Categories
इतर

माझे आवडते इटालियन पदार्थ

. पहिला पदार्थ अर्थातच पिझ्झा. इटलीला जाण्याआधी मी डॉमिनोजचा पिझ्झा खाल्ला होता. इटलीला जो पिझ्झा मिळतो त्यात आणि डॉमिनोज पिझ्झामध्ये फारसं साम्य नाही. मला बहुतेक पिझ्झ्यांचं भारतीय रूप आवडत नाहीम्हणजे पनीर किंवा इतर भारतीय मसाले घालून केलेलं. इटालियन पिझ्झा दिसायला ओबडधोबड असतो, त्यात टॉपिंग नावाचा प्रकार नसतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा पिझ्झा भट्टीत केलेला असतो त्यामुळे कधीकधी थोडासा जळालेला असतो. समजा म्याकडोनाल्डने झुणका-भाकरीची फ्रॅंचाईझ घेतली आणि निर्जंतुक वातावरणात यंत्राने भाकऱ्या केल्या तर त्यात आणि बायजाबाईने केलेल्या चुलीवरच्या भाकऱ्यांच्या चवीत जो फरक असेल तोच इथेही आहे. इटलीमध्ये प्रत्येक भागात मिळणाऱ्या पिझ्झाची चव वेगळी असते. नेपल्स ही पिझ्झाची जन्मभूमी. तिथला पिझ्झा अवर्णनीय असतो. बहुतेक वेळा इटालियन पिझ्झा कापू देत नाहीत त्यामुळे सुरीने आपल्यालाच कापावा लागतो.

Neapolitan pizza
नेपल्सचा पिझ्झा मार्गारिटा

याखेरीज तिथे दुकानात पिझ्झाचे चतकोर तुकडेही विकतात. वेगवेगळ्या चवीचे दोन-तीन तुकडे घेतले तर मजा येते.

२. इटलीच्या लिगुरिया भागात​ (पश्चिम इटली) फोकाच्या (Focaccia) नावाचा पदार्थ मिळतो. फोकाच्या हा ब्रेडचाच एक प्रकार आहे. पीठ, ऑलिव्हचं तेल आणि वेगवेगळ्या प्रकारचं मीठ. ताजा खाल्ला तर नरम, वाळलेलाही छान लागतो. हा सँडविचसाठीही वापरता येतो.

Focaccia
फोकाच्या

३. रिझोत्तो आल फुंगी (Risotto al funghi) म्हणजे मश्रूम आणि भात. इटालियन जेवणाचं एका वैशिष्ट्य म्हणजे मसाले फारसे नसतात त्यामुळे बहुतेक पदार्थ त्यांच्या मूळ चवीनुसार लागतात. इथे मश्रूम आणि कांदा ऑलिव्हच्या तेलात आणि/किंवा लोण्यात परतून घेतात. कधी थोडी व्हाइट वाईनही घालता. मग त्यात चिकन किंवा इतर ब्रॉथ घालून तांदूळ घालतात आणि शिजवतात. नंतर वरून पार्मेजान चीज.

risotto al funghi
रिझोत्तो आल फुंगी

४. तिरामिसु (Tiramisu). यात कॉफी, अंडी, साखर आणि मस्कारपोने चीज यांचं मिश्रण. मग वरून कोकोची पावडर पेरायची. मला गोड फारसं आवडत नाही पण तिरामिसु आवडतं.

Tiramisu
तिरामिसु

५. एखाद्या वाईनची चव कशी आहे हे नेमकं सांगण्यासाठी इग्रजीत खास वेगळे शब्द आहेत. मराठीत हे शब्द नसताना वाईनची चव सांगणं अशक्य आहे. मला दोन वाईन आवडतात – कियांती क्लासिको (Chianti Classico) आणि प्रिमितिव्हो (Primitivo). दोन्ही रेड वाईन आहेत.

Chianti Classico
कियांती क्लासिको (Chianti Classico)

सर्व चित्रे विकी/गूगलवरुन साभार.

Categories
चित्रपट​

तुंबाड : एक थरारक प्रवास

‘तुंबाड’विषयी बोलायचं झालं तर अनेक गोष्टी उल्लेखनीय आहेत. पहिलं म्हणजे याचा जॉन्र. बॉलिवूडला काही प्रकारच्या चित्रपटांचं वावडं आहे. उदा. हिंदी चित्रपटसृष्टीत शेरलॉक होम्स, एर्क्यूल प्वारो किंवा अगदी आपले देशी ब्योमकेश बक्षी यांची गादी चालवू शकेल असं कुणीही नाही. बॉलिवूडला डिटेक्टिव्ह फारसे रुचत नाहीत. तीच गट भयपटांची. नाही म्हणायला रामसे बंधूंनी ‘शैतानी दरवाजा’ वगैरे काढले पण त्यात राम तर सोडा, सीता, सुग्रीव किंवा जाम्बुवंतही नव्हते. नुकतेच आलेले ‘स्त्री’सारखे अपवाद सोडले तर बॉलिवूडमध्ये भयपटांची वानवाच असते.

‘तुंबाड’नं हे बदललं आणि असं बदललं की ‘एक ही मारा लेकिन सॉलिड मारा’. त्यांनी केवळ भयपट केला नाही तर त्याला गूढ दंतकथेची जोड दिली. हे बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही झालेलं नाही. (‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’मध्ये काही गडद छटा आहेत पण एकूणात चित्रपट रोमांचकारी साहसपट आहेत.)

“लोकेशन, लोकेशन, लोकेशन!”

रिअल इस्टेटचा हा मूलमंत्र चित्रपटांनाही लागू पडतो. आपल्या चित्रपटांमध्ये कोकणभाग किती दुर्लक्षित आहे हे लक्षात आलं तेव्हा खुर्चीवरून खाली पडायचा बाकी होतो. शिमला, काश्मीर इथला इंच न इंच कुठल्यातरी चित्रपटात दाखविला गेला आहे. तीच गत स्वित्झर्लंड किंवा इटलीची. तुंबाड महाराष्ट्राच्या कोकण आणि पुण्याजवळच्या निसर्गरम्य भागात चित्रित केला आहे आणि बघताना डोळे सुखावतात.

डोळे सुखावतात याचं कारण अप्रतिम छायांकन (cinematography). या तोडीचं छायांकन हिंदी चित्रपटात यापूर्वी बघितल्याचं आठवत नाही. बरंचसं चित्रीकरण पावसाळ्यात, खऱ्या पावसात केलं गेलं आणि यासाठी चार पावसाळे खर्ची पडले. पूर्ण चित्रपटाला सहा वर्षे लागली. हे करायला अमर्याद संयम आणि कामाप्रति असीम​ निष्ठा यांची गरज असते.

सोहम शाह, आनंद एल. राय, आनंद गांधी, मुकेश शाह, अमिता शाह (निर्माते), राही अनिल बर्वे, आनंद गांधी (दिग्दर्शक), पंकज कुमार (छायांकन), मितेश शाह, आदेश प्रसाद, राही अनिल बर्वे, आनंद गांधी (पटकथा), राज शेखर (गीतकार), अजय-अतुल, जेस्पर किड (संगीतकार), संयुक्त काझा (संकलन) आणि चित्रपटाची सर्व टीम यांचं मन:पूर्वक अभिनंदन. या सर्वांची नावे देण्याचं कारण हे की ही मंडळी नेहेमी पडद्यामागेच राहतात. अभिनेते आणि दिग्दर्शक यांची नावे सर्वच समीक्षक देतात. संकलक,छायाचित्रकार आणि गीतकार यांची नावे एखादवेळेस द्यायला काय हरकत आहे?

तुंबाड रूढार्थाने भयपट असला तरी चित्रपटात ठाशीव भयप्रसंग कमीच आहेत. त्याऐवजी वातावरण आणि प्रेक्षकांच्या कल्पनेतून भयनिर्मिती केली आहे. लोकेशनबद्दल बोलायचं तर बघूनच जागा झपाटलेल्या आहेत असं वाटतं. बहुतेक चित्रपट वाड्यांमध्ये घडतो. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी असे निर्जन वाडे शोधले जिथे चिटपाखरूही नव्हतं. ते जीर्ण वाडे, करकरणारे दरवाजे, गंजलेली कुलुपे. चित्रपटात छोट्या-छोट्या गोष्टींकडेही पूर्ण लक्ष दिलेलं आहे.

चित्रपटाचा मुख्य हेतू भयनिर्मिती असला तरी नीट पाहिलं तर त्यात त्या काळाच्या अन्यायांचंही चित्रण दिसतं. उदा. विनायक राव (सोहम शाह) याचं नंतरच्या काळातील घर. घरात बायको, तीन मुलं आणि एक रखेल. बायकोची स्थिती एका मोलकरणीपेक्षा वेगळी नाही आणि रखेल  घरावर सत्ता गाजवते आहे. गंमत म्हणजे ती घरात आली तेव्हा परिस्थिती नेमकी उलटी होती. विनायकाचा मुलगा सदाशिव (रुद्र सोनी). हा तुमच्या बॉलिवूड किंवा हॉलिवूडमध्ये नेहेमी मुलं दिसतात तसा निष्पाप, निरागस मुळीच नाही. पौगंडावस्थेतील मुलांच्या मनोव्यापारात डोकावण्याचं धाडस भलेभले दिग्दर्शक करत नाहीत. इथे ते केलंय. स्पिलबर्गचा ‘एम्पायर ऑफ द सन‘ हा एक उल्लेखनीय अपवाद.

इतकी मेहनत करूनही चित्रपटाने केवळ ₹१३.५७ कोटींचा गल्ला जमवला. शिरा पडों हेंच्या तोंडार! आपल्या प्रेक्षकांनी ‘माझिया प्रियाला, मला आणि प्रेक्षकांना काहीच कळेना’ याचे ७६४ भागच बघावेत. सुदैवाने ओटीटीवर हा चित्रपट आहे आणि बराच काळ राहील. पूर्वीच्या चित्रपट पडला की शब्दश: डब्यात जायचा. आता ती वेळ येत नाही.

चांदोबातल्या गोष्टीत राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा माझा जीव चित्रपटात कोणती भाषा बोलत आहेत याकडे लागलेला असतो. कथा मराठी माणसांची, महाराष्ट्रातली तरीही पात्रे हिंदी बोलतात कारण हा हिंदी चित्रपट आहे. बहुतेकवेळा हे वैतागवाणं होतं उदा. गमन हा चित्रपट. पण इथे तसं झालं नाही. एकतर चित्रपट इतक्या पातळींवर उत्कृष्ट आहे की या छोट्याशा तपशीलाबद्दल फारसं काही वाटत नाही. आणि दुसरं म्हणजे चित्रपटात संवाद मुळातच कमी आहेत.

तरीही मराठीत हा चित्रपट कसा वाटला असता हा विचार मनात आल्यावाचून रहात नाही. माझ्या मते आदर्श चित्रपटात प्रत्येक पात्र त्याला नैसर्गिकपणे जी भाषा येते ती बोलेल. ‘दि लोंगेस्ट डे‘ हा असा एक चित्रपट.

श्री. ना. पेंडसेंच्या ‘तुंबाडचे खोत’वरून तुंबाड हा शब्द घेतला आहे. कथा नारायण धारप यांच्या एका कथेवर बेतलेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी लेखकांना फारसं स्थान मिळालेलं नाही – विजय तेंडुलकर किंवा महेश एलकुंचवार हे सन्माननीय अपवाद. भविष्यात गोनीदा, जयवंत दळवी किंवा जीएंच्या कथा रुपेरी पडद्यावर बघायला मिळतील अशी आशा आहे.

Categories
इतिहास​ बुके वाचिते

पहिल्या महायुद्धाचे भीषण, विदारक चित्रण : रीजनरेशन त्रिधारा

१९१७ सालच्या जुलै महिन्यात सिगफ्राइड ससून या ब्रिटीश सैन्यदलातील अधिकार्‍याने आपल्या वरिष्ठ​ अधिकार्‍यांना उद्देशून एक निवेदन केले. हे निवेदन म्हणजे या एकांड्या शिलेदाराची बंडखोरी होती.

Siegfried Sassoon
सिगफ्राइड ससून

“मी या स्वेच्छेने केलेल्या निवेदनाद्वारे सैन्यदलाच्या अधिकाराचा विरोध करत आहे, कारण युद्ध थांबवण्याची ज्यांची क्षमता आहे त्यांच्याकडूनच युद्ध लांबवले जाते आहे असे मला वाटते.  युद्धातील सैनिकांचे होणारे हाल मला बघवत नाहीत आणि म्हणूनच ही परिस्थिती चालू ठेवण्यामध्ये मला सहभागी व्हायचे नाही. युद्ध ज्या कारणांसाठी सुरू आहे ती कारणे आता अमानुष आणि अनैतिक बनली आहेत. या सर्वांच्या मुळाशी राजकीय पातळीवरील घेतले गेलेले चुकीचे आणि खोटारडे निर्णय आहेत. याचा परिणाम म्हणून यातना भोगणार्‍या सर्वांच्या वतीने मी या फसवणुकीचा निषेध करत आहे. याचबरोबर मायदेशात असलेल्या बहुसंख्य सामान्य जनतेचा युद्धामुळे सैनिकांना होणार्‍या यातनांकडे बघण्याचा उथळ दृष्टीकोन बदलण्यात मला यश येईल अशी मी आशा करतो. या यातना सामान्यांना भोगाव्या लागत नाहीत आणि त्या भोगणार्‍यांचे हाल समजण्याइतकी कल्पनाशक्तीही त्यांच्याकडे नाही.”

साधारण असा या पत्राचा आशय होता. हे पत्र लिहीण्यास ससूनला विचारवंत बर्ट्रांड रसेल आणि लेखक जॉन मरी यांनी मदत केली. या पत्राच्या प्रती वृत्तपत्रांना पाठवण्यात आल्या, तसेच इंग्लंडच्या संसदेतही हे पत्र वाचले गेले. सेकंद लेफ्टनंट ससूनने फ्रान्समध्ये तिसर्‍या बटालियनकडून लढताना दीड तास जर्मन फौजांचा मारा चुकवित सर्व जखमी सैनिकांना सुरक्षित स्थळी आणण्याची महत्वाची कामगिरी बजावली होती. यासाठी त्याचा मिलिटरी क्रॉस देऊन सन्मान करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ससूनचे कोर्ट मार्शल न करता मानसिक संतुलन बिघडल्याचा शेरा देऊन त्याची क्रेगलॉकहार्ट येथील मनोरूग्णालयात रवानगी करण्यात आली.  क्रेगलॉकहार्ट रूग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रिव्हर्स यांनी त्याचा ताबा घेतला.

इतिहासात या आणि अशा त्रोटक, कोरड्या नोंदी आहेत. जुलै १९१७ ते युद्ध संपेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर १९१८ या काळात रिव्हर्स, ससून आणि काही इतर संबंधित व्यक्तींच्या आयुष्यात काय घडले याचे काल्पनिक पण तथ्यांपासून फारकत न घेता केले चित्रण  ‘रीजनरेशन ट्रिलॉजी’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या तीन कादंबर्‍यांमध्ये ब्रिटीश लेखिका पॅट बार्कर यांनी केले आहे. ‘रीजनरेशन’, ‘द आय इन द डोअर’ आणि ‘द घोस्ट रोड’ या त्या तीन कादंबर्‍या. तिसर्‍या कादंबरीबद्दल त्यांना १९९५ मध्ये बुकर पारितोषिकाने गौरवण्यात आले.

Regeneration by Pat Barker

पहिल्या कादंबरीची सुरूवातच या पत्राने होते. नंतर ससून रिव्हर्सकडे आल्यावर तो चहा, दूध कपात ओतत असताना रिव्हर्स त्याचे बारकाईने निरिक्षण करीत असतो. त्याचे हात थरथरत आहेत का, त्याच्या हालचालींमध्ये झटके आहेत का, बॉंबच्या सतत आवाजाचा परिणाम म्हणून तो दचकतो आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी मिळतात. ससूनमध्ये मानसिक संतुलन बिघडल्याचे कुठलेही चिन्ह नसते. उलट तो एक विवेकी, हुषार, देशभक्त तरूण आणि शिवाय एक संवेदनशील कवीही असतो. त्याच्या कविता प्रसिद्ध झालेल्या असतात. अपेक्षेच्या विरूद्ध असा त्याचा स्वभाव पाहून रिव्हर्स काहीसा संभ्रमात पडतो. ससूनच्या मानसिक आंदोलनांच्या मुळाशी जाताना रिव्हर्सला ज्यांची उत्तरे व्यवस्थेमध्ये राहून देणे शक्य नाही असे काही प्रश्न पडतात.

कादंबरीत बिली प्रायर हे सैनिकाचे काल्पनिक पात्र आहे. प्रायर रिव्हर्सला विचारतो, “तुम्ही आम्हाला भावना दाबून ठेवू नका असे सांगता. रणांगणावर आम्ही आमच्या भावनांना मोकळी वाट करून दिली तर तिथे आमचा एक दिवसही पाडाव लागणार नाही.” रणांगणावर मानसिक परिणाम न होता लढू शकणारा सैनिक फक्त तो असतो ज्याच्या सर्व संवेदना बोथट झाल्या आहेत. अशा सैनिकाचे वर्णन करताना ‘अपोकॅलिप्स नाऊ’ मध्ये मार्लन ब्रॅंडो म्हणतो,

“You have to have men who are moral… and at the same time who are able to utilize their primordial instincts to kill without feeling… without passion… without judgment… without judgment. Because it’s judgment that defeats us.”

पण असा अमानुष सैनिक मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून निरोगी म्हणता येईल का? मानसोपचार तज्ञाचे पहिले काम म्हणजे रूग्णाला सुरक्षित आयुष्य जगता यावे यासाठी तयार करणे. पण इथे रिव्हर्स नेमके उलटे करत होता. युद्धामधील अमानुष अनुभवांना सामोरे गेल्यानंतर सैनिकांना अनेक प्रकारचे मानसिक आजार होत होते. वाचा बसणे, धक्क्यामुळे अर्धांगवायू होणे, बोलण्यात तोतरेपणा येणे, रात्री असह्य दु:स्वप्ने. माणसाला सहन करणे अशक्य व्हावे अशा परिस्थितीमध्ये सतत राहील्यावर असे आजार होणे हा त्या सैनिकांच्या मेंदूने केलेला एक प्रकारचा बचाव होता. पण असे झाल्यानंतर ते रूग्णालयात आले की रिव्हर्स त्यांना पूर्वपदावर आणत होता ते कशासाठी? परत मृत्युच्या खाईत लोटायला? मानसोपचार आणि सैन्यदल यांची उद्दिष्टे परस्परविरोधी असली (जशी ती इथे होती) तर सैन्यदलात काम करणार्‍या मानसोपचार तज्ञाने हा नैतिक पेच कसा सोडवावा?

अशा परिस्थितीत ससूनने हे युद्ध आणि त्यामुळे होणारी जिवितहानी व्यर्थ आहे असा निष्कर्ष काढला तर त्यात काय चूक आहे? पण असे केल्यावर त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे असे ठरवून त्याला मनोरूग्णालयात पाठवण्यात आले होते. जोसेफ हेलरने ‘कॅच-२२‘ या कादंबरीत डार्क ह्युमरचा आधार घेऊन मांडलेला मध्यवर्ती मुद्दा हाच आहे.

ससून जरी संतुलित असला तरी आपल्या मनावर युद्धाचे काही ओरखडे उठण्यापासून तो ही स्वत:ला वाचवू शकत नाही. दु:स्वप्ने किंवा मृत सैनिक जवळ उभे आहेत असे भास होणे या त्याच्या लक्षणांच्या मुळाशी जाताना रिव्हर्सला जाणवते की ससून दोन व्यक्तीमत्वांमध्ये वावरतो आहे. रणांगणावर लढतानाही त्याने कविता रचणे थांबवले नव्हते. गंमत अशी की या कविता युद्धाच्या विरोधात, शांततेसाठी होत्या. अतुलनिय शौर्य दाखवून शत्रूपक्षातील सैनिकांना मारणे आणि तिथून परत आल्यावर त्याच्या विरोधात कविता लिहीणे ही दोन्ही कामे तो एकाच वेळी करत होता आणि विशेष म्हणजे युद्धाच्या विरोधात कविता लिहीण्यासाठी त्याला कच्चा माल आपल्याच रणांगणावरील वर्तणुकीतून मिळत होता. हा विरोधाभास दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाचे लक्षण होते, मात्र इथे ससूनला त्याचा त्रास न होता उलट मदत होत होती. एकीकडे कर्तव्यदक्षतेची चाड आणि दुसरीकडे त्या कर्तव्याच्या उद्दीष्टांमधील फोलपणा अशा कात्रीमध्ये सापडल्यावर दोन वेगवेगळ्या आणि परस्परविरोधी भूमिकांमध्ये जगणे हे ससूनच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक होते.

अशा कात्रीमध्ये सापडलेला कवी या भूमिकेत ससून एकटा नव्हता. त्याचा सहकारी विल्फ्रेड ओवेन हा ही अशाच परिस्थितीमध्ये कविता करण्याकडे वळला. क्रेगलॉकहार्टमध्ये ससूनबरोबर असताना त्याला या बाबतीत ससूनचे मार्गदर्शनही लाभले. या दोघांबरोबरच एडवर्ड थॉमस हा पहिल्या महायुद्धादरम्यानचा कवी/सैनिक म्हणून ओळखला जातो. थॉमसला त्याच्या कवितांमधून रणांगणावरील मानसिक तणावांना मोकळी वाट करून देता आली. ‘द घोस्ट रोड’ ही कादंबरी त्याच्या ‘रोड्स’ या कवितेमधील काही ओळींनी सुरु होते. या कादंबरीच्या नावामागेही या ओळींची प्रेरणा आहे असे वाटते.

Now all roads lead to France

And heavy is the tread

Of the living; but the dead

Returning lightly dance

या तीन कादंबर्‍यांमध्ये पॅट बार्कर युद्ध या विषयाकडे वेगवेगळ्या आणि बहुतकरून अपरिचित अशा दृष्टीकोनांमधून बघतात. रिव्हर्स एक सिव्हिलियन आणि मानसोपचार तज्ज्ञ आहे. त्याने युद्ध प्रत्यक्षात अनुभवलेले नाही, मात्र युद्धामुळे सैनिकांच्या मनावर जे परिणाम होतात ते त्याला चांगलेच ठाउक आहेत. ससून, ओवेन आणि प्रायर (काल्पनिक पात्र) हे तिघेही सैनिक आहेत. त्यांचे अनुभव, त्यांची दु:स्वप्ने आणि त्या स्वप्नांचे विश्लेषण यामधून रणांगणावर जे घडते आहे त्याची झलक मिळते. युद्धाबाबत सर्वात अनपेक्षित प्रतिक्रिया लिझीची आहे. तिचा नवरा युद्धावर गेल्यावर त्याच्यापासून सुटका झाली याचा तिला अत्यानंद झाला आहे. म्हणूनच ती म्हणते, “On August 4, 1914, peace broke out.” युद्ध सुरू झाल्यावर त्या काळातील स्त्रियांवरील बरीचशी बंधने शिथील झाली. त्यांच्या दृष्टीने हा काळ एक प्रकारचे स्वातंत्र्यच होते.

त्या काळात घडलेल्या इतर काही महत्वपूर्ण घटना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कादंबर्‍यांमध्ये येतात. युद्धाच्या विरोधात असलेल्या शांततावादी गटांना त्या काळात सरकारकडून तुरूंगवास, एकांतवास असे अत्याचार सहन करावे लागले. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत होती. याचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे ऍलीस व्हील्डन हिला कोणताही सबळ पुरावा नसताना तत्कालीन पंतप्रधान लॉइड जॉर्ज यांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. ‘द आय इन द डोअर’ ही कादंबरी तिची बाजू मांडते.

रिव्हर्स हा एक मानवशास्त्रज्ञही (Anthropologist) होता.  १८९८ मध्ये त्याने ‘टोरेस स्ट्रेट्स’ येथील बेटांवर जाऊन तिथे राहणार्‍या काही प्राचीन जमातींचा अभ्यास केला. ‘द घोस्ट रोड’ या तिसर्‍या कादंबरीत त्याचे तिथले अनुभव आणि प्रायरचे रणांगणावरील अनुभव एकामागून एक दाखवून बार्कर यांनी त्यातील साम्ये आणि विरोधाभास समोर आणला आहे. रिव्हर्सच्या या बेटांवरील वास्तव्यामध्ये एक प्रसंग उल्लेखनीय आहे. किमान संभाषण करण्याइतकी तेथील स्थानिकांची भाषा आत्मसात केल्यानंतर रिव्हर्सला एका बोटीवरील प्रवासात स्थानिकांचा एक गट भेटतो. रिव्हर्स त्यांना विचारतो, “तुमच्याकडे एक गिनी असेल तर ती तुम्ही कुणाबरोबर वाटून घ्याल?” या प्रश्नाची निरनिराळी उत्तरे मिळाल्यावर त्या लोकांच्या नातेसंबंधांची नावे आणि त्यांचे महत्व याचा उलगडा होत असे आणि त्यानंतर त्या अनुषंगाने त्यांना बरेच इतर प्रश्न विचारता येत असत. त्यांच्याकडून हवी ती माहिती मिळाल्यावर रिव्हर्स जायला निघतो तेव्हा त्यांच्यातील एक बाई त्याला थांबवते आणि तिच्या मोडक्यातोडक्या इंग्लिशमध्ये म्हणते, “Your turn.” रिव्हर्सला भाऊ, बहीणी असतात तरीही तो कुणाबरोबरही गिनी वाटून घेणार नाही असे उत्तर देतो. ते लोक आश्चर्यचकित होतात आणि जसजशी रिव्हर्सच्या आयुष्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळत जाते तसतसे ते आयुष्य, त्या चालीरीती त्यांना अधिकाधिक असंबद्ध वाटू लागतात. ही असंबद्धता त्यांना विनोदी वाटते. त्यांची ती अनपेक्षित प्रतिक्रिया पाहून रिव्हर्सला साक्षात्कार होतो – त्याची नैतिक मूल्ये आणि त्या स्थानिकांची नैतिक मूल्ये सारख्याच पातळीवर आहेत. ज्या मूल्यांना त्याने आयुष्यभर जिवापाड जपले ती मूल्ये संदर्भांची चौकट बदलली तर हास्यास्पद ठरतात. ही प्रतिक्रिया किपलिंगच्या ‘व्हाइट मॅन्स बर्डन’च्या अगदी उलट आहे. नंतरही या अनुषंगाने आपण जी मूल्ये, ज्या रीती स्थानिकांवर लादत आहोत त्यांच्याबद्दल रिव्हर्सला अपराधीपणा वाटतो. बेटांना भेट देणारे ख्रिश्चन मिशनरी आपल्याबरोबर अनेक रोग घेऊन येतात आणि स्थानिक लोकांकडे त्या रोगांविरूद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती नसल्याने ते त्या रोगांना बळी पडतात. मिशनर्‍यांची शिकवण आणि त्यांच्या वर्तनामुळे होणार्‍या परिणामांकडे त्यांचे दुर्लक्ष यातील विरोधाभास त्याला बेचैन करतो.

लेखकांनी वेगवेगळे अनुभव घेतल्याशिवाय त्यांचे लेखन कसदार होणार नाही असा समज आहे आणि तो बहुतांशी खरा आहे. फरक इतकाच की अनुभव घेण्यासाठी लेखकाला त्या परिस्थितीतूनच जायला हवे अशी अट नाही. त्याची कल्पनाशक्ती सशक्त असेल तर असे घडू शकते. पॅट बार्कर यांच्या पहिल्या काही कादंबर्‍या स्त्रियांच्या प्रश्नांवर आधारित होत्या. त्या प्रसिद्ध झाल्यानंतर मिडीयाने त्यांना फेमिनिस्ट, मध्यमवर्गीय स्त्रियांवर  लिहीणारी लेखिका असे लेबल देऊन टाकले. याचा उबग येऊन त्यांनी वेगळ्या विषयावर लिहायचे ठरवले. रीजनरेशन त्रिधारा यातून जन्माला आली. बार्कर यांची शैली भीडभाड न ठेवता रोखठोक वर्णन करण्याची आहे. युद्धकाळातील अमानुष आणि अमानवी प्रसंगांचे चित्रण करताना किंवा त्यावर टिप्पणी करताना त्या कोणताही मुलाहिजा बाळगत नाहीत.

She’d never learnt to read the casualty lists over breakfast and then go off and have a perfectly pleasant day as the vast majority of civilians did.

A society that devours it’s own young deserves no automatic or unquestioning allegiance.

सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक कादंबर्‍या किंवा चित्रपटांमधील युद्धाचे चित्रण बेगडी असते. युद्ध म्हणजे लाखो आयुष्ये उध्वस्त करणारी किती विदारक घटना आहे याची जाणीव रीजनरेशन त्रिधारा वाचल्यावर होते. बार्कर यांच्या म्हणण्यानुसार ठराविक आवाज, गंध, प्रकाश, चवी यांच्या सहाय्याने रणांगणावरील वातावरण उभे करता येऊ शकते. एका डोळ्यामधे गोळी लागून ती कानावाटे बाहेर गेल्यावर मेंदूचा काही भाग गमावूनही आठवडाभर जिवंत राहणार सैनिक किंवा विमानातून पॅराशूटने उडी घेतल्यानंतर जमिनीवरील मृत जर्मन सैनिकाच्या पोटात डोके घुसल्यामुळे त्याचे रक्त-मांस यांनी चेहेरा बरबटवून घेणारा सैनिक अशी अंगावर काटा आणणारी वर्णने वाचल्यानंतर बार्कर यांच्या वातावरणनिर्मितीचा खरेपणा जाणवतो. तरीही बहुधा या रणकंदनाला चितारण्यामध्ये शब्द थिटे पडत आहेत याची जाणीव कुठेतरी त्यांना असावी. ‘द घोस्ट रोड’मध्ये प्रायर आपल्या डायरीत म्हणतो,

I honestly think that if the war went on for a hundred years another language would evolve, one that was capable of describing the sound of bombardment or the buzzing of flies on a hot August day on the Somme. There are no words. There are no words for what I felt when I saw the setting Sun rise.

तीनही कादंबर्‍यांमध्ये कथानक सलगपणे पुढे जाते. यामुळे दुसरी किंवा तिसरी कादंबरी पहिल्यांदा वाचली तर तितकाच प्रभाव पडेल का अशी शंका वाटते.

न्युरॉलॉजीमध्ये संशोधन करताना डॉ. रिव्हर्स यांनी त्यांचे सहकारी डॉ. हेन्री हेड यांच्याबरोबर बरेच प्रयोग केले होते. एका प्रयोगात डॉ. हेड यांच्या उजव्या हातामधील चेतातंतू (Nerves) कापून परत शिवण्यात आले. यानंतर चेतातंतूंची वाढ होऊन ते परत पूर्वस्थितीमध्ये येण्याच्या प्रक्रियेला ‘रीजनरेशन’ असे नाव दिले गेले होते. चेतातंतू जुळून येत असताना डॉ. हेड यांच्या हाताची संवेदनशीलता कमालीची वाढली होती. नेहेमी किरकोळ वाटेल अशा स्पर्शानेही त्यांना प्रचंड वेदना होत असत. रीजनरेशन ही एक हळू आणि यातनादायी प्रक्रिया होती.

युद्धातून परत आलेल्या सैनिकांची दुभंगलेली शरीरे आणि मने जुळवण्याचे काम हे ही असेच होते. एका प्रकारचे रीजनरेशन.

—-
१. ‘व्हाइट मॅन्स बर्डन’ उपरोधिक आहे किंवा कसे याबद्दल वाद आहेत. इथे मार्क ट्वेन आणि हेन्री जेम्स यांना प्रमाण मानून कविता गंभीर आहे असे गृहीत धरले आहे.

Categories
चित्रपट​

डायरेक्टर्स कट : ऑल द प्रेसिडेंट्स मेन

बरेचदा डीव्हीडीसोबत ‘डायरेक्टर्स कट’ नावाचा प्रकार यायचा. यात चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी केलेली कमेंट्री असायची. चित्रपटाच्या प्रत्येक दृश्याचे विश्लेषण करून ते चित्रित करताना काय काय अडचणी आल्या, काय गमती झाल्या हे खुद्द दिग्दर्शक महाशयांकडून ऐकायला मजा यायची. आता डीव्हीडी लुप्त पावल्यावर हा प्रकारही नामशेष होणार की काय असं वाटायला लागलं आहे.

या मालिकेतील इतर चित्रपट आहेत : ‘डायरेक्टर्स कट : द गॉडफादर ‘ आणि ‘डायरेक्टर्स कट : द फ्युजिटिव्ह

Poster for All The Presidents Men

‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’ या चित्रपटाचं विश्लेषण केलं आहे चित्रपटाचे निर्माते रॉबर्ट रेडफर्ड यांनी.

१. चित्रपट सुरू होतो तेव्हा आपल्याला एक पांढरा पडदा दिसतो. हे नेमकं काय आहे ते कळत नाही. प्रेक्षकांना सुरूवातीलाच धक्का द्यायचा असं रेडफर्ड आणि दिग्दर्शक पाकुला यांनी ठरवलं होतं. त्यांच्या असं लक्षात आलं की जर १७ सेकंद पडद्यावर काहीच घडलं नाही तर प्रेक्षक चुळबुळ करायला लागतात. जवळजवळ १७ सेकंदांनंतर एक मोठ्ठा आवाज होतो आणि पडद्यावर ‘J’ हे अक्षर उमटतं. आपण एका टाइपरायटरचा ‘क्लोजअप’ बघतो आहोत हे लक्षात येईपर्यंत पूर्ण ओळ टाईप झालेली असते : June 1, 1972. इथे टाईपरायटर हे एक शस्त्र आहे. इतर शस्त्रे आहेत – टेलिफोन, पेन आणि कागद.

२. गॉर्डन विलिस ज्यांचं टोपणनाव ‘प्रिन्स ऑफ डार्कनेस‘ होतं त्यांनी हा चित्रपट चित्रित केला. पत्रकारितेच्या जगात बहुतेक वेळा सत्य काय हे माहित नसतं. हे दर्शविण्यासाठी बराचसा चित्रपट अंधारात चित्रित केला आहे. फक्त न्यूजरूम दाखविताना फ्लुरोसंट, भगभगीत प्रकाश आहे कारण तिथे सत्य उघडकीला येतं.

३. बॉब वुडवर्डचे (रॉबर्ट रेडफर्ड) कपडे नीटनेटके असायचे मात्र इतर बाबतीत तो तितका व्यवस्थित नसायचा. तो कधी झोपायचा नाही, नेहेमी कामात मग्न. कार्ल बर्नस्टीन (डस्टीन हॉफमन) हुशार होता. त्याचे आईवडील मूलगामी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते त्यामुळे त्याचा कल न्याय आणि समानता यांच्याकडे होता. बातमी मिळवण्यासाठी तो निरनिराळ्या युक्त्या करत असे. शिवाय तो एक उत्तम लेखक होता.

४. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या कार्यालयातील प्रत्येक गोष्टीची चित्रपटाच्या सेटवर नक्कल करण्यात आली होती. यात खुर्च्या, टेबलं, फोन इतकंच नाही तर कचरापेट्यांचाही समावेश होता. यासाठी त्यांनी कार्यालयातील सर्व वस्तूंची यादी केली. तिथल्या कचरापेटीतील कागदं जमा करुन  सेटवर वापरण्यात आले.

५. वॉटरगेट प्रकरण उघडकीला आल्यापासून रेडफर्ड यासंबंधीच्या बातम्यांवर लक्ष ठेवून होता. त्याच्या लक्षात आलं की बातम्यांमध्ये दोन नावे नेहेमी दिसतात : कार्ल बर्नस्टीन आणि बॉब वुडवर्ड. नंतर बातम्यांचा ओघ वाघायला लागल्यानंतर त्याची भेट या दोघांशी झाली. दोघांच्या स्वभावातील फरक त्याला प्रकर्षाने जाणवला. यावर त्याला एक छोटा कृष्णधवल चित्रपट करावासा वाटला. नंतर चित्रपट तयार होईपर्यंत वॉटरगेट प्रकरण संपलं होतं आणि यात आता कुणाला रस असेल का याबद्दल स्टुडिओला शंका होती. रेडफर्डच्या मते जरी चित्रपटाचा शेवट ठाऊक असला तरी तो रोमांचकारी होता आणि हा प्रेक्षकांना नक्कीच बघायला आवडला असता.

६. चित्रपटाची तयारी करताना रेडफर्ड आणि हॉफमन यांनी फक्त स्वतःचेच नाही तर एकमेकांचेही संवाद पाठ केले. याचा परिणाम असा झाला की त्यांच्याबरोबर काम करणारे जे इतर कलाकार होते ते अनेकदा अवाक होत असता कारण हे दोघे आपल्या संवादांची अदलाबद्ल करत असत.

७. आउटडोअरमध्ये चित्रित केलेल्या बहुतेक प्रसंगांमध्ये रस्ता ओला दिसतो. खरंतर त्या काळात वॉशिंग्टनमध्ये इतका पाऊस होत नसे. ही गॉर्डन विलिस यांनी वापरलेली एका युक्ती होती जेणेकरून ओल्या रस्त्यांवरुन प्रकाश परिवर्तित होईल आणि चित्रीकरणाला मदत होईल.

८. वुडवर्ड केन डॉलबर्गबरोबर फोनवर बोलतो तो प्रसंग एकसलग सहा मिनिटांचा होता आणि त्यात एकही कट नव्हता. वुडवर्ड एकामागून एक फोन करतो आहे आणि पार्श्वभूमीत इतर लोक गप्पा मारत आहेत, टीव्ही बघत आहेत. यामध्ये पार्श्वभूमीही तितकीच फोकसमध्ये राहावी यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आलं.

९. अकाउंटंटची भूमिका करणाऱ्या जेन अलेक्झांडरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या ऑस्कर पुरस्काराचं नामांकन मिळालं. ती सेटवर आली तेव्हा तिने निळा ड्रेस घातला होता. पाकुलाने तिला मेकअप वगैरे काही न करता तसेच कॅमेऱ्यासमोर पाठवले.

१०. ‘डीप थ्रोट’चे पात्र खूप काळजीपूर्वक निवडण्यात आले. तो नेहेमीचा मिश्यांना पीळ देणारा खलनायक नव्हता. रेडफर्ड आणि पाकुला दोघांनाही असं वाटलं की या पात्राला ‘डिग्निटी’ असायला हवी. ‘डीप थ्रोट’ आपल्या तत्वांशी प्रामाणिक असणारा आणि त्यांच्याशी तडजोड करायची वेळ आल्यावर आतल्याआत व्यथित होणारा माणूस होता. त्याला एफबीआय वाचवायची होती कारण निक्सन या संस्थेला उध्वस्त करणार असं त्याला वाटत होतं आणि यात तथ्य होतं.

११. वुडवर्ड आणि ‘डीप थ्रोट’ रात्री दोनला भेटतात ते गॅरेज. हे एक भीतीदायक ठिकाण वाटायला हवं होतं जिथे काहीही होऊ शकतं. एक शांत जागा, पाण्याच्या थेंबांचा बारिकसाही आवाज लगेच ऐकू येतो. आणि अचानक गाडीचे टायर घासले गेल्याचा प्रचंड आवाज होतो आणि तुम्ही बसल्या जागी दचकता.