल तर त्याला समीक्षकांच्या सर्टिफिकेटची गरज आहे का? शेक्सपिअरची नाटकं, डिकन्सचे चित्रपट अजूनही का चालतात? शेरलॉक होम्स अजूनही का तग धरून आहे? त्यांना कुठल्या समीक्षकानं पास केलं होतं? अर्थात विल सेल्फप्रमाणे हे सगळे रद्दी असंच म्हणायचं असेल तर मुद्दाच खुंटला. (विल सेल्फ या वेळच्या बुकर स्पर्धेत आहे.)

असो, तर पीटरसाहेब सध्या बुकरसाठी अभिजात लेखक निवडण्यात मग्न आहेत. त्यांनी बुकर निवडून ‘हे वाच’ असं सांगेपर्यंत मी दुसरं काही वाचायचं नाही असं ठरवलं आहे. तुम्हीही पुस्तकांवर लिहू-बिहू नका. इथं साहित्याची हानी होते आहे त्याची कुणाला काळजीच नाही. वाचलं पुस्तक आणि चालले सांगायला जगाला आवडलं म्हणून.

पण मला एक वेगळीच चिंता आहे. पीटरसाहेबांना मराठी येत नाही त्यामुळे ते मराठी वाचणार नाहीत. मग मराठीत अभिजात काय आहे हे आपल्याला कसं कळणार?

—-

१. कल्पना करा, १०० वर्षांपूर्वी ब्लॉग असते आणि ही सुपीक कल्पना पीटरबाबाच्या डोक्यात आली असती तर काय झालं असतं? लगेच ऍक्ट पास करून सोम्या-गोम्यांचं ब्लॉगिंग बंद केलं असतं. तरीही लिहिलंच​ एखादं रसग्रहण, तर डायरेक्ट येरवडा. “टुम जैसा जाहिल, गवार लोग ब्लॉग लिखनेको नही मांगता.” इति नंतरच्या हिन्दी पिच्चरमधला टॉम अल्टर.

२. इथे वुडी ऍलन आठवला, “I took a speed reading course and read War and Peace in twenty minutes. It’s about Russia.”

Categories
बुके वाचिते

‘राग दरबारी’चं मर्मभेदी व्यंग

Rag Darbari book cover
Rag Darbari by Sri Lal Shukla

मराठीच्या तुलनेत हिंदी भाषिक अधिक वाचतात आणि लिहितातही. हिंदीतील ब्लॉगलेखन अव्याहतपणे सुरु असतं. जर हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये आढळणारा शब्द गूगलला तर बहुतेक सर्व सायटी हिंदीमध्ये असतात. हिंदीमध्ये कवीसंमेलनांची दीर्घ परंपरा आहे आणि ते लोक ती प्रेमाने जोपासतात. त्यांच्या कविता मर्मभेदी व्यंगाने भरलेल्या असतात. आणि हेच व्यंग श्रीलाल शुक्ल यांच्या ‘राग दरबारी’ या कादंबरीतही बघायला मिळतं.

गोष्ट आहे शिवपालगंज गावातली. रंगनाथ हा इतिहासात एम.ए. केलेला विद्यार्थी. तो काही दिवस आजारी होता. आता बरा झाल्यावर गावाकडच्या ताज्या हवेत प्रकृती सुधारेल या साध्याभोळ्या विचाराने तो शिवपालगंजमध्ये मामाकडे चालला आहे. त्याचे मामा म्हणजे वैद्यजी, शिवपालगंजमधील बडं प्रस्थ. नाही म्हणायला नावाला जागून ते रोग्यांना तपासून पुड्या वगैरे देतात (वीर्यवर्धक पुडी हे त्यांचं खास औषध!) पण त्यांचा खरा व्यवसाय गावातील राजकारण. गावातील छंगामल विद्यालय इंटरकॉलेजच्या प्रबंधसमितीमध्ये त्यांचा दबदबा आहे. कॉलेजचा प्रिंसिपल त्यांना विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही. शिवाय गावातील कोऑपरेटिव्ह युनियनचे ते मॅनेजिग डायरेक्टरही आहेत.

साधारणपणे अशा गावातील गोष्टींमध्ये श्रीमंत लोक वाईट, गरीब लोकांना लुबाडणारे वगैरे असतात. गरीब लोक साधेभोळे, सचोटीने वागणारे असतात. बिमल रॉयच्या ‘दो बिघा जमीन’पासून सत्यजित राय यांच्या ‘सद्गती’पर्यंत थोड्याफार फरकाने हेच चित्र दिसतं. ‘राग दरबारी’मधले गावकरी मात्र एकाहून एक इरसाल आहेत, मग ते गरीब असोत वा श्रीमंत.  श्रीलाल शुक्लही एका  पात्राबद्दल म्हणतात की कालिकाप्रसाद प्रेमचंदांच्या नायकाप्रमाणे लगान घ्यायला आलेल्या अधिकाऱ्याला घाबरणारा नव्हता. शिवपालगंजच्या इरसाल गावकऱ्यांसाठी एक खास शब्द इथे प्रचलित आहे – गंजहा. याचा वापर विशेषण म्हणूनही केला जातो उदा. “गंजहापन झाड़ते हो!”

शेवटची काही प्रकरणे सोडली तर सगळी कादंबरी म्हणजे व्यंगांच्या विविध प्रकारांचा उत्तम नमुना आहे. कादंबरी १९६८ मधली, त्याबद्दल शुक्ल यांना त्या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तेव्हाच्या परिस्थितीशी जितका अधिक परिचय असेल तितके अधिक संदर्भ लागत जातात. अर्थात काही गोष्टी गेल्या सत्तर वर्षात बदललेल्या नाहीतच, उदा. सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव. शुक्ल यांच्या चौफेर फटकेबाजीचे हे काही नमुने

यहाँ सनीचर साँस खींचकर चुप हो गया। रंगनाथ समझ गया कि घटिया कहानी–लेखकों की तरह मुख्य बात पर आते–आते वह हवा बाँध रहा है।

दारोग़ाजी उनकी बड़ी इज़्ज़त करते हैं। वे दारोग़ाजी की इज़्ज़त करते हैं। दोनों की इज़्ज़त प्रिंसिपल साहब करते हैं। कोई साला काम तो करता नहीं है, सब एक–दूसरे की इज़्ज़त करते हैं।

सैनिटरी इन्स्पेक्टर को कई तरह के काम करने पड़ते हैं। वे भी जेब में ‘लैक्टोमीटर’ डालकर घूमते और राजहंसों की तरह नीर–क्षीर–विवेक करते हुए नीर–क्षीर में भेद न करनेवाले ग्वालों के मोती चुगा करते।

तर मध्येच एखाद्या कवीला शोभेल असं वाक्य.

सन्ध्या का बेमतलब सुहावना समय था।

कादंबरी मी किंडल ऍपवर वाचली. याचा एक फायदा असा की अडलेला शब्द तर बघता येतोच शिवाय झाड, प्राणी, पक्षी यांचा उल्लेख असेल तर ‘सर्च’ हा पर्याय निवडला तर गुगलल्यानंतर चित्रही दिसतं. उदा. हे वाक्य, “काँसों की फुनगियाँ एक जगह पगडण्डी के आर–पार झूल रही थीं।” इथे ‘काँस’ शब्द हायलाईट करून शोधला तर हे चित्र दिसलं.

कुश / काँस घास (Thatch grass / Kans Grass)

मग म्हटलं, अरेच्चा, हे तर ‘पाथेर पांचाली’मधल्या ‘ट्रेन सीन’ मधलं गवत!

सध्याच्या कादंबऱ्यांमध्ये विस्तृत वर्णनं देण्याची पद्धत आहे. नुकताच ‘देल्ही न्वार’ हा इंग्रजी कथासंग्रह वाचला. कथा चांगल्या आहेत, दिल्लीच्या गुन्हेगारीवर. पण बरेचदा लेखकांना कशाचं वर्णन करावं आणि ते किती करावं याचं भान सुटलेलं दिसतं. मग ते कंटाळवाणं होऊन जातं. किंवा काही लेखक आधुनिकतेची कास घेऊन मला वाटेल ते मी लिहिणार, याचा काय अर्थ लावायचा तो लावा असा पवित्रा घेतात. अशा वेळी मी फारतर शेवटी काय होतं ते बघतो आणि त्या लेखकाला रामराम म्हणतो.

गेल्या काही वर्षांमध्ये इंग्रजी भाषेत भारतीय लेखक बरंच लिहीत आहेत. विक्रम सेठपासून सलमान रश्दीपर्यंत अनेक गाजलेली नावं. इथे एक मुख्य अडचण ही आहे की भारतात अंदाजे १२% लोक इंग्रजी बोलतात. इंग्रजीत लिहिणारे लेखक साधारणपणे समाजाच्या वरच्या स्तरातून येतात आणि साहजिकच ते त्या जगाबद्दल लिहितात. भारतातील अठरापगड जाती, त्यांच्या भाषा, चालीरीती यांचं अस्सल चित्र उभं करायचं तर लेखकही त्याच मातीतला हवा. शहरी लेखकांना हे जमणे शक्य नाही. म्हणून भारतातील इतर भाषांमधलं साहित्य इंग्रजीत अनुवादित व्हायला हवं. इथे दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे अनुवादही तितका सकस हवा. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे विवेक शानभाग यांची कन्नड भाषेतील कादंबरी ‘घाचर घोचर.’ याबद्दल गिरीश कर्नाड म्हणतात, “The translation by Srinath Perur unerringly captures the shifting nuances that make Shanbhag’s telling so rich. Having read and admired the original Kannada, I was surprised how quickly Perur made me forget that I was reading a translation.”

श्रीलाल शुक्ल यांची कादंबरीवरची पकड जबरदस्त आहे. कोणतंही वर्णन कंटाळवाणं होत नाही. प्रत्येक पात्राचं बारकाईने अचूक व्यक्तिचित्र उभं करण्यात त्यांचा हातखंडा आहे. वाचताना गोनीदांच्या कादंबर्‍यांमधील कोकणी गावकरी आठवतात. लप्पन हा वैद्यजींचा मुलगा. प्रेमपत्र लिहिताना तो फक्त गाण्यांचे मुखडे लिहितो. किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल रागावले की हिंदी सोडून अवधीमध्ये बोलतात. लंगडला तहसीलदाराच्या हापिसातून एका दस्तावेजाची नक्कल हवी आहे पण त्यासाठी लाच देणार नाही असा त्याचा  ठाम निश्चय आहे. दर वेळी तो अर्ज देतो आणि कुठल्याश्या कारणावरून अर्ज नामंजूर होतो. हे असंच चालू रहातं.

सगळं वर्णन नर्मविनोदी, उपहासात्मक शैलीत करणारी ‘राग दरबारी’ शेवटी गंभीर होते. रंगनाथ सुरुवातीला गावातलं राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यात काही प्रमाणात सहभागीही होतो. शेवटी मात्र त्याला कळून चुकतं की इथे आपलं जमणं शक्य नाही. इथून लवकरात लवकर निघावं हेच बरं. त्याला प्रिन्सिपल छंगामल विद्यालयात नोकरीची ऑफर देतो ती तो धुडकावून लावतो. त्यावर प्रिन्सिपल म्हणतो, ‘‘बाबू रंगनाथ, तुम्हारे विचार बहुत ऊँचे हैं। पर कुल मिलाकर उससे यही साबित होता है कि तुम गधे हो।’’

Categories
इतिहास​ बुके वाचिते

पहिल्या महायुद्धाचे भीषण, विदारक चित्रण : रीजनरेशन त्रिधारा

१९१७ सालच्या जुलै महिन्यात सिगफ्राइड ससून या ब्रिटीश सैन्यदलातील अधिकार्‍याने आपल्या वरिष्ठ​ अधिकार्‍यांना उद्देशून एक निवेदन केले. हे निवेदन म्हणजे या एकांड्या शिलेदाराची बंडखोरी होती.

Siegfried Sassoon
सिगफ्राइड ससून

“मी या स्वेच्छेने केलेल्या निवेदनाद्वारे सैन्यदलाच्या अधिकाराचा विरोध करत आहे, कारण युद्ध थांबवण्याची ज्यांची क्षमता आहे त्यांच्याकडूनच युद्ध लांबवले जाते आहे असे मला वाटते.  युद्धातील सैनिकांचे होणारे हाल मला बघवत नाहीत आणि म्हणूनच ही परिस्थिती चालू ठेवण्यामध्ये मला सहभागी व्हायचे नाही. युद्ध ज्या कारणांसाठी सुरू आहे ती कारणे आता अमानुष आणि अनैतिक बनली आहेत. या सर्वांच्या मुळाशी राजकीय पातळीवरील घेतले गेलेले चुकीचे आणि खोटारडे निर्णय आहेत. याचा परिणाम म्हणून यातना भोगणार्‍या सर्वांच्या वतीने मी या फसवणुकीचा निषेध करत आहे. याचबरोबर मायदेशात असलेल्या बहुसंख्य सामान्य जनतेचा युद्धामुळे सैनिकांना होणार्‍या यातनांकडे बघण्याचा उथळ दृष्टीकोन बदलण्यात मला यश येईल अशी मी आशा करतो. या यातना सामान्यांना भोगाव्या लागत नाहीत आणि त्या भोगणार्‍यांचे हाल समजण्याइतकी कल्पनाशक्तीही त्यांच्याकडे नाही.”

साधारण असा या पत्राचा आशय होता. हे पत्र लिहीण्यास ससूनला विचारवंत बर्ट्रांड रसेल आणि लेखक जॉन मरी यांनी मदत केली. या पत्राच्या प्रती वृत्तपत्रांना पाठवण्यात आल्या, तसेच इंग्लंडच्या संसदेतही हे पत्र वाचले गेले. सेकंद लेफ्टनंट ससूनने फ्रान्समध्ये तिसर्‍या बटालियनकडून लढताना दीड तास जर्मन फौजांचा मारा चुकवित सर्व जखमी सैनिकांना सुरक्षित स्थळी आणण्याची महत्वाची कामगिरी बजावली होती. यासाठी त्याचा मिलिटरी क्रॉस देऊन सन्मान करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ससूनचे कोर्ट मार्शल न करता मानसिक संतुलन बिघडल्याचा शेरा देऊन त्याची क्रेगलॉकहार्ट येथील मनोरूग्णालयात रवानगी करण्यात आली.  क्रेगलॉकहार्ट रूग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रिव्हर्स यांनी त्याचा ताबा घेतला.

इतिहासात या आणि अशा त्रोटक, कोरड्या नोंदी आहेत. जुलै १९१७ ते युद्ध संपेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर १९१८ या काळात रिव्हर्स, ससून आणि काही इतर संबंधित व्यक्तींच्या आयुष्यात काय घडले याचे काल्पनिक पण तथ्यांपासून फारकत न घेता केले चित्रण  ‘रीजनरेशन ट्रिलॉजी’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या तीन कादंबर्‍यांमध्ये ब्रिटीश लेखिका पॅट बार्कर यांनी केले आहे. ‘रीजनरेशन’, ‘द आय इन द डोअर’ आणि ‘द घोस्ट रोड’ या त्या तीन कादंबर्‍या. तिसर्‍या कादंबरीबद्दल त्यांना १९९५ मध्ये बुकर पारितोषिकाने गौरवण्यात आले.

Regeneration by Pat Barker

पहिल्या कादंबरीची सुरूवातच या पत्राने होते. नंतर ससून रिव्हर्सकडे आल्यावर तो चहा, दूध कपात ओतत असताना रिव्हर्स त्याचे बारकाईने निरिक्षण करीत असतो. त्याचे हात थरथरत आहेत का, त्याच्या हालचालींमध्ये झटके आहेत का, बॉंबच्या सतत आवाजाचा परिणाम म्हणून तो दचकतो आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी मिळतात. ससूनमध्ये मानसिक संतुलन बिघडल्याचे कुठलेही चिन्ह नसते. उलट तो एक विवेकी, हुषार, देशभक्त तरूण आणि शिवाय एक संवेदनशील कवीही असतो. त्याच्या कविता प्रसिद्ध झालेल्या असतात. अपेक्षेच्या विरूद्ध असा त्याचा स्वभाव पाहून रिव्हर्स काहीसा संभ्रमात पडतो. ससूनच्या मानसिक आंदोलनांच्या मुळाशी जाताना रिव्हर्सला ज्यांची उत्तरे व्यवस्थेमध्ये राहून देणे शक्य नाही असे काही प्रश्न पडतात.

कादंबरीत बिली प्रायर हे सैनिकाचे काल्पनिक पात्र आहे. प्रायर रिव्हर्सला विचारतो, “तुम्ही आम्हाला भावना दाबून ठेवू नका असे सांगता. रणांगणावर आम्ही आमच्या भावनांना मोकळी वाट करून दिली तर तिथे आमचा एक दिवसही पाडाव लागणार नाही.” रणांगणावर मानसिक परिणाम न होता लढू शकणारा सैनिक फक्त तो असतो ज्याच्या सर्व संवेदना बोथट झाल्या आहेत. अशा सैनिकाचे वर्णन करताना ‘अपोकॅलिप्स नाऊ’ मध्ये मार्लन ब्रॅंडो म्हणतो,

“You have to have men who are moral… and at the same time who are able to utilize their primordial instincts to kill without feeling… without passion… without judgment… without judgment. Because it’s judgment that defeats us.”

पण असा अमानुष सैनिक मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून निरोगी म्हणता येईल का? मानसोपचार तज्ञाचे पहिले काम म्हणजे रूग्णाला सुरक्षित आयुष्य जगता यावे यासाठी तयार करणे. पण इथे रिव्हर्स नेमके उलटे करत होता. युद्धामधील अमानुष अनुभवांना सामोरे गेल्यानंतर सैनिकांना अनेक प्रकारचे मानसिक आजार होत होते. वाचा बसणे, धक्क्यामुळे अर्धांगवायू होणे, बोलण्यात तोतरेपणा येणे, रात्री असह्य दु:स्वप्ने. माणसाला सहन करणे अशक्य व्हावे अशा परिस्थितीमध्ये सतत राहील्यावर असे आजार होणे हा त्या सैनिकांच्या मेंदूने केलेला एक प्रकारचा बचाव होता. पण असे झाल्यानंतर ते रूग्णालयात आले की रिव्हर्स त्यांना पूर्वपदावर आणत होता ते कशासाठी? परत मृत्युच्या खाईत लोटायला? मानसोपचार आणि सैन्यदल यांची उद्दिष्टे परस्परविरोधी असली (जशी ती इथे होती) तर सैन्यदलात काम करणार्‍या मानसोपचार तज्ञाने हा नैतिक पेच कसा सोडवावा?

अशा परिस्थितीत ससूनने हे युद्ध आणि त्यामुळे होणारी जिवितहानी व्यर्थ आहे असा निष्कर्ष काढला तर त्यात काय चूक आहे? पण असे केल्यावर त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे असे ठरवून त्याला मनोरूग्णालयात पाठवण्यात आले होते. जोसेफ हेलरने ‘कॅच-२२‘ या कादंबरीत डार्क ह्युमरचा आधार घेऊन मांडलेला मध्यवर्ती मुद्दा हाच आहे.

ससून जरी संतुलित असला तरी आपल्या मनावर युद्धाचे काही ओरखडे उठण्यापासून तो ही स्वत:ला वाचवू शकत नाही. दु:स्वप्ने किंवा मृत सैनिक जवळ उभे आहेत असे भास होणे या त्याच्या लक्षणांच्या मुळाशी जाताना रिव्हर्सला जाणवते की ससून दोन व्यक्तीमत्वांमध्ये वावरतो आहे. रणांगणावर लढतानाही त्याने कविता रचणे थांबवले नव्हते. गंमत अशी की या कविता युद्धाच्या विरोधात, शांततेसाठी होत्या. अतुलनिय शौर्य दाखवून शत्रूपक्षातील सैनिकांना मारणे आणि तिथून परत आल्यावर त्याच्या विरोधात कविता लिहीणे ही दोन्ही कामे तो एकाच वेळी करत होता आणि विशेष म्हणजे युद्धाच्या विरोधात कविता लिहीण्यासाठी त्याला कच्चा माल आपल्याच रणांगणावरील वर्तणुकीतून मिळत होता. हा विरोधाभास दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाचे लक्षण होते, मात्र इथे ससूनला त्याचा त्रास न होता उलट मदत होत होती. एकीकडे कर्तव्यदक्षतेची चाड आणि दुसरीकडे त्या कर्तव्याच्या उद्दीष्टांमधील फोलपणा अशा कात्रीमध्ये सापडल्यावर दोन वेगवेगळ्या आणि परस्परविरोधी भूमिकांमध्ये जगणे हे ससूनच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक होते.

अशा कात्रीमध्ये सापडलेला कवी या भूमिकेत ससून एकटा नव्हता. त्याचा सहकारी विल्फ्रेड ओवेन हा ही अशाच परिस्थितीमध्ये कविता करण्याकडे वळला. क्रेगलॉकहार्टमध्ये ससूनबरोबर असताना त्याला या बाबतीत ससूनचे मार्गदर्शनही लाभले. या दोघांबरोबरच एडवर्ड थॉमस हा पहिल्या महायुद्धादरम्यानचा कवी/सैनिक म्हणून ओळखला जातो. थॉमसला त्याच्या कवितांमधून रणांगणावरील मानसिक तणावांना मोकळी वाट करून देता आली. ‘द घोस्ट रोड’ ही कादंबरी त्याच्या ‘रोड्स’ या कवितेमधील काही ओळींनी सुरु होते. या कादंबरीच्या नावामागेही या ओळींची प्रेरणा आहे असे वाटते.

Now all roads lead to France

And heavy is the tread

Of the living; but the dead

Returning lightly dance

या तीन कादंबर्‍यांमध्ये पॅट बार्कर युद्ध या विषयाकडे वेगवेगळ्या आणि बहुतकरून अपरिचित अशा दृष्टीकोनांमधून बघतात. रिव्हर्स एक सिव्हिलियन आणि मानसोपचार तज्ज्ञ आहे. त्याने युद्ध प्रत्यक्षात अनुभवलेले नाही, मात्र युद्धामुळे सैनिकांच्या मनावर जे परिणाम होतात ते त्याला चांगलेच ठाउक आहेत. ससून, ओवेन आणि प्रायर (काल्पनिक पात्र) हे तिघेही सैनिक आहेत. त्यांचे अनुभव, त्यांची दु:स्वप्ने आणि त्या स्वप्नांचे विश्लेषण यामधून रणांगणावर जे घडते आहे त्याची झलक मिळते. युद्धाबाबत सर्वात अनपेक्षित प्रतिक्रिया लिझीची आहे. तिचा नवरा युद्धावर गेल्यावर त्याच्यापासून सुटका झाली याचा तिला अत्यानंद झाला आहे. म्हणूनच ती म्हणते, “On August 4, 1914, peace broke out.” युद्ध सुरू झाल्यावर त्या काळातील स्त्रियांवरील बरीचशी बंधने शिथील झाली. त्यांच्या दृष्टीने हा काळ एक प्रकारचे स्वातंत्र्यच होते.

त्या काळात घडलेल्या इतर काही महत्वपूर्ण घटना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कादंबर्‍यांमध्ये येतात. युद्धाच्या विरोधात असलेल्या शांततावादी गटांना त्या काळात सरकारकडून तुरूंगवास, एकांतवास असे अत्याचार सहन करावे लागले. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत होती. याचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे ऍलीस व्हील्डन हिला कोणताही सबळ पुरावा नसताना तत्कालीन पंतप्रधान लॉइड जॉर्ज यांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. ‘द आय इन द डोअर’ ही कादंबरी तिची बाजू मांडते.

रिव्हर्स हा एक मानवशास्त्रज्ञही (Anthropologist) होता.  १८९८ मध्ये त्याने ‘टोरेस स्ट्रेट्स’ येथील बेटांवर जाऊन तिथे राहणार्‍या काही प्राचीन जमातींचा अभ्यास केला. ‘द घोस्ट रोड’ या तिसर्‍या कादंबरीत त्याचे तिथले अनुभव आणि प्रायरचे रणांगणावरील अनुभव एकामागून एक दाखवून बार्कर यांनी त्यातील साम्ये आणि विरोधाभास समोर आणला आहे. रिव्हर्सच्या या बेटांवरील वास्तव्यामध्ये एक प्रसंग उल्लेखनीय आहे. किमान संभाषण करण्याइतकी तेथील स्थानिकांची भाषा आत्मसात केल्यानंतर रिव्हर्सला एका बोटीवरील प्रवासात स्थानिकांचा एक गट भेटतो. रिव्हर्स त्यांना विचारतो, “तुमच्याकडे एक गिनी असेल तर ती तुम्ही कुणाबरोबर वाटून घ्याल?” या प्रश्नाची निरनिराळी उत्तरे मिळाल्यावर त्या लोकांच्या नातेसंबंधांची नावे आणि त्यांचे महत्व याचा उलगडा होत असे आणि त्यानंतर त्या अनुषंगाने त्यांना बरेच इतर प्रश्न विचारता येत असत. त्यांच्याकडून हवी ती माहिती मिळाल्यावर रिव्हर्स जायला निघतो तेव्हा त्यांच्यातील एक बाई त्याला थांबवते आणि तिच्या मोडक्यातोडक्या इंग्लिशमध्ये म्हणते, “Your turn.” रिव्हर्सला भाऊ, बहीणी असतात तरीही तो कुणाबरोबरही गिनी वाटून घेणार नाही असे उत्तर देतो. ते लोक आश्चर्यचकित होतात आणि जसजशी रिव्हर्सच्या आयुष्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळत जाते तसतसे ते आयुष्य, त्या चालीरीती त्यांना अधिकाधिक असंबद्ध वाटू लागतात. ही असंबद्धता त्यांना विनोदी वाटते. त्यांची ती अनपेक्षित प्रतिक्रिया पाहून रिव्हर्सला साक्षात्कार होतो – त्याची नैतिक मूल्ये आणि त्या स्थानिकांची नैतिक मूल्ये सारख्याच पातळीवर आहेत. ज्या मूल्यांना त्याने आयुष्यभर जिवापाड जपले ती मूल्ये संदर्भांची चौकट बदलली तर हास्यास्पद ठरतात. ही प्रतिक्रिया किपलिंगच्या ‘व्हाइट मॅन्स बर्डन’च्या अगदी उलट आहे. नंतरही या अनुषंगाने आपण जी मूल्ये, ज्या रीती स्थानिकांवर लादत आहोत त्यांच्याबद्दल रिव्हर्सला अपराधीपणा वाटतो. बेटांना भेट देणारे ख्रिश्चन मिशनरी आपल्याबरोबर अनेक रोग घेऊन येतात आणि स्थानिक लोकांकडे त्या रोगांविरूद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती नसल्याने ते त्या रोगांना बळी पडतात. मिशनर्‍यांची शिकवण आणि त्यांच्या वर्तनामुळे होणार्‍या परिणामांकडे त्यांचे दुर्लक्ष यातील विरोधाभास त्याला बेचैन करतो.

लेखकांनी वेगवेगळे अनुभव घेतल्याशिवाय त्यांचे लेखन कसदार होणार नाही असा समज आहे आणि तो बहुतांशी खरा आहे. फरक इतकाच की अनुभव घेण्यासाठी लेखकाला त्या परिस्थितीतूनच जायला हवे अशी अट नाही. त्याची कल्पनाशक्ती सशक्त असेल तर असे घडू शकते. पॅट बार्कर यांच्या पहिल्या काही कादंबर्‍या स्त्रियांच्या प्रश्नांवर आधारित होत्या. त्या प्रसिद्ध झाल्यानंतर मिडीयाने त्यांना फेमिनिस्ट, मध्यमवर्गीय स्त्रियांवर  लिहीणारी लेखिका असे लेबल देऊन टाकले. याचा उबग येऊन त्यांनी वेगळ्या विषयावर लिहायचे ठरवले. रीजनरेशन त्रिधारा यातून जन्माला आली. बार्कर यांची शैली भीडभाड न ठेवता रोखठोक वर्णन करण्याची आहे. युद्धकाळातील अमानुष आणि अमानवी प्रसंगांचे चित्रण करताना किंवा त्यावर टिप्पणी करताना त्या कोणताही मुलाहिजा बाळगत नाहीत.

She’d never learnt to read the casualty lists over breakfast and then go off and have a perfectly pleasant day as the vast majority of civilians did.

A society that devours it’s own young deserves no automatic or unquestioning allegiance.

सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक कादंबर्‍या किंवा चित्रपटांमधील युद्धाचे चित्रण बेगडी असते. युद्ध म्हणजे लाखो आयुष्ये उध्वस्त करणारी किती विदारक घटना आहे याची जाणीव रीजनरेशन त्रिधारा वाचल्यावर होते. बार्कर यांच्या म्हणण्यानुसार ठराविक आवाज, गंध, प्रकाश, चवी यांच्या सहाय्याने रणांगणावरील वातावरण उभे करता येऊ शकते. एका डोळ्यामधे गोळी लागून ती कानावाटे बाहेर गेल्यावर मेंदूचा काही भाग गमावूनही आठवडाभर जिवंत राहणार सैनिक किंवा विमानातून पॅराशूटने उडी घेतल्यानंतर जमिनीवरील मृत जर्मन सैनिकाच्या पोटात डोके घुसल्यामुळे त्याचे रक्त-मांस यांनी चेहेरा बरबटवून घेणारा सैनिक अशी अंगावर काटा आणणारी वर्णने वाचल्यानंतर बार्कर यांच्या वातावरणनिर्मितीचा खरेपणा जाणवतो. तरीही बहुधा या रणकंदनाला चितारण्यामध्ये शब्द थिटे पडत आहेत याची जाणीव कुठेतरी त्यांना असावी. ‘द घोस्ट रोड’मध्ये प्रायर आपल्या डायरीत म्हणतो,

I honestly think that if the war went on for a hundred years another language would evolve, one that was capable of describing the sound of bombardment or the buzzing of flies on a hot August day on the Somme. There are no words. There are no words for what I felt when I saw the setting Sun rise.

तीनही कादंबर्‍यांमध्ये कथानक सलगपणे पुढे जाते. यामुळे दुसरी किंवा तिसरी कादंबरी पहिल्यांदा वाचली तर तितकाच प्रभाव पडेल का अशी शंका वाटते.

न्युरॉलॉजीमध्ये संशोधन करताना डॉ. रिव्हर्स यांनी त्यांचे सहकारी डॉ. हेन्री हेड यांच्याबरोबर बरेच प्रयोग केले होते. एका प्रयोगात डॉ. हेड यांच्या उजव्या हातामधील चेतातंतू (Nerves) कापून परत शिवण्यात आले. यानंतर चेतातंतूंची वाढ होऊन ते परत पूर्वस्थितीमध्ये येण्याच्या प्रक्रियेला ‘रीजनरेशन’ असे नाव दिले गेले होते. चेतातंतू जुळून येत असताना डॉ. हेड यांच्या हाताची संवेदनशीलता कमालीची वाढली होती. नेहेमी किरकोळ वाटेल अशा स्पर्शानेही त्यांना प्रचंड वेदना होत असत. रीजनरेशन ही एक हळू आणि यातनादायी प्रक्रिया होती.

युद्धातून परत आलेल्या सैनिकांची दुभंगलेली शरीरे आणि मने जुळवण्याचे काम हे ही असेच होते. एका प्रकारचे रीजनरेशन.

—-
१. ‘व्हाइट मॅन्स बर्डन’ उपरोधिक आहे किंवा कसे याबद्दल वाद आहेत. इथे मार्क ट्वेन आणि हेन्री जेम्स यांना प्रमाण मानून कविता गंभीर आहे असे गृहीत धरले आहे.