Category: बुके वाचिते

  • फसलेली पुस्तकं

    माझी एक सवय सांगायला हवी. कोणतंही पुस्तक वाचताना ते फसलय असं लक्षात आलं रे आलं की माझा त्यातला इंटरेस्ट संपतो. मग एक तर मी तिथेच थांबवतो किंवा कथानकाचं पुढं काय झालं हे बघायचं असेल तर भरभर चाळून शेवटाला जातो आणि पंधरा-वीस मिनिटात ते पुस्तक (एकदाचं) संपवतो१. ही सवय आपोआप आलेली नाही. पुस्तक धो-धो बोअर झालं…

    माझी एक सवय सांगायला हवी. कोणतंही पुस्तक वाचताना ते फसलय असं लक्षात आलं रे आलं की माझा त्यातला इंटरेस्ट संपतो. मग एक तर मी तिथेच थांबवतो किंवा कथानकाचं पुढं काय झालं हे बघायचं असेल तर भरभर चाळून शेवटाला जातो आणि पंधरा-वीस मिनिटात ते पुस्तक (एकदाचं) संपवतो. ही सवय आपोआप आलेली नाही. पुस्तक धो-धो बोअर झालं तरी नेटानं संपवायचंच असा शेवटपर्यंत खिंड लढवण्याचा बाणेदार पवित्रा एकेकाळी होता. नंतर त्यातला फोलपणा लक्षात यायला लागला. आधीच वेळ कमी, पुस्तकं अमर्याद. मग न आवडलेल्या पुस्तकावर वेळ घालवण्यापेक्षा आवडीच्या पुस्तकावर का घालवू नये?

    काही महिन्यांपूर्वी एक पुस्तक वाचलं, ‘व्हेन वी वेअर ऑर्फन्स.’ लेखक – काझुओ इशिगुरो. इशिगुरोचा जन्म जपानमधला, पण लहापणीच आई-वडीलांबरोबर इंग्लंडला गेला आणि तिथेच स्थाईक झाला. त्याची लेखनशैली विलक्षण आहे. एका गार्डीयनच्या टीकाकारानं लिहीलं होतं, ‘हे पुस्तक वाचताना मला बराच वेळ काहीतरी चुकतय अशी जाणीव होत होती पण काय ते लक्षात येत नव्हतं. मग अचानक लक्षात आलं – इशिगुरो फ्राजल व्हर्ब वापरतच नाही. त्यामुळे त्याचं इंग्रजी फार वेगळं वाटतं.’
    इशिगुरो अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये जे वर्णन करतो ते इतर लेखकांना दहा पानं खर्च करूनही जमलं नसतं. त्याचं ‘ऍन आर्टीस्ट इन फ्लोटिंग वर्ल्ड’ याआधी वाचलं होतं त्यामुळे अपेक्षा खूपच वाढल्या होत्या.

    काही पुस्तकं फसत आहेत हे पहिल्या काही पानातच उमगतं. या पुस्तकाबाबत मात्र वेगळंच झालं. पुस्तकाच्या जवळजवळ २०९ व्या पानापर्यंत सगळं काही ठीक होतं. नंतर काही पानातच कळून चुकलं की हे फसतय. असं फार कमी पुस्तकांच्या बाबतीत होतं. हे असं का झालं याचा उलगडा इशिगुरोची मुलाखत वाचल्यावर झाला. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने या पुस्तकात अगाथा ख्रिस्तीप्रमाणे रहस्यकथा लिहायचा प्रयत्न केला होता. मात्र अगाथा ख्रिस्तीच्या कथेच्या शेवटी सर्व धागे जसे आपसूक जोडले जातात तसे त्याला इथे करणं जमलं नाही. यावरून ‘अगाथा ख्रिस्ती नेहेमी एकाच साच्याच्या कथा पाडत असते’ अशी टीका जरी होत असली तरी त्यातही किती कौशल्य असावे लागते याची जाणीव होते.

    ही कथा आहे ख्रिस्तोफर बॅंक्स डिटेक्टीव्हची. यामागे शेरलॉक होम्सची प्रेरणा होती असं इशिगुरो म्हणतो. याचं लहानपण शांघायमध्ये जातं. तेव्हाच्या चीनमध्ये ओपियमचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालू होता. याला बॅक्सच्या आईचा विरोध असतो. परिस्थिती टोकाला गेल्यानंतर अचानक त्याचे आईवडील बेपत्ता होतात. त्याला पुढील शिक्षणासाठी इग्लंडमध्ये पाठवलं जातं. यथावकाश तो एक प्रथितयश डिटेक्टीव्ह बनतो आणि योगायोगाने एका केसच्या संदर्भात आपल्या आई-वडीलांचं काय झालं याचा शोध घेण्याची संधी त्याला मिळते. यासाठी तो शांघायला परत जातो. कथानक घडतं दुसर्‍या महायुद्धाच्या आधी आणि ही केस यशस्वीपणे सोडवली तर एक जागतिक आपत्ती टळू शकेल असंही सूचित केलं जातं.

    इथपर्यंत सगळं ठीक आहे. इशिगुरोची वर्णनं, संवाद, व्यक्तिरेखा नेहेमीप्रमाणेच मंत्रमुग्ध करणारे आहेत. पण जसजसा बॅक्स रहस्य सोडवण्याच्या जवळजवळ जातो, तसतशी त्याची कथानकावरची पकड सुटत आहे असे जाणवते. कथेचे निवेदन प्रथम पुरूषामध्ये आहे. अचानक निवेदकाचे स्वत:वरचे नियंत्रण सुटले आहे असे जाणवते. इतक्या वेळ भरवशाचा असलेला निवेदक अचानक बेभरवशाचा बनतो. मग आधी जे सांगितलं त्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न पडतोच. शिवाय प्लॉट कुठच्याकुठे जातो ते वेगळंच. एकूणात इशिगुरोला नेमकं काय साध्य करायचं होतं याबाबतचा गोंधळ शेवटपर्यंत कायमच राहतो. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला ‘मिस्टरी इन अ मिस्टरी’ करायची होती, पण उत्तरार्धात ही मिस्टरी इतकी ढिसाळ होते की होम्स किंवा अगाथा ख्रिस्तीशी तुलनाही अशक्य होते.

    हे पुस्तक आवडलं का असा प्रश्न विचारला तर अमुक पानापर्यंत आवडलं असं उत्तर देईन. पूर्वार्धात इशिगुरोनं रंगवलेलं लंडनमधील वास्तव्य, त्याचं शांघायमध्ये गेलेलं बालपण केवळ अप्रतिम आहे. नंतर जे काय होतं ते वाचणं म्हणजे भारतीय संघ मजबूत स्थितीतून पराभवाच्या छायेत जाताना जसं वाटतं तसं काहीसं आहे.

    —-

    १. नुकतंच आर्थर सी. क्लार्कचं ‘रॉंदेवू विद रामा’ – वाचलं म्हणणार नाही – चाळलं. ‘हे राम’ म्हणायची पाळी आली. इतकं तूफान बोअर झालं की त्यापुढे ‘शैतानी दरवाजा’ बघणं, स्वत:च्या नखांचा रोज फोटो काढून ती किती वाढली आहेत ते मोजणं, ऑरकुटवरच्या कविता वाचणं, एक चमचा साखरेत किती दाणे येतात हे मोजणं हे सगळे प्रकार बंजी जंपिंग इतके इंटरेस्टींग वाटले असते.

  • एक निष्काम कर्मयोगी : डॉ. हिम्मतराव बावस्कर

    नुकतेच डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचे ‘बॅरिस्टरचं कार्टं’ हे पुस्तक वाचण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर प्रयत्न आणि जिद्द यांच्या सहाय्याने मात केल्याची ही कथा आत्मचरित्रपर आहे. डॉ. बावस्कर यांचा जन्म देहेडचा. जालना जिल्ह्यात पाचशे लोकवस्ती असलेले हे गाव. आईवडील अशिक्षित. गावात कसलीही व्यवस्था नव्हती. अशा परिस्थितीत जन्मलेल्या मुलाचे भवितव्य काय असा प्रश्न कुणी विचारला असता तर…

    नुकतेच डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचे ‘बॅरिस्टरचं कार्टं’ हे पुस्तक वाचण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर प्रयत्न आणि जिद्द यांच्या सहाय्याने मात केल्याची ही कथा आत्मचरित्रपर आहे. डॉ. बावस्कर यांचा जन्म देहेडचा. जालना जिल्ह्यात पाचशे लोकवस्ती असलेले हे गाव. आईवडील अशिक्षित. गावात कसलीही व्यवस्था नव्हती. अशा परिस्थितीत जन्मलेल्या मुलाचे भवितव्य काय असा प्रश्न कुणी विचारला असता तर त्याचे फारसे समाधानकारक उत्तर मिळाले नसते.

    cover of Marathi book Baristarcha Karta

    संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर हिम्मतराव लाकडाच्या टाळावर लाकडे फोडायला जात असत. वीस किलो लाकडे फोडल्यावर चार आणे मिळत असत. याखेरीज शेतामध्ये मजुरी आणि इतर कामे होतीच. आठवी ते दहावी सीताराम मंदिराच्या पुजार्‍यांना सांगून देवळात रहाण्याची व्यवस्था केली. रोज देऊळ झाडून काढणे आणि पुजार्‍यांच्या पुस्तकांच्या दुकानात मदत करणे याच्या बदल्यात देवळाच्या पुजार्‍यांनी शिक्षण आणि जेवणखाण यांचा खर्च करण्याची तयारी दर्शवली.

    दहावीनंतर इंटर सायन्स आणि मेडिकल असा प्रवास बर्‍याच अडचणींना तोंड देत देत झाला. फायनल एमबीबीएसमध्ये मेडीसिन विषयात दुसरा क्रमांक आला. मात्र याच वेळी डिप्रेशनमुळे प्रकृती बिघडली. जवळजवळ एक वर्ष गेल्यानंतर हळूहळू प्रकृती सुधारू लागली. एमबीबीएस झाल्यावर बर्‍याच प्रयत्नांनंतर आणि आरोग्यमंत्र्यांपर्यंत ओळखी काढल्यावर निजामपूर, ता. माणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीची ऑर्डर हाती पडली.

    खरे तर कुठल्याही कथेत किंवा सिनेमात इथे शेवट व्हायला हरकत नसावी. अंडरडॉगची कथा वेगवेगळ्या प्रकारातून आणि माध्यमांमधून बरेचदा समोर आली आहे. त्यानुसार नायकाला एका विशिष्ट ध्येयाची प्राप्ती झाली की कथा संपते. डॉ. बावस्कर यांची इथपर्यंतची कथा उल्लेखनीय आहेच, पण पुढची कथा याहूनही रोचक आहे.

    बिरवाडीमध्ये विंचूदंशाचे प्रमाण भरपूर आहे. त्याकाळात यावर कोणताही उपचार उपलब्ध नसल्याने रुग्ण काही तासात मरण पावत असत. डॉ. बावस्कर यांनी या सर्व केसेसच्या लक्षणे, औषधांचा परिणाम इ. रीतसर नोंदी ठेवायला सुरूवात केली. विंचूदंशामुळे मृत्यू होऊ शकतो यावरच मुंबई-पुणे येथील डॉक्टरांचा विश्वास बसत नसे. नंतर पुणे येथे एम.डी, करत असताना त्यांनी यावरचे संशोधन चालूच ठेवले. पण पुण्यात विंचूदंशाचे रूग्ण फारच कमी म्हणून यासाठी ते शनिवार-रविवार स्कूटरवरून महाड येथे रूग्ण तपासणी करण्यासाठी जात असत. उरलेल्या वेळात जागतिक स्तरावर यावर काय नवीन उपचार दिले जात आहेत याचा लायब्ररीमध्ये बसून सतत पाठपुरावा चालू असे.

    अथक प्रयत्नांनंतर अखेर एक दुवा सापडला. सर्व रूग्णांचा मृत्यू रिफ़्रॅक्टरी हार्ट फेल्युअरमुळे होतो आहे असे त्यांच्या लक्षात आले. यावर त्यांनी
    सोडीयम नायट्रोप्रुसाइड हे औषध वापरण्याचे ठरवले. हे औषध अतिदक्षता विभागातच लावले जाते. याचे प्रमाण चुकल्यास रक्तदाब अचानक कमी होऊन रूग्ण दगावण्याची शक्यता असते. आठ वर्षाच्या एका मुलाला विंचूदंशामुळे रूग्णालयात आणल्यावर त्याची प्रकृती ढासळू लागली. दुसरा कोणताही उपाय नाही असे दिसल्यावर डॉ. बावस्कर यांनी त्याच्या वडीलांकडे एक नवीन औषध वापरू का असे विचारून परवानगी मागितली. ती मिळाल्यावर पोलादपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणतीही सुविधा नसताना नायट्रोप्रुसाइड वापरण्याचा धाडसी निर्णय डॉ. बावस्कर यांनी घेतला. आयव्हीमधून नायट्रोप्रुसाइड सुरू केल्यावर तीन तासातच मुलाची प्रकृती सुधारू लागली. हृदयाचे ठोके नियमित झाले, रक्तदाब नियमित झाला आणि तो गाढ झोपी गेला.

    नंतरच्या काळात नायट्रोप्रुसाइड वापरून डॉ. बावस्कर यांनी दीडशे रूग्ण बरे केले. नंतर नायट्रोप्रुसाइडऐवजी प्राझोसिन हे तोंडाने घेण्याचे औषध याच प्रकारे काम करते असे त्यांना आढळले. विंचूदंशांवर प्राझोसिन रामबाण उपाय आहे हे डॉ. बावस्कर यांच संशोधन ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले. हा अनुभव वाचल्यानंतर हा प्रयोग ब्राझील, स्पेन, जर्मनी, इस्त्रायल इ. देशांमधील डॉक्टरांनी यशस्वीपणे केला. महाराष्ट्र आणि इतर विभागांमध्ये विंचूदंशामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण ४० टक्क्यांवरून १ टक्क्यावर आले. नंतर सिबा फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय परिषदेचे निमंत्रण आल्यावर डॉ. बावस्कर यांनी लंडन येथे यावर भाषण दिले.

    डॉ. बावस्कर यांचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे. रूग्णाकडे पैसे नसले तर त्याला उपचारांबरोबर पदरचे पैसेही देणारा हा धन्वंतरी विरळाच. मात्र त्यांच्या लिखाणात कुठेही गर्वाची छटाही आढळत नाही. जे जे घडले ते वाचकांच्या समोर ठेवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आपल्याला बालपणी चांगले संस्कार मिळाले नाहीत. परिणामत: स्वभावात एक कठोरपण आला आणि त्याचे परिणाम भोगावे लागले अशी कबुलीही ते प्रांजळपणे देतात.

    कथेमध्ये मूल्याधिष्ठीत आयुष्याचा विजय ही कदाचित साहित्यिक दृष्टीकोनातून जमेची बाब नसावी. डिकन्ससारख्या लेखकांबाबत हा आक्षेप बरेचदा घेतला जातो. पण साहित्य आयुष्याचे प्रतिबिंब मानले तर डॉ. बावस्कर यांच्यासारख्या कर्मयोग्यांच्या आयुष्याचे चित्रण इतर कोणत्याही रीतीने करणे कसे शक्य आहे? आणि केले तर ते वास्तवतेला धरून असेल का?

    २०२२ : डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन​.

  • थोरोचं वाल्डेन

    वाल्डेनची खोली अमर्याद आहे असं ऐकल्यानंतर स्वत: नावेतून तळ्याची खोली मोजणारा, वाल्डेनच्या काठी निसर्गाचं निरिक्षण करत तासनतास घालवणारा, उरलेला दिवस मी काहीही केलं नाही असं नि:संकोचपणे सांगणारा, एका झाडाशी आज भेट ठरली आहे म्हणून मैलोनमैल बर्फ तुडवत जाणारा, असा हा थोरो.

    प्रत्येक पुस्तक वाचताना येणारा अनुभव वेगळा असतो. अपवाद अर्थातच लेखकरावांनी एकाच लोकप्रिय साच्यामधून काढलेली अनेक पुस्तके. इथेही लेखक कुशल असेल तर दोन घटका खिळवून ठेवतो पण एकदा पुस्तक खाली ठेवलं की त्यातलं फारसं काही आठवत नाही, आठवायचं कारणही नसतं. ग्रिशॅम ते अगाथा ख्रिस्ती यांची पुस्तकं म्हणजे चटकदार भेळेसारखी आहेत. मधून मधून खायला मस्त, पण सकाळ संध्याकाळ नको. याउलट काही पुस्तकं अशी असतात की एकदा वाचल्यानंतर विसरण्याचा प्रश्नच येत नाही. थोरोचं वाल्डेन हे पुस्तक अशातलच एक.

    Book cover of Walden

    वाल्डेन मॅसेचुसेट्समधलं एक तळं आहे. या तळ्याच्या काठी थोरोनं दोन वर्षे काढली. तिथे एक घर बांधलं, शेती केली, तिथले हिवाळे, उन्हाळे अनुभवले, मनसोक्त वाचन आणि लेखन केलं. या दोन वर्षांच्या अनुभवाचं सार म्हणजे वाल्डेन हे पुस्तक. थोरोच्या बर्‍याच ओळखी आहेत, लेखक, तत्वज्ञ, कवी, निसर्गवादी. पुस्तक वाचताना यांची प्रचिती येतेच, शिवाय त्याचे इतरही गुण समोर येतात. बहुतेक तत्वज्ञ आणि थोरो यांच्यातील एक महत्वाचा फरक म्हणजे थोरो नुसत्या गप्पा न मारता ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीनुसार करून दाखवायचा. त्याच्या वडिलांच्या पेन्सिलीच्या कारखान्यात त्याने संशोधन करून पेटंट मिळवलं होतं. त्यानुसार तयार केलेल्या पेन्सिली ‘थोरो पेन्सिल’ या नावाखाली बरीच वर्षे लोकप्रिय होत्या. वाल्डेनच्या पूर्वार्धामध्ये थोरो घर कसं बांधावं, कोणती पिके घ्यावीत यावर विस्ताराने बोलतो. घर बांधायला त्याला किती खर्च आला, पिकांमधून किती वसुली झाली आणि शिल्लक किती राहिले याचा ताळेबंद देऊन लोकांनी भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वत: घर बांधावं असा सल्ला देतो.

    Henry David Thoreau
    हेन्री डेव्हीड थोरो. (छायाचित्र विकीवरुन साभार​.)

    वाल्डेन वाचताना बरेचदा थोरोची त्या कॉन्कॉर्ड या चिमुकल्या गावात इमर्सनसारख्या समकालीन बुद्धजीवींचा अपवाद सोडला किती कुचंबणा होत असेल असं वाटत राहतं. तो ज्या निगुतीनं निसर्गाचं निरीक्षण करतो, तेच कुतूहल माणसांच्या निरीक्षणाही दिसतं. त्याचं घर नुकत्याच झालेल्या रेल्वेमार्गाच्या जवळच होतं. गावात यायचा-जायचा रस्ता त्याच्या घरावरूनच जात असे. थोरो शेतात काम करत असताना येणारे जाणारे फुकटचे सल्ले देत असत. “काय राव, भुईमुगाचं पीक काय घेऊन र्‍हायले? औंदा बटाटा तेजीमंदे हाय, बक्कळ कमवलं असतं की!” शेतीमागचा थोरोचा हेतू नफ्यापासून कित्येक योजने लांब होता हे त्या शेतकर्‍याला कुणी सांगावं? अशाच माणसांची निरिक्षणे करण्यासाठी तो कधीकधी गावातही जातो. चावडीवर गप्पा मारत असलेले लोक आयुष्य निरर्थक गोष्टीमध्ये वाया घालवत आहेत हे पाहून त्याला आश्चर्य आणि वैषम्य वाटतं.

    गावाबाहेर, सगळ्यांपासून वेगळं रहायचा निर्णय का घेतला याच्या कारणांमध्ये थोरोचं एक कारण आहे – त्याला वसंतऋतूचं आगमन जवळून बघायचं होतं. हिवाळ्यात वाल्डेन गोठून जायचं. सगळ्या तळ्यावर बर्फाचा थर साचलेला. मग मार्च किंवा एप्रिलमधल्या एखाद्या सकाळी – किंवा संध्याकाळी रॉबिन पक्षाची लकेर ऐकू यायची. ही वसंतऋतूच्या आगमनाची पहिली हाक ऐकली की ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं थोरोला वाटायचं.

    I looked out the window, and lo! where yesterday was cold gray ice there lay the transparent pond already calm and full of hope as in a summer evening, reflecting a summer evening sky in its bosom, though none was visible overhead, as if it had intelligence with some remote horizon. I heard a robin in the distance, the first I had heard for many a thousand years, methought, whose note I shall not forget for many a thousand more—the same sweet and powerful song as of yore.

    आणखी काही वर्षांनी भारतातला एक निसर्गवादी कवी पौषाच्या आगमनानं भारावून जाईल आणि म्हणेल,

    পৌষ তোদের ডাক দিয়েছে, আয় রে চলে, আ য় আ য় আয়.

    थोरो निसर्गवादी आहे पण ‘प्राण्यांवर प्रेम करा’ असा सरळसोट सल्ला तो देत नाही. निसर्गाच्या ‘जीवो जीवस्य जीवनम’ या तत्वामुळे तो प्रभावित होतो. वाल्डेनच्या जंगलात तो शिकार करतो, तळ्यात मासे पकडतो. कधीकधी शिकारीच्या धुंदीत असताना ३०,००० वर्षांपासून चालत आलेल्या प्रेरणांना तो नाकारत नाही. पण त्याचबरोबर बरेचदा हे वागणं हिंस्त्र आहे हे ही त्याला पटतं. आपल्या स्वभावात असलेल्या या विरोधाभासाला तो सहज स्वीकारतो आणि पुस्तकाच्या शेवटी शेवटी त्याचं पारडं सहिष्णुतेकडं झुकतं. आजच्या काळात व्यासंगाची व्याख्या बदललेली आहे. आंतरजालामुळे कोणत्याही नव्या संकल्पनेचं विकी पान वाचलं की पाच-दहा मिनिटात जवळजवळ कुठल्याही विषयात तज्ज्ञ होता येतं. दीडशे वर्षांपूर्वी शेजारच्या गावात काय चाललं आहे हे कळायची मारामार असताना थोरो विष्णुपुराण, भगवद्गीता आणि वेदांताचे संदर्भ देतो. आणि तरीही त्याच्या विचारांमागे नुसतं वाचन नाही तर सखोल मनन आहे हे जाणवत राहतं. “The universe is wider than our views of it.” यासारखी वाक्ये कालातीत आहेत याची खात्री पटते.

    पुस्तक आवडल्यानंतर त्याची शिफारस करणं साहजिक आहे पण आजच्या काळात वाल्डेन किती लोकांना आवडेल याबद्दल शंका वाटते. वाल्डेनची शैली काही प्रमाणात जुन्या काळातली आहे. त्यामुळे प्रसंगी पानभर धावणारी लांबच्या लांब वाक्ये, जुन्या इंग्लिशचे काही शब्द, पक्षी, पाने, फुले यांची अपरिचित नावे, या सर्वांना तोंड द्यावे लागते. यात काहीही कूल किंवा हॅपनिंग नाही. त्यात थोरो आस्तिक होता त्यामुळे मधून मधून देवाबद्दलही बोलतो. म्हणजे विज्ञानवादी या पुस्तकावर काट मारणार. (काट मारली तर ठीक आहे, जाळू नये म्हणजे झालं.) विचारांच्या अनुषंगानं थोरो काळाच्या पुढे होता असंही म्हणायाला जीभ कचरते कारण त्याचे काही विचार आजच्या समाजालाही पटण्यासारखे नाहीत. आजच्या फेसबुकच्या जमान्यात नेटवर्किंग हा जगायचा मुख्य उद्देश आहे. केस कापण्यापासून हनीमूनपर्यंत सर्व गोष्टी जगाशी शेअर केल्या नाहीत तर जगणं निरर्थक आहे. माणूस सामाजिक प्राणी आहे या पूर्वापार चालत असलेल्या गृहीतकाला थोरो धुडकावून लावतो. गावातून भेटायची आमंत्रणं आल्यावर तो म्हणतो, “आपण दिवसातून इतक्यांदा भेटतच असतो की, कधी पोस्ट-ऑफिसमध्ये, कधी दुकानात. इतक्या वेळा भेटल्यानंतर आपल्याजवळ एकमेकांना देण्यासारखी नवीन मूल्ये आहेत का याचा विचार आपण कधी करणार? केवळ जनरीत आहे म्हणून असले निरर्थक शिष्टाचार पाळणं यामुळे आपण एकमेकांबद्दलचा आदर गमावतो आहोत.”

    थोरोला राहण्यासाठी जमीन इमर्सनने दिली होती. इथे गांधीजींना गरीबीत ठेवण्यासाठी बिर्लांना किती खर्च येत होता हे आठवतं. आजच्या जगात थोरोचे सगळेच विचार पटणं किंवा त्यांना स्वीकारणं शक्य नाही. पण विचार पटले नाहीत तरीही काही काळ वेगळ्या बाजूनं विचार करून बघणं हे ही आवश्यक असतं. मात्र वाल्डेनच्या बाबतीत त्याची अमाप प्रसिद्धीच कदाचित हानीकारक ठरेल की काय अशी शंका येते. दीडशेव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत जॉन अपडाइक म्हणतो, “…the book itself risks being as revered and unread as the Bible.”

    वाल्डेनची खोली अमर्याद आहे असं ऐकल्यानंतर स्वत: नावेतून तळ्याची खोली मोजणारा, वाल्डेनच्या काठी निसर्गाचं निरिक्षण करत तासनतास घालवणारा, उरलेला दिवस मी काहीही केलं नाही असं नि:संकोचपणे सांगणारा, एका झाडाशी आज भेट ठरली आहे म्हणून मैलोनमैल बर्फ तुडवत जाणारा, असा हा थोरो. अमेरिकेतील श्रेष्ठ लेखकांमध्ये याची गणना होते, मात्र नंतरच्या अमेरिकेने आपल्या संस्कृतीमध्ये थोरोचे विचार अंगिकारल्याची कोणतीही खूण दिसत नाही. रेल्वेच्या आगमनामुळे काहीशा व्यथित झालेल्या थोरोवर आज कदाचित luddite हे लेबल चिकटण्याची शक्यता आहे. पण थोरोचा विरोध हा आंधळा विरोध आहे असं वाटत नाही. आपण जी प्रगती करतो आहोत तिचा अंतिम उद्देश काय आहे यात त्याला जास्त रस आहे. तंत्रज्ञान हे साधन आहे, साध्य नाही. पण मग साध्य काय आहे हे शोधण्याचा तो प्रयत्न करतो. आजच्या अमर्याद स्पर्धेच्या आणि बेहिशेबी शॉपिंगच्या जगात थोरोचे विचार अंतर्मुख करायला लावणारे आहेत.

    हे विचार किती लोकांना पटतील माहीत नाही. ज्याला रूचतील, पटतील आणि पचतील त्याने घ्यावेत. पुस्तक इथे उपलब्ध आहे.

    —-

    १. शंभर वर्षांनी आलेला हेमिंग्वे याच्या उलट होता. तो छोटी वाक्ये लिहायचा. काही वाक्ये. छोटी. काही शब्द. तुटक. आणि कथानक, त्रोटक. तरीही प्रभावी.