Category: बुके वाचिते

  • गुस्ताव्ह फ्लोबेर, पोपट आणि कादंबरी

    सार्वजनिक माध्यमांमध्ये काही आरोळ्या विशेष लोकप्रिय असतात. राज्य पातळीवर ‘मराठी भाषेचा लोप होतो आहे’ ही जशी नेहमी उठणारी आरोळी आहे तशीच आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘कादंबरी हा प्रकार आता मृत झाला आहे (यावेळी अगदी नक्की बरं का!)’ हीसुद्धा नेहमी ऐकू येणाऱ्या आरोळ्यांपैकी एक. जागतिक स्तरावर कादंबरीच्या स्वरुपात गेल्या दोन-तीन शतकात अनेक बदल झाले. ग्रॅंट स्नायडरने हे एका…

    सार्वजनिक माध्यमांमध्ये काही आरोळ्या विशेष लोकप्रिय असतात. राज्य पातळीवर ‘मराठी भाषेचा लोप होतो आहे’ ही जशी नेहमी उठणारी आरोळी आहे तशीच आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘कादंबरी हा प्रकार आता मृत झाला आहे (यावेळी अगदी नक्की बरं का!)’ हीसुद्धा नेहमी ऐकू येणाऱ्या आरोळ्यांपैकी एक. जागतिक स्तरावर कादंबरीच्या स्वरुपात गेल्या दोन-तीन शतकात अनेक बदल झाले. ग्रॅंट स्नायडरने हे एका कार्टूनमधून उत्तम प्रकारे दाखवलं आहे. हा प्रवास बरेचदा नैसर्गिकपणे झाला – इथे नैसर्गिकचा अर्थ सामाजिक, राजकीय आणि/किंवा व्यक्तिगत पातळीवर घडणारे बदल आणि त्या बदलांना दिलेली प्रतिक्रिया असा घ्यावा. सुरुवात पारंपरिक कादंबरी वाचनापासून झाली, नंतर इतर प्रकारांची ओळख होत गेली – अजूनही होते आहे. यातले काही आवडले, पटले, इतर काही तितकेसे पटले नाहीत किंवा भावले नाहीत. नंतर एक गोष्ट लक्षात आली. बहुतेक वेळा एखाद्या नवीन प्रकारची कादंबरी वाचण्याआधी त्या प्रकाराची ओळख करून घेतली नाही तरी चालू शकतं. किंबहुना कधीकधी पथ्यावरच पडतं. उदा. मुराकामीचं साहित्य आधुनिकोत्तर प्रकारात मोडतं पण ते पारंपरिक जरी असतं तरी तो तितकाच आवडला असता यात शंका नाही कारण त्याच्या कादंबऱ्या वाचल्यावर जे मिळतं ते या प्रकारांच्या वर्गीकरणाच्या पलिकडे असतं.

    नुकतीच ज्युलियन बार्न्स या ब्रिटीश लेखकाची ‘फ्लोबेर्स पॅरट’ ही कादंबरी वाचली. खरं सांगायचं तर विशेष आवडली नाही तरीही त्यावर लिहावसं वाटलं याचं कारण बार्न्सने यात अनेक गमतीजमती केल्या आहेत. एकदा वाचताना ठीक वाटतात. गुस्ताव्ह फ्लोबेर हा एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध फ्रेंच लेखक. याने कादंबरीत ‘वास्तववाद’ आणला असं मानलं जातं. याच्या साहित्यामध्ये प्रसंग आणि परिसर यांचं अचूक वर्णन असे, आणि हे वर्णन शक्य तितकं अचूक व्हावं, ते वाचल्यावर वाचकाच्या डोळ्यासमोर चित्र यावं यासाठी फ्लोबेर खूप परिश्रम घेत असे. ‘अ सिंपल हार्ट’ नावाची लघुकथा लिहीत असताना त्या कथेत एक पोपटाचं पात्र होतं. त्याचं वर्णन हुबेहुब व्हावं म्हणून फ्लोबेरनं एक पोपट उसना आणला आणि कथा लिहून होईपर्यंत तो त्या पोपटासमोर बसून त्याचं निरिक्षण करत होता. बार्न्सच्या कादंबरीच्या नावाचा हा संदर्भ आहे. बार्न्स हा आधुनिक लेखक – सोप्या शब्दात सांगायचं तर कादंबरीच्या पारंपरिक नियमांना न जुमानणारा. कादंबरीच्या मुख्य पात्राला – जेफरीला – फ्लोबेरमध्ये खूप रस असतो आणि तो त्याच्या आयुष्यातील सर्व धागेदोरे शोधत असतो. एका वास्तववादी लेखकावर कादंबरी लिहीताना बार्न्सने जी कादंबरी लिहीली ती वास्तववादाचं दुसरं टोक आहे.

    ब्रिटीश लेखक विल सेल्फ हा अशा आरोळ्या मारणाऱ्यांमध्ये आघाडीवर असतो. नुकताच त्याचा याच आशयाचा एक लेख (का?) वाचला. ढीगभर बोलूनही मुद्यावर न येण्याची कला याला छान साधते. लेखाचा सारांश असा : अजूनही आधुनिकतावाद (मॉडर्निझ्म) चालू आहे – सेल्फसाहेबांना आधुनिकतावाद लई प्रिय. त्याच्या नंतरचं किंवा आधीचं काहीही त्यांना मंजूर नाही. जेम्स जॉयसने ‘फिनेगन्स वेक’ लिहीली तेव्हाच कादंबरी हा प्रकार मरणासन्न झाला. त्यानंतर अनेक चांगल्या कादंबऱ्या लिहील्या गेल्या हे मान्य पण त्यांच्यात काही राम नव्हता. (म्हणजे त्या कादंबऱ्या चांगल्या होत्या की नाही? एक पे रैना – घोडा या चतुर.) नंतर अनेक प्यारे(मोहन नाही, ग्राफ) डिजीटल मिडीया कसा फोफावतो आहे, रॉक संगीतात राम, सुग्रीव किंवा जांबुवंत कसे उरलेले नाहीत, सोशलिझ्म, लोकांचं वाचन कसं कमी झालं आहे याडा, याडा. आणि अर्थातच मागच्या दशकात रोलिंग बाईंच्या हॅरी पॉटर कादंबऱ्या धो-धो चालल्या याचा इथे काहीही संबंध नाही कारण सेल्फसारखे उच्चभ्रू लेखक ज्या हस्तीदंती मनोऱ्यांमध्ये राहतात तिथे रोलिंगबाइंचं नाव जरी ऐकलं तरी आत्मशुद्धी करावी लागते म्हणे. साहजिकच हॅरी पॉटरमुळे किती लहानग्यांना वाचनाची गोडी लागली हा मुद्दा विचारात घ्यायचं कारणच नाही. सुरूवात कादंबरी हा प्रकार मृत झाला आहे अशी, शेवट गंभीर कादंबऱ्या अजूनही लिहील्या आणि वाचल्या जातील असा. मधलं लांबलचक गुर्हाळ वाचल्यानंतरही हातात काही न पडल्यामुळे बिचारे वाचक कपाळ बडवून घेतात. ही कपाळबडवी लेखावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये उत्तम प्रकारे दिसली. क्षणभर आंग्लाळलेल्या मुक्तपीठावरच्या प्रतिक्रिया वाचतो आहोत की काय असा भास झाला. एक उदाहरण, “Well basically, the novel is dead because a metaphorical rhombus-shaped canary wants to go down a mine rather than read one. Or something. And because Western European socialists don’t like Stalinism or Hollywood. It’s pretty simple really, who needs any statistics or proof?”

  • भारतीय गुप्तचर यंत्रणेचे वास्तव : एस्केप टू नोव्हेअर

    हेरगिरी हा लेखकांचा आणि चित्रपट निर्मात्यांचा आवडता विषय असतो कारण यात कथानक मनोरंजक करण्यासाठी आवश्यक असलेले बरेचसे घटक आधीच असतात. अर्थात याचा अर्थ हेरगिरीचं सर्व चित्रण वास्तवाला धरून असतं असा नाही. ‘मिशन इम्पॉसिब्ल’मध्ये सीआयएमध्ये प्रवेश करायला टॉम क्रूझला अर्धा चित्रपट लागतो, तेच काम ‘बॉर्न अल्टीमेटम’मध्ये जेसन बॉर्न अडीच मिनिटात करतो. खरं काय कुणास ठाऊक. अर्थात…

    हेरगिरी हा लेखकांचा आणि चित्रपट निर्मात्यांचा आवडता विषय असतो कारण यात कथानक मनोरंजक करण्यासाठी आवश्यक असलेले बरेचसे घटक आधीच असतात. अर्थात याचा अर्थ हेरगिरीचं सर्व चित्रण वास्तवाला धरून असतं असा नाही. ‘मिशन इम्पॉसिब्ल’मध्ये सीआयएमध्ये प्रवेश करायला टॉम क्रूझला अर्धा चित्रपट लागतो, तेच काम ‘बॉर्न अल्टीमेटम’मध्ये जेसन बॉर्न अडीच मिनिटात करतो. खरं काय कुणास ठाऊक. अर्थात अपवाद आहेत. जॉन ल कारेचे गुप्तहेर ‘मार्टीनी – शेकन, नॉट स्टर्ड’ वगैरे मागताना दिसत नाहीत, उलट अकाउंट्सने पेन्शन मंजूर न केल्यामुळे खस्ता खाताना दिसतात.

    Book cover for Escape to Nowhere

    या पार्श्वभूमीवर अमर भूषण यांची ‘एस्केप टू नोव्हेअर’ ही कादंबरी बऱ्याच बाबतीत उल्लेखनीय आहे. अमर भूषण २००५ साली कॅबिनेटमधून ‘स्पेशल सेक्रेटरी’ या पदावरून निवृत्त झाले. जवळजवळ चाळीस वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणेचा जवळून अनुभव घेतला. कादंबरी एका सत्य घटनेवर आधारित आहे. २००४ मध्ये एजन्सीचा – संपूर्ण पुस्तकात रॉचा ‘एजन्सी’ असा उल्लेख आहे – एक वरिष्ठ अधिकारी अचानक गायब झाला. या अधिकाऱ्यावर देशाची गुप्त माहिती विकण्याच्या संशयावरून पाळत ठेवली जात होती. हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर झालेल्या गदारोळात अनेक दोषारोपांच्या फैरी झडल्या, एजन्सीच्या प्रमुखांवर ठपका ठेवण्यात आला. ही कादंबरी म्हणजे अमर भूषण यांनी या प्रकरणाचं त्यांच्या दृष्टिकोनातून केलेलं वर्णन आहे.

    एजन्सीच्या सुरक्षा विभागाचा प्रमुख, जीवमोहन. एकदा ‘सायबर ऑपरेशन्स’चा विभाग प्रमुख वेंकट त्याला भेटायला येतो, भेटायचं कारण असतं रवी मोहनविरुद्ध तक्रार. रवी पूर्व एशिया विभागाचा ‘सिनियर अनालिस्ट’. वेंकटच्या म्हणण्यानुसार रवी त्याला वरचेवर त्याच्या कामाबद्दल विचारत राहतो. फक्त त्यालाच नही तर इतर सर्व विभागातील लोकांशीही रवीचा संपर्क असतो आणि त्या सर्वांकडून रवी नेहमी माहिती काढून घेत असतो. वेंकटला रवी परदेशी गुप्तहेर यंत्रणेसाठी काम करत आहे असा संशय असतो. आरोप गंभीर असल्यामुळे जीव त्याचा सहाय्यक अजय आणि ‘काउंटर एस्पियोनाज युनिट’चा प्रमुख कामथ या दोघांना बोलावतो. कामथ रवीवर पाळत ठेवण्याची व्यवस्था करतो. जीव त्याचा वरिष्ठ वासनला भेटून सर्व कल्पना देतो. कादंबरीमध्ये प्रकरणांऐवजी पहिला दिवस, दुसरा दिवस असे भाग आहेत – एकूण प्रवास पंचाण्णव दिवसांचा. (कित्येक वर्षानंतर पंचाण्णव हा शब्द लिहिण्याची संधी आली.) रवी ‘झाएर क्लब’ नावाच्या एका महागड्या जिमचाही मेंबर असतो पण तिथे प्रवेश मिळवण्यासाठी कामथ आणि सहकाऱ्यांना बऱ्याच अडचणी येतात. रवीला ऑफिसमध्ये भेटण्यासाठी बरेच लोक येत असतात – आर्मीचे उच्चपदस्थ अधिकारी, एजन्सीच्या विविध विभागाचे प्रमुख. याशिवाय रवी नेहमी ओबेरॉयसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्ट्याही देत असतो. एकुणात रवीचं राहणीमान त्याच्या पगारापेक्षा खूप वरचं असतं. रवीचा कार्यालयातील फोन टॅप करण्यात येतो. शिवाय या ऑपरेशनसाठी एक वेगळी ‘नर्व्ह सेंटर’ नावाची कंट्रोल रुम उघडण्यात येते. तिथे टॅप केलेल्या संवादांचं शब्दांकन करण्यात येतं. रवीच्या टेलिफोन कॉलवरुन फारशी माहिती मिळत नाही, रवी फोनवर बोलताना काळजी घेऊन फारसं महत्त्वाचं बोलत नाही असं लक्षात येतं. काही दिवसानंतर जीव कामथला रवीच्या ऑफिसमध्ये चालत असलेलं बोलणं रेकॉर्ड करायला सांगतो. दरम्यान जीव रवीच्या गेल्या दहा वर्षात झालेल्या सगळ्या पोस्टींग्ज, त्याने घेतलेल्या रजा इत्यादींची माहिती मागवतो. यात रवी बाल्टिमोर, वॉशिंग्टन, काठमांडू, बॅंकॉक, इत्यादी ठिकाणी नेहमी जात असल्याचं दिसून येतं.

    एजन्सीच्या एका वरिष्ठ तंत्रज्ञाला विश्वासात घेऊन रात्री ९ वाजता रवीचं ऑफिस उघडण्यात येतं. पुढचे सात तास खोलीत वेगवेगळ्या ठिकाणी रेकॉर्डर बसवण्यात येतात. पहाटे चार वाजता कामथला ‘मिशन सक्सेसफुल’ असा फोन येतो. दरम्यान रवीने झेरॉक्स इंडियाला केलेल्या एका कॉलमुळे कामथ सतर्क होतो. रवी झेरॉक्सच्या तंत्रज्ञाला त्याच्या घरी असलेला श्रेडर बिघडला असल्याचं सांगतो आणि तो लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी करतो. इथे रवीवर असलेला संशय बळकट होतो. घरी श्रेडर आहे याचा अर्थ रवी घरी नियमितपणे कागदपत्रे नष्ट करतो आहे. रवी त्याला भेटायला येणाऱ्या लोकांकडे काश्मीर, पाकिस्तान, बांग्लादेश, भारत-चीन संबंध, अशा अनेक विषयांवरील गोपनीय माहितीची नेहमी मागणी करत असतो. बरेचदा अधिकारी त्याला कागदपत्रांच्या प्रतीही देत असतात. अजूनही ठोस पुरावा हाती आलेला नसतो. यानंतर रवीच्या ऑफिसमध्ये आणि कारमध्ये कॅमेरे बसवण्यात येतात आणि तो ऑफिसमध्ये रोज काय करतो याचं चित्रण केलं जातं. इथे एक महत्त्वाचा दुवा सापडतो. रोज रवी जेवणानंतर खोलीचं दार बंद करतो आणि कधी २५ तर कधी ४० अशा संख्येमध्ये कागदपत्रे झेरॉक्स करतो. संध्याकाळी आपल्या बॉगमध्ये ही कागदपत्रे तो घरी नेतो. बॅग कधीही प्यूनजवळ देत नाही. आता प्रश्न येतो की तो नेमके कोणते कागद झेरॉक्स करतो आहे? यासाठी कॅमेरा हालवण्यात येतो पण झेरॉक्सच्या प्रकाशात काही वाचणं शक्य होत नाही. इथे जीव एक युक्ती सुचवतो. फोटो डिव्हिजनच्या अधिकाऱ्याला बोलावून झेरॉक्स केलेली कागदपत्रे मेमरीमध्ये साठवू शकेल असं मशीन विकत घ्यायला सांगतो. रवी ब्रुनेईला गेलेला असताना त्याच मशीन नादुरुस्त करण्यात येतं. परत आल्यावर त्याने तक्रार केल्यानंतर हे नवीन मशीन त्याला तात्पुरतं म्हणून देण्यात येतं. अखेर रवी नेमकं काय करतो आहे याचे पुरावे मिळतात.

    अजूनही रवीला अटक करणं शक्य नसतं कारण मिळालेले पुरावे न्यायालयात फारसे उपयोगी नसतात. रवीला ३११(२)(c) च्या खाली बडतर्फ केलं जाऊ शकतं पण तो कोर्टात गेला तर मी कागदपत्रे घरी अभ्यास करण्यासाठी नेत होतो असं म्हणू शकतो. जोपर्यंत रवीच्या बाहेरच्या गुप्तचर संस्थेमध्ये कॉन्टॅक्ट कोण आहे याचा पत्ता लागत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नसतो. रवीच्या घरातही कॅमेरे बसवण्यात येतात. दरम्यान एक दिवस रवी अचानक प्युनला त्याच्या ऑफिसमध्ये असलेल्या फायली कारमध्ये ठेवायला सांगतो. प्यून फायली घेऊन जात असताना काउंटर एस्पियोनाज युनिटचे दोन अधिकारी त्याला हटकतात आणि फायली जप्त करतात. जीवला हे कळल्यावर तो वासनला सांगतो. आता जर फक्त रवीच्या फायली जप्त केल्या तर त्याला संशय येईल म्हणून ते त्या दिवशी संध्याकाळी बाहेर जाणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याची बॅग तपासतात आणि कागदपत्रे जप्त करतात. हे रूटीन चेक आहे असं सर्वांना सांगण्यात येतं. आता वासनचा धीर सुटायला लागतो. प्रकरण पंतप्रधानांचे प्रमुख सल्लागार – प्रिंसिपल सेक्रेटरी उर्फ प्रिंसीपर्यंत गेलेलं असतं. प्रिंसी भारत-अमेरिका संबंध सुधारण्याच्या मागे असतो त्यामुळे त्याला हे प्रकरण शक्यतो आतल्या आतच मिटवावं असं वाटत असतं. यावर बोलताना वासन इस्रोचं उदाहरण देतो. इस्रोच्या दोन शास्त्रज्ञांना हेरगिरीच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने दोघांना निर्दोष जाहीर केले. नंतर ब्युरोच्या शताब्दी समारंभात बोलताना अब्दुल कलाम यांनी या प्रकरणावरून ब्युरोला शालजोडीतले दिले होते.

    ही कादंबरी असली तरी सत्य घटनेवर बेतलेली असल्याने पारंपरिक कादंबरीचे स्वरूप घेत नाही. खरं तर याला मोहन यांच्या आठवणी म्हणता येऊ शकेल पण असं करण्यात कदाचित ‘ऑफिशियल सीक्रेट्स ऍक्ट’चा भंग होऊ शकेल. शिवाय नकळत गुप्तचर यंत्रणेच्या कामाबाबत महत्त्वाचे धागेदोरे उघड होण्याचाही संभव आहे. यासाठीच मोहन यांनी सत्य आणि कल्पना यांची सरमिसळ केली असावी. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे कादंबरी लिहीण्याचा मोहन यांचा मुख्य उद्देश एजन्सीत काम करणाऱ्या तरूण लोकांना एजन्सीच्या कामातील खाचखळग्यांची जाणीव करुन देणे हा आहे. सरकार, प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणेचे अनेक पैलू इथे बघायला मिळतात. आपली गुप्तचर यंत्रणा पंतप्रधानांच्या हाताखाली काम करते. आपल्या राजकीय नेत्यांचा आवाका बघता याचा अर्थ एजन्सीचा बराच कारभार प्रिंसीच्या हातात असावा असं वाटतं. दर वेळी पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या गप्पा सुरू झाल्या, समझोता एक्सप्रेस धावायला लागली की वरून एजन्सीला आपलं काम सौम्य करण्याचे आदेश येतात. मात्र आयएसआय असं करत नाही म्हणूनच त्यांचं भारतातील जाळं अधिक कार्यक्षम आहे असा अंदाज कादंबरीच्या पात्रांच्या बोलण्यावरून येतो. याखेरीज शेजारी देशातील फुटीर कारवायांना उत्तेजन देणे, पैसा पुरवणे, तिथल्या खबऱ्यांना पोसणे अशा एजन्सीच्या सहसा उघड होत नसलेल्या कामांबद्दलही चर्चा होते. आर्मी, नेव्ही, ब्यूरो, सीबीआय यांच्यातील नेहमी होणारे संघर्षांची कल्पना येते. भारतीय गुप्तचर यंत्रणेचे कधीही न समोर आलेले रूप या कादंबरीत बघायला मिळते.

  • गाव मागचा मागे पडला

    ख्रिस स्ट्युअर्ट​ ‘जेनेसिस’ या बॅंडमधला ड्रमर. दोन अल्बम केल्यानंतर संगीताचे क्षेत्र सोडून युरोपमध्ये फिरून मेंढ्यांची लोकर काढणे, प्रवासविषयक पुस्तके लिहीणे अशी कामे केली. अखेर इंग्लंडमधले राहते घर विकून स्पेनमधल्या अन्दालुचिया या चिमुकल्या गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ‘ड्रायव्हिंग ओव्हर लेमन्स’ ही या प्रवासाची गोष्ट. अन्दालुचियावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली, एका बाजूला बर्फाने आच्छादित पर्वत, घराजवळूनच…

    ख्रिस स्ट्युअर्ट​ ‘जेनेसिस’ या बॅंडमधला ड्रमर. दोन अल्बम केल्यानंतर संगीताचे क्षेत्र सोडून युरोपमध्ये फिरून मेंढ्यांची लोकर काढणे, प्रवासविषयक पुस्तके लिहीणे अशी कामे केली. अखेर इंग्लंडमधले राहते घर विकून स्पेनमधल्या अन्दालुचिया या चिमुकल्या गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ‘ड्रायव्हिंग ओव्हर लेमन्स’ ही या प्रवासाची गोष्ट. अन्दालुचियावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली, एका बाजूला बर्फाने आच्छादित पर्वत, घराजवळूनच जाणारी नदी, संत्री, लिंबं यांच्या बागा, फळफुलांची शेतं. तरीही शहरातून इथे स्थायिक व्हायचे म्हणजे सोपं काम नाही. नदीवर पूल बांधण्यापासून ते टेकडीवरच्या झर्‍यातून घरापर्यंत पाणी येण्याची व्यवस्था करण्यापर्यंत सगळी कामे स्वत:च करायची. मदतीला शेजारपाजारचे दोमिन्गोसारखे मित्र होतेच. एकदा मूलभूत गरजा भागल्यानंतर ख्रिस आणि त्याची बायको आना यांचे प्रयोग सुरू झाले. कुक्कूटपालन, मेंढ्या-बकर्‍या, डुकरे पाळणे, बागेतील शेती आणि मशागत. काही प्रयोग यशस्वी झाले तर काही सपशेल फसले.

    ख्रिसची लिहीण्याची शैली सरळ आणि प्रामाणिक आहे. आयुष्याकडून फार गडगंज अपेक्षा न ठेवता निसर्गाच्या सान्निध्यात राहून साधं आयुष्य जगायचं ही माफक मागणी. आपल्या निर्णयाबद्दल तो फारसं बोलत नाही. इंग्लंडमधलं आयुष्य का नकोसं वाटलं याबद्दल ‘तिथे विम्याची नोंदणी करत बसण्यापेक्षा हे किती बरं’ असं एखादं मोघम वाक्य येतं. पण टेकडीवरच्या झर्‍यामधून पाचर खोदल्यानंतर येणारा पाण्याचा पहिला प्रवाह बघणे, शेळ्या-मेंढ्या टेकडीवर चरताना त्यांच्या गळ्यातील घंटा झाडाखाली बसून ऐकणे किंवा उन्हाळ्यात रात्री असह्य उकाडा झाल्यावत नदीत डुंबायला जाणे अशा वरकरणी साध्या पण अर्थपूर्ण गोष्टी करताना त्याला मिळणारा आनंद पाहून ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं त्याने म्हटलं नाही तरी आपल्याला ते जाणवत रहातं. “It was a thrill, that first day, watching as the water gathered and swelled and saturated the dry earth. It crept up the bank, pouring into the ant-hills and mole-runs, and little by little turned into a full-blown stream. Seeing it, I would splash through to the head and race around the next corner to await the miracle all over again.”

    व्ही. एस. नायपॉल साहित्यक्षेत्रातील मोठं नाव. ‘ऑन लिटररी ओकेजन्स’ हे त्यांनी वेळोवेळी लिहीलेल्या निबंधांचे पुस्तक, यात त्यांचं नोबेल पारितोषिक भाषणही आहे. नायपॉल बर्‍याच विषयांवर बोलतात, त्यातील एक मुख्य आणि परतपरत येणारा विषय म्हणजे स्वत:चा शोध. त्यांचे बालपण त्रिनिदादमध्ये गेलं, आजोबा मजूर म्हणून भारतातून आल्यानंतर नंतरच्या पिढ्या तिथेच स्थायिक झाल्या. त्यांच्या वडीलांनी लहानपणापासून तुला लेखक व्हायचय असं मनावर बिंबवलेलं. लहानपणी जे वाचायला मिळालं, डिकन्सपासून वेल्सपर्यंत, त्यातील वातावरण, पात्रे नेहेमी परकी वाटत राहीली. एकदा गावात झालेली रामलीला बघितली हाच काय तो भारतीय संस्कृतीचा परिचय. नायपॉल यांच्या शब्दात सांगायचं तर, ‘आम्हाला वाटलं की आम्ही आमच्याबरोबर भारचा एक तुकडा आणला आहे आणि तो एखाद्या गालिच्याप्रमाणे इथे पसरता येईल.’ हिंदी कळत होतं पण बोलता येत नव्हतं. ऑक्सफर्डला स्कॉलरशिप मिळाल्यावर नायपॉलना वाटलं की आता लेखकांच्या या देशात गेल्यावर आपल्या प्रतिभेला जाग येईल. पण तसं काहीच झालं नाही, उलट गोंधळ अजून वाढत गेला. अखेर इग्लंडमध्येच त्यांना स्वत:मध्ये दडलेला लेखक सापडला पण तो त्यांच्या लहानपणी घरासमोर जो रस्ता होता त्या रस्त्याच्या आठवणींमध्ये. रस्ता, घरं, तिथले लोक आठवत गेले आणि ‘मिगेल स्ट्रीट’ हे पुस्तक तयार झालं.

    पहिलं पुस्तक लिहील्यानंतर बाकीची आपोआप येतील ही त्यांची कल्पना फोल ठरली दुसर्‍या पुस्तकाच्या वेळी पाटी परत कोरी होती. योगायोगानं त्यांना त्रिनिदाद आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लिहीण्यासाठी आमंत्रण मिळालं. यासाठी आपण जिथे रहात होतो तिथल्या त्या भागाच्या इतिहासाचा अभ्यास करता आला. अंतर्मनात आणखी एक धागा जुळला आणि हेच प्रत्येक वेळी होत राहीलं. भारतीय वंश असूनही भारत परका होता. नेहरू, टागोर, गांधी किंवा आर. के नारायण यांच्या लेखनातून दिसणारा भारत एकांगी भासत होता. भारतात येऊन प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर भारतावर दोन पुस्तके लिहीली. एका ठिकाणी नायपॉल म्हणतात, “To take an interest in a writer’s work is, for me, to take an interest in his life; for one interest follows automatically the other.” थोडा विचार केल्यानंतर वाक्य पटायला लागतं. हॅम्लेट अनेक अर्थांनी श्रेष्ठ कलाकृती आहे पण शेक्सपिअरने ज्या काळात हॅम्लेट लिहीलं त्या काळातील रेनेसान्सचे युरोपभर उमटलेले प्रतिसाद, कॅथोलिक धर्माविरूद्ध मार्टीन लूथरने सुरू केलेलं बंड आणि प्रोटेस्टंट शाखेचा उदय, एनलायटनमेंटची सुरूवात हे सगळं लक्षात घेतलं तर ‘टु बी ऑर नॉट टू बी’ च्या अर्थाचे निराळे पदर उलगडतात. तसंच नायपॉल यांची पुस्तकं वाचल्यानंतर पुस्तकाच्या विषयापेक्षा नायपॉल यांची वेगळी ओळख पटायला लागते.

    ही दोन पुस्तकं कुठल्याही दुकानात एका भागात सोडाच, एका खोलीतही दिसणार नाहीत कदाचित. ही एकामागून एक वाचली म्हणून त्यांच्यातला एक समान धागा लक्षात आला, नाहीतर ते ही झालं नसतं. ख्रिस किंवा नायपॉल दोघेही आपल्या सद्यस्थितीवर संतुष्ट नाहीत. दोघांनाही अस्वस्थ वाटतय, दोघांनाही आपल्या अस्वस्थतेवर आपापल्या परीने मार्ग शोधले आहेत. ख्रिसचा मार्ग ‘दिल से’ मार्ग आहे, जास्त विश्लेषण न करता (किंवा जास्त विश्लेषण केलं आहे असं न दाखवता कारण ब्रिटीश माणसं विचार न करता असा निर्णय घेतील यावर विश्वास बसणं कठीण. त्या जागी एखादा इटालियन किंवा स्पॅनिश असता तर गोष्ट वेगळी.) नायपॉल आत्मपरिक्षण आणि काहीसा कॅथार्टीक म्हणता येईल असा मार्ग शोधतात. प्रत्येक पुस्तक लिहील्यानंतर त्यांना स्वत:च्याच एका पैलूची ओळख होते.

    ख्रिसला जे हवंय ते वरकरणी सरळ आहे असं वाटतं पण तसं नसावं. शेतीच करायची तर ती इंग्लंडमध्येही करता आली असती पण त्याला स्पेन आवडतं. तिथे राहताना पहिल्यांदा एक ब्रिटीश जोडपं भेटतं तेव्हा ‘हे इथे कशाला आले’ असा विचार त्याच्या मनात चमकून जातो. ब्रिटीश संस्कृतीबद्दल नावड आणि दक्षिण युरोपमधील मोकळ्या-ढाकळ्या वातावरणाचं आकर्षण असा काहीसा हा पेच आहे असं वाटतं. जे इंग्लंड ख्रिसला नकोसं झालं त्याबद्दल नायपॉल यांना सुप्त आकर्षण होतं. (इथे ‘कलोनियल’ म्हणून जी ओळख जन्मत:च मिळाली त्याबद्दल ते विस्ताराने बोलतात.) पण त्यांच्यातला लेखक प्रगट झाला तो मात्र त्रिनिदाद आणि भारतातच. म्हणूनच ते म्हणतात, “To become a writer, that noble thing, I had thought it necessary to leave. Actually, to write, it was necessary to go back. It was the beginning of self-knowledge.”

    माणसाला नेमकं काय हवय यावर भल्याभल्यांनी लिहीलय. ख्रिसला अन्दालुचियामध्ये आपलं गाव सापडलं, नायपॉलना त्यासाठी आपल्या भूतकाळात दडलेली पाळंमुळं शोधावी लागली तर कुणाला टोक्योमधला चांगला चालणारा बार बंद करुन कादंबरी लिहायला घ्यावीशी वाटली. इथे बरोबर किंवा चूक असं काही नसतं.

    To each his own.