Category: बुके वाचिते

  • स्नूपी, चार्ली ब्राऊन आणि मंडळी

    कॉमिक स्ट्रिप म्हणजे तीन किंवा चार चौकोन असलेली (रविवारी जास्त), ठराविक पात्रे असलेली आणि त्यांची गोष्ट सांगणारी मालिका. मात्र कॉमिक स्ट्रिपच्या कलाकारांचा उल्लेख कार्टूनिस्ट असाही केला जातो त्यामुळे या दोन प्रकारातील फरक तितका स्पष्ट नाही. कॉमिक स्ट्रिपचा उदय ‘वर्तमानपत्रातील मोकळी जागा भरणे’ या कारणासाठी झाला आणि आजही त्यामागचे मुख्य कारण तेच आहे. अर्थात आता आंतरजालामुळे…

    कॉमिक स्ट्रिप म्हणजे तीन किंवा चार चौकोन असलेली (रविवारी जास्त), ठराविक पात्रे असलेली आणि त्यांची गोष्ट सांगणारी मालिका. मात्र कॉमिक स्ट्रिपच्या कलाकारांचा उल्लेख कार्टूनिस्ट असाही केला जातो त्यामुळे या दोन प्रकारातील फरक तितका स्पष्ट नाही. कॉमिक स्ट्रिपचा उदय ‘वर्तमानपत्रातील मोकळी जागा भरणे’ या कारणासाठी झाला आणि आजही त्यामागचे मुख्य कारण तेच आहे. अर्थात आता आंतरजालामुळे ‘वेब कॉमिक’ हा नवा प्रकार आला आहे. स्वदेशी कॉमिक स्ट्रिप नसल्या तरी गारफील्ड, कॅल्विन ऍंड हॉब्ज किंवा इचि फीट कॉमिक्स यासारख्या परदेशातील कॉमिक स्ट्रिप इथे बऱ्याच लोकप्रिय आहेत.

    या सर्वांमध्ये माझी आवडती कॉमिक स्ट्रिप चार्ल्स शुल्ट्झ याची पिनट्स. २ ऑक्टोबर १९५० रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रकाशित झाला आणि १३ फेब्रुवारी, २००० ला शेवटचा. एकूण १७८९७ भाग प्रकाशित करून शुल्ट्झने एक विक्रमच केला. निवृत्त झाल्यानंतर शुल्ट्झने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. यातील मुख्य पात्र आहे चार्ली ब्राऊन हा मुलगा. सुरुवातीला याचं वय चार वर्षे होतं, नंतर सहा झालं आणि शेवटी आठ. इतर पात्रांमध्ये सॅली, मित्र लिनस, श्रोडर, लिनसची मोठी बहीण लूसी आणि पेपरमिंट पॅटी, फ्रॅकलिन ही मुख्य पात्रे आहेत. चार्ली ब्राऊन नेहमी उदास असतो, त्याला बरंच काही करायची इच्छा असते – बेसबॉलची मॅच जिंकणे, पतंग उडवणे इ. – पण त्याच्या पदरात नेहमी अपयशच येतं. सुरुवातीला त्याचा स्वभाव ऍरोगंट होता, नंतर तो सौम्य झाला. इतर पात्रांची आपापली वैशिष्ट्ये आहेत. लूसी भांडकुदळ आहे, पण पाच सेंट फी घेऊन ती मानसोपचाराचे सल्लेही देते. तिच्याकडे बहुतेक वेळा चार्लीच सल्ला मागायला येतो. बरेचदा हे सल्ले ‘ऑब्व्हियस ट्रूथ्स’ असतात पण कधीकधी विचार करायला लावणारेही असतात. श्रोडर पियानो वाजवतो आणि बेथोवनचा भक्त आहे. (श्रोडर पियानो वाजवत असताना मागे उमटणारी स्वरलिपी नेहमी मूळ बेथोवनची असते. बरेच कानसेन वाचक लिपीवरून कोणत्या सिंफनीतील कोणती मूव्हमेंट आहे याचा शोध घेत असतात.) लिनस नेहमी एक ब्लॅकेट घेऊन वावरत असतो – ते जवळ नसेल तर त्याला चैन पडत नाही. हे वर्णन वाचल्यावर कदाचित असं वाटू शकेल की या लहान मुलांच्या गोष्टींमध्ये मोठ्यांना काय रस असणार? अशा गोष्टी – उदा. हॅरी पॉटर – फक्त लहान मुलांसाठीच असतात असाही एक समज असतो. पीनट्समध्ये चार्ली ब्राऊनला त्याच्या वयानुसार ज्या अडचणी येतात आणि त्यावर त्याची जी प्रतिक्रिया होते ती बरेचदा व्यापक स्वरूपाची असते. त्यामुळे त्याच्या अडचणी बालसुलभ आहेत हे लक्षात येऊनही मोठी माणसेही त्यात गुंतत जातात.

    सुरुवातीला या पात्रांची मालिका सुरू झाल्यावर नंतर त्यात एका भू-भूचा प्रवेश झाला – स्नूपी. बहुतेक वेळा दीर्घकालीन मालिकांमध्ये सुरुवातीची पात्रे आणि त्यांचं नंतरचं स्वरूप यात बराच फरक असतो. ‘साइनफेल्ड’ मालिकेतील कॉस्मो क्रेमरच्या पात्राची झालेली प्रगती हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. स्नूपीच्या बाबतीतही हेच झालं. सुरुवातीला सामान्य कुत्रा असणारं हे पात्रं नंतर प्रचंड बदललं. स्नूपी हा कुत्रा असला तरी तो इतर कुत्र्यांप्रमाणे कधीच वागत नाही. चार्ली ब्राऊन त्याला खायला घालतो पण स्नूपी त्याचं स्वामित्व कधीच स्वीकारत नाही. इतर कुत्र्यांप्रमाणे सर्कशीत चालतात तश्या करामती करणं त्याला कमीपणाचं वाटतं. स्नूपीला बोलता येत नाही पण त्याच्या मनात काय विचार चालू आहेत हे वाचकांना ‘थॉट बलून’च्या द्वारे कळतं. सुरुवातीला हे विचार फक्त ‘फूड’सारख्या शब्दांपर्यंतच मर्यादित होते. नंतर स्नूपी प्रगल्भ झाला. दोन पायांवर चालण्यापासून सुरुवात करून व्हॅन गॉची चित्रे गोळा करण्यापर्यंत त्याची मजल गेली. तो टाईपरायटरवर कादंबरीही लिहू लागला. कादंबरीची सुरुवात नेहमी “It was a dark and stormy night…” अशी होत असे. नंतर एकदा त्याला प्रकाशकांकडून कादंबरी स्वीकारल्याचं पत्रही येतं, मात्र ते एकच प्रत छापणार असतात, ती खपली तर पुढची. स्नूपीच्या पात्रामध्ये झालेला एक मोठा बदल म्हणजे त्याचा ‘अल्टर-इगो’. हा अंगात शिरला की स्नूपी पहिल्या महायुद्धातील एक फायटर पायलट होतो आणि त्याचा नेहमीचा शत्रू – रेड बॅरनशी – युद्ध करतो. (स्वत: शुल्ट्झने दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता.) याखेरीज स्नूपी कामचलाऊ फ्रेंच “बोलतो”, टेनिस खेळतो, ऍकॉर्डियन, गिटार वाजवतो, ‘वॉर ऍंड पीस’ एक शब्द रोज या वेगाने वाचतो. कदाचित पीनट्सची ओळख नसेल तर हे सगळं कैच्याकै वाटू शकेल. यावर शुल्ट्झचं म्हणणं असं की सहसा कुत्रे आपल्याला वाटतं त्यापेक्षा बरेच हुशार असतात. या विचाराची अतिशयोक्ती इथे दिसते. यावर विचार केल्यावर एक वेगळा मुद्दा सुचला. बरेचदा कुत्रे आपल्याच नादात असतात. रात्री-अपरात्री सूर लावून रडणे किंवा कुठेतरी घाईघाईत जाताना दिसणे हे सर्व पाहून हे प्राणी आपल्याच भावविश्वात मग्न असतात असं वाटतं. (कुत्रे क्वचितच टंगळमंगळ करत जाताना दिसतात. बहुतेक वेळा एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगला जाताना जी घाई असते तीच त्यांच्या चालीत असते. याउलट मांजर.) स्नूपीखेरीज वुडस्टॉक नावाचा एक पक्षीही आहे पण याला आपले विचार शब्दांत मांडता येत नाहीत. त्याऐवजी तो “| | | | | | |” अशा खुणांमध्ये बोलतो.

    चिंटू किंवा कॅल्विन ऍंड हॉब्ज यासारख्या मालिका आणि पीनट्समध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. पीनट्समध्ये एकही मोठ्या माणसाचे पात्र नाही. मोठ्या माणसांचे उल्लेख येतात पण ती कधीही दिसत नाहीत. पीनट्समध्ये वाचकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी मुलांच्या पातळीवरचा आहे. स्पिलबर्गने ‘ई. टी.’ चित्रित करताना हेच केलं होतं. चित्रपट सुरू झाल्यावर बराच वेळ कॅमेरा अडीच-तीन फुटापेक्षा वरचं काही बघतच नाही, सगळ्या मोठ्या माणसांचे पायच दिसतात. गंमत म्हणजे स्पिलबर्गने लहानपणी डिस्नेचे लूनी टून्स कार्टून बघितले होते त्यातही असंच होतं. यावरूनच त्याला ही कल्पना सुचली. यामुळे पीनट्स इतर लहान मुलांच्या मालिकेपेक्षा वेगळ्या पातळीवर जाते. मोठ्या माणसांशी वागताना येणाऱ्या अडचणी हा इथे महत्त्वाचा मुद्दा नाही, उलट सर्वस्वी लहान मुलांच्या जगात जाऊन तिथून जग कसं दिसतं हे बघायचा प्रयत्न आहे. होम्सला मारल्यानंतर कॉनन डॉयलला लोकांचा रोष पत्करावा लागल्याची कहाणी सर्वश्रुत आहे. साठच्या दशकात शुल्ट्झने लिनस आणि लूसी यांच्या बाबांची दुसऱ्या गावी बदली होते असं दाखवलं आणि ते दोघे सगळ्यांना सोडून गेले. लगेच फोन, पत्रे, तारा यांचा भडिमार सुरू झाला. खरं तर शुल्ट्झ यथावकाश हे परत येतात असं दाखविणारंच होता, पण लोकाग्रहास्तव त्याला हे काम तातडीने उरकावं लागलं.

    सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कॉमिक स्ट्रिप या कलाप्रकाराबद्दल वाचकच नव्हे तर समीक्षकांमध्येही अनास्थाच आहे. याचं एक मुख्य कारण म्हणजे प्रत्येक दिवशी कॉमिक स्ट्रिप ३० ते ४० सेकंदात वाचून होते. आवडती कॉमिक स्ट्रिप नसेल तर वाचक बेचैन होतात पण असली तरी मिनिटभरापेक्षा जास्त वेळ तिला दिला जात नाही. साहजिकच कॉमिक स्ट्रिप या प्रकाराकडे गंभीरपणे बघितलं जात नाही. साहजिकच याची समीक्षा वगैरे फारच लांबची गोष्ट होते. शुल्ट्झने ज्या अनेक बारकाव्यांमधून मालिका फुलवली आहे ते बरेच वेळा दुर्लक्षितच राहतात. (उदा. स्नूपी खुनशी मोडमध्ये आला की किंचित दात दाखवीत इंग्रजीत ज्याला ‘एव्हिल ग्रिन’ म्हणतात तसं हसतो किंवा रागावला की त्याच्या भुवया किंचित वक्र होतात.) अशा परिस्थितीत हे कलाकार आणि त्यांची कला यांच्याबद्दल अधिक माहिती मिळणं जवळजवळ दुरापास्तच असतं. सुदैवाने शुल्ट्झने वेळोवेळी लिहिलेले लेख आणि दिलेली भाषणे यांचं संकलन ‘माय लाईफ विथ चार्ली ब्राऊन’ या पुस्तकात केलं आहे. पीनट्सच्या चाहत्यांना हे पुस्तक रोचक वाटेलच, शिवाय जर कॉमिक स्ट्रिप या कलाप्रकारात रुची असेल तर अशा लोकांसाठीही उपयोगी आहे. या पुस्तकात शुल्ट्झ त्याच्या सुरुवातीच दिवसांपासूनचा प्रवास, आलेल्या अडचणी, नवीन कार्टुनिस्ट म्हणून सुरुवात करतानाचे धोके इ. बद्दल विस्ताराने बोलतो. रोजच्या कॉमिक स्ट्रिपला प्रेरणा कुठून मिळते याचीही सविस्तर चर्चा करतो. एकदा जेवणाच्या टेबलावर सगळे जमले असताना शुल्ट्झची मुलगी एमी दंगा करत होती. शुल्ट्झने तिला दटावल्यानंतर ती काही वेळ गप्प झाली. मग तिने एक ब्रेड घेतला आणि त्याला लोणी लावायला सुरुवात केली आणि शुल्ट्झला विचारलं, “Am I buttering too loud for you?” हीच पंचलाईन वापरून शुल्ट्झने त्याचं पुढचं कॉमिक बनवलं.

    स्नूपी पहिल्या महायुद्धातील फायटर पायलट असतो या कल्पनेचा नंतर शुल्ट्झने ‘डी-डे’ च्या आठवणीसाठी अनोख्या पद्धतीने उपयोग करून घेतला. ६ जून, १९९३ रोजी प्रकाशित झालेल्या कॉमिक स्ट्रिपमध्ये नॉर्मंडीच्या बीचवर स्नूपी एकटाच हेल्मेट घालून पोहत जाताना दिसतो. खाली लिहिलेलं असतं, June 6, 1944,”TO REMEMBER”.

  • इंडिया आफ्टर गांधी : एका अनपेक्षित देशाचा इतिहास

    शाळेत असताना डोक्यावर विज्ञानाचे भूत होते. याचा एक परिणाम म्हणजे कला शाखा आणि प्रामुख्याने इतिहास, नागरिकशास्त्र यांच्याकडे दुर्लक्ष झाले. सनावळी आणि तहांच्या तारखा घोकून पाठ करण्यापलिकडे इतिहासाचे महत्व काय हे ठाऊक नव्हते. ते महत्व लक्षात आणून द्यायला देतील असे शिक्षकही नव्हते, किंबहुना त्या शिक्षकांनाही ते महत्व कळले होते की नाही याबद्दल शंका वाटते. शाळेत शिकलेल्या…

    शाळेत असताना डोक्यावर विज्ञानाचे भूत होते. याचा एक परिणाम म्हणजे कला शाखा आणि प्रामुख्याने इतिहास, नागरिकशास्त्र यांच्याकडे दुर्लक्ष झाले. सनावळी आणि तहांच्या तारखा घोकून पाठ करण्यापलिकडे इतिहासाचे महत्व काय हे ठाऊक नव्हते. ते महत्व लक्षात आणून द्यायला देतील असे शिक्षकही नव्हते, किंबहुना त्या शिक्षकांनाही ते महत्व कळले होते की नाही याबद्दल शंका वाटते. शाळेत शिकलेल्या इतिहासाबद्दल आणखी एक रोचक मुद्दा म्हणजे हा इतिहास गौतम बुद्ध, सम्राट अशोक यांच्यापासून ते टिळक, गांधी यांच्यापर्यंत भरभरून बोलत असे. मात्र १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले असे सांगून हा इतिहास तिथेच थांबत असे. नंतर १९५० मध्ये घटनेची स्थापना किंवा नंतरच्या पंचवार्षिक योजना यांचे काही उल्लेख येत, पण गेल्या पन्नास वर्षात नेमके काय घडले, काय अडचणी आल्या याबद्दल बहुतकरून मौन बाळगलेले असे. (सध्याचा अभ्यासक्रम पाहिलेला नाही त्यामुळे त्यात बदल केला असल्यास चांगलेच आहे.)

    खरं म्हणजे विद्यार्थ्यांचा तत्कालीन इतिहासाशी परिचय असणे सर्वात महत्वाचे आहे. देश ज्या परिस्थितीत आहे तिथपर्यंत तो कसा पोचला हे जाणून घेणे रोचक आहेच शिवाय प्रसारमाध्यमांमधून देशाचे जे चित्र बहुतकरून रंगवले जाते, ते कितपत बरोबर आहे हे ही यावरून उमजायला मदत होते. अर्थात हे शाळेत शिकवले गेले नाही तर लोक यापासून अनभिज्ञ राहतात असे अजिबात नाही. पुस्तके, लेख, चर्चा इ. माध्यमांमधून या इतिहासाचे विविध पैलू समोर येत असतातच. पण यात एक धोका असतो. बहुतेक पुस्तके – चरित्रे, आत्मचरित्रे, तेंव्हाच्या घटनांची प्रत्यक्ष वर्णने करणारी पुस्तके – एकांगी असण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी या पुस्तकांची इतर माहितीसूत्रांशी तुलना करून त्यात सत्याचा अंश किती हे ठरवावे लागते आणि हे ठरवणारा इतिहासकार शक्य तितका निष्पक्ष असायला हवा. ( असे झाले नाही तर काय होते याचे एक ठळक उदाहरण म्हणजे लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लापिएर यांचे ‘फ्रीडम ऍट मिडनाइट’ हे गाजलेले पुस्तक. ‘इंडिया आफ्टर गांधी’ वाचल्यानंतर ‘फ्रीडम ऍट मिडनाइट’ अतिरंजित वाटायला लागते. प्रा गुहा यांच्या मते ‘फ्रीडम ऍट मिडनाइट’ मधील लॉर्ड माउंटबॅटन यांचे चित्रण पक्षपाती आहे. त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष केले गेले आहे आणि त्यांच्या योगदानाचे वर्णन अतिशयोक्तीपूर्ण आहे.) पुस्तकांपेक्षाही माहितीचा अधिक धोकादायक स्त्रोत म्हणजे चर्चा, मग त्या घराघरात चालणार्‍या असोत की वेगवेगळ्या च्यानेलवरच्या. अशा चर्चांमधील बहुतेक सर्व सहभागी व्यक्तींची मते ठाम असतात. त्यात पूर्वग्रहांचा वाटा बराच असतो, घटनांकडे एकाच चश्म्यातून पाहिले जाते.

    Book cover for India After Gandhi

    प्रा. रामचंद्र गुहा यांचे ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे पुस्तक स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास शक्य तितक्या निष्पक्षतेने मांडण्याचा प्रयत्न करते. प्रा. गुहा यांनी देश आणि परदेशातील मान्यवर संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहिले. नंतर बंगलोर येथे स्थायिक होऊन लेखन करण्याचा निर्णय घेतला. ‘इंडिया आफ्टर गांधी’साठी त्यांचा २०११ चे साहित्य अकादेमी पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. गेल्या पन्नास वर्षातील घटनांचा आढावा घेताना प्रा. गुहा अनेक स्त्रोतांचा दाखला देतात. पुस्तके, लेख, लोकसभेतील नोंदी हे आहेतच, याशिवाय विविध व्यक्तींची खाजगी कागदपत्रे, सीबीआय/पोलिस यांचे अहवाल, गुप्तचर खात्याचे गोपनीय अहवाल असे अनेक संदर्भ यात येतात. संदर्भसूची जवळपास नव्वद पानांची आहे यावरून संशोधनाची व्याप्ती लक्षात यावी. प्रा. गुहा यांनी याआधी भारतातील पर्यावरणवादी किंवा क्रिकेट खेळाचा इतिहास यासारख्या विषयांवर पुस्तके लिहीली आहेत. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची सर्व कारकीर्द एका तर्‍हेने ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकासाठी केलेली दीर्घ (आणि काहीशी यातनामय ) अशी पूर्वतयारी होती.

    या पुस्तकात प्रा. गुहा १९५० ते १९९० या काळातील घटनांचा क्रमवार परिचय करून देतात. पुस्तकाच्या सुरूवातीलाच ते तकालीन इतिहासाची नोंद करण्यामधील धोके कोणते आहेत याची जाणीव करून देतात. सम्राट अशोकाबद्दल वाचताना वाचकांचे मत बहुतकरून तटस्थ असते कारण त्या काळाशी घनिष्ठ परिचय नसतो. मात्र गेल्या पन्नास वर्षातील घटनांबद्दल, व्यक्तींबद्दल वाचकांची आणि इतिहासकाराचीही ठाम मते असतात. इतिहासकाराने नोंदवलेल्या घटनांचा वाचक सरळसरळ विरोध करू शकतात. बरेचदा इतिहासकारही नकळत पूर्वग्रहांच्या प्रभावाखाली येऊ शकतो. १९९० नंतरच्या घटना मांडताना प्रा. गुहा या मुद्याला अधोरेखित करतात. साधारणपणे तत्कालीन इतिहासाची मर्यादा ३० वर्षे ठरवली जाते. याचे कारण ३० वर्षांनंतर त्या घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोन तटस्थ होऊन भावनांची तीव्रता कमी झाली असेल अशी अपेक्षा असते. या कारणासाठी प्रा. गुहा १९९० नंतर नोंदवलेल्या घटनांना इतिहास न म्हणता शोधपत्रकारितेचे नाव देतात.

    गेल्या दहा-बारा वर्षांत भारताची झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था हा एक चमत्कार मानला जातो आहे. प्रा. गुहा यांच्या मते खरं तर याहून मोठा चमत्कार आधीच घडून गेला आहे आणि घडतो आहे पण त्याकडे कुणाचे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही. हे म्हणजे पी. सी. सरकारांनी आधी ताजमहाल अदृश्य करावा, तेंव्हा प्रेक्षक शांत. मग पिशवीतून ससा काढून दाखवावा आणि त्याला टाळ्या मिळाव्यात तसे काहीसे झाले आहे. हा चमत्कार आहे भारताच्या अस्तित्वाचा. निरनिराळे राजकारणी, विश्लेषक, संशोधक गेली शंभर वर्षे भारताची शकले कधी होणार यावर पैजा लावून बसले होते. स्वातंत्र्य मिळायच्या आधी भारताला स्वातंत्र्य दिले तर ते विघातक ठरेल ही चर्चिल आणि इतर इंग्रज अधिकार्‍यांची आवडती सबब होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक दशकात ज्या घटना घडल्या त्यानंतर जगभरात ‘आता लोकशाही संपणार, इतर आशियाई देशांप्रमाणेच भारतात सैन्यदलाचे राज्य येणार’ असे अंदाज वर्तवले जात होते. सुरूवातीला हे केवळ पाश्चात्य देशांपुरते मर्यादित होते, पण ८० च्या दशकामध्ये काही भारतीय विश्लेषकही असा विचार मांडत होते. दर वेळेस अत्यवस्थ दिसणारी लोकशाही परत नव्या जोमाने उभी राहीली. १९७५ मध्ये आलेली आणीबाणीही या लोकशाहीला मुळापासून नष्ट करू शकली नाही. समाजशास्त्रशात्राचे नियम, युरोपियन इतिहासावरून बांधलेले आडाखे या सर्वांना न जुमानता भारत अजूनही एकसंध आहे.

    भारताची गेल्या पन्नास वर्षांतील वाटचाल बघताना स्टीव्ह जॉब्जचे प्रसिद्ध ‘कनेक्ट द डॉट्स’ भाषण आठवते. आता साधारण वाटणार्‍या घटना भविष्यामध्ये अभूतपूर्व महत्वाच्या ठरतात. स्वातंत्र मिळाल्यानंतर नेहरू आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घेतलेले काही निर्णय नंतर फार महत्वाचे ठरले. वर चर्चांमधून दिशाभूल होण्याचा उल्लेख आला आहे. याचे एक उदाहरण म्हणजे कोणत्याही चर्चेत नेहरूंचा उल्लेख आला की १९६२ चा चीनकडून झालेला पराभव आणि काश्मिर प्रश्नाची बेजबाबदार हाताळणी हे दोनच मुद्दे प्रामुख्याने चर्चेला असतात. अशा चर्चा ऐकल्या तर यापलिकडे नेहरूंचे काही कर्तुत्व होते किंवा नाही अशी शंका यायला लागते. प्रा. गुहा याचे सविस्तर आणि सखोल उत्तर देतात. इथे उदात्तीकरण किंवा ‘फिल गुड’ असा हेतू नसून एका प्रदीर्घ कारकीर्दीचे योग्य मूल्यमापन करणे हा उद्देश आहे हे ध्यानात घ्यायला हवे.

    भारताला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झाल्यावर कोणत्या पद्धतीचे सरकार असावे यावर कॉंग्रेसमध्ये बराच खल झाला. अमेरिका आणि युरोपमधील सरकारांचा अभ्यास करून अखेर लोकशाही पद्धत निवडण्यात आली. काही निरीक्षकांच्या मते वसाहत राजवटीमधून नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशांसाठी हुकूमशाही अधिक योग्य असते कारण या देशातील लोक लोकशाहीसाठी तयार नसतात. इंडोनेशिया किंवा पाकिस्तानचे उदाहरण भारतानेही स्वीकारले असते तर फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते. भारतात सैन्यदलाची हूकूमत कधी येणार याबद्दलही बरीच चर्चा होती. यासंबंधात नेहरूंचे विचार किती स्पष्ट होते याचे उदाहरण स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर घडलेल्या एका प्रसंगातून दिसते. पहिल्या झेंडावंदनाच्या प्रसंगी आम जनतेला ध्वजाजवळ येण्याची परवानगी देऊ नये असे मत तत्कालीन सैन्यदलाच्या ब्रिटीश प्रमुखांनी व्यक्त केले होते. नेहरूंनी त्यांना लिहीलेल्या उत्तरामध्ये ‘सैन्यदलाचे काम सरकारला लागेल ती मदत करण्याचे आहे, धोरण ठरवण्याचे नाही’ असे ठणकावले. नंतरही जनरल करियप्पा यांचा सरकारी कामात हस्तक्षेप होतो आहे हे लक्षात आल्यावर नेहरूंनी त्यांना समज दिली होती. याचा परिणाम म्हणजे नंतरच्या काळात परिस्थिती कितीही बिकट असली तरीही सरकारच्या कामात सैन्यदलाने हस्तक्षेप केल्याचे एकही उदाहरण नाही. आपल्या शेजारच्या देशातील परिस्थिती पाहिली तर ही किती चांगली गोष्ट आहे याची खात्री पटावी.

    उद्योगधंद्यांवरील चर्चांमध्ये नेहेमी भारताची तुलना जपानशी केली जाते. प्रा. गुहा एक उलटी तुलना करतात. भारताची घटना निश्चित करण्याचे ठरल्यानंतर देशभरातील जनतेकडून यासाठी सुचवण्या मागवण्यात आल्या. १९४६ ते १९४९ या काळात ११ सत्रांमध्ये चर्चा केल्यानंतर ११ खंड आणि ३४९ कलमे असलेली भारताची घटना अस्तित्वात आली. याच काळात जपानची घटनाही अस्तित्वात आली. फरक हा की ही घटना २४ अमेरिकन लोकांनी (त्यातील १६ सैन्यदलातील होते) एका खोलीत बसून तयार केली. नंतर जपानी संसदेत घटनेवर चर्चा झाली पण कोणतीही दुरूस्ती करण्यासाठी अमेरिकन अधिकार्‍यांची परवानगी आवश्यक होती. याउलट १९३० मध्येच कॉंग्रेसने आमची घटना आम्हीच तयार करू असे इंग्रज अधिकार्‍यांना सांगितले होते.

    स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रज सरकारच्या काळात अस्तित्वात आलेल्या प्रशासकीय सेवेचे – इंडियन सिव्हिल सर्व्हिसचे – काय करायचे असा प्रश्न आला. काही मंडळींची मागणी होती की आयसीएस बरखास्त करावी. याचे मुख्य कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय नेत्यांना तुरूंगवासात पाठवण्यामागे आयसीएसचा महत्वाचा सहभाग होता आणि यासाठी ही नेते मंडळी त्यांच्यावर नाराज होती. पण नेहरू आणि सहकार्‍यांनी आयसीएसचे कौशल्य आणि ताकद ओळखून त्यांना भारतीय सरकारमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अचूक असल्याचा पहिला दाखला दोन वर्षातच मिळाला. स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुका पार पाडण्याचे शिवधनुष्य तत्कालीन निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी यशस्वीपणे पेलून दाखवले. याखेरीज गांधीवादापासून फारकत घेऊन भारताला उद्योगधंद्यांमध्ये स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नेहरूंनी दूरदृष्टी ठेवून पहिल्या आणि दुसर्‍या पंचवार्षिक योजनेअंतर्गत अनेक महत्वपूर्ण पावले उचलली. नेहरूंनी नंतरच्या काळात केलेल्या चुका हिमालयाएवढ्या होत्या. त्याची जबाबदारी त्यांच्याकडे जातेच. पण नेहरूंचे किंवा त्यांच्यानंतर आलेल्या शास्त्रींचे राजकारण मूल्याधिष्ठीत होते हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. याउलट इंदिरा गांधींपासून व्यक्तीनिष्ठ राजकारणाची सुरूवात झाली, आधीचे सर्व आयाम बदलले. आणीबाणीच्या काळात व्यक्त झालेली एक टिप्पणी या बाबतीत बोलकी आहे. “नेहरू आज असते तर त्यांनाही तुरूंगात जावे लागले असते आणि तिथून त्यांनी परत आपल्या मुलीला पत्रे लिहीली असती.”

    सर्व नियमांना अपवाद ठरून भारत अजूनही का तग धरून आहे? या प्रश्नाचे उत्तर प्रा. गुहा उपसंहारात देतात. भारतीय मानस स्वाभाविकपणे लोकशाहीकडे झुकणारे आहे. १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकांमध्ये मतदानाशी आधी कधीही संबंध न आलेल्या बहुतांशी जनतेने मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. नंतरही काश्मिर किंवा इतर भागात अतिरेक्यांच्या धमक्या जनतेला मतदानापासून रोखू शकल्या नाहीत. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विविधता. जागतिक इतिहासात विविध भाषा, संस्कृतीचे लोक आपापली ओळख कायम ठेऊन एक राष्ट्र निर्माण करण्यासाठी एकत्र आल्याचे दुसरे कोणतेही उदाहरण नाही. अमेरिकेत हे घडले पण भारताच्या अगदी उलट तर्‍हेने. अमेरिका ‘मेल्टींग पॉट’ म्हणून ओळखली जाते. जगभरातील लोक एकत्र येऊन अमेरिकन संस्कृती स्वीकारतात. याउलट भारतात ‘सॅलड कल्चर’ आहे, प्रत्येक वेगळी संस्कृती आपली ओळख कायम ठेवते. सुरूवातीला पाश्चात्य निरीक्षकांना अशा सरमिसळीतून एकसंध राष्ट्र उभे राहू शकेल यावर विश्वास बसत नव्हता. सध्या युरोपियन युनियनमध्ये हाच प्रयत्न चालू असताना किती अडचणी येत आहेत ते आपण पहातोच. भारतात हे घडू शकले याचे मुख्य कारण ‘सॅलड संस्कृती’ आणि विशेषत: भाषावार प्रांतरचना आहे असे प्रा. गुहा म्हणतात. असे केले नसते तर काय झाले असते याची उदाहरणे जवळच आहेत. श्रीलंकेत जवळजवळ अर्ध्या भागात तमिळ लोक असूनही त्यांच्यावर सिंहली भाषा लादण्यात आली, त्याचे परिणाम आजही दिसत आहेत. पूर्व पाकिस्तान अस्तित्वात आल्यावर पहिल्याच दिवशी भाषणात जिना यांनी पाकिस्तानमध्ये बंगाली भाषेला कोणतेही स्थान नाही, त्यांना उर्दू शिकावी लागेल असे स्पष्ट सांगितले. बांग्लादेश निर्मितीची बीजे इथेच रोवली गेली. कॉंग्रेसमध्ये १९२० पासूनच भाषावार प्रांतरचना असावी असे मत व्यक्त केले जात होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंचा विचार बदलला पण सुदैवाने देशभरातून उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेऊन त्यांनी याला मान्यता दिली. यामुळे प्रत्येक प्रांताची ओळख अबाधित राहीली आणि आज ‘अनेकता में एकता’ सारखी वाक्ये म्हणता येऊ लागली. आज अमेरिकेत हिस्पॅनिक लोकांची संख्या लक्षणीय आहे, मात्र राजकारणी लोकांचे धोरण ‘मेल्टींग पॉट’ संस्कृती सोडेल अशी चिन्हे दिसत नाहीत.

    आजच्या भारतात नेमकी काय परिस्थिती आहे? आपली खरंच प्रगती होते आहे का? अशा प्रश्नांना बहुतेक वेळा ‘ब्लॅंकेट जनरलायझेशन’ या प्रकारात मोडतील अशी उत्तरे मिळतात. ‘काय होणार या देशाचं’ या चालीवर म्हटलेली वेगवेगळ्या कवींची गाणी निरनिराळ्या सुरांमध्ये ऐकायला मिळतात. या प्रकाराशी बराच चांगला परिचय आहे कारण एकेकाळी अशी गाणी गाण्यात माझाही आवाज होता. बहुतेक वेळा याच्या मुळाशी परदेशात दिसणार्‍या आणि जाणवणार्‍या वरवरच्या परिस्थितीशी केलेली तुलना असते. पण भारत आणि अमेरिका किंवा युरोप यांच्यामध्ये मूलभूत फरक आहेत, ते लक्षात घेतले नाहीत तर अशा तुलना बहुतांशी निरर्थक ठरतात. फ्रेंच किंवा जपानी लोकांच्या भाषाप्रेमाचे उदाहरण नेहेमी दिले जाते. भारतात असे होणे शक्य नाही कारण प्रत्येक माणसाला किमान तीन भाषा शिकाव्याच लागतात. फ्रेंच लोकांचे भाषाप्रेम त्यांच्या राष्ट्रप्रेमाला कारणीभूत ठरले आणि या आणि यासारख्या उदाहरणांवरून भारतासारखा देश एकसंध राष्ट्र म्हणून कधीही टिकू शकणार नाही असे अंदाज कित्येक दिग्गजांनी वर्तवले. मुळात युरोपियन इतिहासावरून भारताविषयी अंदाज वर्तवणे फारसे बरोबर नाही.

    भारताचा इतिहास पाहिल्यावर आणखी एक गोष्ट जाणवते. व्यवस्थापन शास्त्रामध्ये ८०-२० चा नियम असतो. थोडक्यात, कोणत्याही गोष्टीमध्ये २० % ना बाकीच्या ८० % पेक्षा अधिक महत्व असते. उदा. तुम्ही ज्या गोष्टी करता त्यातील २० % गोष्टी खरोखर महत्वाच्या असतात. आपल्या राजकारण्यांकडे पाहिल्यावर हा देश कसा चालतो असा प्रश्न कुणालाही पडावा. इथे हा नियम लागू होतो असे वाटते. याचे एक उदाहरण म्हणजे आतापर्यंत आलेले कोणतेही सरकार पाहिले तर असे दिसते की त्यांनी कितीही गलथान कारभार केला तरीही काही कामे अशी केली ज्यामुळे देशाच्या प्रगतीला अभूतपूर्व अशी कलाटणी मिळाली. नेहरूंचे योगदान वर आलेच आहे, इंदिरा गांधींनी १९७१ मध्ये बांग्लादेश प्रश्नावर जागतिक दबावाला न जुमानता निर्णायक भूमिका घेतली. मिझोराम, पंजाब करार आणि देशातील दूरसंचार क्षेत्रातील क्रांती राजीव गांधींमुळे झाली तर खुल्या अर्थव्यवस्थेचे सर्व श्रेय नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांना जाते. अगदी आणीबाणीनंतर आलेल्या अल्पायुषी जनता सरकारनेही आणिबाणीच्या काळात केलेल्या लोकशाहीच्या विरोधातील घटनादुरूस्त्या बदलल्या आणि आणीबाणी लागू करायला मंत्रीमंडळाची परवानगी हवी असा महत्वाचा बदल केला. देश का चालतो तर देशातील २० % लोक जी कामे करतात त्यामुळे बाकीच्या ८० % लोकांचा गलथानपणा चालून जातो. या २० % मध्ये अर्थातच प्रशासकीय सेवेमध्ये असणार्‍या सक्षम अधिकार्‍यांचाही महत्वाचा वाटा आहे.

    आपली लोकशाही खरी आहे की आभासी? या प्रश्नावर प्रा. गुहा म्हणतात, ‘फिफ्टी फिफ्टी’. निवडणुका, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य अशा गोष्टीमध्ये आपल्याकडे लोकशाही आहे पण राजकारण, राजकारणी आणि त्यांच्याशी संलग्न संस्था यामध्ये चालणारे व्यवहार बरेचदा लोकशाही दिसत नाही. आजवरच्या इतिहासात काश्मीर, पंजाब आणि नागालॅंड इथे भारतापसून वेगळे होण्यासाठी सर्वात आक्रमक प्रयत्न झाले. आजही जवळपास वीस टक्के भारतामध्ये अशांतता आहे, पण चार पंचमांश भारत शांत आहे. या भागातील जनतेला लोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा मिळतो आहे. आशिया खंडातील आपल्या शेजार्‍यांकडे पाहिल्यास ही किती मौल्यवान गोष्ट आहे याची खात्री पटावी.

    चांगली ऐतिहासिक पुस्तके वाचताना होणारा एक रोचक परिणाम म्हणजे त्या कालमानसाची (zeitgeist) स्पष्ट कल्पना येते. मेंदू नेहेमी नवीन अनुभव संदर्भांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करत असतो. संदर्भ जितके अचूक असतील तितके नवीन अनुभव आत्मसात करायला सोपे जाते. ‘इंडिया आफ्टर गांधी’ वाचल्यानंतर पहीली बदललेली चौकट जाणवली ती म्हणजे जुने हिंदी (आणि इतरभाषिक) चित्रपट बघताना येणार्‍या अनुभवाची. सुनील दत्तचे ‘हम हिंदुस्थानी’ गाणे पूर्वी भाबडे आणि भावुक वाटायचे. आता पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे चित्रपट १९६० चा आहे. दोन पंचवार्षिक योजना यशस्वीपणे अमलात आल्या होत्या, दोन निवडणुका झाल्या होत्या, भिल्लईचा नवीन स्टील प्लांट उभा राहीला होता. भाक्रा-नांगल येथील अजस्त्र धरणाच्या कामाला सुरूवात झाली होती. चीनच्या आक्रमणाला दोन वर्षे बाकी होती. नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याची नवलाई अजूनही ओसरली नव्हती. हे सर्व लक्षात घेतल्यावर या भावुकतेबद्दल काहीशी कौतुकमिश्रित भावना होते. आता सीईओ असणार्‍या मुलाच्या लहानपणचे व्हीडीओ बघताना आईवडीलांना वाटत असेल तसे काहीसे. नंतर ६०, ७० च्या दशकातील उलथापालथी बघितल्यावर सत्यजित रेंच्या ‘जन अरण्य’, ‘महानगर’ किंवा ‘प्रतिद्वंदी’ सारख्या सामजिक चित्रपटांमागची भूमिका लक्षात येते. या सर्वांची आधीही अजिबात कल्पना नव्हती असे नाही, पण आता चौकटी अधिक रेखीव झालेल्या जाणवतात.

  • जॅझ, ब्लूज आणि शूबर्ट

    भारतीयांना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचं इतकं आकर्षण का आहे हे मला नेहमी पडणारं कोडं आहे. (घाबरू नका, नेहमीप्रमाणे यूएएसब्याशिंग नाही.) अमेरिकेला कधी जाण्याचा योग आला नाही आणि आलाच तर ब्लॉग वाचून एनएसएवाले पाऊल ठेवू देतील अशी शक्यता कमी. तरीही मला युरोप अमेरिकेच्या तुलनेत हजारपटीने अधिक रोचक वाटतो. युरोपमधल्या गरिबातील गरीब देशातही सांस्कृतिक श्रीमंती – बघण्या/ऐकण्या/वाचण्या –…

    भारतीयांना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचं इतकं आकर्षण का आहे हे मला नेहमी पडणारं कोडं आहे. (घाबरू नका, नेहमीप्रमाणे यूएएसब्याशिंग नाही.) अमेरिकेला कधी जाण्याचा योग आला नाही आणि आलाच तर ब्लॉग वाचून एनएसएवाले पाऊल ठेवू देतील अशी शक्यता कमी. तरीही मला युरोप अमेरिकेच्या तुलनेत हजारपटीने अधिक रोचक वाटतो. युरोपमधल्या गरिबातील गरीब देशातही सांस्कृतिक श्रीमंती – बघण्या/ऐकण्या/वाचण्या – सारखी असते. गैरसमज नको, न्यूयॉर्कपासून कॅलिफोर्नियापर्यंत अनेक प्रकारचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम किंवा ‘न्यूयॉर्कर’, ‘न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’ अशी उत्तम मासिके यावरून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात सांस्कृतिक दुर्भिक्ष्य आहे असं अजिबात नाही. फरक इतकाच यातील बहुतेक सगळं सांस्कृतिक लेणं सुनेला माहेराकडून रुखवत मिळतो त्याप्रमाणे युरोपीय वाडवडिलांनी आंदण दिलेलं आहे. तिथल्या मातीतून उपजलेलं, स्वतःचं म्हणावं असं सांस्कृतिक वैभव तिथे फार कमी आहे. आणि तिथले जे मूळ रहिवासी होते, त्यांचं उच्चाटन झाल्यावर त्यांची संस्कृतीही लोप पावली, कुठेतरी एखाद्या म्युझियममध्ये किंवा एखाद्या विद्यापीठाच्या संशोधन विभागात काही अवशेष बघायला मिळतील, तेवढेच.

    याला अर्थातच अपवाद आहेत आणि फार रोचक आहेत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे स्वतःचे म्हणवता येतील असे काही कलाप्रकार आहेत पण गंमत अशी की यांचा उगम युरोपातील उच्चभ्रू जेत्यांकडून न होता आफ्रिकेतून बांधून आणलेल्या गुलामांकडून झाला. दिवसभर जनावरापेक्षा हलाखीच्या परिस्थितीत काम केल्यावर रात्री या गुलामांनी संगीतामध्ये सुटका शोधली. जॅझ आणि ब्लूज या संगीतप्रकारांचा उगम यातून झाला. जसा आधुनिक कादंबरीवर काफ्काचा मोठा प्रभाव आहे तसंच विसाव्या शतकातील अनेक संगीतकारांनी जॅझ आणि ब्लूजपासून प्रेरणा घेतली – यांची यादी इतकी मोठी आहे की एक पुस्तक भरावं. एरिक क्लॅप्टन आणि मार्क नॉफलर (डायर स्ट्रेटस) यांच्या संगीतात याच्या खुणा जागोजागी दिसतात. डायर स्ट्रेट्सच्या गाण्यांमध्ये सहसा रॉक संगीतात न आढळणारा सॅक्सोफोन आहे. कधीकधी गाण्याच्या ओळींमधूनही मार्क आपल्या या सांस्कृतिक वारशाची आठवण काढतो (“The satin jazzmen have put away their horns”). डायर स्ट्रेट्सची गाणी कधीही ओळी गायच्या संपल्या म्हणून लगेच संपत नाहीत. ओळी संपल्या की गिटार आणि इतर वाद्यांची जुगलबंदी चालू होते – हा खास जॅझचा वारसा. यात बरंच ‘इंप्रोव्हायझेशन’ असतं. जॅझ संगीताचा ठेका वेगळा आहे त्यामुळे नेहमीची गाणी ऐकण्याची सवय असल्यावर जॅझ ऐकलं तर हे काय चाललंय असा प्रश्न पडू शकतो. सवय झाल्यावर त्या संगीताची ‘एनर्जी’ लक्षात यायला लागते. याचा सुरेख वापर नुकताच ‘द ग्रेट ट्रेन रॉबरी’ या चित्रपटात बघितला. इथे चित्तथरारक प्रसंगात नेहमीचं ढ्याण-ढ्याण संगीत न वापरता जॅझ संगीताचे तुकडे वापरले आहेत. खरं तर बहुतेक जॅझ संगीताचे सूर मंद असतात त्यामुळे ही कल्पना ‘काउंटर-इंट्यूटीव्ह’ वाटू शकते पण प्रत्यक्षात जॅझ संगीताची ‘एनर्जी’ या चित्तथरारक प्रसंगांना उत्तम साथ देते आणि एक वेगळा अनुभव मिळतो.

    इथे एक पूर्वी कधीही न झालेली आणि बहुधा होणारही नाही अशी तुलना करण्याचा मोह होतो आहे. मराठी लेखक जागतिक पातळीवर का पोचत नाहीत यातील अनेक कारणांपैकी बहुधा १६ (क) क्रमांकाचं कारण इथे सापडावं. हारुकी मुराकामी आणि गौरी देशपांडे. खरं तर या दोन लेखकांमध्ये फारसं साम्य नसावं, त्यात मी मुराकामीचं लेखन तुलनेनं अधिक वाचलं आहे. देशपांडेबाईंचं जे थोडं-फार वाचलं त्यावरून एक साम्य लक्षात आलं. दोघेही आशियाई लेखक आहेत आणि तरीही दोघांच्या लेखनात पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत आणि जॅझ-ब्लूज यांचे उल्लेख येतात. इथे साम्य संपतं. पहिल्यांदा बाईंच्या लेखनात हा उल्लेख पाहिला तेव्हा उत्सुकता वाटली होती, लवकरच त्या उत्सुकतेचे डोळे आणि हात बांधून टकमकटोकावरून तिचा कडेलोट करण्यात आला. देशपांडेबाईंच्या – ‘दुस्तर हा घाट’ आणि ‘थांग’ – या पुस्तकात दर काही पानांनंतर असे उल्लेख येतात,

    ‘मग बसून तिला मोत्सार्टबद्दल काय काय ऐकवले’,

    ‘आणि त्याने तिला जॅझ-ब्लूज-सोलवर एक व्याख्यान दिले,’

    ‘मग वनमाळी म्हणे,..”बा़ख वगैरे येरागबाळ्याचं काम नाही!” मग अ‍ॅलिस्टर चिडून त्याच्या ‘उच्चभ्रूपणावर टीका करी आणि जॅझ, ब्लूज, सोल, रॉक हे कसे लोकांचे संगीत आहे, राजेरजवाड्यांचे नाही, ते पटवून देई.’

    नवशिक्या लेखकांना नेहमी एक सल्ला दिला जातो, ‘शो, डोंट टेल.’ म्हणजे ‘त्याला राग आला’ असं न लिहिता राग आल्यावर त्याने काय केलं? – दार आपटलं, शेंडीला आग लावली – हे लिहा. देशपांडेबाईंच्या पात्रांना पाश्चात्त्य संगीताचं इतकं सखोल ज्ञान असूनही बाई ते ज्ञानकण वाचकांपर्यंत कधीच पोचवीत नाहीत. आणि जिथे या संगीताचं थोडंफार विश्लेषण होतं तिथेही ही मर्यादा दिसते. ‘दुसर्‍या ‘ब्रँडेनबुर्ग’मधलं हृदय भेदून टाकणारं ट्रंपेट’. बाखच्या दुसर्‍या ब्रँडेनबुर्ग काँन्चेर्तॉमध्ये ट्रंपेट हे मुख्य वाद्य आहे ही अगदी प्राथमिक माहिती आहे. हे म्हणजे ‘झाकिरभाईंच्या तबल्याचा जीवघेणा ठेका’ म्हणण्यासारखं आहे. आणि करुण प्रसंगासाठी हे संगीत कितपत योग्य आहे याची शंका वाटते. किंवा कधीकधी उलटं वाटतं जेव्हा नायिकेचे सासरे मरण पावतात तेव्हा तिला मोत्झार्टचं ‘रेक्वियम’ का आठवत नाही?

    आता मुराकामीकडे वळू. ‘काफ्का ऑन द शोर‘ या कादंबरीत दोन पात्रे शूबर्टबद्दल चर्चा करतात. ही चर्चा एक-दोन पानं चालते, एक उदाहरण. ‘..the Sonata in D Major. It’s a tough piece to master. Some pianists can play one or maybe two of the movements perfectly, but if you listen to all four movements as a unified whole, no one has ever nailed it. A lot of famous pianists have tried to rise to the challenge, but it’s like there’s always something missing.” अशी वर्णने, रसग्रहणात्मक चर्चा मुराकामीच्या लेखनात पानोपानी दिसते. आणि इथे शूबर्टचा सोनाटा कधीच मनासारखा वाजवता येत नाही ह्या अपूर्णतेला कथानकातही संदर्भ आहे. संगीत, त्याचा पात्रांशी संबंध आणि त्या पात्रांनी त्याचं केलेलं विश्लेषण या सर्वांचं कथानकामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. फक्त ‘मग त्याने शूबर्टवर तासभर व्याख्यान दिलं’ असं म्हणून मुराकामी गप्पा बसत नाही. किंबहुना मुराकामी वाचल्यानंतर त्याने ज्या संगीताचं वर्णन केलं आहे त्याचा खप वाढल्याची उदाहरणे आहेत. यूट्यूबवर बीटल्सचं ‘नॉर्वेजियन वुड’ गाणं आहे त्याखालच्या प्रतिसादांमध्ये अनेक प्रतिसाद आपण मुराकामीची याच नावाची कादंबरी वाचून इथे आल्याची कबुली देतात.

    फरक एव्हाना स्पष्ट झाला असावा. इथे मुद्दा शूबर्ट किंवा जॅझचा नाही. जर तुमचं पात्र या संगीतामध्ये बुडून गेलं आहे तर ते दिसायला हवं आणि यासाठी मुळात लेखकाला त्या संगीतामध्ये बुडून जाता यायला हवं. हे झालं नाही तर पात्राची संगीताची आवड वरवरची आहे हे लक्षात येतं आणि पात्रे कृत्रिमपणाकडे झुकू लागतात. आता मोत्झार्ट किंवा जॅझ जितके देशपांडेबाईंच्या संस्कृतीला परके तितकेच मुराकामीच्याही. तरीही एखाद्या परकीय कलाप्रकारामध्ये स्वतःला झोकून देण्याची वृत्ती मुराकामीत आहे (त्याच्या जागतिक लोकप्रियतेचं हे एक मुख्य कारण आहे, पाश्चात्त्य लोक त्याच्या कादंबर्‍यांशी ‘रिलेट’ करू शकतात) ती देशपांडेबाईंच्या लेखनात दिसत नाही. आणि हा अपवाद नाही, दुर्दैवाने ही वृत्ती बहुतेक भारतीयांमध्ये दिसते.

    अमेरिकेला जायचं नक्की झाल्यावर भारतीय लोक हुरळून जातात, मात्र ‘ आता मला जॅझ-ब्लूजच्या पंढरीत जायला मिळेल’ या जाणिवेने आनंदित झालेला भारतीय माझ्या बघण्यात नाही. तिथे पिढ्यानपिढ्या राहूनही बहुतेक लोकांची ‘प्ले-लिस्ट’ बाबूजी, लता-आशा, कुमारजी यांच्या पलीकडे जात नाही. सर्वांना जॅझ आवडायलाच हवं असा आग्रह नाही, हा प्रश्न वृत्तीचा आहे. बरेचदा भारतीय जाण्याच्या आधीच तिथे इतर भारतीय कोण आहेत याचा शोध घेतात. यात अर्थातच प्रॅक्टिकल भाग असतो. परकीय देशात मदत लागल्यावर ओळखीचं कुणी असेल तर बरं असतं. पण सेटल झाल्यानंतरही भारतीय इतर भारतीयांची साथ सोडत नाहीत. मग तिथे आपली संस्कृती जपण्याचे प्रयत्न सुरू होतात. यात हेतू शुद्ध असतो मात्र साध्य फारसं काही होत नाही. कुमारजी इथे ऐकले काय किंवा तिथे ऐकले काय सारखंच. (आणि कुमारजी ऐकणं सोडून द्या असंही म्हणायचं नाही.) पण एक वेगळी संस्कृती अनुभवण्याची संधी असेल तर का घेऊ नये? जेवताना टेबलावर भारतीय असेल तर बहुतेक वेळा गप्पा ठराविक विषयांवरच होतात – राजकारण, भारत- परदेश तुलना, इथे किती सोप्पं आहे इ किंवा सर्वात फेवरिट विषय – वडापावपासून टपरीवरच्या चहापर्यंत सर्वांसाठी अतीव नोस्टाल्जिक होणं. (नोस्टाल्जियाच्या मी अजिबात विरुद्ध नाही पण तो प्रमाणात असेल तरच रुचकर लागतो असं वाटतं.) याउलट एखादा जपानी किंवा ग्रीक माणूस असेल तर तुम्हाला एका परकीय संस्कृतीचा खजिना सापडू शकतो. इथे अर्थातच सर्वांनी हे करायलाच हवं असं नाही, व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर आहेच.

    आणि आता तर यासाठी कुठे जायचीही गरज नाही. आंतरजालामुळे जी हवी ती संस्कृती चुटकीसरशी उपलब्ध आहे.

    —-

    १. देशपांडेबाईंवर सरसकट टीका करण्याचा हेतू नाही याची कृपया त्यांच्या फ्यानिणींनी नोंद घ्यावी. (वाघ – वाघीण, फ्यान – फ्यानीण. वाघिणींच्या संख्येत घट होत असली तरी फ्यानिणींची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.)