Author: Raj

  • अ शो अबाउट नथिंग

    पूर्वीच्या काळी – म्हणजे भारत आर्थिक महासत्ता वगैरे व्हायला लागण्याच्या अगोदर – कोणतीही चांगली गोष्ट – पेणसिलीपासून ते मोटारगाडीपर्यंत – म्हणजे फारिन मेड हे समीकरण ठरलेले असे. आता सुदैवाने काळ बदलला आहे, सगळ्या वस्तू इथे मिळायला लागल्या आहेत. तरीही एका गोष्टीसाठी मात्र अजूनही पल्याडचे तोंड बघावे लागते आणि ती म्हणजे विनोद. विनोद हे माणसाचे नाव…

    पूर्वीच्या काळी – म्हणजे भारत आर्थिक महासत्ता वगैरे व्हायला लागण्याच्या अगोदर – कोणतीही चांगली गोष्ट – पेणसिलीपासून ते मोटारगाडीपर्यंत – म्हणजे फारिन मेड हे समीकरण ठरलेले असे. आता सुदैवाने काळ बदलला आहे, सगळ्या वस्तू इथे मिळायला लागल्या आहेत. तरीही एका गोष्टीसाठी मात्र अजूनही पल्याडचे तोंड बघावे लागते आणि ती म्हणजे विनोद. विनोद हे माणसाचे नाव बरेच प्रचलित असले तरी जातिवंत, खळखळून हसायला लावणारा विनोद मात्र इथे दुर्मिळ झाला आहे. विनोद म्हटले की पुलंचे नाव समोर ठेवायला लोक तत्पर असतात. जातिवंत विनोदी साहित्य निर्मितीमध्ये त्यांचे काम नि:संशय उल्लेखनीय आहे. पण त्यानंतर काय? साहित्य तर सोडाच, पण इतर माध्यमांमध्येही विनोदाला फारसे गंभीरपणे घेतले जात नाही असे दिसते.

    परदेशाचे तोंड बघावे लागते ते इथे. अमेरिकन सिटकॉम हा अफलातून प्रकार आपल्याकडे होणे शक्य नाही कारण त्याला जी मेहनत अपेक्षित आहे ती आपल्या मालिकांचे निर्माते-दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडून कदापि होणे नाही. तिथे पाट्या टाकून चालत नाही, प्रत्येक भाग स्वतंत्र त्यामुळे लांबण लावता येत नाही. प्रत्येक वर्षीच्या सीझनमध्ये अमुक भाग करायचे असे ठरलेले असते. वर्षाला घाऊक चारशे अन पाचशे भागांच्या खानावळीच्या पंक्ती उठवणार्‍यांना हे कसे जमावे? याच्या जवळ जाणारा एकमेव प्रकार मराठीत पाहिला मिळाला तो म्हणजे लहानपणी बघितलेला  ‘विच्छा माझी पुरी करा’ चा प्रयोग. मी पाहिलेल्या प्रयोदात विजय कदम, जानर्दन लवंगारे, दीपक शिर्के आणि किशोर नांदलसकर होते. तेव्हा हसून हसून जी पुरेवाट झाली तसा अनुभव परत आला नाही.

    अमेरिकन सिटकॉममध्ये वेगवेगळ्या मालिकांचे चाहतेवर्ग आहेत. आमची फेवरिट म्हणजे साइनफेल्ड. इतरही आवडतात, ‘टू ऍंड अ हाफ मेन’ किंवा ‘रेमंड’ पण साइनफेल्डची सर कुणालाही येणार नाही असे आमचे ठाम मत आहे. गेली १०-१२ वर्षे या मालिकेचे भाग अनेकदा पाहूनही परत बघावेसे वाटतात हे विशेष. साइनफेल्ड मालिकेची कल्पना जेरी साइनफेल्ड आणि लॅरी डेव्हिड या दोघांच्या डोक्यातून निघाली. जेरी त्यावेळी स्टॅंड अप कॉमेडियन म्हणून नुकताच प्रसिद्ध होऊ लागला होता. लॅरी आणि त्याने मिळून या मालिकेची रूपरेखा निश्चित केली. त्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे मालिकेत कोणत्याही प्रकारचे भावनात्मक प्रसंग यात नाहीत. ‘शो अबाउट नथिंग’ असे सूचक वर्णन करून रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या निरर्थक वाटणार्‍या गोष्टींभोवती प्रत्येक भागाची कथा गुंफलेली आहे.

    यातील प्रमुखे पात्रे चार. जेरी साइनफेल्डने स्वत:चीच भूमिका केली आहे, त्याचा शेजारी क्रेमर, मित्र जॉर्ज आणि मैत्रिण इलेन. जसजसे मालिकेचे भाग वाढत गेले तसतशी यातील प्रत्येकाची स्वभाववैशिष्ट्ये अधिक ठळक होत गेली. जेरी कधीही संतापत नाही, त्याने चिडून कुणावर ओरडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाज चिरकतो. जॉर्ज अतिशय चिंगूस मारवाडी आहे तर इलेनला एकही मैत्रिण नाही. यातील क्रेमरचे पात्र विशेष आहे. सुरूवातीला लॅरी डेव्हिडने आपल्या एका शेजार्‍यावर याची व्यक्तिरेखा बेतली होती (त्या शेजार्‍याचे नावही क्रेमर होते.) नंतर क्रेमरची भूमिका करणार्‍या मायकेल रिचर्ड्सने आपली कल्पनाशक्ति पणाला लावून या व्यक्तिरेखेत रंग भरायला सुरूवात केली. निरनिराळे आवाज काढणे, कधीही दारावर टकटक न करता धाडकन दरवाजा उघडून आत येणे, सतत धडपडणे अशा अनेक लकबींमुळे त्याच्या व्यक्तिरेखेला एक विशिष्ट आकार आला. असे होते आहे हे लक्षात आल्यावर मालिकेच्या लेखकांनी त्या व्यक्तिरेखेला शोभतील असे प्रसंग लिहीण्यास सुरूवात केली. कल्पनाशक्ति आणि मेहनत यांच्या जोरावर मायकेलने आपल्या पात्राला एक स्वतंत्र रूप मिळवून दिले. क्रेमर दरवाजा उघडून धाडकन आत का येतो? यावर मायकेलचे म्हणणे असे की क्रेमर जसा लोकांच्या आयुष्यात बिनबोलावता घुसतो त्यासाठी मला एक प्रतिमा हवी होती. त्याचे धाडकन आत येणे यात मला ती सापडली. जॉर्जचे पात्र लेखक लॅरी डेव्हीडवरच बेतले आहे. जॉर्जची भूमिका करणार्‍या जेसनला सुरूवातीला हे माहित नव्हते. एकदा एक प्रसंग वाचत असताना तो लॅरीला म्हणाला, “छे, असे कधी होणे शक्य आहे का?” त्यावर लॅरी म्हणाला, “का नाही? माझ्या बाबतीत झाले आहे.” ते ऐकल्यावर जेसनच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने लॅरीच्या लकबी जॉर्जच्या भूमिकेत आणायला सुरूवात केली.

    याखेरीज जॉर्जचे आई-वडील फ्रॅंक आणि एस्टेल कोस्टान्झा, जेरीचे आई-वडील मॉर्टी आणि हेलन साइनफेल्ड, जेरीचे काका लिओ, जेरीचा शेजारी आणि जानी दुष्मन पोस्टमन न्यूमन ही पात्रेही महत्वाची आहेत. न्यूमन म्हणजे जुरासिक पार्कमधील जाड्या, भ्रष्ट प्रोग्रामर. जेफके सिनेमात त्याचे नाव न्यूमन होते तेच इथेही ठेवले. त्याची आणि जेरीची नेमकी का दुष्मनी आहे याचे कारण कधीच उघड केले जात नाही. जेरीच्या म्हणण्यानुसार सुपरमॅनला जसा एक खलनायक असतो तसा मला न्यूमन. जॉर्जचे आईवडील म्हणजे विक्षिप्तपणाचे अर्क आहेत. जॉर्जची आई आयुष्यात कधीही हसलेली नाही, वडील स्विमिंगपूलमध्ये चपला घालून पोहतात. अंकल लिओ बोलताना नेहेमी समोरच्याचा खांदा पकडतो. इतर कमी महत्वाची पात्रेही काही कमी नाहीत. जॉर्जचा बॉस, क्रूगर, क्रूगर इंडस्ट्रीजचा मालक आहे पण त्याला कंपनी गाळात चालली आहे याची अजिबात फिकीर नाही. जॉर्जला त्याच्या मानगुटीवर बसून काम करून घ्यावे लागते.

    प्रत्येक भागात एखाद्या साध्याश्या वाटणार्‍या गोष्टीभोवती सर्व पात्रांच्या कथा गुंफल्या जातात. ही कथानक निर्मिती, सर्व पात्रांचे स्वभाव त्याला चपखल बसणे आणि त्यातून होणारी निखळ विनोदनिर्मिती ही या मालिकेची वैशिष्ट्ये म्हणता येतील. लोकांच्या विक्षिप्त सवयी – उदा. बोलताना खूप जवळ उभे राहणे, फोनवर तासनतास बोलत राहणे यासारख्या गोष्टींचा विनोदासाठी कसा उपयोग करावा हे बघण्यातच मजा आहे. एका भागात जेरी चक्क पर्स घेऊन हिंडतो आणि त्यामुळे गदारोळ झाल्यावर शेवटी जगाला ओरडून सांगतो, “यस, आय कॅरी अ पर्स!” याखेरीज गॉडफादर, जेएफके, अपोकॅलिप्स नाऊ या चित्रपटांची उत्कृष्ट विडंबने साइनफेल्डमध्ये बघायला मिळतात. काही भागांमध्ये तर जेरी आणि जॉर्ज एनबीसीमध्ये मालिका तयार करण्यासाठी बोलणी करायला जातात या सत्य घटनांवरच आधारलेले आहेत.

    १९८९ ते १९९८ असे नऊ सीझन केल्यानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर असताना आणि च्यानेलची पुढच्या सीझनसाठी प्रत्येक भागाला पन्नास लाखांची ऑफर असतानाही जेरी साइनफेल्डने मालिका संपवण्याचा निर्णय घेतला. अर्थात मालिका संपली म्हणून तिची लोकप्रियता थांबली नाही. मालिकेच्या पुन:प्रसारणामुळे मिळालेल्या उत्पन्नाने जेरी साइनफेल्डला फोर्ब्ज मासिकाच्या दडगंज श्रीमंतांच्या यादीमध्ये नेऊन ठेवले.

  • लिहित्या लेखकाचं वाचन

    डॉ. विलास सारंग यांचं ‘लिहित्या लेखकाचं वाचन’ हे पुस्तक​. त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या विविध लेखांचं संकलन या पुस्तकात आहे. पुस्तक वाचनीय आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक लेखात काहीतरी नोंद घेण्याजोगं सापडतं.

    डॉ. विलास सारंग यांचं ‘लिहित्या लेखकाचं वाचन’ हे पुस्तक​. त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या विविध लेखांचं संकलन या पुस्तकात आहे. पुस्तक वाचनीय आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक लेखात काहीतरी नोंद घेण्याजोगं सापडतं. बालकवींच्या ‘औदुंबर’ या कवितेची वेगवेगळ्या समीक्षकांनी केलेली समीक्षा किंवा लक्ष्मण माने यांची ‘उपरा’तील लेखनशैली आणि हेमिंग्वेच्या लेखनशैलीशी तिचं असलेलं साम्य यासारखे सखोल वाचन आणि सूक्ष्म निरीक्षणातून आलेले निष्कर्ष हे या पुस्तकाचं ठळक वैशिष्ट्य​ म्हणावं लागेल​. डॉ. सारंग यांनी साहित्यावर बरंच संशोधन केलेलं आहे. मुंब​ई विद्यापीठ आणि इंडियाना विद्यापीठ या दोन्ही ठिकाणी त्यांनी स्वतंत्रपणे संशोधन करून दोनदा पीचडी मिळवली आहे. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये लिहिणार्‍या मोजक्या लेखकांमध्ये त्यांचा समावेश होतो.

    ‘शेक्सपिअरचं भाषांतर’ या लेखात सारंग विंदा करंदीकर यांनी केलेलं ‘किंग लिअर’ आणि अरुण नाईक यांनी केलेलं ‘हॅम्लेट’ या दोन भाषांतरांचा आढावा घेतात​. ‘किंग लिअर’बद्दल त्यांचा मुख्य मुद्दा आहे की इंग्रजीतून मराठीत येताना वाक्यरचनेत जो नैसर्गिक बदल करायला हवा तो विंदांनी केलेला नाही. उदा. ‘I went to school’ याचं भाषांतर ‘मी शाळेला गेलो’ असं व्हायला हवं पण पण विंदांच्या पद्धतीनुसार ते ‘मी गेलो शाळेला’ असं होईल​. मराठी गद्यात अशी वाक्यरचना कृत्रिम वाटते. विंदा इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक होते. त्यांची विद्वत्ता आणि दांडगा व्यासंग त्यांनी लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनेतून दिसतो असं सारंग नमूद करतात​. तरीही वाक्यरचना उलटी करण्याचं कारण काय​? मराठी वर्तमानपत्रेही ही प्रथा का पाळतात हा वैताग आणणारा प्रश्न आहे. कहर म्हणजे अशी वाक्यरचना करून मथळ्यात यमक जुळवलं की उपसंपादकांना दिवस सार्थकी गेल्यासारखं वाटतं. असे मथळे पाहिले की त्या वर्तमानपत्राच्या हापिसात जाऊन फुलटू राडा करावासा वाटतो. जर वर्तमानपत्रांनीच भाषेची बूज राखली नाही तर कसं व्हायचं? सारंग यांच्या मते अशी वाक्यरचना अधिक नाट्यपूर्ण वाटते. यामुळे रसभंग होतो या सारंग यांच्या मताशी पूर्ण सहमती आहे. वर भर म्हणून सुटसुटीत प्रतिशब्द वापरण्याऐवजी विंदा संस्कृताळलेले बोजड शब्द वापरतात​. ‘राइपनेस इज ऑल’ या ओळीचं भाषांतर करताना ‘पिकलेपण’ या सोप्या शब्दाऐवजी विंदा ‘परिपक्वता’ वापरतात​. ‘हॅम्लेट’च्या बाबतीतही हेच​. ‘तूही नाही करणार अन्याय माझ्या कानांवर’ अशी कृत्रिम वाक्यरचना सहन करत सगळं नाटक वाचावं लागतं. ओघवती भाषा हे ज्याचं वैशिष्ट्य असा शेक्सपिअर या प्रकारे वाचावा याहून मोठं दुर्दैव नसावं.

    ”उपरा’ आणि हेमिंग्वे’ या लेखात लक्ष्मण माने यांच्या भाषाशैलीबद्दल सारंग म्हणतात​, “मराठी भाषेत अशी भाषाशैली क्वचितच आढळते…ज्याने मराठीला एक नवीन​, ताजी भाषाशैली दिली आणि ज्याची शैली हेमिंग्वेची आठवण करून देते, असे लेखक मराठीत किती आहेत​?” इथे दुर्गाबाईंची शैलीदार भाषा किंवा ‘बलुतं’मध्ये केलेलं जाणीवपूर्वक वाड़मयीन लेखन याच्याशी ‘उपरा’ची तुलना करतात​. एक उदाहरणार्थ लेखही आहे पण तो टीकात्मक असल्याने ‘पंथी’यांना उदाहरणार्थ कितपत रुचेल कल्पना नाही. ‘जातककथांमधील वास्तववाद’ हा लेख दुर्गाबाईंनी मूळ पाली भाषेतून अनुवाद केलेल्या सिद्धार्थ जातक च्या आठ खंडांवर आहे. सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या या ग्रंथांवरील हा लेख दुर्गाबाईंच्या विद्वत्तेची झलक दाखविणारा आहे. हे सर्व आठ खंड वाचून होणं अशक्य वाटतं, निदान काही भाग तरी वाचावा अशी इच्छा मात्र नक्कीच होते. पुस्तकातील अनेक गोष्टी उल्लेखनीय आहेत​. किंबहुना प्रत्येक लेखाबद्दल विशेष​ असं काहीतरी लिहिता येईल​. खरं तर अशी दोन​-तीन उदाहरणे देऊन लेख संपवायला आवडलं असतं पण पुस्तकात जश्या अनेक उल्लेखनीय गोष्टी आहेत तशाच काही गोष्टी खटकणार्‍याही आहेत​. यातील काही किरकोळ आहेत​, पुढील आवृत्त्यांमध्ये सहज सुधारता येतील आणि काही गंभीर आहेत​. इथे केवळ छिद्रान्वेषीपणा करण्याचा हेतू नाही, मात्र इतक्या गंभीर चुकांकडे दुर्लक्ष करता येणेही अशक्य आहे.

    पहिला मुद्दा किरकोळ आहे – लेखक किंवा उपसंपादक यांची डुलकी या सदरात मोडणारा. बा. सी, मर्ढेकर यांच्यावरील लेखात सारंग त्यांच्या कवितांवर इटालियन कवी दान्तेचा प्रभाव होता काय याची मीमांसा करतात​. सुरुवातीला “दान्ते (इंग्रजी सवयीप्रमाणे आपण डाण्टे असं म्हणू)” असं वाक्य येतं. मग मर्ढेकरांच्या ‘शिशिरागम’ कवितेतील ओळी येतात​. “दान्ते-नि-शेक्सपिअर-संगत आपणास​” (मर्ढेकरांनी दान्ते हा मूळ उच्चार वापरला आहे हे विशेष​.) नंतर सारंग आपण आधी काय लिहिलं होतं ते विसरून जातात आणि ‘दान्ते’ वापरतात​. मग हा उच्चार जर इतका नैसर्गिक आहे तर इंग्रजी उच्चाराच्या फंदात पडायचंच कशाला? खरं तर इटालियन भाषेतील​ उच्चार अत्यंत सोपे आहेत​, आपल्याकडचे ‘त’ आणि ‘द’ चे उच्चार त्यांच्याकडे जसेच्या तसे आहेत​. तरीही मराठीत इटालियन (किंवा इतर भाषेतीलही) नावं लिहिताना जे अनंत घोळ घातले जातात त्याला तोड नाही. सर्वात विहंगम घोळ​ – भाषेचं नाव​ बरेच लोक ‘इतालियन’ असं लिहितात​. इथे ‘त’ कशासाठी? देशाचं नाव कसं लिहाल​? इटली का इतली? मग भाषेचं नावही तसंच लिहा नं – इटालियन. बरं पुढे जाऊन ‘इतालियन’ हा शब्द सोडला तर बाकी सर्व शब्दांमध्ये ‘त’ च्या जागी ‘ट​’. उदा. ‘इतालियन’ संस्कृतीमध्ये ‘कियांटी’ ही वाइन प्रसिद्ध आहे. पिऊन झाल्यावर टीच​​ बातली हाणा आमच्या तालक्यात म्हणजे निदान आमची ट्रेधाटिरपीत टरी थांबेल​. (पूर्वी भयाण मनोजकुमारच्या भयाण चित्रपटांमध्ये टॉम अल्टर आणि बॉब क्रिस्टो अशी भयाण वाक्ये भयाणपणे बोलत असत​.) हिंदीमध्ये ‘इतालवी’ असं लिहितात पण तिथे तो स्वतंत्र शब्द आहे आणि बाकी सर्व गोष्टींसाठी ‘त’ च वापरतात​. ‘इटली’ हे इंग्रजीकरण झालेलं नाव आहे. मूळ नाव वापरायचं असेल तर ‘इतालिया’ असं म्हणायला लागेल​. बरेच​ देश किंवा शहरं यांच्या नावांचं इंग्रजीकरण झालं आहे. आता ही नावं रुळली आहेत त्यामुळे ती बदलण्यात अर्थ नाही. पण माणसांच्या नावाचं काय​? माझ्या मते कोणत्याही माणसाच्या नावात कुणालाही बदल करण्याची मुभा नसावी. नाव ही माणसाच्या मूलभूत ओळखींपैकी एक महत्त्वाची ओळख आहे. असं असतानाही मराठी लेखक परकीय नावांबद्दल जो निष्काळजीपणा दाखवतात ते पाहून वाईट वाटतं. मग Foucault (फूको)चा उच्चार फूकोल्ट, Da Vinci (दा विंची)चा दा व्हिंसी, Antonioni (अंतोनियोनी)चा अंटोनियोनी किंवा le Carré (ल कारे)चा ल कार​. (‘इ’ वर ऍक्सेंट असेल तर त्याचा उच्चार ‘ए’ होतो.) एक गोष्ट खरी की सर्वांना सर्व उच्चार माहीत असावेत ही अपेक्षा नाही. पण मग थोडे कष्ट घेऊन शोधा की. फोर्वो आहेच​ किंवा यूट्यूबवर ‘How do you pronounce Foucault’ असा सर्च करा. बहुतेक सर्व परकीय नावांचे उच्चार ऐकता येतील​. गांधींचं नाव घँडी किंवा बुद्धाचं नाव बूडा हे इंग्रजीकरणाचे प्रताप आहेत​. निदान मराठीत लिहिताना तरी आपण माणसांच्या नावांचं इंग्रजीकरण न करता मूळ​ नावं लिहायला हवीत​.

    पुढचा मुद्दा गंभीर आहे. औदुंबरवरच्या समीक्षांची चर्चा करताना सारंग म्हणतात​, “जगात (कलेच्या वा वास्तव​) शक्यता एकवटलेल्या नसतात​, तर विखुरलेल्या असतात​. या भूमिकेला वैज्ञानिक पाठबळ आहे. अद्ययावत विज्ञान आपल्याला सांगतं की वस्तुस्थिती काय आहे, हे आपल्याला कधीच खात्रीपूर्वक सांगता येत नाही. फॅक्ट किंवा सत्य हे आपल्या कधीच हाती लागत नाही…वेर्नर हायझेनबर्ग या वैज्ञानिकाचं अनिश्चिततेचं तत्त्व आता बहुतेकांना माहीत झालं आहे.” थोडक्यात औदुंबर कवितेचा विविध समीक्षकांनी लावलेल्या अर्थाचा संबंध सारंग हायझेनबर्गच्या अनिश्चिततेच्या तत्त्वाशी जोडतात​. स्पष्ट सांगायचं तर याला काहीही अर्थ नाही. हे म्हणजे एखाद्या कडून पैसे उसने घेतले आणि त्याला “परत देईन किंवा देणार नाही मात्र या दोन्ही भूमिकांना वैज्ञानिक पाठबळ आहे” असं म्हणण्यासारखं आहे. विज्ञान म्हणजे अनिश्चितता हे साफ चूक आहे. असं असतं तर मंगळापर्यंत यान गेलंच नसतं. हायझेनबर्गचं तत्त्व अत्यंत काटेकोर सीमांमध्ये लागू होतं, त्याबाहेर न्यूटनचे नियम लागू होतात​. मंगळयानाच्या कक्षेचं गणित करताना हायझेनबर्ग कामाचा नाही, तिथे न्यूटनलाच साकडं घालावं लागतं. हे मत सारंग यांचं आहे की सौंदर्यशास्त्रातील इतरांचंही हे ठाऊक नाही. हे सर्वमान्य मत असेल तर साहित्याच्या संशोधकांनी एकदा पदार्थविज्ञानवाल्यांशी बोलणं गरजेचं वाटतं.

    ‘आजची कादंबरी – आणि उद्याची’ या शेवटच्या प्रकरणात सारंग म्हणतात​, “दुसऱ्या महायुद्धात पोळलेले समाज – उदाहरणार्थ, फ्रान्स​-सार्त्र व काम्यू यांसारखे लेखक निर्माण करू शकले. प्रदीर्घ काळ स्थिरतेच्या दडपणाखाली घुसमटणारे समाज – सोव्हिएट रशिया व चीन – यांच्याकडून काहीच मिळालं नाही. (पास्तरनॅक व सोल्झेनित्सिन वगळून​, तेही राज्यविरोधी).” इथे दोन मोठ्या गफलती आहेत​. चीन, रशियाला महायुद्धाची झळ लागली नाही??? फार तर झळ लागली पण थोर लेखक निर्माण झाले नाहीत असं म्हणा पण तसं केलं तर सारंग यांचं पहिलं वाक्य बाद ठरतं. एकूणातच महायुद्ध आणि थोर लेखक यांचा संबंध बादरायण वाटतो. शिवाय चिनी लेखक अनुल्लेखाने मारण्याइतके चिल्लर आहेत का?

    शेवटचा मुद्दा विचित्र​ म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण ‘बिझार’ म्हणतो अशा प्रकारचा आहे. मागे विश्राम गुप्ते यांनी ‘या देशात शास्त्रज्ञ नाहीत‘ असं विधान केलं होतं त्या जातीचा. म्हणजे हे विधान खरं नाही हे कुणालाही कळेल मग ते लेखकाला का कळलं नाही? कादंबरीवरच्याच प्रकरणात सारंग म्हणतात​, “पण पेपरबॅक पुस्तकं एकदा वाचल्यावरही खराब होतात​.” म्हणजे काय याचा अर्थ मला अजूनही लागलेला नाही. माझ्याकडे असलेली ९९% पुस्तकं पेपरबॅक आहेत​. किंवा उलटा प्रश्न – एकदा वाचल्यावर खराब होईल असं करण्यासाठी पुस्तक किती दांडगाईने वाचावं लागेल​? खुद्द सारंग यांचं पुस्तक आणि मराठीतील बहुतेक पुस्तक पेपरबॅक याच वर्गात मोडतात हे आणखी रोचक​.

    सारंग आंतरराष्ट्रीय पातळीवर लिहिणारे लेखक आहेत त्यामुळे त्यांच्या पुस्तकात अशा चुका आढळल्या तर ते विशेष​ खटकतं. काळजीपूर्वक पुस्तक लिहायचं तर तितके कष्ट घ्यावे लागतात आणि हे झटपट होत नाही, याला वेळ द्यावा लागतो. ‘ऑक्सफर्ड शेक्सपिअर’ मालिकेतील ‘मॅकबेथ’ची आवृत्ती काढायला दहा वर्षे लागल्याचं तिचे संपादक प्रस्तावनेत सांगतात​. किती मेहनत घेतली असेल याची यावरून कल्पना यावी. या गोष्टी खटकत असल्या तरी पुस्तक वाचनीय आहे. डॉ. हरिश्चंद्र थोरात यांच्या ‘कादंबरीविषयी’ या ग्रंथाबद्दल बोलताना सारंग त्यातील काही भाग उद्धृत करतात​. डॉ. थोरात म्हणतात​, “विचार हा शब्द येथे गंभीरपणे वापरला आहे. विचार नेटकेपणाने करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते…मनात येणार्‍या स्वैर कल्पनाविलासालाच विचार म्हणण्याची प्रथा या काळात रूढ झाली.” इथे डॉ. थोरात जरी समीक्षेविषयी बोलत असले तरी आज सगळीकडेच​ सुसूत्रपणे विचार करणे कालबाह्य होऊ लागलं आहे की काय अशी शंका येते. हे किती खरं आहे याची प्रचिती आजूबाजूला येणारे बहुतेक लेख वाचले तर येते. फुटका नळ गळावा तसे शद्ब गळत असतात​. आपल्या मनातील विचारांचा गुंता जसाच्या तसा ओतला की झाला लेख​. आणि हे नवशिके लेखकच करतात असं नाही. संपादक​, विचारवंत अशी बिरुदं मिरवणारे लेखात फक्त त्यांनी जे वाचलं ते कोंबत असतात​. सगळा मामला वरवरचा, खोलात जायचं काम नाही. प्रत्येक परिच्छेदात नवीन विचार हवा हा नियम कालबाह्य होतो आहे अशी शंका कधीकधी येते कारण मुळात परिच्छेदाचाच पत्ता नसतो. अर्धीमुर्धी वाक्ये हिंदी चित्रपटात पूर्वी नायिका जशी कड्याला धरून लोंबकळायची तशी लोंबकळत असतात​. त्यात ‘ललित’ नावाचा प्रकार तर लय टेररबाज​.

    रखरखीत दुपार​……………………..
    मी कॉलेजच्या वाटेवर​……………………………..
    इतक्यात​………………………
    आरं मावसभावा, ही रांगोळी कशापायी रं भुसनळ्या?

  • गूढ​, रहस्यमय, अद्भुत : हारुकी मुराकामी

    मुराकामी वाचल्यानंतर इतर लेखक प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला सकाळ कशी होती, हवा कशी होती, ट्रॅफिक कसे होते, हिरो किंवा हिरविणिने काय घातले होते याचे वर्णन करण्यात पानेच्या पाने खर्च का करतात असे वाटायला लागते.

    सवयी फार विचित्र असतात. जाता जात नाहीत. अशीच एक निरर्थक सवय लागलेली. कुठलेही पुस्तक वाचायला सुरुवात केली की लेखकाला कुठल्यातरी चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करायचा. आणि विशेष म्हणजे भल्या भल्या लेखकांच्या बाबतीत हे करायला जमले. डिकन्स म्हटल की दु:ख, दु:ख, दु:ख आणि मणमोहण देसाई लाजतील असे योगायोग. पण माणसाच्या मनात डोकावण्याचे कसब विलक्षण. आणि एखादे वाक्य इतके अप्रतिम की तिथे थांबून दहा मिनिटे विचार करावा लागतो. सॉमरसेट मॉमचे वैशिष्ट्य म्हणजे कथा साध्या, सरळ शब्दांमध्ये सांगितलेली. पण परत मनोव्यापारांची गुंतागुंत समोर आणायची हातोटी विलक्षण.

    पण कधीकधी असे एखादे पुस्तक हाती लागते की आपले सगळे अंदाज ढासळून पडतात. (थोडक्यात मस्त स्विंगींग यॉर्करवर आपली दांडी उडते. ) असेच एक पुस्तक परवा वाचले. हारूकी मुराकामीचे ‘काफ्का ऑन द शोर’. पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या काही पानात एक अंदाज बांधला, तो ढासळल्यावर दुसरा, त्यानंतर तिसरा. असे चार-पाच वेळा झाल्यावर शरणागती पत्करली आणि मुकाट मुराकामी नेईल तिथे त्याच्यामागून जाऊ लागलो. यातले सर्वच विलक्षण, काहीसे फँटसीच्या अंगाने जाणारे. सुरूवातीला तर्कशुद्ध मन हे असे का, ते तसे का असे प्रश्न विचारत रहाते. नंतर गोष्टीत रंगून गेल्यावर या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत हे लक्षातही रहात नाही. मग नाकाता मांजरांशी बोलतो किंवा जळवांचा पाऊस पाडू शकतो अशा गोष्टी ‘रूटीन’ वाटायला लागतात.

    Book cover of Kafka on the Shore

    गोष्ट सुरू होते तेव्हा जवळपास प्रत्येक प्रकरणात एखादा नवीन धागा येतो. काही काळ आपण भंजाळतो. काय चाललय काहीच कळत नाही. नंतर रूबिक क्युबचे चौरस जुळावेत तसे धागे जुळत जातात. याच्या जोडीला निवेदन इतकं प्रभावी की पुस्तक खाली ठेवायचा प्रश्नच येत नाही. फँटसी आणि रहस्य यांचा सुंदर मिलाफ. मग आधीच्या काही प्रश्नांची उत्तरेही मिळत जातात. सुप्रसिद्ध ओडीपल थीम भेटते. (यामुळेच या कादंबरीला मॉडर्न ग्रीक ट्रॅजेडी म्हटले आहे.) काही प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरित रहातात. मुराकामीच्या मते प्रत्येक वाचकाची उत्तरे वेगळी असतील. पुस्तकातील विनोदही आलाच तर अगदी कळेल-न-कळेल असा. गूढतेला कुठेही तडा न जाऊ देणारा. The kind of fallen-from-grace building you find in any city, the kind Charles Dickens could spend ten pages describing. यावरून आठवले. डिकन्स किंवा इतरही काही प्रसिद्ध लेखक त्यांच्या जाडजूड पुस्तकांमध्ये पानेच्या पाने वर्णने देत बसतात. आणि खरे सांगायचे तर हे वाचायला कंटाळा येतो. बर, वाचल्याशिवाय रहावतही नाही कारण एखादे अप्रतिम वाक्य सुटायला नको. मुराकामीचे असे अजिबात नाही. शक्यतो वर्णन नाही, जिथे आहे तिथे इतके प्रभावी की वाचल्याशिवाय रहावतच नाही. मुराकामी वाचल्यानंतर इतर लेखक प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला सकाळ कशी होती, हवा कशी होती, ट्रॅफिक कसे होते, हिरो किंवा हिरविणिने काय घातले होते याचे वर्णन करण्यात पानेच्या पाने खर्च का करतात असे वाटायला लागते.

    यातली सर्व पात्रे नॉर्मलच्या थोडी बाहेर जाणारी आहेत, किंबहुना ऍबनॉर्मल म्हटलं तरी चालेल. मुराकामीच्या म्हणण्याप्रमाणे त्याला ‘जरा हटके’ पात्रांबद्दल जास्त उत्सुकता असते. यात दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जपानमध्ये घडलेल्या एका गूढ प्रसंगाचे अमेरिकन संरक्षण खात्याने नोंदलेले वर्णनही आहे, अर्थातच काल्पनिक (The Rice Bowl Hill incident). पण मुराकामी स्वतः पत्रकार आहे आणि त्याला याबद्दल अधिक विचारले असता त्याने फक्त ‘नो कमेंट्स’ एवढेच उत्तर दिले.

    बरेचदा कलाकृतींमध्ये इतर प्रसिद्ध लेखकांचे संदर्भ आले तर लेखकाचे स्फूर्तीस्थान कळते. साइनफेल्डमध्ये वूडी ऍलनचा संदर्भ पाहिल्यावर त्याचा दर्जा फ्रेंड्सपेक्षा इतका वर का हे लक्षात येते. इथे तर नावातच काफ्का, त्यामुळे कथा अब्जर्ड असल्यास नवल नाही. (आणि काफ्का त्याचा आवडता लेखक असल्याचे मुराकामीनेही सांगितले आहे.) इतरही बरेच संदर्भ आहेत. ग्रीक ट्रॅजेडी, अरेबियन नाईट्स, मॅकबेथ, प्लेटोचे सिंपोझियम, मोझार्ट आणि शूबर्ट यांच्या संगीतातील बारकावे किंवा पुचिनीचा ला बोहेम ऑपेरा. लेखकाचा व्यासंग किती अफाट आहे याची यावरून कल्पना येते. शिवाय हेही लक्षात येते की या आणि अशा प्रकारच्या बर्‍याच लेखकांना/पुस्तकांना मुराकामी कोळून प्यायला आहे. तो जे लिहीतो आहे त्याची त्याला पूर्ण कल्पना आहे. ही सगळी नावे केवळ नेम-ड्रॉपिंगच्या उद्देशाने दिलेली नाहीत.

    जर तुम्हाला गूढ, रहस्यमय, काहीशा फँटसीच्या अंगाने जाणार्‍या कथा आवडत असतील तर ‘काफ्का ऑन द शोर’ वाचून बघायला हरकत नाही.