Category: बुके वाचिते

  • कोरियन लेखक चो से-हुई यांची प्रभावी कादंबरी : द ड्वार्फ

    कुठल्याही कथेच्या दृष्टीने दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. कथेचा निवेदक कोण आहे आणि कथा कुणाच्या दृष्टीकोनातून सांगितली जात आहे. ड्वार्फमध्ये प्रत्येक प्रकरणात निवेदक बदलतो, इतकेच नाही तर बरेचदा एकाच कथेमध्ये, वेगवेगळे निवेदक आणि स्थलकाल यांची वाचकाला कुठलीही पूर्वसूचना न देता सरमिसळ केलेली आहे.

    शाळेच्या वर्षाचा शेवटचा दिवस. गणिताचा तास चालू आहे. शिक्षक आज सिलॅबसबाहेरचं बोलणार आहेत. कट.

    एक जण सरपण गोळा करून त्यावर शेंगा भाजतो आहे. सरपणाचे लाकूड समोर नुकत्याच पाडलेल्या घरांचे आहे. घरे बेकायदा होती. बहुधा.

    त्याचा मित्र येतो, त्याचेही घर गेले आहे. अंधार पडल्यावर ते रस्त्याच्या कडेला दबा धरून बसतात. एक कार येते. त्यात ज्या माणसाने या सर्वांच्या घराचे कागद विकत घेतले तो आहे. दोघे त्यावर हल्ला करतात. पैसे, कागद ताब्यात घेतात. कार पेटवून देतात. कट.

    शिक्षक सांगतो आहे.

    Imagine a solid where you can’t divide inner and outer—a Möbius-type solid. The universe—infinite, endless—we can’t seem to tell its inside from its outside. This simple Möbius strip conceals many truths.

    चो से-हुई यांच्या ‘द​ ड्वार्फ‘ या कादंबरीची सुरूवात अशी होते. कादंबरी नेहेमीपेक्षा बर्‍याच बाबतीत वेगळी आहे. कादंबरी लिंक्ड नोव्हेल (कोरियनमध्ये याला yŏnjak sosŏl असे म्हणतात.) स्वरूपात आहे. याचा अर्थ कादंबरीतील प्रत्येक प्रकरण एक छोटी गोष्ट आहे. अशा प्रकारची कादंबरी लिहीताना निरनिराळे लेखक एक-एक प्रकरण लिहीतात. मात्र इथे लेखक एकच आहे. या गोष्टी स्वतंत्रपणेही वाचता येतात आणि सगळ्या गोष्टी सलग वाचल्या तर त्याला कादंबरीचे स्वरूप येते. किंबहुना सुरूवातीला चो से-हुई यांनी या गोष्टी विविध कोरियन मासिकांमध्ये प्रकाशित केल्या होत्या. नंतर त्या एकत्रित करून ड्वार्फ तयार झाली.

    कादंबरीचा विषय बेसुमार औद्योगीकरण आणि त्यापायी भरडली जाणारे कामगार लोक हा आहे. १९७०च्या दशकात दक्षिण कोरियात पार्क चुंग ही यांची सत्ता होती. पार्क यांचे मूळ सैन्यातील होते. त्यांनी देशही हुकूमशाहीनेच चालवला. द.कोरियाची आज जी भरभराट दिसते आहे, त्यामागे त्या काळातील श्रमजीवी वर्गाचे केलेले शोषण आहे. चो से-हुई यांनी या कथा या काळातच लिहील्या. कथा लिहीताना त्यांच्या डोळ्यासमोर तेव्हाचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचे हे ध्येय होतेच, पण त्याचबरोबर सरकारच्या सेन्सरशिपपासून बचावही तितकाच महत्वाचा होता. त्या काळात कोरियन नागरिकांवर अनेक बंधने होती. अगदी स्त्रियांच्या केसांच आणि स्कर्टची लांबीही ठरलेली असे. या सर्वांना तोंड देत चो से-हुई यांनी त्या काळातील ज्वलंत प्रश्नांना तोंड फोडले आहेच, शिवाय हे करताना कलेच्या दृष्टीकोनातून एक मास्टरपीस तयार करण्यातही ते यशस्वी झाले आहेत. हे सर्व लक्षात घेतले तर कादंबरीचे किमान दोन वाचकवर्ग ठळकपणे समोर येतात. एक म्हणजे त्या काळातील सामन्य कोरियन जनता, जिला ही कादंबरी सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव करून देते. आणि दुसरा म्हणजे यात समोर दिसते आहे त्याच्या पलिकडे अजून काही आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करणारे वाचक.

    गोष्टीतील मुख्य पात्र ड्वार्फ़, त्याची बायको आणि तीन मुले. ड्वार्फला जन्मापासून शारिरीक व्यंगामुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि त्यांचा अंत होईल अशी चिन्हे नाहीत. त्याने बरीच कामे करून पाहिली, नळ दुरूस्तीपासून डोबार्‍याबरोबर खेळ करण्यापर्यंत. सगळीकडे हाल-अपेष्टा. कुठेच, कधीच आशेचा किरण दिसला नाही. यावर त्याच्या कल्पनेत एक उपाय आहे आणि तो म्हणजे समाजात सर्वांना सारखी वागणूक, सारखी संपत्ती मिळायला हवी. कुणाकडेही अधिक संपत्ती आली तर सरकारने त्याला गुन्हेगार ठरवून ती संपत्ती सर्वांना सारखी वाटून द्यावी. कथेमध्ये मोबियस स्ट्रीप आणि तिचे त्रिमितीय स्वरूप क्लेन बॉटल यांचा उल्लेख येतो. लेखक या भूमितीय प्रकारांची आयुष्याशी सांगड घालू पहातो. मोबियस स्ट्रिपवर फिरण्याचा अंत नाही त्याचप्रमाणे या लोकांच्या यातनांचाही अंत नाही. याची आवर्तने सुरूच रहाणार. याखेरीज परत-परत तरूणपणी ध्येयवादाची स्वप्ने बघणारी आणि कालांतराने त्यातील फोलपणा कळून निराशेच्या गर्तेत जाणारी पात्रे भेटतात.

    कुठल्याही कथेच्या दृष्टीने दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. कथेचा निवेदक कोण आहे आणि कथा कुणाच्या दृष्टीकोनातून सांगितली जात आहे. ड्वार्फमध्ये प्रत्येक प्रकरणात निवेदक बदलतो, इतकेच नाही तर बरेचदा एकाच कथेमध्ये, वेगवेगळे निवेदक आणि स्थलकाल यांची वाचकाला कुठलीही पूर्वसूचना न देता सरमिसळ केलेली आहे. संवादांमध्ये भूतकाळ आणि वर्तमानकाळ दोन्हींचे संवाद एकापाठोपाठ एक येतात. त्यामुळे निवेदनाला ‘स्ट्रीम ऑफ कॉनशसनेस’चे स्वरूप येते. वेगवेगळ्या निवेदकांमध्ये ड्वार्फची तीन मुले आणि शेवटच्या प्रकरणात कारखान्याच्या मालकाचा उद्दाम आणि काहीसा विकृत असा मुलगा हे येतात मात्र कथानायक ड्वार्फ कधीच येत नाही. त्यामुले त्याच्या मनाची अवस्था इतरांच्या वर्णनातूनच कळते. या सर्वांमध्ये बरेचदा काही वाक्ये थेट वाचकाला उद्देशून आहेत असे वाटते आणि हा वाचक त्या काळातील दडपशाहीला सामोरी जाणारी कोरियन जनता आहे हे लक्षात घेतले तर हा समज आणखी दृढ होतो. उदा.

    A nation without dissenters is a disaster. Who is bold enough to try
    to establish order based on violence?

    अनुवाद उत्कृष्ट आहे यात वादच नाही पण जिथे रूपक किंवा प्रतीकांचा प्रश्न येतो तिथे अनुवाद तोकडा पडतो. एक उदाहरण म्हणजे ड्वार्फ़चे नाव. याबाबत त्याचा मुलगा म्हणतो,

    The older man didn’t realize the meaning of Father’s name: kumppuri, reflecting the desire of poor parents for a son to become wealthy.

    इथे अनुवाद झाला आहे पण एका मर्यादेपलिकडे त्या संस्कृतीची ओळख असल्याखेरीज याचे महत्व कळणे अशक्य आहे.

    काही लेखकांचे साहित्य वाचताना आपण ३६० अंशात १६ क्यामेरे लावून घडणारे प्रसंग बघत आहोत असे वाटते. कथेत घडणा‍‍र्‍या प्रत्येक गोष्टीतील प्रत्येक सेकंदाचे चित्रण आपल्यासमोर असते. चो से-हुई याचे दुसरे टोक पकडतात. निवेदन छोट्या वाक्यांमध्ये, पात्राच्या भावनांचा विचार न करता, काहीशा अलिप्तपणे केलेले आढळते. मृत्यूसारख्या प्रसंगालाही ३-४ ओळींच्या वर जागा नाही. बहुतेक प्रसंगाचे वर्णन तुटकच, पण एखादे वाक्य इतके प्रभावी की त्या तुटकपणामुळे जो मोकळा कॅनव्हास तयार होतो त्यात वाचक आपसूक त्याच्या मनातील रंग भरून टाकतो.

    आधुनिक कोरियन साहित्याच्या सर्वोच्च कलाकृतींमध्ये या कादंबरीला गणले जाते. कादंबरी वाचल्यानंतर याची सत्यता पटते.

  • ऍन ऍन्थ्रॉपॉलॉजिस्ट ऑन मार्स

    ऑलीव्हर सॅक्स प्रख्यात न्यूरोसाएंटिस्ट आणि मानसशास्त्रज्ञ. त्यांचं ‘ऍन ऍन्थ्रॉपॉलॉजिस्ट ऑन मार्स’ हे पुस्तक बर्‍याच दृष्टीकोनातून डोळे उघडायला लावणारं आहे. सॅक्स त्यांच्या विषयात तज्ज्ञ आहेतच, पण ते त्यांच्या रूग्णांकडे केवळ एक रोचक केस म्हणून न बघता त्यांच्यातल्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात.

    ताजमहालाच्या समोर राहणार्‍यांना रोज उठून ताजमहाल बघितल्यानंतर काय वाटत असेल? की समोर काय आहे त्यांच्या लक्षातही येत नसेल? अतिपरिचय असल्यावर अशी अवज्ञा अनेक गोष्टींबाबत होते, किंबहुना गोष्ट जितकी वरकरणी सामान्य तितकी असं व्हायची शक्यता जास्त. आपण ज्या गोष्टींना गृहित धरून चालतो, त्या तशा नाहीत हे बरेचदा कळणे अवघड असते. यामागे ‘कॉमन सेन्स’ वापरून ठरवलेली गृहीतके बरेचदा असतात. मग एखादवेळेस अशा गृहीतकांना मुळापासून हादरा बसतो आणि आतापर्यंत आपण घोड्यासारखी झापडं लावून जगत होतो असं वाटायला लागतं.

    ऑलीव्हर सॅक्स प्रख्यात न्यूरोसाएंटिस्ट आणि मानसशास्त्रज्ञ. त्यांचं ‘ऍन ऍन्थ्रॉपॉलॉजिस्ट ऑन मार्स’ हे पुस्तक बर्‍याच दृष्टीकोनातून डोळे उघडायला लावणारं आहे. सॅक्स त्यांच्या विषयात तज्ज्ञ आहेतच, पण ते त्यांच्या रूग्णांकडे केवळ एक रोचक केस म्हणून न बघता त्यांच्यातल्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. या पुस्तकात ते सात रूग्णांबद्दल बोलतात आणि याच्या अनुषंगाने ते काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. पुस्तक वाचल्यानंतर दृष्टीहीन किंवा स्वमग्न (autistic) लोकांबद्दल आपल्या समजुतींना परत तपासून बघायची वेळ आली आहे हे प्रकर्षानं जाणवतं.

    Book cover of An Anthropologist On Mars

    सॅक्स यांचा पहिला रूग्ण जोनाथन आय. एक प्रख्यात चित्रकार आहे. न्यूयॉर्कमध्ये ऍबस्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिस्ट (abstract expressionist) म्हणून त्यानं बरीच वर्ष काम केलं. १९८६ मध्ये कार मधून जात असताना एका ट्रकने धडक दिल्यामुळे तो बेशुद्ध झाला. नंतर रूग्णालयात तपासणी चालू असताना असं लक्षात आलं की त्याला अक्षरं किंवा रंग ओळखता येत नाहीत. काही दिवसांनी अक्षर ओळखता यायला लागली पण तो पूर्णपणे रंगांधळा झाला. कुठलीही गोष्ट त्याला काळ्या-पांढर्‍या आणि राखाडी रंगांमध्ये दिसायला लागली. तो चित्रकार असल्यामुळे याची भीषणता त्याला अधिक जाणवली. याआधी त्याचं जग रंगांवरच आधारलेलं होतं, सामान्य माणसापेक्षा रंगांशी त्याची अधिक जवळीक होती. प्रत्येक गोष्टीच्या रंगांच्या छटा त्याला तोंडपाठ होत्या. अपघातानंतर त्याला स्वत: काढलेली चित्रही परकी वाटायला लागली.

    आपण रंग बघतो तेव्हा नेमकं काय होतं? शाळेत शिकवताना डोळा आणि क्यामेरा यांची जी तुलना केली जाते ती वास्तवापासून इतकी दूर आहे की आता बंद कराला हवी. सफरचंदावरून जे प्रकाशकिरण परावर्तित होतात त्यात बर्‍याच तरंगलांबी असतात आणि प्रकाशझोत कसा आहे यावर कोणते तरंग परावर्तित होणार हे अवलंबून असतं पण आपल्याला सफरचंदाचा रंग बदलताना दिसत नाही. मग रंग कोणता हे कुठ ठरतं, डोळ्यामध्ये की मेंदूमध्ये? मेंदूमध्ये रंगांचं विश्लेषण करण्यासाठी एक खास केंद्र असतं. हे केंद्र मेंदूच्या आठवणी आणि इतर भागांशीही संपर्क ठेवून असतं. आपल्याला एखादा रंग ‘दिसतो’ तेव्हा त्यामागे डोळ्यांनी दिलेली माहिती, आधीच्या आठवणी, आपल्या अपेक्षा या सर्वांचा सहभाग असतो. एखाद्या भाषेत एखाद्या रंगासाठी शब्द नसेल तर ती भाषा बोलणार्‍या लोकांना तो रंग ओळखता येत नाही. अर्थात लाल रंग दिसल्यावर मेंदूत जी संवेदना निर्माण होते ती म्हणजे लाल रंग हे का, कधी, कसे ठरते हा आणखी मूलभूत प्रश्न आहे. याचे उत्तर कदाचित ‘क्वालिया’ (qualia) म्हणजे नेमके काय हे कळल्यावर/कळले तर मिळू शकेल. (हा प्रश्न न्यूरोसायन्सची ‘होली ग्रेल’ म्हणून ओळखला जातो.)

    जोनाथनला सुरूवातीला बसलेला धक्का ओसरल्यानंतर तो सावरला. त्यानं काळी-पांढरी चित्रं काढायला सुरूवात केली. रंग नष्ट झाले पण त्याच्या बदल्यात त्याची नजर घारीसारखी तीक्ष्ण झाली. त्यानं रात्री बाहेर पडायला सुरूवात केली. नंतर एकदा एका डॉक्टरांनी यावर नवीन उपचार करून बघायचे का असं विचारलं पण जोनाथननं त्यांना स्पष्ट नकार दिला.

    सॅक्स यांचा आणखी एक रूग्ण चित्रकारच आहे. त्याचं नाव फ्रॅंको मन्यानी. फ्रॅंको इटलीमधील पोंतितो (pontito) या चिमुकल्या गावात जन्मला आणि वयाच्या बारा वर्षेपर्यंत तिथे राहीला. दरम्यान दुसर्‍या महायुद्धात नाझी सैनिकांनी पोंतितो उध्वस्त केलं. बरीच भ्रमंती केल्यानंतर फ्रॅंकोनं सॅन फ्रान्सिस्को इथं स्थायिक व्हायचं ठरवलं. याच काळात त्याला एका रहस्यमय आजारानं ग्रासलं. याच्या उपचारासाठी त्यानं काही दिवस इस्पितळात काढले. तापामध्ये बरळत असताना त्याला स्वप्नात पोंतितो दिसायला लागलं, तिथली घरं, चर्च, रस्ते. जागा झाल्यावरही हे थांबलं नाही, इस्पितळाच्या भिंतींवर, गादीवर सगळीकडे त्याला पोंतितोची स्पष्ट चित्रं दिसायला लागली. ही चित्रं त्रिमितीमध्ये होती आणि आपण एखाद्या व्हिडिओ गेममध्ये जसं वेगवेगळ्या बाजूंनी बघू शकतो तसं त्याला पोंतितो कोणत्याही कोनातून बघता येत होतं. मग त्यानं भिंतीवर दिसणारं चित्र पेन्सिलीनं गिरवायला सुरूवात केली. लवकरच हातात कधीही ब्रश न घेतलेल्या फ्रॅंकोनं पोंतितोची उत्कृष्ट चित्रं काढायला सुरूवात केली.

    फ्रॅंकोच्या केसमध्ये सगळंच अद्भुत आहे. त्याला कोणता आजार झाला होता? यामुळं त्याच्या मेंदूवर काय परिणाम झाला? कोणतेही प्रशिक्षण नसताना व्यावसायिक पातळीची चित्रे काढणं त्याला कसं काय शक्य झालं? काही फोटोग्राफर पोंतितोला गेले आणि त्यांनी तिथले फोटो घेतले. फोटो आणि फ्रॅंकोची चित्रे यांची तुलना केल्यावर चित्रांमधील तपशील किती अचूक आहे याची खात्री पटली. आतापर्यंत नेणिवेत असलेली लहानपणची पोंतितोची चित्रं इतक्या स्पष्टपणे जाणिवेत कशी आणि का आली? प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. मात्र हजार-एक चित्रं काढल्यानंतर ‘मेमरी आर्टिस्ट’ (memory artist) म्हणून ओळखल्या जाणार्‍या फ्रॅंकोची चित्रं जगभर प्रसिद्ध झाली आहेत. त्याच्या चित्रांची प्रदर्शनं भरत आहेत.

    ‘तूरेत सिंड्रोम’ (Tourette syndrome) जगातील प्रत्येक देश, प्रत्येक वंशामध्ये आढळतो. याची प्रमुख लक्षणं म्हणजे हालचालींवर नियंत्रण नसणे, विशिष्ट हालचाली (समोरच्या वस्तूंना, माणसांना वारंवार स्पर्श करणे) परतपरत करणे, काही शब्द किंवा शिव्या देण्यावर नियंत्रण नसणे इ. ही लक्षणे पाहिल्यानंतर असा माणूस कोणतेही नाजुक काम करण्यास असमर्थ असेल असं वाटतं. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती फारच वेगळी आहे.

    डॉ. कार्ल बेनेट कॅनडामध्ये सर्जन आहेत आणि त्यांना तूरेत सिंड्रोम आहे. सॅक्सला हे कळल्यानंतर त्यांचा यावर विश्वास बसला नाही. ज्याचे स्वत:च्या साध्या हालचालींवर नियंत्रण नाही तो माणूस सर्जनचे काम कसे करू शकतो? बेनेट यांनी सॅक्सना त्यांच्या दवाखान्यात येऊन शस्त्रक्रिया करताना मला स्क्र्ब करा असे आमंत्रण दिले. सॅक्स तिथे गेल्यानंतर त्यांनी जे बघितले ते अविश्वसनीय होते. बेनेट त्यांना विमानतळावर घ्यायला आले. गाडी चालवत असताना बेनेट यांच्या हालचाली चालूच होत्या. दोन्ही गुडघे स्टिअरिंग व्हीलच्या समान अंतरावर ठेवणे, समोरच्या काचेला वारंवार स्पर्श करणे इ. मात्र हे करताना गाडीवरचे नियंत्रण एकदाही सुटले नाही. दवाखान्यात शस्त्रक्रिया चालू होण्याआधी सॅक्स आता काय होणार याच्या प्रचंड दडपणाखाली होते. बेनेट यांनी सुरी हातात घेतल्यानंतर त्यांच्या संपूर्ण व्यक्तीमत्वात बदल झाला. शस्त्रक्रिया करत असताना त्यांनी एकही अनावश्यक हालचाल केली नाही, त्यांचा हात अतिशय स्थिर होता. अडीच तास शस्त्रक्रिया चालू असेपर्यंत बेनेट यांच्यामध्ये तूरेत सिंड्रोमचा मागमूसही नव्हता. शस्त्रक्रिया संपल्यानंतर परत उड्या मारणे, समोरच्याला स्पर्श करणे वगैरे चालू झाले. यशस्वी आणि विश्वासार्ह सर्जन म्हणून बेनेट यांची ख्याती आहे. त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी त्यांना तूरेत सिंड्रोमसकट स्वीकारले आहे. नंतर लाउंजमध्ये इतर डॉक्टरांबरोबर गप्पा मारताना बेनेट जमिनीवर लोळत, हवेत लाथा मारत होते. सॅक्स परतताना बेनेट यांनी त्यांच्या विमानातून त्यांना कॅलगरीपर्यंत सोडले. विमान चालवतानाही तूरेत कुठेही आडवा आला नाही.

    दृष्टीहीन लोकांबद्दल आपले बरेच गैरसमज आहेत. त्यातील एक महत्वाचा म्हणजे दृष्टीहीनांसाठी सर्वात मूल्यवान भेट म्हणजे दृष्टी. चॅपलिनच्या सिटी लाइट्सपासून (City Lights) ते हिंदी चित्रपटांपर्यंत डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली रे झाली की दुसर्‍या क्षणाला पेशंटला दिसायला लागतं. खरं तर चित्रपट तिथं सुरू व्हायला हवा. जन्मापासून आंधळ्या असलेल्या व्यक्तींना बघता आलं तर त्यांचा सुरूवातीला आपण काय बघतो आहोत हेच त्यांना कळत नाही कारण त्यांचे सगळे जग स्पर्शावर आणि आवाजांवर अवलंबून असतं. एका रूग्णाला आपला कुत्रा कोणता आणि मांजर कोणतं हे स्पर्श केल्याशिवाय ओळखता येत नसे. त्यांच्या आधीच्या जगात माणसे येतात आणि जातात. दिसायला लागल्यावर रूंदी, खोली किंवा वेगवान वस्तू यांचा त्यांना अर्थबोध होत नाही. जन्मापासून किंवा बर्‍याच काळ दृष्टी नसलेल्या लोकांच्या मेंदूमध्ये या प्रकारची गणिते करण्यासाठी आवश्यक ती वाढ झालेली नसते. अचानक दृष्टी मिळाल्यावर मेंदूवर ताण येतो. बरेचदा रूग्ण डिप्रेशनमध्ये जातात आणि काही रूग्णांनी आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत.

    सॅक्स अशाच एका रूग्णाची गोष्ट सांगतात. दृष्टी नसताना आपली सर्व कामे आत्मविश्वासपूर्वक करणारा हा तरूण दृष्टी आल्यानंतर सैरभैर झाला. आपण आपली ओळख गमावली आहे असं त्याला वाटायला लागलं. अखेर ताण सहन न झाल्यानं आणि इतर आजारांमुळे डोळ्यांमध्ये काही दोष नसतानाही त्याला परत अंधत्व आलं. इथे सॅक्स विचारतात, केवळ आपलं जग डोळ्यांवर चालतं म्हणून आपलं आयुष्य आत्मविश्वासानं जगणार्‍या अंध लोकांवर दृष्टी लादणं कितपत बरोबर आहे? अंधत्व जन्मापासून असेल तर मेंदू त्या जगात जगण्यासाठी आवश्यक ती तजवीज करून ठेवतो. त्यांचं जग आपल्यासारखं नसतं पण आपल्याइतकच समृद्ध असतं आणि काही बाबतीत आपल्यापेक्षा जास्त. नेत्रदानाच्या वारेमाप जाहिरातींमध्ये दीर्घकाळ अंध असलेल्या लोकांना दृष्टी मिळाल्यावर ज्या अडचणी येतात त्यांचा विचार केला जातो का?

    पुस्तकाच्या शेवटच्या दोन प्रकरणांमध्ये सॅक्स एका महत्वाच्या पण गैरसमजांनी भरलेल्या विषयावर बोलतात – स्वमग्नता किंवा ऑटीझम. स्वमग्नतेबद्दल माहिती देताना चित्रफितींमध्ये नेहेमी लहान मुले दाखवली जातात. पण मोठे झाल्यावर ती कशी बनतात याबद्दल फारशी माहिती सहसा मिळत नाही. लहानपणी साधी कामेही न करता येणारी मुले स्वयंपूर्ण आयुष्य जगू शकतात यावर विश्वास बसणे कठीण आहे. पुस्तकाचे शेवटचे प्रकरण संशोधक टेंपल ग्रॅंडीनबद्दल (Temple Grandin) आहे. टेंपल स्वमग्न आहे तरीही अथक प्रयत्न करून तिने प्राणीशास्त्रामध्ये पी. एच. डी. मिळवली. या क्षेत्रातील तिचे काम उल्लेखनीय आहेच शिवाय स्वमग्नतेवरही तिने स्वत:च्या अनुभवातून बरेच लिखाण केले आहे.

    टेंपलला सहा महिन्यांची असताना आईच्या कुशीत स्पर्श झाल्यावर गोठले गेल्याची संवेदना अजूनही आठवते. (स्वमग्न लोकांचे एक वैशिष्ट्य असे की त्यांना अगदी लहानपणीच्या गोष्टीही आठवतात. तुम्ही त्यांच्याशी बोलत असताना ते बोलणे, त्याचा टोन, शब्द जसेच्या तसे त्यांच्या मेंदूत नोंदले जातात.) सहा वर्षांची होईपर्यंत तिला बोलताही येत नव्हते. सुदैवाने या काळात मतिमंद मुलांसाठी असलेल्या शाळेत जाण्याची तिला संधी मिळाली. तिथे एक शिक्षिका आणि स्पीच थेरपिस्ट (speech therapist) यांनी तिला बोलायला शिकवले. बोलता यायला लागल्यावर जणू एक अडथळा पार झाला. इतर मुलांपेक्षा खूप हळू पण निश्चित अशी प्रगती दिसू लागली. संवाद साधता येत होता पण त्यातील भावना आणि परस्परसंबंध हे तिला गोंधळून टाकत असत, आजही टाकतात. रोमिओ आणि ज्युलिएट वाचल्यावर तिला हे असे का वागतात हे लक्षात येत नाही. ती स्वत:ची स्वस्था स्टार ट्रेक मधील यंत्रमानव डेटा सारखी आहे असे मानते. डेटाला माणसांबद्दल खूप उत्सुकता आहे, निरीक्षणातून तो माणसांबद्दल नियम बनवण्याचा प्रयत्न करतो पण त्यांचे भावनिक व्यवहार त्याला बुचकळ्यात टाकणारे असतात.

    याचा अर्थ टेंपलला भावना म्हणजे काय हे माहित नाही का? असे अजिबात नाही. प्राण्यांशी वागताना तिच्यात आमूलाग्र बदल होतो. तिला नेहेमी गाई, डुकरे यांच्याबरोबर काम करावे लागते. प्राणी दु:खी आहेत की आनंदी, बिथरले असतील तर त्यांना शांत कसे करायचे याची तिला अचूक माहिती आहे. गाईंच्या कत्तलखान्यात चालणार्‍या अमानुष प्रक्रिया बदलण्यात तिचा मोठा वाटा आहे. गाई मारताना शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना त्रास होऊ नये यासाठी तिने अनेक उपाय शोधून काढले. प्राण्यांच्या वेदना तिला सहन होत नाहीत पण माणसांबद्दल हे भावनिक बंध तिला ठेवता येत नाहीत. माणसे आणि त्यांचे व्यवहार तिला गुंतागुंतीचे वाटतात. तिचा प्राण्याच्या देखभालीचा व्यवसाय चालवताना सुरूवातीला तिला अनेक लोकांनी फसवले कारण खोटे बोलणे ही कल्पनाच तिच्या आवाक्याबाहेर होती. मात्र आता अनुभवातून ती सावध झाली आहे.

    स्वमग्नतेवर टेंपलने बरेच काम केले आहे. स्वत:च्या अनुभवातून स्वमग्न लोकांना काय अडचणी येतात, स्वमग्न मुलांशी कसे वागावे अशा अनेक गोष्टीमवर ती मार्गदर्शन करत असते. तिच्या मते स्वमग्नता, स्किझोफ्रेनिया किंवा खिन्नता याबद्दल चीड येणे साहजिक आहे. पण याची दुसरी बाजू अशी आहे की असे लोक बरेचदा प्रतिभावंत असतात. तिच्या मते जर हे सर्व आजार मुळापासून दूर केले तर कदाचित जगातील प्रतिभाही नष्ट होईल आणि फक्त अकाऊंटंट लोक शिल्लक राहतील. पुस्तक वाचल्यानंतर त्यात विचारलेले प्रश्न वाचून आणखी प्रश्न पडतात. मानसिक दृष्ट्या निरोगी ही अवस्था खरंच अस्तित्वात आहे किंवा नाही अशी शंका येते कारण इथे रोगी आणि निरोगी अशी डिजिटल अवस्था नसते. दृष्टीहीन, मूकबधिर किंवा स्वमग्न लोक आपल्यासारखे जगत नाहीत म्हणून त्यांना आपल्या निकषांवर जगायला लावणे कितपत बरोबर आहे? याऐवजी त्यांना त्यांच्या जगात जास्तीत जास्त मोकळेपणाने कसे जगता येईल हा विचार करणे अधिक योग्य नाही का?

    परत जाताना सॅक्स यांना टेंपल सोडायला आली होती. शेवटी ती थोडीशी भावनाविवश झाली होती. सॅक्स लिहीतात,

    Temple, who was driving, suddenly faltered and wept. “I’ve read that libraries are where immortality lies….I don’t want my thoughts to die with me….I want to have done something….I am not interested in power or piles of money. I want to leave something behind. I want to make a positive contribution – know that my life has meaning. Right now, I am talking about things at the very core of my existence.” I was stunned. As I stepped out of the car to say goodbye, I said,”I’m going to hug you. I hope you don’t mind.” I hugged her – and (I think) she hugged me back.

  • बिहाइंड एव्ह्री ग्रेट फॉर्च्यून…

    जागतिक इतिहासामध्ये इ.स. १४०० च्या पुढची काही शतके महत्वाची मानली जातात. रेनेसान्स हा काळ इटालियन भाषेत रिनाशिता (Rinascita) असाही ओळखला जातो. रिनाशिता याचा अर्थ पुनर्जन्म. साहित्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र अशा अनेक शाखांमध्ये आविष्कारांचा सुवर्णकाल म्हणता येईल असा रेनेसान्स, नंतर एनलायटनमेंट आणि औद्योगिक क्रांती या सर्व घडामोडींचे जगावर दूरगामी परिणाम झाले. या सर्वांचा उल्लेख करताना बहुतेक…

    जागतिक इतिहासामध्ये इ.स. १४०० च्या पुढची काही शतके महत्वाची मानली जातात. रेनेसान्स हा काळ इटालियन भाषेत रिनाशिता (Rinascita) असाही ओळखला जातो. रिनाशिता याचा अर्थ पुनर्जन्म. साहित्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र अशा अनेक शाखांमध्ये आविष्कारांचा सुवर्णकाल म्हणता येईल असा रेनेसान्स, नंतर एनलायटनमेंट आणि औद्योगिक क्रांती या सर्व घडामोडींचे जगावर दूरगामी परिणाम झाले. या सर्वांचा उल्लेख करताना बहुतेक इतिहासकारांच्या वर्णनांमध्ये गर्व, अभिमान इ. भावनांच्या छटा आढळतात. अर्थात सर्वच इतिहासकार पूर्वग्रहदूषित नसतात पण इतिहास जेत्यांकडूनच लिहीला जातो हे पूर्वापार चालत असलेले मत जेते आणि पराभूत यांची आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती बदलली असतानाही बरेचदा खरे ठरते आहे. याचे एक उदाहरण नियाल फर्गसन यांच्या ‘सिव्हिलायझेशन : द वेस्ट ऍण्ड द रेस्ट‘ या पुस्तकामध्ये दिसते. फर्गसनच्या मते जगाची आजची प्रगत अवस्था इंग्लंड, फ्रान्स, स्पेन इ. देशांनी शतकानुशतके इतर देशांवर केलेल्या राज्यांचा परिणाम आहे. पाश्चात्य संस्कृतीने अंगिकारलेल्या विविध गुणांमुळे ती राष्ट्रे वरचढ ठरली पण आता इतर राष्ट्रांनीही ते गुण आत्मसात केले आहेत. थोडक्यात ‘साम्राज्य’ धोक्यात आहे.

    प्रत्येक घटनेचे – विशेषत: ती ऐतिहासिक घटना असेल तर – अनेक पैलू असतात, तिचे चांगले आणि वाइट दोन्ही प्रकारचे परिणाम बघायला मिळतात. अशा वेळी फक्त चांगले परिणाम लक्षात घेऊन त्या घटनेचे समर्थन करणे मूर्खपणा आहे. ६५० लाख वर्षांपूर्वी डायनॉसॉर नष्ट झाले, नंतर आताचे सस्तन प्राणी उत्क्रांत होऊन बलाढ्य झाले आणि त्यातून माणूस अस्तित्वात आला. जर डायनॉसॉर नष्ट झाले नसते तर काय झाले असते? त्याचप्रमाणे युरोपियन साम्राज्यांनी जगावर राज्य केले नसते तर जगाची प्रगती थांबली असती का? कुणी सांगावे? इतिहासात जर-तरला अर्थ नसतो. याच न्यायाने अमेरिकेत मंदी आली हे एका प्रकारे बरेच झाले असे म्हणता येईल. निदान इराकच्या अजूबाजूचे देश आक्रमणापासून तरी वाचले.

    पंधराव्या शतकाच्या सुरूवातीला इटलीमध्ये फ्लोरेन्स या शहरात कलाविष्कारांचा अतुलनिय संगम झाला होता. वेगवेगळ्या क्षेत्रांमधील कलाकार एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करत होते. व्यापाराच्या निमित्ताने अरब देशांशी किंवा टर्कीमधील बलाढ्य ऑटमन साम्राज्याशी असणारा संपर्कही यासाठी फायदेशीर ठरला. यातून पुढे अनेक क्षेत्रांमध्ये नवीन विचार, नवीन संकल्पना आल्या. छापखान्याच्या शोधामुळे आतापर्यंत काही लोकांपर्यंत सिमित असलेले विचार घरोघरी पोचू लागले. याच काळात मजेलन, कोलंबस, वास्को द गामा यांच्या प्रयत्नांमुळे नव्या जगाचा शोध लागला. दक्षिण अमेरिका, भारत, इंडोनेशिया येथील समृद्धीच्या बातम्या युरोपात पोचल्यावर या प्रदेशांवर वर्चस्व मिळवण्याची एकच चढाओढ सुरू झाली. नंतरच्या काही शतकांमधील इतिहास आफ्रिका, भारत आणि दक्षिण अमेरिका येथील स्थानिक रहीवासी आणि युरोपियन साम्राज्ये यांच्यातील कटू संघर्षांचा साक्षीदार आहे.

    हा इतिहास वाचताना मला एक विरोधाभास प्रखरपणे जाणवत राहतो. रेनेसान्स आणि एनलायटनमेंट हा काळ माणसाला सुसंस्कृत बनवणारा म्हणून ओळखला जातो. (परत इथे माणूस म्हणजे पाश्चात्य माणूस असाच अर्थ घ्यायला हवा. अन्यथा इजिप्त, चीन, भारत अशा अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या संस्कृतींची भरभराट या काळाच्या आधीपासून चालू होती.) निक्कोलो मकियवेल्ली याने लिहीलेले इल प्रिंचिपे – द प्रिंस हे आदर्श राजा कसा असावा यावरचे पुस्तक किंवा कास्तिलोयोने याने समाजात वागण्याच्या नियमांचे – एटिकेट्सचे – द कोर्टियर हे पुस्तक – ही तेव्हाच्या युरोपमध्ये बेस्टसेलर पुस्तके होती. कोणत्याही विषयावर अधिकारवणीने बोलू शकणारा, समाजात कुठे कसे वागावे याची माहिती असणारा आदर्श पुरूष म्हणून ओळखला जाणारा रेनेसान्स मॅन याच काळात जन्माला आला. थोडक्यात आधीच्या अंधारयुगात टोळीयुद्धे करणारा युरोपियन माणूस या काळात सभ्य आणि सुसंस्कृत बनायला सुरूवात झाली.

    पण हाच सुसंस्कृत माणूस जेव्हा घरापासून दूर परक्या संस्कृतींमध्ये गेला तेव्हा काय झाले? त्याने आपला सर्व सुसंस्कृतपणा सोईस्करपणे बाजूला ठेवला आणि त्या भागातील स्थानिकांवर मन मानेल तसे अत्याचार केले. सोळाव्या शतकाच्या सुरूवातीला मेक्सिकोच्या स्थानिकांची लोकसंख्या २५० लाख होती. स्पॅनिश आक्रमणानंतर इ. स. सोळाशेमध्ये ही संख्या दहा लाखावर आली. यात युरोपियन लोकांनी बरोबर आणलेल्या कांजण्यासारख्या रोगांचाही समावेश होता आणि युद्ध, अविचारी नरसंहार यांचाही. या काळात येथील सोन्याचांदीच्या खाणींमधून युरोपमध्ये दरवर्षी हजारो टन सोने आणि चांदीची वाहतूक होत होती.

    जगातील जास्तीत जास्त प्रदेश बळकावून आपले सामर्थ्य वाढवणे ही त्या काळातील प्राथमिक गरज होती. पण घरी सालस आणि सुसंस्कृत वागणारा युरोपियन बाहेरच्या देशांमध्ये इतका क्रूर का झाला? डिकन्ससारखे संवेदनशील लेखक आणि बर्नाड शॉ, बर्ट्रांड रसेल सारखे विचारवंत इंग्लंडमध्ये असतानाही त्यांना भारतातील ब्रिटीश राज्याची अमानुषता जाणवू नये याला काय म्हणावे? कॉनन डॉयलच्या होम्सकथांमध्ये भारतातून लुटून आणलेल्या संपत्तीचे उल्लेख बाजारातून भाजी आणावी तितक्या सहजपणे येतात! किपलिंगने तर ‘व्हाइट मॅन्स बर्डन’ मध्ये नेटिव्हांना सुसंस्कृत करण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर आहे अशी चोराची उलटी ठोकली. यातील दांभिकता लक्षात न येण्याइतकी सटल होती की सगळा ब्रिटीश समाजच अफूच्या नशेखाली निद्रिस्त होता? चर्चिलसारख्या चतुरस्त्र आणि दूरदृष्टी असणार्‍या नेत्याची भारताबद्दलची मते आणि त्याच्या अनुषंगाने त्याने केलेली कृत्ये हे बघितल्यावर ‘धिस वॉज देअर फाइनेस्ट अवर’ म्हणणारा नेता तो हाच का असा प्रश्न पडतो. ही दांभिकता आपल्या कृत्यांचे रॅशनलायझेशन म्हणावे की मानवी स्वभावातील गुंतागुत? कदाचित गांधीजींना हा विरोधाभास कुठेतरी आतून जाणवला असावा. ‘तुम्हालाच तुमच्या अमानुषतेची जाणीव होईल आणि मग तुम्ही इथून परत जाल’ ही त्यांची प्रतिक्रिया आरसा दाखवणारी होती. (भारताला स्वातंत्र्य यामुळे मिळाले किंवा कसे किंवा असा मार्ग पत्करण्याचे फायदे आणि तोटे कोणते हे निराळे विषय आहेत.)

    तेव्हाचा भारतीय समाज हा ही संशोधनाचा विषय ठरावा. आपल्या पारतंत्र्यामागे स्थानिक लोकंमध्ये एकी नसणे, स्वकीयांविरूद्ध परकीयांशी हातमिळवणी अशी अनेक कारणे होती. ‘इन ऍन ऍंटीक लॅंड’ या पुस्तकात अमिताभ घोष एक वेगळा मुद्दा मांडतात. वास्को द गामाच्या जहाजातून पोर्तुगीज खलाशी जेव्हा इथे आले तेव्हा इथली सुबत्ता आणि संपत्ती पाहता येथील राजाला नजराणे देण्यासाठीही त्यांच्याकडे योग्य काही नव्हते. स्थानिक आणि पाहुणे यांच्यातील आर्थिक विषमता नंतरच्या आक्रमणाला कारणीभूत झाली हे उघडच आहे. पण स्थानिक लोक या आक्रमणासाठी तयार नव्हते याचे एक कारण हे ही आहे की याची त्यांना गरज वाटली नाही. जेव्हा एखाद्या देशावर केलेले आक्रमण आपल्यावर झालेल्या आक्रमणाइतके यशस्वी ठरते तेव्हा या घटनेची पराभूतांच्या दृष्टीकोनातून दखल घेतली जात नाही. एखाद्या श्रीमंत माणसाला चाकूच्या धाकावर लुबाडणारा दरोडेखोर या दोघांमध्ये शिक सुसंस्कृत कोण? की सुसंस्कृतपणा फक्त कट्या-चमच्यांनी खाणे किंवा लोकांसाठी दारे उघडणे अशा वरवरच्या गोष्टींपर्यंतच मर्यादिस आहे?

    फर्गसनच्या पुस्तकामागची वृत्ती चिंताजनक आहे. इराकवर केलेले आक्रमण इराकच्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केले होते अशी सारवासारव याच मनोवृत्तीतून केली जाते.

    पुस्तक महत्वाचे नाही पण फर्गसन सोकावतोय.