Categories
इनोद

तुमकू बैदा होना क्या?

च्या मारी, डोक्याचं गांगेय साम्राज्य झालंय नुसतं . काय म्हणालात, गांगेय साम्राज्य म्हणजे काय? अरेरे.. गांगेय साम्राज्य यासारख्या साध्या शब्दाला जर तुमची गाडी अडली तर समाजमनाच्या तात्कालिक आंदोलनांचे अवगाहन, परिशीलन आणि अश्वारोहण तुम्हाला कसे जमणार? मग ती आंदोलने अनवट आहेत की कनवट, वारली आहेत की एकारली हे कळणे तर दूरच राहीले.

बोले तो तुम्हारे बेसिक फंडेमें लोचा है. हमारे खाला के चचेरे फूफाका दिमाग बी ऐसाईच था. सुबा सुबा नाश्ते के टैम पेच झिकझिक शुरू.
रोज सुबा मेरे खाला के फूफा पेपर पढते थे, तबीच मेरे खाला की फूफी उनको पूछती थी,

“तुमकू खारी होना क्या?”
“नको.”
“तुमकू चाय-रोटी होना क्या?”
“नको.”
“तुमकू बैदा होना क्या?”
“नको.”
“मेरा कलेजा देती भूनके, होना क्या? क्या बई, खालूजान इकबाल का रिश्ता लेके आए थे, हां बोलती तो आज दुबई में होती. लेकिन जमीला ने उसी टैम पे मेरेकू ‘लव ष्टोरि’ दिखाई और मै बोली नई, मेरेकू ये रिश्ता नै होना. “
“नको.”

‘शैतानी दरवाजा’ या चित्रपटात एक हृद्य प्रसंग आहे. एका स्मशानात एका बाईचं भूत फिरतं आहे. भुतांसाठी झाडाला उलटे लटकणे किंवा कुणी दिसल्यास खदाखदा हसणे यापलिकडे ‘रिक्रिएशनल फसिलिटीज’ नसतात त्यामुळे रात्री नुसतं फिरून फिरून तिला/त्याला कंटाळा येतो. जगायचा कंटाळा आला म्हणून तिने/त्याने जीव दिलेला असतो . नंतरही कंटाळा आल्यावर काय करायचं इतका पुढचा विचार करण्याइतकी दूरदृष्टी तिला/त्याला नसते. कंटाळवाणा भूतकाळ असल्यावर भुतालाही त्या भूतकाळाचा कंटाळा येणारच, पण त्या गेलेल्या काळाचे भूत या भुतापुढे सदैव उभे असते. अचानक काही कवट्यांच्या खाली तिला/त्याला एक ओळखीची कवटी दिसते, हिंजवडे मास्तरांची. हिंजवडे मास्तर उत्क्रांती शिकवायचे. सर्व्हायव्हल, सिलेक्शन . ती/ते भूतकाळाच्या आठवणींमध्ये रमून जाते…

——–

तळटीपा

१. प्रेरणा [अ] : Once I had multiple personalities, but now all of us are doing well.

२. वारली गाव किंवा अनंतात विलीन होणे [ब] किंवा ब्रूस लीचा चुलतभाऊ वार ली. साहित्य जितके संदिग्ध तितके ते थोर असा दंडक असल्याने आम्ही आमच्या साहित्याच्या प्रत्येक कानाकोपर्‍यामध्ये संदिग्धता ठाकून-ठोकून भरली आहे. तरीही कुणाला काही अर्थबोध झाल्यास त्याला लेखक जबाबदार नाही. ग्राहकांचा संतोष [क] हेच आमचे ध्येय. अधिक माहीतीसाठी पहा आमची ‘कमिंग जावई’ कादंबरी – दामाजीची जागृती.

३. बाईच्या भुतालाही समान हक्क मिळू नयेत याला काय म्हणावे? तिला – भूत झालेल्या बाईला की त्याला – बाईच्या भुताला? मृत्यूनंतरच्या आयुष्यामधील व्याकरणाच्या अडचणी अजूनही सोडवल्या गेलेल्या नाहीत ही शरमेची बाब आहे. गेल्या दोनशे वर्षांमध्ये दिवंगत झालेल्या भाषातज्ज्ञांनी या बाबतीत कामचुकारपणा केलेला आहे हे उघड आहे. संबंधित अधिकारी इकडे लक्ष देतील काय? या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी गरज पडल्यास भाषातज्ज्ञांची कुमक पाठवावी काय या प्रश्नावरही गंभीर विचार होण्याची आवश्यकता आहे.

४. तिने/त्याने जीव दिलेला असतो – भूत झालेल्या बाईने जिवंत असताना जीव दिलेला असतो असे म्हटले तर एक वेळ ठीकै पण बाईच्या भुताने जीव दिलेला असतो म्हणजे काय? भूत जीव कसे देणार? पण बाई जिवंत असते तेव्हा भूत नसते म्हणजे एका अर्थी बाई जिवंत असताना भूत मेलेले असते. म्हणजे त्याने जीव दिलेला असतो असे म्हणता येईल का? तसे असले तर आत्ता आपल्या सगळ्यांच्या भुतांनी जीव दिलेले आहेत असे म्हणता येईल का? इथे अर्थातच भुताचा जन्म होतो का आणि झाला तर कधी होतो हा कळीचा मुद्दा आहे. भुताचे सगळे उलटे त्यामुळे त्याचे मरण आधी आणि जन्म नंतर असे तार्किक दृष्टीने मानायला हरकत नसावी.

——–

तळतळटीपा

अ. तळतळटीप क पहावी.

ब. विलीन होणे याची एक फोड ‘विली न होणे’ अशीही करता येते. सोळाव्या शतकात टोपीकरांच्या देशात ग्रीक नाटकांवरून कॉपीपेष्ट करून इंग्रजी नाटके लिहीणारा विलियम उर्फ विली नावाचा नाटककार होऊन गेला. त्याच्या सन्मानार्थ आजही इंग्लंडात ‘न झाला असा विली न होणे’ ही म्हण लोकप्रिय आहे. थोर्थोर लेखकांचे आणि साहित्याचे संदर्भ/निर्देश/अप्रत्यक्ष उल्लेख दिल्यावर साहित्याचे मूल्य आणखी वाढते असाही एक दंडक आहे.

क. संतोष ही भावना (मुलगी की इमोसन? त. २. प. ) की संतोष ग्राहक नावाचा मुलगा? आमी नै सांगणार जा! तळटीप २ पहा गडे!

ड. देव अभिनेता की कुणालाही हार जात नाही असा परमेश्वर? प्रश्न, प्रश्न, प्रश्न – साहित्यात नुसते प्रश्न आले पाहिजेत, उत्तरे शोधायला रिकामटेकडे वाचक आहेत की. आणखी एक दंडक. थोर्थोर साहित्याचे इतके दंडक पाळता पाळता आम्ही जणू दंडकारण्यातच वास्तव्य करत आहोत असा कधीकधी आम्हाला भास होतो.
——–

वि. सू. : या सर्वांतून काही अर्थबोध झाल्यास लेखकाची सहानूभूती स्वीकारावी.

Categories
इतर

मन की आंखे खोल बाबा

मागच्या ब्याकग्राउंडला शहनाईचे मंद-बिंद सूर, दिवाळीच्या मंगल-बिंगलमय वातावरणात, साहित्यिक जाणिवा-बिणिवांना नवे-बिवे धुमारे-बिमारे फुटत असताना मध्येच जुन्या हिंदी-बिंदी चित्रपटातील आंधळ्या-बिंधळ्या भिकाऱ्याप्रमाणे ‘मन की आंखे खोल, बाबा’ असं गात विसंवादी सूर-बिर काढणं फार जीवावर येतं आहे पण इलाज नाही. हल्ली सर्वांना आपल्या समाजाच्या अभिरुचीचा स्तर कसा उंचावता येईल याची काळजी लागली असते.

आदर्श समीक्षक म्हणजे ज्याने बरेच कलाप्रकार पाहिलेले असतात, आणि नुसते पाहिलेले नाही तर आतून अनुभवलेले असतात, ज्याला त्यांच्या इतिहासाची सखोल माहिती असते आणि जो एखाद्या कलाकृतीमधली सौंदर्यस्थळं उलगडून दाखवू शकतो, असा प्राणी असतो. हे बरेचदा खरं असतं. पण बहुतेक वेळा समीक्षक लोक ही सौंदर्यस्थळं वगैरे दाखविण्यापेक्षा तलवारबाजी करण्यात इतके मग्न होतात की त्यांचा दॉन किहोते होऊन जातो. जे समोर येईल त्याला शत्रू समजून कापायचं. उदा. इथे विश्राम गुप्ते म्हणतात, “म्हणून आपल्याकडे शास्त्रज्ञ नाहीत, गणितज्ञ नाहीत.. ” खरंच? आपल्याकडे एकही शास्त्रज्ञ किंवा गणितज्ञ नाही? मग रामानुजम कोण होता? टीआयएफआर, आयआयएससी, आरआरआयमध्ये जी फ्याकल्टी लिष्ट आहे ती काय शोभेसाठी लावलीये? इस्रोच्या ज्या दर वर्षी नवीन मोहिमा निघतात; चंद्र, मंगळावर यानं जातात ती कोण पाठवतं? (बादवे, लेखात एकाच वाक्यात नायपॉल एकेरी आणि श्याम मनोहर दुहेरी हे काय गौडबंगाल आहे? ) हे असं लिहितात कसं, लिहिलं तरी संपादक लोक छापतात कसं आणि छापल्यावर एकही प्रतिक्रिया येत नाही की हे काय चाललंय?

लेख वाचून चित्र डोळ्यासमोर आलं. इ. स. २०१३. भारत देश अंधारात बुडलेला, वीज नाही कारण इंजिनियर नाहीत, लोकांना वीज म्हणजे काय हेच माहीत नाही कारण देशात शास्त्रज्ञ नाहीत. गावकुसावर लोक डोक्याला हात लावून बसलेले, घराघरात अंधी बहन और विधवा मां खडकम-खडकम करत अनुक्रमे भांडी घासणे आणि कपडे शिवणे या कामात मग्न आहेत. वरून हेलिकॉप्टरमधून पुढारलेले पाश्चात्त्य देश आपली दुर्दशा बघत आहेत. एखाद वेळेस दया आली तर अन्नाची पाकिटं फेकतात, मग खाली दंगल होते. शांतता झाल्यावर ब्याक टू गावकूस आणि अंधी बहन और विधवा मां खडकम-खडकम. आपल्याकडे सरकार नाही, कारण लोकशाही म्हणजे काय हे माहीतच नाही. शाळा, कॉलेज, समाज या कल्पना आपल्या मनाला कधी शिवल्याच नाहीत. सगळे लोक दिवसा शिकार करतात आणि रात्री शेकोटी पेटवून भाले फिरवीत त्याभोवती नाचतात. मुंबईत रात्री रस्त्यांवर गाई, म्हशी, याक, रेनडिअर, कोल्हे, सिंह, झेब्रे, लांडगे, फुरसू, सरसू, त्से त्से माश्या, गेंडे, गेंडिण्या, आर्मडिल्लो, आर्मडिल्लीण्या, बोनोबो, ओरांग-ओटांग, कांगारू, पेग्विन यांचं राज्य असतं कारण रस्त्यांवर दिवे नाहीत. पण एक दिवस हे बदलेल. पश्चिमेकडून एक गोरापान, निळ्या डोळ्यांचा देवदूतासारखा दिसणारा देवदूत येईल. (मॅग्नुस कार्लसन नाय बरं का! ) तो या देशात क्रांती आणेल. आपल्याला सोई-सुविधा देईल. बदल्यात मरेस्तोवर खजिने लुटून नेईल पण हा देवाला दिलेला प्रसाद समजायचा. कारण पश्चिमेकडचा हा देव कधीही चुकत नाही. त्याच्या देशात सदैव सुबत्ता नांदत असते, तिथे कधीही कुणीही गुन्हा करत नाही. केलाच तरी शासन इतकं सक्षम असतं की गुन्हेगाराला लगेच शिक्षा होते. भारतासारख्या मागासलेल्या देशाची प्रगती कशी होईल या विचाराने (किंवा कालची जास्त होऊन रात्रभर वकार युनुस झाल्याने) या निळ्या डोळ्यांच्या देवदूताला रात्र-रात्र झोप येत नाही. आयुष्यभर त्याच्या खांद्यावर गोऱ्या माणसाचं ओझं असतं. अतिशयोक्ती वाटते? गुप्ते यांचं पाश्चात्त्य देशांबद्दलचं मत वाचा. “पाश्चात्त्य जगात अशी फिर्याद करण्याची आवश्यकता नाही. तिथे चिरेबंदी सिस्टिम आहे. लॉ अँड ऑर्डर आहे, डिसिप्लिन आहे, रॅशनल आणि इंटेलेक्चुअल जगण्याची पूर्ण संधी आहे. ” पुढचं अस्पष्ट दिसतय कारण डोळे पाणावलेत. इथे हिटलर, स्टालिन, मॅकार्थी, किसिंजर, चाउसेस्क्यू, निक्सन, बुश छोटे, डिक चेनी, रम्सेफिल्ड इ. महात्म्यांचं स्मरण करून मी माझं भाषण संपवतो.

Categories
चित्रपट​

जन अरण्य

सत्यजित रे यांचं नाव आलं की ‘पाथेर पांचाली’ आणि ‘चारुलता’ हे दोन चित्रपट नेहमी चर्चेला येतात कारण हे दोन्ही त्यांच्या सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी आहेत. यामुळे आता या चित्रपटांबद्दल बोलण्यासारखं फारसं काही उरलेलं नाही. दुसरं म्हणजे त्यांच्या इतर तितक्या न गाजलेल्या चित्रपटांबद्दल कुणी बोलताना दिसत नाही. चर्चा सोडाच, साधे उल्लेखही दिसत नाहीत. मला त्यांचे सगळे चित्रपट आवडतात, काही जास्त, काही कमी. त्यांचा कलाप्रवास बघितला तर काही गोष्टी जाणवतात. त्यांचे बहुतेक चित्रपट सकस साहित्यकृतींवर आधारलेले आहेत – बिभूतीभूषण बॅनर्जी, टागोर, प्रेमचंद, शंकर, इ. सुरुवातीच्या अपू त्रिधारेनंतर ६० च्या दशकात त्यांनी ‘देवी’, ‘चारुलता’ सारखे नायिकाप्रधान चित्रपट केले, महानगर हा चित्रपटही नायिकाप्रधान म्हणता यावा. या दरम्यान ‘गोपी गाईन, बाघा बाईन’ किंवा शोनार केल्ला सारखे फॅंटसीपट केले. सत्तरच्या दशकात ते सामाजिक चित्रपटांकडे वळले. आजूबाजूला जे चाललं होतं त्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं असं ते या बाबतीत म्हणतात. यातून कलकत्ता त्रिधारा या नावाने ओळखले जाणारे तीन चित्रपट आले – ‘प्रतिद्वंदी’, ‘सीमाबद्ध’ आणि ‘जन अरण्य’. ८० च्या दशकात ज्याला ‘इन-हाउस ड्रामा’ म्हणता येईल असे चित्रपट त्यांनी केले. याला काही वेळा त्यांचं प्रकृती अस्वास्थ्यही कारणीभूत होतं. ‘घरे-बायरे’, ‘आगंतुक’, ‘शाखा प्रोशाखा’ आणि इब्सेनच्या नाटकावर आधारलेला ‘गणशत्रू’. आणखी एक विशेष म्हणजे हे सर्व चित्रपट रंगीत होते. या आधी कांचनजंघासारखे अपवाद सोडले तर रे यांचा कल कृष्णधवल चित्रपटांकडेच होता. मला त्यांचे साठ आणि सत्तरच्या दशकातील चित्रपट सर्वात जास्त आवडतात. ८० च्या दशकातील चित्रपट त्यांनी रंगीत करायला नको होते असं वाटतं. रे यांच्या शैलीतही उत्तरोत्तर फरक जाणवतो. पाथेर पांचालीचा ‘ट्रेन सिक्वेन्स’ ज्याला ‘व्हिज्युअल पोएट्री’ म्हणता येईल असा आहे. नंतर चारुलतामधला सुरुवातीचा प्रसंग – कंटाळलेली नायिका झरोक्यांतून बघते आहे किंवा कांचनजंघामधले काही प्रसंग असे अपवाद सोडले तर नंतरच्या चित्रपटांमध्ये असे प्रसंग फारसे दिसत नाहीत.

‘कांचनजंघा’, ‘अरण्येर दिनरात्री’ आणि ‘कलकत्ता त्रिधारा’ हे विशेष आवडलेल्या चित्रपटांपैकी. ‘जन अरण्य’ हे नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हा लोकांचा महासागर असा काहीतरी अर्थ असावा असं वाटलं. इथे सपशेल फसवणूक झाली. ‘जन अरण्य’ चा अर्थ आहे मध्यस्थ. कलकत्ता त्रिधारा त्या काळातील तरुणांवर आधारलेली आहे. जन अरण्य आणि प्रतिद्वंदी दोन्हीकडे नुकताच पदवी मिळालेला तरुण आणि नोकरी मिळवण्यासाठी त्याने केलेला संघर्ष ही मध्यवर्ती कल्पना आहे. ‘सीमाबद्ध’मध्ये नायक नोकरी करतो आहे पण नोकरी टिकवण्यासाठी त्याला काय तडजोडी कराव्या लागतात याचं चित्रण आहे. जन अरण्य या त्रिधारेतील शेवटचा चित्रपट. प्रतिद्वंदीमध्ये रे यांनी ‘शेकी कॅमेरा’सारखे प्रयोग केले होते, जन अरण्यमध्ये ते दिसत नाहीत. चित्रपट मणी शंकर मुखर्जी यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.

Movie poster for Jana Aranya

चित्रपट सुरू होतो कोलकाता विद्यापीठाच्या एका खोलीत. परीक्षा चालू आहे आणि दोन शिक्षक देखरेख करत आहेत. ही देखरेख नावालाच आहे कारण विद्यार्थी सरळ सरळ कॉप्या करत आहेत. मात्र नायक सोमनाथ बॅनर्जी या फंदात न पडता प्रामाणिकपणे उत्तरे लिहितो आहे. सोमनाथच्या पेपरवर कॅमेरा काही क्षण रेंगाळतो, त्याचं अक्षर बारीक असल्याचं जाणवतं. पुढच्या प्रसंगात एक शिक्षक पेपरचा गठ्ठा घेऊन घरी येतो आणि पेपर तपासायला लागतो. पुढचा पेपर घेतल्यावर तो डोळे बारीक करून वाचायचा प्रयत्न करतो, हा पेपर सोमनाथचा असावा. मध्येच डास चावत आहेत, बायकोला फ्लिट मारायला सांगतो. मुलाला शेजाऱ्यांकडून चष्मा उसना आणायला सांगतो पण ते गावी गेले आहेत. बायकोशी वादावादी होते. या सर्वात सोमनाथच्या पेपरचं भवितव्य काय? रिझल्ट लागतो तेव्हा सोमनाथचा नुसता पास झाल्याचं कळतं. या प्रसंगातून चित्रपटाची रूपरेखा स्पष्ट होते. इथे नायक-खलनायक असा संघर्ष नाही कारण कोण नायक आणि कोण खलनायक हेच संदिग्ध आहे. सत्तरच्या दशकातील गरिबीने गांजलेल्या मध्यमवर्गाची परिस्थितीमुळे कशी पिळवणूक होत होती याचं हे प्रभावी चित्रण आहे. पुढे नोकरी शोधायचे प्रयत्न. नोकरीचे अर्ज टाइप करत असताना टाईपरायटरवरच्या क्लोज-अपमध्ये शब्द दिसतात, “I beg to apply… “

यात वर्ष निघून जातं. एकदा मित्राबरोबर एका खासदाराला भेटायला जातो, भिंतीवर नेत्यांचे फोटो. खासदार त्यांना देशासाठी त्याग करायचा संदेश देतो. पुढच्या प्रसंगात उत्पल दत्त – बिशूदा – केळ खाताना दिसतात. केळ खाता-खाता केळीवाल्याला विचारतात, “पुस्तकविक्रेते विकत असलेली पुस्तकं वाचत नाहीत. तू तुझी केळी खातोस का? ” केळाचं साल ते निष्काळजीपणे फेकून देतात आणि त्यावर घसरून सोमनाथ पडतो. त्यांची जुनी ओळख निघते. बिशूदा सोमनाथला बिझनेस करायचा सल्ला देतात. यासाठी जागा आणि इतर मदत द्यायची हमी घेतात. हा बिझनेस कसा करायचा याचं चित्रण रे यांनी इतकं तपशीलवार केलं आहे की त्या काळात कदाचित हे पाहिल्यावर कुणालाही व्यवसाय सुरू करता यावा.

व्यवसाय कोणता तर मध्यस्थाचा. स्टेशनरीपासून केमिकल्सपर्यंत कंपन्यांना जे लागतं त्याचा पुरवठा करायचा आणि कमिशन घ्यायचं. सुरुवातीला हे सोपं असतं. एक बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर त्याला जुने बंगले असतील तर सांग असं म्हणतो. ‘शाहेबबाडी’ – इंग्रजांनी बांधलेले बंगले. हे पाडून त्यातील माल विकायचा. सोमनाथने एक बंगला दाखवल्यावर काही दिवसांनी त्याला याचं कमिशन मिळतं. पैसे मिळवणे इतकं सोपं आहे यावर त्याचा विश्वास बसत नाही. सुरुवातीचा सोमनाथ इतका सरळ की कुणी पैसे दिले तर त्या माणसासमोर मोजायचीही त्याला लाज वाटते. हळूहळू त्याला व्यावसायिक खाचाखोचा लक्षात येतात. कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी बरेचदा क्लायंटना खूश करावं लागतं. पार्ट्या, इम्पोर्टेड गोष्टी – क्लायंटचा जो वीक पॉइंट असेल त्यानुसार त्याला काय हवं आहे ते द्यायचं आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं.

मध्यस्थ हा शब्द सभ्य आहे. याला समानार्थी शब्द आहे दलाल. कॉन्ट्रॅक्टच्या मागे धावताना जेव्हा सोमनाथवर या शब्दाचा सर्वात कुप्रसिद्ध अर्थ खरा करण्याची वेळ येते तेव्हा तो नखशिखांत हादरतो. सुरुवातीला नको म्हणतो पण परिस्थितीच्या दबावाला अखेर शरण जातो. शेवटी ‘कहानी में ट्विस्ट’ ही आहे पण तो पडद्यावरच पाहिलेला बरा. ‘प्रतिद्वंदी’मध्ये शेवट आशादायी आहे, शेवटी नायकाला बागेत पक्ष्यांच गाणं ऐकू येतं. ‘जन अरण्य’मध्ये मात्र नायकाचं इतकं अध:पतन होतं की यापुढे तो कधीही आरशात स्वत:ला पाहू शकणार नाही. या संपूर्ण सिनेमात रे आशेचा कोणताही किरण दाखवीत नाहीत. सिनेमात कुणीही खलनायक नाही. सगळेजण वेगवेगळ्या प्रमाणात परिस्थितीशी तडजोड करत आहेत. अपवाद सोमनाथचे वडील – जुन्या पिढीतले, अजूनही सदाचार, मूल्याधिष्ठित आचरण यावर विश्वास असणारे. रेंच्या चित्रपटात अनेक ‘थीम्स’ परत परत येताना दिसतात. जेवणाच्या टेबलावर सोमनाथ, त्याचा मोठा भाऊ, वहिनी आणि वडील चर्चा करत असतात. विषय – भ्रष्टाचार. (असाच प्रसंग शाखा प्रशाखामधेही आहे. ) सोमनाथचा भाऊ म्हणतो की भ्रष्टाचार आदिम काळापासून अस्तित्वात आहे कारण संस्कृतमध्येही याला शब्द आहे. सोमनाथच्या वडिलांना यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. आजच्या काळात हा मूल्यांचा संघर्ष कितपत समयोचित आहे कल्पना नाही. एके काळी वशिला असं कुजबूज करून सांगायचे त्याला आता नेटवर्किंग अशी प्रतिष्ठा मिळाली आहे. मात्र चित्रपटात मांडलेला मूल्यांच्या ‘रेलेव्हन्स’चा प्रश्न आजही लागू आहे असं वाटतं.

रे यांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे ज्या सहजतेने ते वेगवेगळ्या गोष्टी सूचित करतात त्याला तोड नाही. अर्थातच कथानकाच्या सोयीसाठी या गोष्टी बरेचदा मुद्दाम घालाव्या लागतात कारण रे यांनी नेहमी पारंपरिक कथानकाचा आधार घेतला आहे. पण कधीही, कुठेही ही प्रतीकं कृत्रिम वाटत नाहीत.

सोमनाथ आणि बिशूदा पहिल्यांदा भेटतात तेव्हा कॅमेरा रस्त्यातल्या खड्ड्यांवर रेंगाळतो. बिशूदा सोमनाथला बजावतात, “जपून चाल, शॉर्बत्र पिटफॉल. “

१. बंगाली नावं मराठीत लिहिणं डोक्याला ताप आहे. बंगालीत बरेचदा व्यंजनाचा उच्चार ऑ आणि ओच्या मध्ये कुठेतरी असतो. त्यामुळे जॉन ऑरण्य की जोन ऑरण्य असा प्रश्न पडतो. ऑ लिहिला तरी उच्चार ‘वॉक’ इतका स्पष्ट नसतो आणि ओ लिहिलं तरी तेच होतं. त्यामुळे वाचताना मराठीवाचक तो उच्चार बरोबर करेलच याची खात्री नाही म्हणून शेवटी इंग्रजी उच्चार ठेवले आहेत. दुसरं – हे तीन चित्रपट ‘द कलकत्ता ट्रिलॉजी’ या नावाने ओळखले जातात. आता शहराचं नाव बदलल्यावर त्रिधारेचं नावंही बदलायचं का? प्रश्न ऑप्शनला टाकला आहे. उपप्रश्न : अमिताभ घोष यांच्या ‘द कलकत्ता क्रोमोसोम’चं काय करायचं?

Categories
चित्रपट​

कलकत्ता त्रिधारा आणि इतर काही

सत्यजित रे आजारी असताना त्यांना ऑस्कर मिळाल्याची घोषणा झाली आणि दूरदर्शनला अचानक त्यांचा शोध लागला. त्यावेळी त्यांचे अनेक चित्रपट एकापाठोपाठ एक दाखविण्यात आले. त्यातच ‘प्रतिद्वंदी’ही बघितला. नंतर रे यांचे चित्रपट परतपरत पाहिले आणि काही समान धागे तर काही वेगळ्या वाटा स्पष्ट झाल्या. सुरुवातीला, म्हणजे ‘पाथेर पांचाली’, ‘चारुलता’ किंवा ‘जॉलशाघर’ यामध्ये सुरेख फ्रेम मांडण्याची कल्पकता दिसते तिला नंतरनंतर रे यांनी फाटा दिलेला दिसतो. याचा अर्थ नंतरच्या चित्रपटातील फ्रेम लक्षणीय नाहीत असा नाही पण ‘पाथेर पांचाली’ मध्ये जसं नैसर्गिक सौंदर्य टिपलं आहे ते नंतर कमी झालेलं दिसतं – ‘कांचनजंघा’ ठळक अपवाद पण त्या चित्रपटात कथानकाचा महत्त्वाचा भाग कांचनजंघा शिखरच आहे. रे यांनी ‘कलकत्ता त्रिधारे’खाली तीन चित्रपट केले – ‘प्रतिद्वंदी’ (१९७०), ‘सीमाबद्ध’ (१९७१) आणि ‘जन अरण्य’ (१९७६). तिन्हीमध्ये विषय साधारणपणे सारखेच – बेकारी, शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि व्यवसाय किंवा नोकरी मिळालीच तर ती टिकवून ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भानगडी.

Poster for the movie Pratidwandi

या चित्रपटांवर युरोपमध्ये त्या काळात होणाऱ्या वेगवेगळ्या प्रायोगिक चित्रणशैलींचा प्रभाव अधिक ठळकपणे जाणवतो. ‘प्रतिद्वंदी’मध्ये रे यांनी (बहुधा पहिल्यांदाच) काही अनोखे प्रयोग केले आहेत. चित्रपट सुरु होतानाचा प्रसंग निगेटिव्हमध्ये दाखवला आहे – काळ्याचं पांढरं आणि पांढऱ्याचं काळं. नायक सिद्धार्थ याचे वडील मरतात आणि त्यांची प्रेतयात्रा निघालेली दिसते. स्मशानभूमीमध्ये दहन होईपर्यंतचे सर्व प्रसंग निगेटिव्हमध्ये आणि नंतर सिद्धार्थच्या चेहऱ्यावर कॅमेरा रोखल्यावर चित्र पॉझिटिव्हमध्ये बदलतं. नंतरच्या प्रसंगात सिद्धार्थ गच्च भरलेल्या बसमधून जाताना दिसतो – नोकरीच्या मुलाखतीसाठी. मागे ‘द बोर्न अल्टीमेटम’ आला तेव्हा त्यात हॅंडहेल्ड कॅमेऱ्याचा वापर करून चित्रित केलेल्या दृश्यांचा बराच बोलबाला झाला होता पण रे यांनी कितीतरी आधी हेच तंत्र वापरलं आहे. बसमधून जाताना बसणारे धक्के कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट जाणवतात. मुलाखतीमध्ये नकार मिळाल्यानंतर सिद्धार्थ वशिल्यासाठी एका कार्पोरेटरला भेटायला जातो. या सलग घेतलेल्या प्रसंगात कार्पोरेटरचा चेहरा कधीही दिसत नाही, कॅमेरा त्याच्या खांद्यावरून सिद्धार्थकडे बघत राहतो. (इथे परत ‘बॉर्न अल्टिमेटम’मधील पत्रकार त्याच्या सोर्सला टोरिनोमध्ये भेटतो तो प्रसंग आठवतो.)

चित्रपटाची कथा फारशी गुंतागुंतीची नाही. सिद्धार्थ आणि त्याच्या मित्रांचे रोजचे प्रसंग, घरी आई आणि भावंडांबरोबर घडणाऱ्या गोष्टी, मध्यांतरानंतर एक नायिकाही येते. कथानकापेक्षा रे यांची विविध बारकावे टिपण्याची आणि प्रसंगी त्यावर मर्मभेदी कॉमेंट करण्याची शैली अधिक तीव्रतेने जाणवते. सिद्धार्थ एका सिनेमाला जाऊन बसतो तेव्हा तिथे न्यूजरील चाललेलं असतं. १९७०-७१ च्या बजेटचं कौतुक, इंदिरा गांधी हसतमुखाने सह्या करताना आणि याद्वारे देशात सगळं किती आलबेल चाललं आहे हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न. ७० चं दशक प. बंगालच्या दृष्टीने आणि व्यापकरीत्या भारताच्या दृष्टीने अतिशय अशांत होतं. ‘चारूलता’सारख्या संवेदनशील, काव्यमय विषयातून रे यांना ‘कलकत्ता त्रिधारे’सारख्या धगधगत्या विषयांना हात घालावासा वाटला यामागे तेव्हाची परिस्थिती बऱ्याच प्रमाणात कारणीभूत आहे.

सीमाबद्ध

त्रिधारेपैकी सर्वात शेवटी आलेल्या ‘जन अरण्य’वर आधीच लिहून झालेलं आहे. ‘सीमाबद्ध’मध्ये नायक सीलिंग फॅन बनवणाऱ्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी करतो आहे. एक मोठी ऑर्डर तयार होत असताना मालात मोठी चूक असल्याचं लक्षात येतं. ऑर्डर वेळेवर पोचवली नाही तर नुकसान होणारच, शिवाय कंपनीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न. म्हणून नायक एका कामगार नेत्याला हाताशी धरून संप घडवून आणतो. संप मिटेपर्यंत मिळालेला वेळ कंपनीच्या पथ्यावर पडतो, ऑर्डर यथावकाश पूर्ण होते आणि यामुळे नायकाची बढती होते. हे सर्व मूकपणे बघत असते नायकाची मेव्हणी (शर्मिला टागोर). ती पहिल्यांदाच बहिणीकडे आलेली असते. नायकाचा हुद्दा पाहून ती प्रभावित होते पण हळूहळू खरी परिस्थिती तिच्या लक्षात येते. शेवटी रे यांनी नेहमीप्रमाणे प्रतीकांचा सुरेख वापर केला आहे. बढती मिळाल्याची बातमी घेऊन नायक घरी येतो तर लिफ्ट बंद. एक एक मजले चढताना तो अधिकाधिक थकून जातो आणि शेवटी जेव्हा घरी पोचतो तेव्हा पूर्णपणे पराभूत झालेला असतो.

तिन्ही चित्रपटांचे शेवट सुखद नाहीत. तरी त्या मानाने ‘प्रतिद्वंदी’च्या शेवटाला एक संवेदनशील किनार आहे. मुलाखती देऊन नोकरी मिळत नाही असं पाहून शेवटी नायक एका आडगावात नोकरी पत्करतो – सुरुवातीला भेटलेल्या कार्पोरेटरच्या वशिल्याने. तिथे खोलीत बसलेला असतानाचा त्याला बाहेर एका पक्ष्याचा किलबिलाट ऐकू येतो. तो बाहेर जाऊन बघतो, त्याचवेळी एक प्रेतयात्रेत चाललेला रामनामाचा घोषही ऐकू येतो. आवाज ऐकून नायक वळतो आणि चित्रपट संपतो. गंभीर विषय असला तरीही रे यांच्यात दडलेला सौंदर्य टिपणारा कवीमनाचा दिग्दर्शक कधीकधी असा अनपेक्षितपणे दिसून जातो. ‘सीमाबद्ध’ आणि १९७६ मध्ये आलेला ‘जन अरण्य’ यामध्ये मात्र रे नायकाचं सरळसरळ अध:पतन दाखवतात. देशात आणीबाणी चालू असताना दुसरं काही अपेक्षितही नसतं.

रे यांच्या चित्रपटात काही थीम्स किंवा प्रसंग परतपरत घडताना दिसतात. उदा. सर्व मुख्य पात्रांनी एकत्र पिकनिकला जायचं हा रे यांचा पेटंट प्रसंग म्हणता येईल. बहुतेक वेळा ही पिकनिक हसतखेळत सुरू होते पण नंतर कथानकाच्या गाभ्याशी जे मुद्दे असतात त्यांच्यापर्यंत जाऊन पोचते. ‘अरण्येर दिनरात्री’मध्ये ‘मेमरी गेम्स’ खेळताना विविध पात्रांचे उल्लेखनीय पैलू समोर येतात, ‘कापुरूष’मध्ये मुख्य पात्र तीनच पण पिकनिकमध्येच कथानक महत्त्वाचं वळण घेतं. ‘कांचनजंघा’मध्ये तर सगळी पात्रं बाहेरच फिरत असतात, एकमेकांना भेटतात आणि परत आपापल्या दिशेने जातात. ‘शाखा-प्रोशाखा’मध्ये आजोबा आजारी असतात म्हणून सर्व कुटुंबीय भेटायला येतात. त्यांची प्रकृती सावरल्यावर पिकनिकला जातात आणि तिथे संघर्षाचे मुद्दे समोर येतात. (इथे बंगाली लोकांना पिकनिक करणं विशेष आवडत असावं अशीही एक शक्यता असू शकेल.)

रे यांचं भरपूर गाणी असलेल्या हिंदी चित्रपटांशी त्यांचं नातं फारसं जुळलं नाही. तरीही त्यांच्या चित्रपटांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीचे रोचक पडसाद जागोजागी आढळतात. ‘अभिजान’ या वहिदा रेहमान आणि सौमित्र चॅटर्जी यांच्या भूमिका असलेल्या चित्रपटाशी त्या काळच्या हिंदी चित्रपटांचं बरंच साम्य आढळतं. यात सौमित्राने नेहमीपेक्षा वेगळी म्हणजे एका ड्रायव्हरची भूमिका केली आहे आणि वहिदा एक नाचगाणं करणारी. यात ड्रायव्हरचा क्लीनर हिंदी गाणी गाताना दाखवला आहे. किंवा ‘कांचनजंघा’मध्ये एका तरुणाच्या ट्रान्झिस्ट्ररमधून ‘हाल कैसा है जनाब का?’ ऐकू येतं. हे असे तुकडे का टाकले असावेत याविषयी मला नेहमी कुतूहल वाटतं. एक शक्यता म्हणजे त्या काळी बंगाली समाजात असलेली हिंदी गाण्यांची लोकप्रियता – तिचं हे एक प्रतिबिंब. दुसरी शक्यता रोचक आहे पण तिला काहीही आधार नाही. संगीताचं चित्रपटातील महत्त्वाचं स्थान त्यांनी कधीच नाकारलं नाही. पार्श्वसंगीतामुळे प्रसंगाला एक वेगळी मिती लाभते हे त्यांच्या चित्रपटातील अनेक प्रसंगावरून दिसतं. पण या बाजूने विचार करणाऱ्या लोकांना कधीकधी हिंदी चित्रपटातील गाणी अनावश्यक आणि अस्थानी वाटू शकतात. रे यांचं हे मत नक्कीच होतं. मग नेहमी गंभीर चित्रपट काढणाऱ्या रे बाबूंना कधी कधी गंमत म्हणून एखादा हिंदी गाण्याचा तुकडा टाकावा असं वाटलं असेल का?