Category: बुके वाचिते

  • बावीस हजार वर्षांचा रोमांचक इतिहास – फाउंडेशन मालिका

    १ ऑगस्ट १९४१. २१ वर्षे वयाचा आयझॅक ऍझिमॉव्ह (Isaac Asimov) कोलंबिया विद्यापीठात रसायनशास्त्रामध्ये पी. एचडी. करत होता. त्याचबरोबर ‘अस्टाउंडींग’ नावाच्या ‘सायन्स फिक्शन’ मासिकामध्ये तो लघुकथाही लिहीत होता. नुकतीच ‘नाइटफॉल’ नावाची कथा इतर पाच कथांसोबत मासिकाचा संपादक – जॉन कॅंपबेल – याने स्वीकारली होती. आज एका नवीन कथेबद्दल चर्चा करण्यासाठी त्याला कॅंपबेलने बोलावलं होतं. फक्त एक…

    १ ऑगस्ट १९४१. २१ वर्षे वयाचा आयझॅक ऍझिमॉव्ह (Isaac Asimov) कोलंबिया विद्यापीठात रसायनशास्त्रामध्ये पी. एचडी. करत होता. त्याचबरोबर ‘अस्टाउंडींग’ नावाच्या ‘सायन्स फिक्शन’ मासिकामध्ये तो लघुकथाही लिहीत होता. नुकतीच ‘नाइटफॉल’ नावाची कथा इतर पाच कथांसोबत मासिकाचा संपादक – जॉन कॅंपबेल – याने स्वीकारली होती. आज एका नवीन कथेबद्दल चर्चा करण्यासाठी त्याला कॅंपबेलने बोलावलं होतं. फक्त एक छोटीशी अडचण होती. नवीन कथा कशावर असणार आहे याचा अझिमॉव्हला अजिबात पत्ता नव्हता. आता कॅंपबेलला काय सांगायचं हा मोठाच प्रश्न होता. शेवटी अझिमॉव्हने गिलबर्ट आणि सलिव्हन यांच्या नाटकाचे पुस्तक उघडले आणि जो विषय समोर येईल त्यावर ‘फ्रि असोसिएशन’ (free association) करण्याचा प्रयत्न केला. त्याने जे पान उघडले त्यावर एका राणीचे चित्र होते. राणी – राज्य – सैनिक – रोमन साम्राज्य – गॅलॅक्टिक एम्पायर! बिंगो! गिबनचे प्रसिद्ध ‘डिक्लाइन ऍंड फॉल ऑफ रोमन एम्पायर’ अझिमॉव्हने दोनदा वाचले होते. त्याच धर्तीवर गॅलॅक्टीक एम्पायरची कथा का लिहीता येऊ नये? कॅंपबेलच्या हापिसात पोचेपर्यंत ऍझिमॉव्हच्या डोक्यात कल्पनांची गर्दी झाली होती. कॅंपबेललाही हे कथानक मनापासून आवडले. पुढच्या तासभर दोघांनी मिळून पहिल्या आणि दुसर्‍या गॅलॅक्टिक एम्पायरच्या हजार वर्षांचा आराखडा पक्का केला. यथावकाश या कथा प्रसिद्ध झाल्या आणि दहा वर्षांनी यांचे एकत्रीकरण करून तीन पुस्तकेही निघाली – फाउंडेशन त्रिधारा (Foundation Trilogy) या नावाखाली त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. जागतिक सायन्स फिक्शन परिषदेतील ह्युगो पारितोषिक टोलकिनच्या ‘लॉर्ड ऑफ द रिंग’ (Lord of the Ring) ला न मिळता फाउंडेशन त्रिधारेला देण्यात आले.

    Book cover for Foundation

    फाउंडेशन मालिकांच्या मुळाशी अनेक रोचक कल्पना आहेत. मालिकेचा नायक हरी सेल्डन एक गणितज्ञ आहे. त्याने सायकोहिस्टरी (Psychohistory) नावाची गणिताची एक नवीन शाखा शोधून काढली आहे. सायकोहिस्टरीच्या सहाय्याने आकाशगंगेतील विविध साम्राज्यांचे भविष्य वर्तवता येते. समाजशास्त्राला गणिताचे पाठबळ मिळाले तर जे तयार होईल त्याला सायकोहिस्टरी म्हणता येईल. सायकोहिस्टरीची भाकिते अचूक येण्यासाठी जितकी लोकसंख्या जास्त तितके चांगले. इथे स्टॅटिस्टीकल मेकॅनिक्स (Statistical Mechanics) या पदार्थविज्ञानातील शाखेचा आधार घेतला आहे. शिवाय साम्राज्याला काही कारणांमुळे धोका निर्माण होणार असेल तर तो कसा टाळता येईल यासाठीही सेल्डनने काही तरतुदी करून ठेवलेल्या असतात. या तरतुदींची अंमलबजावणी करता यावी यासाठी त्याने आकाशगंगेच्या दोन टोकांना संस्था निर्माण केलेल्या असतात. सगळ्या आकाशगंगेचे भविष्य ज्यांच्यावर अवलंबून आहे अशा या संस्था – फाउंडेशन. सुरूवातीला या कथांचा आवाका इनमिन पाचशे वर्षे होता, वाढता वाढता तो वीस हजार वर्षे झाला. या दीर्घ कालखंडामध्ये अनेक ग्रहांवर अनेक राज्ये आली आणि गेली, नवीन शत्रू निर्माण झाले, अनपेक्षित घटना घडल्या – मात्र सर्व पुस्तकांमध्ये एक दुवा समान राहीला – हरी सेल्डन आणि त्याने केलेली भविष्यवाणी.

    अझिमॉव्हची स्वत:ची अशी एक वेगळी शैली आहे. पात्रांचे मानसिक व्यवहार किंवा गुंतागुंती यामध्ये तो फारसा शिरत नाही. तसेच त्या दिवशी हवा कशी होती, कुणी कोणते कपडे घातले होते यांची पानेच्या पाने वर्णनेही नाहीत. त्यामुळे ज्यांना ‘कॅरॅक्टरायझेशन’ सारख्या गोष्टींची अपेक्षा असते त्यांना ही पात्रे उथळ वाटू शकतात. गंमत अशी आहे की अझिमॉव्हच्या कथांमध्ये मुख्य पात्रे माणसे नाहीत तर अभिनव कल्पना (Ideas) असतात. ‘सायन्स फिक्शन’ आहे म्हणून तीन डोकी आणि चार पाय असलेल्या अफाट जीवांच्या अचाट करामती असले प्रकार नाहीत. किंबहुना युद्ध किंवा मारामारी यांचीही फारशी वर्णने नाहीत. या कथांमध्ये जे सर्व घडते ते आपल्याला फक्त पात्रांच्या संवादांमधून कळते. आणि हा संघर्ष बहुतेक वेळा कल्पनांचा असतो. कुठली कल्पना शास्त्रीय दृष्टीने अधिक व्यापक आहे, कोणती शास्त्रीय संकल्पना तार्किक दृष्टीने परिस्थितीचे अचूक वर्णन करू शकते यावर कथानकाचा सगळा डोलारा अवलंबून असतो. मग कधी ही कल्पना टुरिंग मशीनची असते तर कधी यंत्रमानव विशिष्ट परिस्थितीमध्ये एका माणसाचे हित बघेल की मानवजातीचे असा पेच असतो.ही अझिमॉव्हची खासियत आहे. त्याच्या सर्व कथांचा शास्त्रीय आधार पक्का असतो. ‘सायन्स फिक्शन’ या प्रकारातील सायन्सचा भाग अचूक आणि अभिनव असेल याची तो पूर्ण काळजी घेतो. त्याच्या जादूच्या कथांमध्येही भले राक्षस किंवा ड्रॅगन असोत, पण ते शास्त्रीय नियमांचे उल्लंघन करीत नाहीत.

    फाउंडेशनच्या तीन कादंबर्‍या प्रकाशित झाल्या, गाजल्या आणि अझिमॉव्हवर यावर आणखी लिहा असा दबाव यायला लागला. वाचकांनी विनवण्या, आर्जवे केली, काहींनी तर ‘यावर आणखी लिहीले नाहीत तर परिणाम चांगले होणार नाहीत’ अशा धमक्याही दिल्या. पण कॉनन डॉयलला जसा होम्सचा वीट आला होता तसाच अझिमॉव्हला फाउंडेशनचे नावही ऐकावेसे वाटत नव्हते. हळूहळू प्रकाशक – डबल्सडे सुद्धा याची मागणी करू लागले. अझिमॉव्ह प्रत्येक वेळी काहीतरी सबब काढून टाळायचा. एकदा म्हणाला फाउंडेशनऐवजी मी आत्मचरित्रही लिहायला तयार आहे. ते म्हणाले लिही. या पठ्ठ्याने लिहीलंसुद्धा. १९७३ ते १९८१ अशी आठ वर्षे हुलकावणी दिल्यावर शेवटी डबल्सडेची सहनशक्ती संपली. एके दिवशी त्यांनी अझिमॉव्हला बोलावलं आणि हातात $२५,००० चा चेक ठेवला (इतर पुस्तकांसाठी त्याचा ऍडव्हान्स $३,००० असायचा.) आणि सांगितलं, ‘हे नवीन फाउंडेशन कादंबरीसाठी. बाकीचे पंचवीस कादंबरी झाल्यावर.’ अझिमॉव्ह म्हणाला, ‘पैसे पाण्यात जातील.’ ते म्हणाले, ‘फिकिर नाही.’ बरीच हमरीतुमरी झाल्यावर अखेर त्याने कादंबरी लिहायला घेतली. ‘फाउंडेशन्स एज’ ही चौथी कादंबरी तीस वर्षांनंतर प्रसिद्ध झाली. नंतर आणखी तीन कादंबर्‍या आल्या. १९९२ मध्ये अझिमॉव्हच्या मृत्यूनंतर इतर लेखकांनीही या मालिकेत भर घातली. ‘हिचहायकर्स गाइड टु द गॅलक्सी’ ही डग्लस ऍडम्सची प्रसिद्ध कादंबरी फाउंडेशन मालिकेचे उत्कृष्ट विडंबन आहे.

    ‘सायन्स फिक्शन’ या प्रकाराखाली नेमक्या कोणत्या प्रकारच्या कथा यायला हव्यात याबद्दल बरेचदा संदिग्धता असते. डोरिस लेसिंग किंवा मार्गारेट ऍटवूडसारख्या लेखिकांनी भविष्यकाळातील कथा लिहील्या आहेत, त्याही उत्तम प्रकारे. पण या कथांमध्ये ‘सायन्स’ हा प्रकार चवीपुरताच असतो. या कथा भविष्यकाळात घडतात म्हनून यांना सायन्स फिक्शन म्हणायचं, इतकंच. म्हणूनच कधीकधी अशा कथांना ‘स्पेक्युलेटिव्ह फिक्शन’ असेही म्हटले जाते. फरक इतकाच की शास्त्रशुद्ध ‘सायन्स फिक्शन’ लिहीणार्‍या अझिमॉव्ह किंवा आर्थर सी. क्लार्कसारख्या लेखकांना उच्च साहित्यिक वर्तुळांमध्ये प्रवेश मिळत नाही. शास्त्रीय संकल्पनांना मध्यवर्ती ठेवून लिहील्या गेलेल्या साहित्याला तितकी प्रतिष्ठा मिळत नाही हे विदारक सत्य आहे. अर्थात या लेखकांचा आणखी एक दोष असा की हे धो-धो लोकप्रिय आहेत. यांच्या कादंबर्‍यांवर वाचकांच्या उड्या पडतात. याचा अर्थ सरळ आहे. हे लेखक इतके लोकप्रिय आहेत म्हणजे नक्कीच यांचा दर्जा फारसा चांगला नसणार. अर्थात अझिमॉव्हची मुलाखत पॅरिस रिव्ह्यू किंवा न्यूयॉर्करमध्ये आली किंवा नाही आली तरी वाचकांना काहीही फरक पडत नाही. आणि ते बरंच आहे.

    परत फाउंडेशन मालिका लिहायला सुरूवात केल्यावर अझिमॉव्हने सायकोहिस्टरीचा उगम कसा झाला आणि आधी काय झालं याच्याविषयी लिहीलं. प्रत्यक्षात बर्‍याच उशिरा लिहीलेली ‘प्रिल्यूड टू फाउंडेशन’ (Prelude to Foundation) ही कादंबरी क्रमाने पहिली येते. खरं सांगायचं तर मी अजूनही मालिकेतील सर्व पुस्तके वाचलेली नाहीत कारण सातच पुस्तके आहेत, पुरवून पुरवून वाचत होतो. आता उरलेलीही वाचून टाकायला हवीत असं वाटायला लागलं आहे. एक मात्र खात्री आहे, अझिमॉव्हची शैली कितीही परिचित असली तर शेवटी तो धोबीपछाड टाकणार आणि आपली त्यात सपशेल मात होणार. त्याने हुशारीने कथानकाला दिलेल्या या कलाटण्या या मालिकांचा उच्च बिंदू ठराव्यात.

    कथा वाचताना ही म्हण लक्षात ठेवावी, ‘दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं.’ अर्थात उपयोग होणार नाहीच. 🙂

    —-

    १. ‘गॅलक्सी’ साठी मराठीत दोन शब्द आहेत. आकाशगंगा आणि दिर्घिका. मात्र गॅलॅक्टीक साठीही दिर्घिका शब्द दिला आहे जो बरोबर वाटत नाही. शिवाय ‘दिर्घिका साम्राज्य’ कैच्याकै वाटते. तीच गत ‘गांगेय’ ची. ‘गांगेय साम्राज्य’ म्हटलं तर इ.स.पू. ४९७ मध्ये पाटलीपुत्रच्या आसपास एखाद्या मठात पिवळी वस्त्रे नेसून काही गंभीर चेहरे महासीहनाद सुत्तावर चर्चा करत आहेत असं दृश्य डोळ्यासमोर येतं.

    २. यालाही दोन प्रतिशब्द आहेत आणि दोन्ही बोजड आहेत. सांख्यिकी स्थितीगतिशास्त्र आणि सांख्यिकी यामकी. समजा या विषयात एखादा लेख लिहायचा आहे आणि त्यात हे शब्द पन्नास वेळा वापरले तर वाचायला कसं वाटेल? सांख्यिकी स्थितीगतिशास्त्र, सांख्यिकी स्थितीगतिशास्त्र, सांख्यिकी स्थितीगतिशास्त्र, सांख्यिकी स्थितीगतिशास्त्र… चार वेळा म्हणता म्हणता माझा ‘कच्चा पापड पक्का पापड’ झाला.

    ३. फाउंडेशन मालिकेनंतर अझिमॉव्हची यंत्रमानव मालिका (Robot Series) सर्वात गाजली. यंत्रमानवांसाठी त्याने मांडलेले चार नियम प्रसिद्ध आहेत.

  • आर के नारायण आणि नोबेल पारितोषिक

    नेहमीचा घोळ – पुस्तक आणि त्याच्यावर आधारलेला चित्रपट. पुस्तक चांगलंच असतं, वाईट पुस्तकावर निर्माते आपले पैसे घालवत नाहीत. चित्रपट कधी पसंतीला उतरतो, कधी नाही. यातलं काय आधी हा ही एक वेगळा प्रश्न आहे. आधी चित्रपट बघितला तर मत पूर्वग्रहदूषित होण्याचा धोका वाढतो – वाचताना पात्रांच्या जागी कलाकार आपसूक समोर येतात. आधी पुस्तक वाचलं तर चित्रपट…

    नेहमीचा घोळ – पुस्तक आणि त्याच्यावर आधारलेला चित्रपट. पुस्तक चांगलंच असतं, वाईट पुस्तकावर निर्माते आपले पैसे घालवत नाहीत. चित्रपट कधी पसंतीला उतरतो, कधी नाही. यातलं काय आधी हा ही एक वेगळा प्रश्न आहे. आधी चित्रपट बघितला तर मत पूर्वग्रहदूषित होण्याचा धोका वाढतो – वाचताना पात्रांच्या जागी कलाकार आपसूक समोर येतात. आधी पुस्तक वाचलं तर चित्रपट बघताना बहुतेक वेळा अपेक्षाभंग होतो कारण बराच बदल झालेला असतो. पण बहुतेक वेळा हा निर्णय आपोआप घेतला जातो. आर. के. नारायण म्हणजे स्वामी आणि मालगुडी हे समीकरण घट्ट झालं होतं. (‘स्वामी/मालगुडी डेज’ पुस्तक अधिक चांगलं की मालिका हा निर्णय करणं अशक्य व्हावं इतकं ते रूपान्तर सुरेख झालं आहे.) त्यामुळे या लेखकाने गाईडची कथा कशी सांगितली आहे याबद्दल उत्सुकता होती. (गाईड चित्रपटाची कथा सर्वश्रुत आहे त्यामुळे इथे शेवट उघड करण्याचा इशारा गैरलागू ठरावा.) नारायण त्यांच्या साध्या-सोप्या शैलीबद्दल प्रसिद्ध आहेत. फाफटपसारा नाहीच, किंबहुना ‘मिनिमलिस्टीक’ वाटावं असं त्यांचं लिखाण असतं. प्रस्तावनेत मायकेल गोर्रा यांनी म्हटल्याप्रमाणे “he is easy to read, and hard to understand.” असं असताना वाचायला सुरुवात केल्यावर नारायण एक अनपेक्षित धक्का देतात. कादंबऱ्यांमध्ये निवेदनाचे अनोखे प्रयोग फारसे बघायला मिळत नाहीत आणि साधी शैली असलेल्या नारायणांकडून अशी अपेक्षा अजिबातच नसते. कथा सुरू होते तृतीयपुरूषी निवेदनात. राजू तुरुंगामधून सुटून आल्यावर गावातील नदीकाठी बसलेला आहे आणि एका गावकऱ्याशी गप्पा मारतो आहे. काही वेळ त्यांच्या गप्पा झाल्यावर निवेदक अचानक, कोणतीही पूर्वसूचना न देता प्रथमपुरुषी निवेदनात जातो. आता राजू आपली कथा सांगतो आहे. ही जर चित्रपटाची पटकथा असती तर इथे फ्लॅशबॅक आला असता. ही भूतकाळाची कथा राजू सलग सांगत नाही, जशी आठवेल तशी सांगतो. कधी रोझी आणि मार्कोबरोबर घडलेल्या घटना, कधी त्याच्या लहानपणाचे प्रसंग. प्रथमपुरुषी आणि तृतीयपुरुषी निवेदकांची ही अदलाबदल कादंबरी संपेपर्यंत चालू राहते.

    Book cover for the Guide

    नारायण यांना ही अनोखी शैली का वापरावी वाटली हे हळूहळू लक्षात येतं. या दुहेरी निवेदनातून राजूचे एकेक पैलू समोर येतात. राजूला मारुनमुटकून स्वामी बनवण्यात आलं आहे पण याचा अर्थ त्याचा यात काहीच सहभाग नाही असा नाही. किंबहुना हे का झालं याचं उत्तर राजू स्वत:च देतो. कोणत्याही गोष्टीला नाही म्हणणं त्याला जमत नाही. तो गाईड होण्यामागेही हेच कारण होतं आणि स्वामी होण्यामागेही. रेल्वेस्टेशनावर टूरिस्ट लोक आल्यावर त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत देत तो गाईड झाला, तर गावकऱ्यांच्या प्रश्नांना, अडचणींना चतुराईने उत्तरे देत स्वामी. “I never said, “I don’t know.” Not in my nature, I suppose. If I had the inclination to say “I don’t know what you are talking about,” my life would have taken a different turn.” हा राजूच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया आहे आणि हीच त्याची शोकांतिका आहे. नारायण यांच्या सहज शैलीत लपलेली संदिग्धता अनेक ठिकाणी दिसते. शेवटी राजू उपास करत असताना एक पत्रकार त्याला विचारतो, “have you always been a yogi?” यावर राजू त्याला गूढ उत्तर देतो, “Yes; more or less.”

    ‘गाईड’ हिंदी आणि इंग्रजी दोन भाषांमध्ये बनविण्यात आला. हिंदी आवृत्तीचे दिग्दर्शन विजय आनंद उर्फ गोल्डीने केलं, इंग्रजीसाठी पाश्चात्त्य दिग्दर्शक होता. (नाव आवर्जून आठवावं इतका प्रसिद्ध नसावा.) इंग्रजी आवृत्ती पाहिलेली नाही. हिंदी आवृत्तीमध्ये अनेक बदल केले आहेत. चित्रपट आणि पुस्तक यातील एक मुख्य फरक म्हणजे पुस्तकात मार्कोचं पात्र बरंच स्पष्ट आहे. पुस्तकात रोझीला पाहताक्षणीच ती विवाहित असूनही राजू तिच्या प्रेमात पडतो. रोझी-मार्कोची वारंवार भांडणे होतात पण जे घडतं त्याला तिघेही सारखेच कारणीभूत असतात. चित्रपटात मार्कोच्या व्यक्तिरेखेला फारसा वाव दिलेला नाही. रोझीने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न करणं, मार्कोचे इतर स्त्रियांशी संबंध हे प्रसंग पुस्तकात नाहीत. हे प्रसंग घातल्यामुळे जे घडलं त्याचा दोष मार्कोवर येतो. नायकाचं इतकं पदच्युत होणं कदाचित आनंद बंधूंना पटलं नसावं. सर्वात महत्त्वाचा बदल – राजू तुरुंगात गेल्यानंतर त्याची आणि रोझीची भेट होत नाही. रोझीचं पात्रं पुस्तक अर्धं संपल्यानंतर परत दिसत नाही. पुस्तकातील रोझी सेंटी वहिदाच्या तुलनेत बरीच रोखठोक वाटते. चित्रपटात रोझीचं पात्र शेवटी पारंपरिक हिंदी नायिकेच्या चाकोरीनेच जातं. आणि हो, मूळ कथा मालगुडीत घडते आणि राजू सौथ इंडियन असतो – सकाळी इडली आणि काफीचा ब्रेकफास्ट करणारा.

    नारायण यांनी ‘गाईड’ प्रदर्शित झाल्यानंतर एकलेख लिहिला होता. देव आनंद त्यांना भेटायला येण्यापासून पुढे काय-काय होत गेलं याचं दिलखुलास वर्णन यात आहे. सुरुवातीला ते इतका मोठा स्टार आपल्याला भेटायला आला या कल्पनेनेच हुरळून गेले होते. निर्माता-दिग्दर्शक आणि त्यांचा लवाजमा आल्यानंतर नारायण यांनी म्हैसूरच्या आसपासची मालगुडीशी मिळतीजुळती ठिकाणं त्यांना दाखविली. हळूहळू बैठका वाढायला लागल्या आणि कथेवरचा नारायण यांचा ताबा सुटू लागला. मग राजू मालगुडी सोडून कुठेतरी उत्तर हिंदुस्थानात गेला. शेवटीशेवटी इतके बदल झाले की नारायण यांनी त्यात लक्ष घालणं सोडून दिलं. अर्थात या सर्व प्रकरणात नारायण विजय आनंदचा उल्लेख कुठेही करत नाहीत. देव आनंद आणि आंग्लभाषिक दिग्दर्शक हे दोघेच त्यांच्या टीकेचे धनी होतात. बऱ्याच वर्षांपूर्वी ‘चंदेरी’मध्ये गोल्डीची मुलाखत वाचली होती. त्यात त्यानेही इंग्रजी आवृत्तीचा खरपूस समाचार घेतला होता. पुस्तक आणि चित्रपट यातील आणखी एक मुख्य फरक म्हणजे नारायण यांनी शेवट संदिग्ध ठेवला आहे. Raju opened his eyes, looked about, and said, “Velan, it’s raining in the hills. I can feel it coming up under my feet, up my legs—” He sagged down. हे शेवटचं वाक्य आहे. आता यावरून खरंच पाऊस पडला की नाही हे ज्याचं त्यानं ठरवावं. किंबहुना राजू शेवटी मरतो की नाही हे ही नक्की नाही. चित्रपटात शेवट सकारात्मक आहे – पाऊस येतो – यावर टीका होऊ शकते आणि ती योग्यही असेल पण एक गोष्ट विसरता कामा नये. १९६५ मध्ये आपली अन्नधान्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. इतकी की खुद्द पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जनतेला आठवड्यातून एक दिवस उपास ठेवण्याचं आवाहन केलं होतं. चित्रपटाचा शेवट बघताना ही पार्श्वभूमी विसरता कामा नये. देशात दुष्काळ पडलेला असताना चित्रपटाचा शेवट सकारात्मक करणं निर्मात्यांना अधिक सोयीचं वाटलं असावं.

    गोल्डीच्या म्हणण्यानुसार गाईडमध्ये काही क्षण देव आनंदने अभिनयाची उच्च पातळी गाठली आहे. गोल्डीच्या काही फ्रेम्स लक्षवेधक आहेत. वहां कौन है तेरा गाण्यात देव पुलावर चालत असताना एक शॉट आणि नंतर पुलाची लांबी दाखवणारा शॉट, स्पिलबर्गची आठवण करून देणारे सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवरचे शॉट. गाईडमधील एक महत्त्वाची बाब म्हणजे शैलेन्द्रची गाणी. गुलजार शैलेन्द्रबद्दल म्हणतो, “वो हिंदी या उर्दू में नही लिखते. उनकी जुबान हर एक हिंदुस्थानी की जुबान है.” साधे तरीही अर्थपूर्ण शब्द ही शैलेन्द्रची खासियत. आणि बर्मनदांनी सगळी गाणी अप्रतिम केली आहेत. गाण्यामधून कथानक कसं पुढे सरकतं याचं सुरेख उदाहरण या चित्रपटात दिसतं. ‘सैंया बेइमान-क्या से क्या हो गया’ गाण्यातील चित्रीकरण ऑपेराच्या जवळ जाणारं आहे. ‘वहां कौन है तेरा’ गाणं संपेपर्यंत राजू स्वामीपदाच्या पहिल्या पायरीला आलेला असतो आणि हे कसं होतं हे गोल्डीने अत्यंत सहजरीत्या दाखवलं आहे – एक साधू त्याची भगवी शाल झोपलेल्या देव आनंदच्या अंगावर पांघरतो आणि राजूच्या स्वामीपदाचा प्रवास सुरू होतो.

    नारायण यांच्यावर वेळोवेळी बरीच टीका झाली. टीका करण्यात नायपॉल आघाडीवर होते. नारायण यांच्या कथांमध्ये तत्कालीन भारत कुठेच दिसत नाही हा टीकेचा मुख्य मुद्दा होता. कदाचित नारायण यांना फ्रेंच लेखक गुस्ताव्ह फ्लोबेरने सुरू केलेल्या वास्तववादाच्या पठडीत बसून भारतातील धुळीचं, कचऱ्याचं साग्रसंगीत वर्णन करण्यापेक्षा स्थलकालांच्या बंधनातून मुक्त असलेल्या एका काल्पनिक भारतातील गोष्टी अधिक महत्त्वाच्या वाटत असाव्यात. त्यांनी एकदा नायपॉल यांना म्हटलं होतं, “India will go on.” नारायण यांच्या इतर वाक्यांप्रमाणेच या वाक्यातूनही अनेक अर्थ सूचित होतात.
    —-

    १. नारायण यांनी हिंदूमध्ये आणि इतरत्र बरीच वर्षे लेख लिहिले. त्यांचे हे लेख अनेक कारणांसाठी वाचनीय आहेत. तांदुळावरचं रेशनिंग संपल्यानंतर नारायण यांचा एक लेख आला होता. लेख नर्मविनोदी असला तरी त्यामागचं भीषण वास्तव जाणवल्यावाचून राहवत नाही. रेशनिंग सुरू होतं तेव्हा कुठेही लग्नसोहळा असेल तर पाहुण्यांना आपापला शिधा बरोबर घेऊन जावा लागत असे. अचानक अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची धाड पडली तर काय करायचं यासाठी हा खटाटोप. अधिकारी आले तर कचऱ्यात पत्रावळी किती यावरून किती धान्य वापरलं याचा हिशेब घेत असत आणि धान्यवापर मर्यादेत आहे किंवा नाही हे ठरवीत असत. कधीकधी समारंभ सुरू असताना यजमान एका रांगेतील लोकांना हळूच नेत्रपल्लवी करून बोलावीत. हे लोक शक्य तितक्या गोपनीयतेने एका अज्ञातस्थळी जात आणि गुपचुप जेवण उरकून येत. त्यांचं झाल्यावर मग पुढची रांग. आज आयप्याडवर टिचक्या मारत नेहरूंच्या समाजवादावर टीका करणं फार सोपं आहे कारण आजच्या पिढीला त्या काळच्या परिस्थितीचं आकलन होणं अशक्य आहे. अन्न सुरक्षा बिलाला सुखवस्तू मध्यमवर्गियांकडून आर्थिक बोजा पडेल अशी कारणं दिली जातात त्यावरून हे दिसतं. आज आपली अर्थव्यवस्था कितीही खालावली तरीही मध्यमवर्गाला उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. सोन्यावरची ड्यूटी कमी केली किंवा गॅस सबसिडी वाढवली तरीही सरकारवर आर्थिक बोजा पडतोच पण फक्त गरिबांसाठीच्या सवलतींच्या वेळीच हे कारण पुढे केलं जातं. मध्यमवर्गियांना सवलती मिळतात तेव्हा पडणाऱ्या आर्थिक बोज्याबद्दल कुणी चकार शब्दही काढत नाही.

    एके काळी नारायण यांना नोबेल मिळण्याची अफवा जोरात होती. त्यावर लिहिलेल्या एका लेखात नारायण यासुनारी कावाबाटाचं उदाहरण देतात. त्याला नोबेल मिळाल्यावर मुलाखतीत नेहमीच्या “कसं वाटतंय?” या प्रश्नावर तो म्हटला, “काय वाटायचं? इथे येतायेता प्रवासात एक दिवस गेला.” नोबेलच्या पैशांचं काय करणार यावर म्हटला, “एखादी खुर्ची किंवा सोफा घ्यावा म्हणतो, कुणी आलं तर बसायला तरी होईल.” हे सांगितल्यावर नारायण म्हणतात, “नोबेल निवडण्याचे जे काही निकष असतील ते असोत पण विजेता कुणाचंही साहाय्य न घेता स्वीडनला येऊ शकेल आणि मिळालेले पैसे हवे तसे खर्च करू शकेल इतका धडधाकट असतानाच त्याला पारितोषिक देण्यात यावं.”

  • शब्दांचा जादूगार : विक्रम सेठ

    विक्रम सेठची ओळख त्याच्या कवितांमधून झाली. ‘द हम्बल ऍडमिनिस्ट्रेटर्स गार्डन’ आणि ‘ऑल यू हू स्लीप टुनाइट’ हे दोन कवितासंग्रह वाचनात आले. माझ्या तुटपुंज्या वाचनप्रवासात असं काही कधी वाचायला मिळालं नव्हतं. म्हटलं तर अगदी साध्या वाटणाऱ्या कविता, कधीकधी इतक्या सोप्या की वाचल्यावर वाटावं हे आपल्यालाही सहज जमायला हरकत नाही. काही कविता चित्रांसारख्या, मोजक्या शब्दांमधून वातावरणाचा एखादा…

    विक्रम सेठची ओळख त्याच्या कवितांमधून झाली. ‘द हम्बल ऍडमिनिस्ट्रेटर्स गार्डन’ आणि ‘ऑल यू हू स्लीप टुनाइट’ हे दोन कवितासंग्रह वाचनात आले. माझ्या तुटपुंज्या वाचनप्रवासात असं काही कधी वाचायला मिळालं नव्हतं. म्हटलं तर अगदी साध्या वाटणाऱ्या कविता, कधीकधी इतक्या सोप्या की वाचल्यावर वाटावं हे आपल्यालाही सहज जमायला हरकत नाही. काही कविता चित्रांसारख्या, मोजक्या शब्दांमधून वातावरणाचा एखादा क्षण अलगद पकडणाऱ्या. मग ‘बीस्टली टेल्स – फ्रॉम हिअर ऍंड देअर’ वाचलं – नुसती धमाल. दहा कविता पण त्या कशा तर भारत, चीन, ग्रीस, युक्रेन इथल्या रूपककथांवर आधारित. प्रत्येक कथेत दोन-दोन प्राणी – मांजर आणि कोंबडी किंवा मगर आणि माकड. वेगवेगळ्या शब्दांची, जोडशब्दांची, नादांची आणि यमकांची नुसती लयलूट चाललेली, आपण फक्त आनंद लुटायचा. मग हाती आलं – गोल्डन गेट. हे काय प्रकरण आहे हे कळल्यावर छाती दडपली. दोन-एकशे पानांची कादंबरी पण पूर्णपणे सुनीतांमध्ये. यातल्या सुनीतांचं स्वरूप रशियन लेखक पुश्किनच्या ‘युजीन ओंजिन’वर आधारित आहे. कॅलिफोर्नियातल्या आयुष्यांवर आधारित या कादंबरीचं वर्णन गोर विदालनं ‘द ग्रेट कॅलिफोर्निया नॉव्हेल’ या शब्दात केलं आहे. ‘थ्री चायनीज पोएट्स’ या चिनी कवितांच्या अनुवादासाठी विक्रम सेठ एका वर्षात चिनी भाषा शिकला हे कळल्यावर या माणसाबद्दल आदरयुक्त भीती आणि भीतियुक्त आदर वाटायला लागला.

    पण अजूनही गद्य काही वाचलं नव्हतं. ‘ऍन इक्वल म्युझिक’ खूप अपेक्षेनं वाचायला घेतलं पण फारसं आवडलं नाही. अर्थात आता ते नेमकं का आवडलं नव्हतं ते ही आठवत नाही त्यामुळे परत चाळून बघायला हवं असं वाटतं आहे. पण अजूनही एका पुस्तकाशी लपंडाव चालला होता – ‘अ सूटेबल बॉय’ (A Suitable Boy). काही साहित्यिक त्यांच्या विशिष्ट पुस्तकांबरोबर जोडले गेलेले असतात. त्यांचं नाव घेतलं की ते पुस्तक आठवतच. मेलव्हिल – मोबी डिक, डिकन्स – डेव्हिड कॉपरफिल्ड वगैरे. तसं विक्रम सेठ म्हटलं की ‘सुटेबल बॉय’ आलंच. एकदा लायब्रीत त्याचा एक भाग मिळाला तो वाचला पण दुसरा उपलब्ध नव्हता. या ना त्या कारणानं वाचायचं राहून जात होतं. अखेर आख्खं पुस्तक हाती आलं एकदाचं. मग मारली बैठक आणि घेतलं वाचायला.

    Book Cover for A Suitable Boy

    साल १९५१. सूटेबल बॉयच्या पहिल्याच पानावर मिसेस रूपा मेहता यांची मुलगी सविता हिच्या लग्नाचा सोहळा चालू आहे. या दरम्यान त्या धाकटी मुलगी लता हिला म्हणतात, “मी ठरवेन त्या मुलाशीच तुझं लग्न होणार. ” खरं तर कथेचा गाभा पुस्तकाचं नाव आणि या पहिल्याच वाक्यानं स्पष्ट व्हायला हवा. पण सूटेबल बॉयची कथा म्हणजे लतासाठी योग्य मुलगा शोधणं असं म्हणणं म्हणजे “ताजमहाल म्हणजे फार कै नै, मुमताज बेगमची कबर आहे” असं म्हणण्यासारखं आहे.

    गोष्ट आहे चार कुटुंबांची – मेहरा, कपूर, खान आणि चॅटर्जी. मिसेस रूपा मेहरा, त्यांची चार मुलं – अरूण, सविता, लता, वरूण; महेश कपूर आणि मिसेस कपूर यांची तीन मुलं – प्राण, वीणा आणि मान; बैतारचे खानसाहेब यांची तीन मुलं – झैनाब, इम्तियाझ आणि फिरोझ; आणि सगळ्यात शेवटी जस्टीस चॅटर्जी आणि मिसेस चॅटर्जी यांची पाच मुलं – मीनाक्षी, अमित, दिपांकर, काकोली, तपन. अरूण मेहराचं लग्न मीनाक्षी चॅटर्जीशी झालंय तर प्राण कपूरचं सविता मेहराशी. मान कपूर, फिरोझ खान यांची आणि त्यांचे वडील महेश कपूर आणि नवाबसाहेब यांची घट्ट मैत्री आहे. दमलात? ही तर फक्त मुख्य पात्रं झाली. याशिवाय मिसेस मेहरा यांचे वडील डॉ. किशनचंद सेठ आणि त्यांची दुसरी बायको पार्वती, वीणाचा नवरा केदारनाथ टंडन, मुलगा भास्कर आणि मैत्रीण प्रिया, रूपा मेहरा यांची मैत्रीण-कम-मानलेली मुलगी कल्पना, महसूलमंत्री महेश कपूर यांचे सहकारी – मुख्यमंत्री शर्मा आणि प्रतिस्पर्धी – गृहमंत्री अगरवाल, गावातील प्रख्यात कोठेवाली सईदा बेगम, तिची बहीण तस्नीम आणि नोकराणी बिब्बो, प्रसिद्ध गायक उस्ताद माजिद खान, सारंगीवादक इश्फाक, उर्दू शिक्षक राशीद, लताची घनिष्ठ मैत्रीण मालती, इंग्लिश विभागात लेक्चरर असलेल्या प्राण कपूरचे वरिष्ठ प्राध्यापक शर्मा, गणित विभागातला मित्र सुनील पटवर्धन, त्याचे वरिष्ठ प्राध्यापक दुर्राणी, त्यांचा मुलगा कबीर अशी अनेक पात्रं. आणि तीन-चार पानांसाठी ‘पेशल अपीअरन्स’ – पं. जवाहरलाल नेहरू.

    टॉलस्टॉयबद्दल अशी तक्रार बरेचदा ऐकली आहे की त्याची पात्रं लक्षात राहत नाहीत. ‘सुटेबल बॉय’च्या बाबतीत असं अजिबात झालं नाही. प्रत्येक पात्र त्याच्या सगळ्या वैशिष्ट्यांसकट डोळ्यापुढे उभं राहतं. विशेष म्हणजे विक्रम फारच क्वचित पात्रांचं वर्णन करतो. काही लेखकांना पात्र कथेत आलं रे आलं की हरवलेल्या व्यक्तींची वर्णनं देतात त्याप्रमाणे त्यांची उंची, चेहरा, वर्ण अशी सगळी माहिती द्यायची सवय असते. ‘सूटेबल बॉय’मध्ये कथेच्या दृष्टीनं अगदी महत्त्वाचं असेल तरच पात्रांच्या एखाद्या वैशिष्ट्याचा उल्लेख केला आहे अन्यथा ते पात्र कसं दिसतं हे ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य वाचकाला आहे. हे सुरूवातीला लक्षात आलं नव्हतं पण कथानकानं पकड घेतल्यानंतर ही पात्रं आपोआप डोळ्यापुढं आली – काही प्रत्यक्षातली, काही सिनेमातली. महेश कपूर म्हटलं की मला काळा कोट घातलेले बलराम जाखड आठवतात. मिसेस रूपा मेहता – गोलमालमधली दीना पाठक, अमित चॅटर्जी – ‘प्रोतिद्वंदी’मधला ध्रितिमान मात्र तितका गंभीर नाही, प्राण कपूर – रजनीगंधामधला दाढीवाला, केदारनाथ टंडन – जन अरण्यमधला सोमनाथ. कोणतंही वर्णन न वाचता हा चिमित्कार कसा झाला ते विक्रमलाच ठाऊक. आणखी एक म्हणजे कसं कोण जाणे पण वाचताना आपल्या मनात काय चाललं आहे हे निवेदकाला आणि पर्यायाने विक्रम सेठला कळत असावं. पहिल्याच पानावर मिसेस मेहरांचं वाक्य वाचून जेन ऑस्टीनच्या ‘प्राइड ऍंड प्रेज्युडीस’ची आठवण न झाली तरच नवल. नंतर जेन ऑस्टीनचा उल्लेख येतो आणि लता ‘एम्मा’ वाचताना दिसते. प्रियाच्या नोकराचं वर्णन एका ओळीपुरतंच येतं पण तरीही तो लक्षात राहतो कारण त्याला सगळ्यांची औषधं चोरून खायची सवय असते. ते वाचल्यावर वाटतं, हे तर डिकन्ससारखं चाललं आहे – छोट्याहून छोट्या पात्रालाही काहीतरी विशिष्ट लकब किंवा सवय देऊन ते लक्षात राहील असं करायचं. असा विचार येतो न येतो तो लगेच पुढच्या पानावर उरिया हीपचा संदर्भ येतो. जणू विक्रम सेठ म्हणतो आहे, “मलाही माहिती आहेत यांची प्रेरणास्थानं, काळजी नसावी. ” हे ऐकून मी खजील होतो आणि चिकित्सा बाजूला ठेवून निमूट वाचायला लागतो.

    कथानकाचा काळ फार काळजीपूर्वक निवडलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून चार वर्षं झाली आहेत. स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक याच सालात झाली. याखेरीज तेव्हाच्या संसदेपुढे असलेल्या काही प्रश्नांचा संदर्भ कथानकात येतो. स्त्रियांना समान कायदे देणारे ‘हिंदू कोड बिल’ (Hindu Code Bill), जमिनदारी संपुष्टात आणणारे ‘जमिनदारी अबोलिशन बिल’ (Zamindari Abolition Bill). पैकी ‘जमिनदारी अबोलिशन बिल’ अस्तित्वात आणि अमलात आणण्याचे अधिकार केंद्राने प्रत्येक राज्याला दिले होते. सुटेबल बॉयची कथा पूर्व प्रदेश या काल्पनिक राज्यातील ब्रह्मपूर या शहरात घडते. जमिनदारी संपवण्याच्या बिलाचे कर्ते महसूल मंत्री महेश कपूर असतात. मात्र हे बिल अमलात आल्यावर त्यांचे मित्र बैतारचे नवाबसाहेब यांची मालमत्ताही जप्त होणार. यामुळे त्यांच्या संबंधात येणारे चढउतार कथानकाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे बिल घटनेच्या विरोधात आहे या मुद्द्यावरून कोर्टातही जाते. ब्रह्मपूरमध्ये चौकात असलेल्या मशीदीच्या शेजारीच शिवमंदिर बांधण्याचे प्रयत्न चालू असतात आणि या अनुषंगाने ब्रह्मपुरमधील हिंदू आणि मुसलमान समाजात संघर्षांचे बरेच प्रसंग येतात. सुटेबल बॉय १९९३ मध्ये प्रकाशित झाले. १९९२ मधल्या बाबरी मशीद प्रकरणाचा प्रभाव यावर असण्याची शक्यता आहे.

    १९५१ मध्ये पंतप्रधान नेहरू आणि काँग्रेसचे अध्यक्ष पुरूषोत्तमदास टंडन यांच्यामध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरुंनी पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष ही पदे एकाच व्यक्तीकडे असू नयेत अशी भूमिका घेऊन पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. टंडन यांच्या अल्पसंख्यांक आणि अर्थव्यवस्थेच्या भूमिकांच्या विरोधात रफी अहमद किडवाई, मौलाना आझाद आणि आचार्य कृपलानी यांनी राजीनामा देऊन वेगळा पक्ष स्थापन केला. नंतर टंडन आणि नेहरू यांच्यातील मतभेद विकोपाला गेले आणि नेहरू काँग्रेस सोडणार अशी परिस्थिती निर्माण झाली. अखेर नेहरूंची सरशी झाली आणि तेव्हापासून काँग्रेसमध्ये पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष हे शक्यतो एकच व्यक्ती असावेत किंवा निदान एकाच मताचे असावेत असा अलिखित नियम बनला. कथेमध्ये महेश कपूर आझाद आणि कृपलानी यांच्या पक्षात सामील होतात. अशा प्रकारच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये कथानक ऐतिहासिक घटनांवर आधारित पण काल्पनिक आहे अशा प्रकारची नोटिस असते. सुटेबल बॉयमध्ये अशी कोणतीही नोटिस दिलेली नाही. इथे एक रोचक विचार येतो. महेश कपूर यांचे पात्र तेव्हाच्या एखाद्या नेत्यावर आधारलेले असावे का? पूर्व प्रदेश आणि ब्रह्मपूर हे काल्पनिक करण्यामागचे कारण काय असावे?

    विक्रम कवी आहे याचे इतर पुरावेही त्याचं गद्य साहित्य वाचताना मिळतात. चॅटर्जी मुलांबद्दल बोलताना ‘None of them worked, but each had an occupation’ सारखी वाक्यं तो सहज लिहून जातो. याखेरीज बहुतेक प्रकरणांचा किंवा प्रकरणातील विभागांचा शेवटचं वाक्य स्तब्ध करायला लावणारं असतं. असं वाक्य वाचताना हायकूमध्ये जसं शेवटची ओळ अर्थ बदलून टाकते किंवा एक वेगळाच ‘टच’ देते तसं वाटतं. जणू काही एखाद्या चित्रकारानं चित्र पूर्ण केल्यानंतर एक शेवटचा फटकारा मारताना छोटासा बदल करावा आणि त्यामुळे चित्राला वेगळाच अर्थ मिळावा तसं काहीसं. तर काही वेळा एखाद्या वाक्यानं पाश्चात्य संगीतातील ‘कोडा’ आठवतो. (एक मूव्हमेंट संपली आहे हे दर्शविण्यासाठी त्या मूव्हमेंटच्या शेवटी एक निर्णायक सूर येतो – बहुतेक वेळा व्हायोलिन किंवा पियानोचा – तोच कोडा. )

    ‘सुटेबल बॉय’चा टोन मुख्यत्वे ‘सटायर’ (satire) आहे असं वाटतं. दु:खद प्रसंग वगळता बाकीच्या प्रसंगांमध्ये निवेदक हळूच एक एक विसंगती, कधी गंभीरपणे तर कधी नर्मविनोदी शैलीत आपल्यासमोर आणत असतो. मशीदीच्या शेजारीच शिवमंदिर बांधायचं नक्की झाल्यावर उस्ताद माजिद खान रियाज करता करता व्यथित होतात. मंदिर मशीदीच्या पश्चिमेला – म्हणजे रोज नमाज पढताना आपण या काफिरांच्या देवासमोर झुकणार. काय म्हणावं याला? पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की जो भैरव राग ते गात होते त्याचं नाव शिवाचंच एक नाव आहे. किंवा पंडित नेहरू निवडणुकांच्या आधी सलिमपुरमध्ये भाषण करताना कधी ब्रह्मपूरपर्यंतही न गेलेल्या खेडुतांसमोर कोरियन क्रायसिस किंवा इजिप्तच्या प्रश्नांबद्दल बोलतात. बेन्स्टन ऍंड प्राइस या ब्रिटिश कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असलेल्या अरूणला एकदाही इंग्लंडला न जाताही लंडनची इत्थंभूत माहिती असते. आपल्या निवडणुकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना तो आणि त्याचे सहकारी चर्चिल परत निवडून येईल किंवा नाही यावर समरसून चर्चा करत असतात.

    बहुतेक प्रथितयश लेखकांची एक विशिष्ट शैली असते. हेमिंग्वे कमीत कमी शब्द आणि छोट्या वाक्यांसाठी प्रसिद्ध आहे, डिकन्स विस्तृत वर्णनांसाठी. विक्रम इतक्या साध्या आणि सोप्या शब्दात सगळं सांगतो की शैली वगैरे शोधायचा विचारच मनात येत नाही. पूर्ण पुस्तक वाचताना फक्त एकदाच एक शब्द आवर्जून शब्दकोशात बघावासा वाटला. (फारच सुरेख शब्द – Acrostic – जिच्या प्रत्येक ओळीचं पहिलं अक्षर जुळवलं तर गुप्त संदेश मिळतो अशी कविता. ) साध्या शब्दांतून हे अनोखं विश्व उभारणं विक्रमला कसं जमलं? कादंबरीची आणखी एक खासियत म्हणजे तपशील. ब्रह्मपूरमधील चांभार उद्योग – बूट, चपला बनवण्याच्या प्रक्रियेपासून ते आपल्या घटनेचं १४ वं कलम आणि अमेरिकेची १४ वी अमेंडमेंट यांच्यातील साम्य अशा अनेक विषयांचं खोलात जाऊन वर्णन केलं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातलं सामान्य जीवन कसं होतं याचं सुरेख चित्र या कादंबरीत बघायला मिळतं. खुशवंत सिंग यांनी हा काळ अनुभवला आहे. त्यांना या कथेत शोधूनही एकही तपशिलाची चूक आढळली नाही. गंमत म्हणजे विक्रम सेठचा जन्म कादंबरीतील काळ संपल्यानंतर १९५२ साली झाला.

    इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो. १९५१ हे साल निवडण्याचं कारण काय? ज्या चार मुख्य कुटुंबांची ही कथा आहे ती कुटुंबं सुखवस्तू आहेत. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यांनाही फाळणीचे चटके बसले होते. कपूर कुटुंबाला लाहोरमधून इकडे प्राण मुठीत धरून यावं लागलं, त्याचे संदर्भ येत असतात. येताना हल्ला झाला त्याचे व्रण अजूनही प्राण कपूरच्या हातावर आहेत. कादंबरी चार वर्ष आधी – १९५१ ऐवजी १९४७ मध्ये बेतली असती तर कितीतरी मोठं नाट्य रंगवायला मिळालं असतं. मग विक्रमनं असं का केलं असावं? १९५१ मध्ये पात्रांच्या समोर अडचणी आहेत पण त्या जीवनमरणाच्या नाहीत, “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग” या स्वरूपाच्या आहेत. मिसेस रूपा मेहरांच्या समोर असलेले प्रश्न – लताचं लग्न कधी होईल, वरूणच्या नोकरीचं काय – अवघड आहेत, अशक्य नाहीत.

    टॉलस्टॉयची प्रसिद्ध शोकांतिका – ऍना कॅरॅनिनाचं पहिलंच वाक्य आहे, “Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way. ” साहित्यामध्ये आनंदी कथांपेक्षा दु:खी कथांना झुकतं माप मिळाण्याची परंपरा ग्रीक शोकांतिकांपासून चालू आहे. विक्रमने सुटेबल बॉयमध्ये या प्रवाहाच्या विरूद्ध गेलं तर काय होतं हे शोधलं आहे. दुष्काळ, महामारी, देशोधडी यासारख्या आपत्तींना सामोरे जाणाऱ्या लोकांपेक्षा रोजच्या आयुष्यातल्या छोट्या-छोट्या संघर्षांना तोंड देणारे लोक त्याला अधिक रोचक वाटतात. सुटेबल बॉय वाचल्यानंतर इतके दिवस निमूटपणे स्वीकारलेल्या टॉलस्टॉयच्या वाक्याबद्दल प्रश्न उभे राहिले. कोणतंही कुटुंब शंभर टक्के सुखी असू शकतं का? आणि रंजलेल्या-गांजलेल्या, भकास-उदास कुटुंबांमध्येच साहित्यिक मूल्याच्या कथा असतात का? साहित्य हे आयुष्याचं प्रतिबिंब मानलं तर सुखी आयुष्यांमध्येही मानवी स्वभावाचे पैलू दिसायला काय हरकत आहे?

    आवडणारी पुस्तकं बरीच असतात, ती आवडण्याची कारणंही वेगवेगळी असतात. फार क्वचित एखादं पुस्तक भारून जायला होतं. यापूर्वी असा अनुभव मुराकामीच्या बाबतीत आला आहे. पण मुराकामी वाचून येणारी अनुभूती आणि विक्रम सेठ वाचून येणारी अनुभूती यांच्या जातकुळीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. मुराकामीचं जग जादुई असतं, स्वप्न आणि सत्य यांच्या सीमारेषेवरचं. विक्रम सेठचं जग जे आपल्याला आजूबाजूला दिसतं तेच आहे. आपल्याला कुठेतरी रूपा मेहरा किंवा अमित चॅटर्जी भेटलेले असतात. मग त्यांच्या या साध्याश्या वाटणाऱ्या कथेनं संमोहित का करावं? कदाचित जेम्स वुड सुटेबल बॉयबद्दल म्हणतो तसं असावं, “Such writing reminds us that there are secrets beyond technique, beyond even style, which have to do with a quality of soul on the part of the writer.”

    ‘अ सुटेबल बॉय’ लवकरच छोट्या पडद्यावर बघायला मिळेल​. मीरा नायर यांनी बीबीसीसाठी याचे दिग्दर्शन केले आहे.

    —-

    १. मुराकामीसारखे काही अपवाद सोडले तर आधुनिक साहित्यापेक्षा मला पारंपरिक साहित्य अधिक भावतं. आधुनिक साहित्यामध्ये जे वेगवेगळे प्रयोग होतात ते स्वागतार्ह आहेत यात शंका नाही. मात्र यामुळे त्याआधी आलेला वास्तववाद (Realism) बाद होतो हे पटत नाही. आधुनिकतावादाची (Modernism) रेघ मोठी करण्यासाठी वास्तववादाची रेघ पुसण्याचे कारण का पडावे हे आकलनाबाहेरचे आहे. म्हणूनच विल सेल्फसारखा नावाजलेला लेखक “मी आणि माझे काही आवडते लेखक हेच सर्वश्रेष्ठ, बाकी सगळे टुकार. आधुनिकतावाद हेच अंतिम सत्य, बाकी सगळं भिकार. ” असं म्हणतो तेव्हा त्याला ‘सेल्फ ऑब्सेस्ड रॅंट’ या पलीकडे फारसं महत्त्व द्यावंस वाटत नाही. आधुनिक साहित्य वाचताना येणारी एक मोठी अडचण म्हणजे यातले हंस कोण आणि बगळे कोण हे ओळखणं अवघड असतं. पारंपरिक साहित्यामध्ये यशस्वी होण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या गुणवत्तेची गरज असते. लोकांच्या वेगवेगळ्या रूची आणि त्यामुळे येणारा सापेक्षपणा बाजूला ठेवला तर पारंपरिक साहित्यामध्ये प्रभावीपणे कथा सांगू शकणारे साहित्यिक यशस्वी होतात असं दिसतं. आधुनिक साहित्यामध्ये बरेचदा लेखक किती हुशारीने शब्दखेळ करू शकतो, पारंपरिक नियम मोडू शकतो, वाचकांना कोड्यात टाकू शकतो यावरच सगळा भर असतो. याचं टोकाचं उदाहरण म्हणजे जेम्स जॉइसची ‘फिनेगन्स वेक’ ही एक सर्वश्रेष्ठ कादंबरी आहे की जॉइसचा ‘अल्टिमेट प्रॅंक’ आहे याबद्दल अजूनही समीक्षकांमध्ये चर्चा होते आहे.

    २. इतकं लिहिलं म्हणजे याचा अर्थ ‘कादंबरी वाचाच’ असा नव्हे. हा इशारा देण्याचं कारण बरंच वजनदार आहे. जगातील सर्वात मोठ्या कादंबऱ्यांमध्ये सुटेबल बॉयचा समावेश होतो. दीडदोनशे पानांचं पुस्तक किंवा दोन-एक तासांचा चित्रपट ‘खुशाल वाचा किंवा बघा’ म्हणायला काही वाटत नाही. सव्वा किलो वजनाची, १४७४ पानं वाचा असं म्हणायला जीभ अडखळते. रोज पन्नास पानं वाचलीत तर एक महिना लागेल, रोज दहा वाचलीत तर पाच महिने. इतका वेळ द्यायचा किंवा नाही हे ज्याचं त्यानं ठरवावं. म्हणूनच आभार मानताना विक्रम वाचकांना उद्देशून म्हणतो, “Buy me before good sense insists, You’ll strain your purse and sprain your wrists. “