Categories
बुके वाचिते

‘राग दरबारी’चं मर्मभेदी व्यंग

श्रीलाल शुक्ल यांची कादंबरीवरची पकड जबरदस्त आहे. कोणतंही वर्णन कंटाळवाणं होत नाही. प्रत्येक पात्राचं बारकाईने अचूक व्यक्तिचित्र उभं करण्यात त्यांचा हातखंडा आहे. वाचताना गोनीदांच्या कादंबर्‍यांमधील कोकणी गावकरी आठवतात.

Rag Darbari book cover
Rag Darbari by Sri Lal Shukla

मराठीच्या तुलनेत हिंदी भाषिक अधिक वाचतात आणि लिहितातही. हिंदीतील ब्लॉगलेखन अव्याहतपणे सुरु असतं. जर हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये आढळणारा शब्द गूगलला तर बहुतेक सर्व सायटी हिंदीमध्ये असतात. हिंदीमध्ये कवीसंमेलनांची दीर्घ परंपरा आहे आणि ते लोक ती प्रेमाने जोपासतात. त्यांच्या कविता मर्मभेदी व्यंगाने भरलेल्या असतात. आणि हेच व्यंग श्रीलाल शुक्ल यांच्या ‘राग दरबारी’ या कादंबरीतही बघायला मिळतं.

गोष्ट आहे शिवपालगंज गावातली. रंगनाथ हा इतिहासात एम.ए. केलेला विद्यार्थी. तो काही दिवस आजारी होता. आता बरा झाल्यावर गावाकडच्या ताज्या हवेत प्रकृती सुधारेल या साध्याभोळ्या विचाराने तो शिवपालगंजमध्ये मामाकडे चालला आहे. त्याचे मामा म्हणजे वैद्यजी, शिवपालगंजमधील बडं प्रस्थ. नाही म्हणायला नावाला जागून ते रोग्यांना तपासून पुड्या वगैरे देतात (वीर्यवर्धक पुडी हे त्यांचं खास औषध!) पण त्यांचा खरा व्यवसाय गावातील राजकारण. गावातील छंगामल विद्यालय इंटरकॉलेजच्या प्रबंधसमितीमध्ये त्यांचा दबदबा आहे. कॉलेजचा प्रिंसिपल त्यांना विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही. शिवाय गावातील कोऑपरेटिव्ह युनियनचे ते मॅनेजिग डायरेक्टरही आहेत.

साधारणपणे अशा गावातील गोष्टींमध्ये श्रीमंत लोक वाईट, गरीब लोकांना लुबाडणारे वगैरे असतात. गरीब लोक साधेभोळे, सचोटीने वागणारे असतात. बिमल रॉयच्या ‘दो बिघा जमीन’पासून सत्यजित राय यांच्या ‘सद्गती’पर्यंत थोड्याफार फरकाने हेच चित्र दिसतं. ‘राग दरबारी’मधले गावकरी मात्र एकाहून एक इरसाल आहेत, मग ते गरीब असोत वा श्रीमंत.  श्रीलाल शुक्लही एका  पात्राबद्दल म्हणतात की कालिकाप्रसाद प्रेमचंदांच्या नायकाप्रमाणे लगान घ्यायला आलेल्या अधिकाऱ्याला घाबरणारा नव्हता. शिवपालगंजच्या इरसाल गावकऱ्यांसाठी एक खास शब्द इथे प्रचलित आहे – गंजहा. याचा वापर विशेषण म्हणूनही केला जातो उदा. “गंजहापन झाड़ते हो!”

शेवटची काही प्रकरणे सोडली तर सगळी कादंबरी म्हणजे व्यंगांच्या विविध प्रकारांचा उत्तम नमुना आहे. कादंबरी १९६८ मधली, त्याबद्दल शुक्ल यांना त्या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तेव्हाच्या परिस्थितीशी जितका अधिक परिचय असेल तितके अधिक संदर्भ लागत जातात. अर्थात काही गोष्टी गेल्या सत्तर वर्षात बदललेल्या नाहीतच, उदा. सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव. शुक्ल यांच्या चौफेर फटकेबाजीचे हे काही नमुने

यहाँ सनीचर साँस खींचकर चुप हो गया। रंगनाथ समझ गया कि घटिया कहानी–लेखकों की तरह मुख्य बात पर आते–आते वह हवा बाँध रहा है।

दारोग़ाजी उनकी बड़ी इज़्ज़त करते हैं। वे दारोग़ाजी की इज़्ज़त करते हैं। दोनों की इज़्ज़त प्रिंसिपल साहब करते हैं। कोई साला काम तो करता नहीं है, सब एक–दूसरे की इज़्ज़त करते हैं।

सैनिटरी इन्स्पेक्टर को कई तरह के काम करने पड़ते हैं। वे भी जेब में ‘लैक्टोमीटर’ डालकर घूमते और राजहंसों की तरह नीर–क्षीर–विवेक करते हुए नीर–क्षीर में भेद न करनेवाले ग्वालों के मोती चुगा करते।

तर मध्येच एखाद्या कवीला शोभेल असं वाक्य.

सन्ध्या का बेमतलब सुहावना समय था।

कादंबरी मी किंडल ऍपवर वाचली. याचा एक फायदा असा की अडलेला शब्द तर बघता येतोच शिवाय झाड, प्राणी, पक्षी यांचा उल्लेख असेल तर ‘सर्च’ हा पर्याय निवडला तर गुगलल्यानंतर चित्रही दिसतं. उदा. हे वाक्य, “काँसों की फुनगियाँ एक जगह पगडण्डी के आर–पार झूल रही थीं।” इथे ‘काँस’ शब्द हायलाईट करून शोधला तर हे चित्र दिसलं.

कुश / काँस घास (Thatch grass / Kans Grass)

मग म्हटलं, अरेच्चा, हे तर ‘पाथेर पांचाली’मधल्या ‘ट्रेन सीन’ मधलं गवत!

सध्याच्या कादंबऱ्यांमध्ये विस्तृत वर्णनं देण्याची पद्धत आहे. नुकताच ‘देल्ही न्वार’ हा इंग्रजी कथासंग्रह वाचला. कथा चांगल्या आहेत, दिल्लीच्या गुन्हेगारीवर. पण बरेचदा लेखकांना कशाचं वर्णन करावं आणि ते किती करावं याचं भान सुटलेलं दिसतं. मग ते कंटाळवाणं होऊन जातं. किंवा काही लेखक आधुनिकतेची कास घेऊन मला वाटेल ते मी लिहिणार, याचा काय अर्थ लावायचा तो लावा असा पवित्रा घेतात. अशा वेळी मी फारतर शेवटी काय होतं ते बघतो आणि त्या लेखकाला रामराम म्हणतो.

गेल्या काही वर्षांमध्ये इंग्रजी भाषेत भारतीय लेखक बरंच लिहीत आहेत. विक्रम सेठपासून सलमान रश्दीपर्यंत अनेक गाजलेली नावं. इथे एक मुख्य अडचण ही आहे की भारतात अंदाजे १२% लोक इंग्रजी बोलतात. इंग्रजीत लिहिणारे लेखक साधारणपणे समाजाच्या वरच्या स्तरातून येतात आणि साहजिकच ते त्या जगाबद्दल लिहितात. भारतातील अठरापगड जाती, त्यांच्या भाषा, चालीरीती यांचं अस्सल चित्र उभं करायचं तर लेखकही त्याच मातीतला हवा. शहरी लेखकांना हे जमणे शक्य नाही. म्हणून भारतातील इतर भाषांमधलं साहित्य इंग्रजीत अनुवादित व्हायला हवं. इथे दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे अनुवादही तितका सकस हवा. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे विवेक शानभाग यांची कन्नड भाषेतील कादंबरी ‘घाचर घोचर.’ याबद्दल गिरीश कर्नाड म्हणतात, “The translation by Srinath Perur unerringly captures the shifting nuances that make Shanbhag’s telling so rich. Having read and admired the original Kannada, I was surprised how quickly Perur made me forget that I was reading a translation.”

श्रीलाल शुक्ल यांची कादंबरीवरची पकड जबरदस्त आहे. कोणतंही वर्णन कंटाळवाणं होत नाही. प्रत्येक पात्राचं बारकाईने अचूक व्यक्तिचित्र उभं करण्यात त्यांचा हातखंडा आहे. वाचताना गोनीदांच्या कादंबर्‍यांमधील कोकणी गावकरी आठवतात. लप्पन हा वैद्यजींचा मुलगा. प्रेमपत्र लिहिताना तो फक्त गाण्यांचे मुखडे लिहितो. किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल रागावले की हिंदी सोडून अवधीमध्ये बोलतात. लंगडला तहसीलदाराच्या हापिसातून एका दस्तावेजाची नक्कल हवी आहे पण त्यासाठी लाच देणार नाही असा त्याचा  ठाम निश्चय आहे. दर वेळी तो अर्ज देतो आणि कुठल्याश्या कारणावरून अर्ज नामंजूर होतो. हे असंच चालू रहातं.

सगळं वर्णन नर्मविनोदी, उपहासात्मक शैलीत करणारी ‘राग दरबारी’ शेवटी गंभीर होते. रंगनाथ सुरुवातीला गावातलं राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यात काही प्रमाणात सहभागीही होतो. शेवटी मात्र त्याला कळून चुकतं की इथे आपलं जमणं शक्य नाही. इथून लवकरात लवकर निघावं हेच बरं. त्याला प्रिन्सिपल छंगामल विद्यालयात नोकरीची ऑफर देतो ती तो धुडकावून लावतो. त्यावर प्रिन्सिपल म्हणतो, ‘‘बाबू रंगनाथ, तुम्हारे विचार बहुत ऊँचे हैं। पर कुल मिलाकर उससे यही साबित होता है कि तुम गधे हो।’’