Author: Raj

  • कलेचा प्रवास आणि मूल्यमापन

    नुकताच टाइम मासिकातील एक लेख वाचनात आला. ‘द ग्रेट गॅट्सबी’ ही एफ. स्कॉट फिट्झजेराल्ड याची कादंबरी विसाव्या शतकातील एक महत्वाची कलाकृती मानली जाते. मुराकामीसारख्या लेखकाने ‘माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे पुस्तक’ या शब्दात हिचा गौरव केला आहे. अनेक अभ्यासक्रमांना हे पुस्तक लावून विद्यार्थांचे शिव्याशापही घेतले गेले आहेत. पण गुडरीड्स या सायटीवर तब्बल २९,००० लोकांनी या कादंबरीला…

    नुकताच टाइम मासिकातील एक लेख वाचनात आला. ‘द ग्रेट गॅट्सबी’ ही एफ. स्कॉट फिट्झजेराल्ड याची कादंबरी विसाव्या शतकातील एक महत्वाची कलाकृती मानली जाते. मुराकामीसारख्या लेखकाने ‘माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे पुस्तक’ या शब्दात हिचा गौरव केला आहे. अनेक अभ्यासक्रमांना हे पुस्तक लावून विद्यार्थांचे शिव्याशापही घेतले गेले आहेत. पण गुडरीड्स या सायटीवर तब्बल २९,००० लोकांनी या कादंबरीला भिकार, टुकार, कंटाळवाणी अशी शेलकी विशेषणे देऊन आपली नावड व्यक्त केली. एकीने पुस्तक कचर्‍याच्या पेटीत टाकून त्याचा फोटो प्रतिक्रिया म्हणून लावला. तसं बघायला गेलं तर यात फारसं आश्चर्यकारक नाही. कोणत्याही कलाकृतीला श्रेष्ठ म्हणणारे जितके असतात तितकेच तिला नाकारणारेही असतात. मात्र या नेहेमी घडणार्‍या घटनेतून काही रोचक प्रश्न समोर येतात.

    कलेचा उगम माणसाच्या नैसर्गिक प्रेरणांमधून झाला असावा. फ्रान्सच्या शोवे इथल्या गुहांच्या भिंतींवरची अंदाजे ३०,००० वर्षे जुनी चित्रे माणसाच्या कलेचा पहिला पुरावा मानली जातात. (नुकतीच स्पेनमध्ये सापडलेल्या निएंडरथाल माणसाने काढलेली चित्रे कदाचित याहूनही जुनी म्हणजे ४२,००० वर्षांपूर्वीची असू शकतील. ) नंतर माणूस जगाच्या निरनिराळ्या भागांमध्ये गेला. भाषा, हवामान, राहणीमान अशा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे आज आपल्याला दिसणार्‍या नानाविध संस्कृती. गेल्या ३०,००० वर्षांमध्ये बरंच पाणी वाहून गेलंय, पाण्यावरचे पूलही बदललेत.

    विसाव्या शतकातील कलाक्षेत्राकडे नजर टाकल्यास संस्कृतीच्या अनधिकृत राजधान्या सहज दिसून येतात. पॅरिस, न्यूयॉर्क, लंडन यासारख्या शहरांमधून जी मासिके निघतात, इथे जी प्रदर्शने भरतात, इथे जे महोत्सव होतात त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली असते. या शहरांमध्ये एक विलक्षण साम्य आहे. ही सर्व शहरे गेल्या काही शतकात ज्या महासत्ता बलाढ्य होत्या त्या देशांमध्ये आहेत. हा योगायोग आहे का? नक्कीच नाही. जेते केवळ संपत्ती, सत्ता हिरावून घेत नाहीत, गुलामांची संस्कृतीही इथे पणाला लागलेली असते. आशिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंडातील लोक गेल्या काही शतकात स्वत:चे अस्तित्व टिकवण्यात गर्क होते, आज मरू की उद्या अशी परिस्थिती असताना कलेकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला होता?

    अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांना स्वातंत्र्य त्या मानाने लवकर मिळाले. पण इथे एक महत्वाचा फरक असा की ज्यांना स्वातंत्र्य मिळाले ते या खंडाचे मूळ रहिवासी नव्हते. सुरूवातीला आलेल्या युरोपियन वसाहतींचे हे वंशज होते. त्यांनी नंतर आलेल्या आपल्याच बांधवांविरूद्ध युद्ध पुकारून स्वातंत्र्य मिळवले. पण मूळचे अमेरिकन इंडियन जे या खंडावर कित्येक हजार वर्षांपासून रहात होते त्यांच्या परिस्थितीत ‘आजा मेला नातू झाला अन खुंटाला खुंट कायम झाला’ या न्यायाने फारसा फरक पडला नाही. (त्यातही युरोपियन वसाहती झाल्यानंतर कित्येक लाख अमेरिकन इंडियन बाहेरून आलेले नवीन रोग, युद्धे किंवा अमानुष हत्याकांड यांना बळी पडले. ) तीच गत आफ्रिकेतून आणलेल्या गुलामांची. जिम क्रोच्या कृपेने यांना खरे स्वातंत्र्य मिळायला विसावे शतक उजाडावे लागले.

    अमेरिका आणि युरोपचे नाते लव्ह-हेट रिलेशनशिप आहे. औद्योगिक क्रांतीनंतर सुबत्ता आल्यावर सांस्कृतिक वारसा मिळवण्यासाठी युरोपशिवाय पर्याय नव्हता. युरोपमध्ये उगम पावलेल्या अनेक चळवळी अमेरिकेत लोकप्रिय झाल्या. पण त्याचबरोबर इतर क्षेत्रांमध्ये वर्चस्व मिळत असताना कलेच्या क्षेत्रातही आम्ही मोठे हे दाखवायचे होते. इन-मिन पाच-सहा लेखकांच्या कामाला ‘अमेरिकन रेनेसान्स‘ असे नाव देणे हा या वृत्तीचा एक केविलवाणा परिणाम. हे म्हणजे रितेश देशमुखच्या लग्नाची पार्टी आणि बेजिंग ऑलिंपिक उद्घाटन सोहळा यांची तुलना करण्यासारखे आहे. ( इथे या लेखकांना कमी लेखण्याचा हेतू नाही. मेलव्हिल, थोरो, इमर्सन, एमिली डिकीन्सन प्रतिभावंत होते यात वादच नाही. पण रेनेसान्स या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. ) अमेरिकेत अधिकृत भाषा इंग्रजी असल्याने इतर संस्कृतींच्या अभिव्यक्तींना मुळातच मर्यादा पडतात. ( भारतात प्रत्येक राज्याची स्वत:ची वेगळी सांस्कृतिक ओळख होण्यामध्ये भाषावार प्रांतरचनेचा महत्वाचा वाटा आहे. ) आजही अमेरिकन इंडियन लोकांच्या कलाप्रकारांना दुर्मिळ कला जतन करण्यापलिकडे महत्व नाही.

    बाकीच्या खंडांमधील परिस्थिती निराळी होती कारण इथे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्य मूळच्या स्थानिक रहिवाश्यांकडे गेले, जेत्यांच्या पिढ्या (सुदैवाने) मागे थांबल्या नाहीत. हळूहळू इथून उगम पावलेले लेखक जागतिक स्तरावर येऊ लागले. अमिताभ घोष एका मुलाखतीत म्हणाले होते, “मी इंग्रजीत लिहायला लागलो तेव्हा इतर पाश्चात्य लेखक आणि समीक्षक यांची मुख्य भावना आश्चर्याची होती. भारतासारख्या देशातला एक लेखक निर्दोष इंग्रजीत लिहीतो आहे हे म्हणजे एखादा कुत्रा गातो आहे असे होते. आता परिस्थिती बरीच सुधारली आहे.” विक्रम सेठ, सलमान रश्दी, नायपॉल यासारख्या लेखकांनी भारतीय कथेला जागतिक स्तरावर नेण्यात यश मिळवले आहे. नायपॉल यांनी इंग्रजी साहित्याची नेहेमीचीच यशस्वी वाट चोखाळण्याचे साफ नाकारले. वसाहतवादाच्या परिपाकामध्ये स्वत:चा शोध घेताना डिकन्सपासून जेन ऑस्टीनपर्यंत सर्व ब्रिटीश लेखक त्यांना परके वाटले. ( ‘द ग्रेट गॅट्सबी’ इतक्या लोकांना आवडले नाही त्यामागे असेच कारण असावे असे वाटते. सध्याच्या जगाशी संबंध लावण्यासारखे त्यांना त्यात काही सापडले नसावे. आणि जर असे असेल तर व्याख्येनुसार ते अभिजात साहित्य ठरू शकत नाही.)

    इथे एक महत्वाचा मुद्दा येतो. गेल्या शतकातील जेत्यांच्या देशातील कालमानस (zeitgeist ) आणि बाकीच्या जगातील कालमानस यामध्ये मूलभूत फरक आहेत. संस्कृती, राहणीमान यांच्या अनुषंगाने युरोप आणि अमेरिका येथील कलाप्रकारांचा प्रवास काही विशिष्ट दिशांनी झाला. पण बाकीच्या जगात तसे झाले नाही. बरेचदा राहणीमानाचा दर्जा चांगला नसल्याने कलांकडे दुर्लक्ष झाले. अर्थात पाश्चात्य कलांचे पडसाद उमटलेच नाहीत असे नाही. मग प्रश्न येतो की या राहीलेल्या जगातील कलाकृतींना पाश्चात्य कलाकृतींचे मापदंड लावून त्यांचे मूल्यमापन करणे कितपत योग्य आहे? कला आणि शास्त्र यातील एक मुख्य फरक म्हणजे शास्त्रामध्ये प्रगती एका निश्चित दिशेने होते. रामन इफेक्टचा शोध भारतात लागला तेव्हा भारत गुलामगिरीत होता की स्वतंत्र याने काही फरक पडत नाही. मात्र कलेचा प्रवास कोणत्याही दिशेने होऊ शकतो आणि या प्रवासावर सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा मोठा प्रभाव असतो. यातील कोणतीही दिशा बरोबर किंवा चूक नसते. असे असताना जागतिक साहित्य एका विशिष्ट दिशेनेच चालले आहे (आणि ती दिशा अर्थातच युरोप आणि अमेरिकेतील साहित्यिकांनी ठरवलेली आहे ) आणि आपणही तीच दिशा पकडली पाहिजे असे म्हणण्याला फारसा अर्थ नाही. ( एखाद्या कलाकाराला ती वाट चोखाळावी वाटली तर अर्थातच ते स्वातंत्र्य आहेच. सत्यजित रे यांच्या शैलीवर रन्वारसारख्या फ्रेंच दिग्दर्शकांचा मोठा प्रभाव होता. ) किंबहुना सध्या प्रचलित असलेले मापदंड हेच अंतिम आहेत असे मानायलाही काही आधार नाही. दुर्दैवाने जागतिक स्तरावर पारितोषिके निवडताना बरेचदा याच अलिखित नियमानुसार व्यवहार चालतात हे सत्य आहे. शैक्षणिक भाषेत या प्रकाराला hegemony असे नाव आहे.

    युरोपियन सांस्कृतिक वर्चस्वाचे पडसाद काही वेळा जेत्यांचे राज्य नसणार्‍या देशांमध्येही झाले. टर्कीच्या इतिहासात त्या देशावर एकदाही पारतंत्र्याची वेळ आली नाही. तरीही कायम युरोपच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि युरोपियन समाजात आपल्याला स्थान मिळावे अशी महत्वाकांक्षा बाळगणारे टर्कीचे विचारवंत आणि कलाकार मानसिकरीत्या नेहेमीच युरोपच्या गुलामगिरीतच राहीले. (हीच अवस्था दस्तोयेव्ह्स्कीच्या काळात रशियामधील विचारवंतांची होती. ) ओरहान पामुकने याबद्दल बरेच लिहीले आहे. या वृत्तीचे एक उदाहरण म्हणजे सोळाव्या शतकात टर्कीमध्ये बलाढ्य ओटोमान साम्राज्याच्या राजवटीत ‘मिनिएचर पेंटींग’ हा चित्रकलेचा एक अनोखा प्रकार लोकप्रिय होता. नंतर युरोपमध्ये ‘इंप्रेशनिझ्म’चे वारे वाहू लागले आणि त्या लाटेचा परिणाम म्हणून मिनिएचर पेंटींग ही कला लयाला गेली. या कलेचा लोप पामुकच्या गाजलेल्या ‘माय नेम इज रेड’ या पुस्तकाचा गाभा आहे.

    या वर्चस्वाचा आणखी एक परिणाम म्हणजे जागतिक स्तरावर बहुतेक करून जेत्या देशांमधील कलाकारांनाच स्थान मिळत राहीले. गालिबसारख्या अलौकिक प्रतिभाशाली कवीला वर्डस्वथ, शेले यांच्या रांगेत स्थान मिळायला हवे, पण आज जागतिक पातळीवर मूठभर संशोधक सोडले तर त्याचे नावही कुणाला माहित नाही. चीनसारख्या पाच हजार वर्षांचा सांस्कृतिक वारसा सांगणार्‍या देशात अनेक प्रतिभावंत कलाकार होऊन गेले. चीनबाहेर त्यांची दखल कोण घेणार? (विक्रम सेठचे चिनी कवितांच्या अनुवादाचे पुस्तक ‘थ्री चायनीज पोएट्स’ वाचनीय आहे.) रेनेसान्सच्या काळात युरोपमध्ये प्रतिभेचा महापूर आला हे खरे पण इतर जगात प्रतिभावंत झालेच नाहीत असेही नाही.

    कलेच्या इतिहासाबाबत आढळणारा एक रोचक मुद्दा म्हणजे साधारणपणे ज्या देशाची आर्थिक परिस्थिती चांगली असते तिथली संस्कृती अधिकाधिक लोकप्रिय होताना दिसते. (जय हो!) शीतयुद्ध चालू असताना सीआयएने रशियाविरूद्ध वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने मॉडर्न आर्टला एक शस्त्र म्हणून वापरले. मॉडर्न आर्टला मान्यता मिळण्यात पडद्यामागे सीआयएच्या मदतीचा मोठा वाटा होता. टॉम क्रूझपासून ऑपरापर्यंत हॉलीवूडचे स्टार लोक मुंबईच्या उकाड्यात हसतमुखाने येत आहेत. याला कारण बॉलीवूडची गुणवत्ता अचानक हजारपट वाढली आहे असे आहे का? अजिबात नाही. गुणवत्ता इराणच्या कितीतरी चित्रपटांमध्येही ठासून भरलेली असते, तिथे का बरं कुणी जात नाही? द होल थिंग इज दॅट के भय्या सबसे बडा रूपय्या.

    भारतात परिस्थिती बदलते आहे. पण उण्यापुर्‍या पन्नास वर्षांमध्ये क्रांतिकारक बदल होणे अवघड आहे. आपल्या देशाचे दुर्दैव हे की आपला प्रवास पाश्चात्य देशांच्या उलट – सुवर्णकालाकडून अंधारयुगाकडे झाला. अठराव्या शतकामध्ये जागतिक व्यापारात ५० % वाटा भारत आणि चीन यांचा होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही टक्केवारी २ % वर आली होती. एकविसाव्या शतकात कदाचित ज्याला ‘पोएटीक जस्टीस’ म्हणता येईल अशी परिस्थिती येऊ घातली आहे. युरोपची गंगाजळी धोक्यात आहे. अमेरिकेने स्वत:च्या जळत्या घराकडे दुर्लक्ष करून नेहेमीप्रमाणे इतर देशांमध्ये नाक खुपसणे चालू ठेवले, पण या वेळी ते अंगाशी आले आहे. याउलट भारत, चीन, ब्राझील यांची परिस्थिती आधीपेक्षा बरीच सुधारली आहे. अशा परिस्थितीमध्ये कलाक्षेत्रावर याचे पडसाद न उमटणे अशक्य आहे. शिवाय आताचे जग रेनेसान्स किंवा एनलायटनमेंट पेक्षा फारच वेगळे आहे. आंतरजालामुळे सामान्य लोकांच्या मताकडे दुर्लक्ष करणे कठीण होऊ लागले आहे.

    एकविसाव्या शतकात हा प्रवास कसा होईल हे बघणे रोचक ठरावे.

    —-

    तळटीप
    १. बरेचदा युरोपातील मान्यवर कलाकारांनी इतर संस्कृतींमधील कल्पना वापरल्या. पिकासोच्या कलाकृतींमध्ये आफ्रिकन कलेचा बराच प्रभाव होता. पण ज्या कलाकारांपासून त्याला ही प्रेरणा मिळाली ते अंधारातच राहिले. हा विरोधाभास दाखवणारी आफ्रिकन चित्रकार शेरी सांबा याची चित्रमालिका बोलकी आहे. पहिल्या चित्रात पिकासो आणि आफ्रिकन चित्रकार दाखवले आहेत. दुसर्‍या चित्रात ते चित्रे घेऊन प्रदर्शनाला जात आहेत. तिसर्‍या चित्रात पिकासो नाही, मात्र आफ्रिकन चित्रकार गर्दीमध्ये हरवला आहे. त्याचे चित्र अजूनही त्याच्याजवळच आहे, त्याला प्रदर्शनात जागा मिळालेली नाही.
    चित्रमालिकेचे शीर्षक आहे – Quel avenir pour notre art? – आमच्या कलेचे भविष्य काय?

    गेल्या काही दशकांमध्ये आफ्रिका, आशिया येथील चित्रकारांना संधी देण्याचे विशेष प्रयत्न झाले आहेत.

  • गुण गाईन आवडी

    लेख खरंतर उशिरा येतो आहे. डॉ. सी. एन. आर. राव यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली तेव्हा यायला हवा होता पण तेव्हा नेहमीप्रमाणे आपल्या मिडियामध्ये जयजयकाराच्या घोषणा दुमदुमत होत्या. मागच्या लेखामध्ये आलेला एक धागा याही लेखात आहे – व्यक्तिपूजा आणि निरपेक्ष मूल्यमापन. साधारणपणे राजकारणी, खेळाडू, कलाकार यांच्या कारकीर्दीचं वेळोवेळी मूल्यमापन होत असतं. गांधी-नेहरू यांनी…

    लेख खरंतर उशिरा येतो आहे. डॉ. सी. एन. आर. राव यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली तेव्हा यायला हवा होता पण तेव्हा नेहमीप्रमाणे आपल्या मिडियामध्ये जयजयकाराच्या घोषणा दुमदुमत होत्या. मागच्या लेखामध्ये आलेला एक धागा याही लेखात आहे – व्यक्तिपूजा आणि निरपेक्ष मूल्यमापन. साधारणपणे राजकारणी, खेळाडू, कलाकार यांच्या कारकीर्दीचं वेळोवेळी मूल्यमापन होत असतं. गांधी-नेहरू यांनी कोणत्या चुका केल्या, सचिनच्या पुलशॉटपासून त्याने निवृत्त व्हावं की नाही याच्या चर्चा, सिनेमाची समीक्षा तर नेहमी होतच असते. यात काही गैर नाही उलट प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला याला सामोरं जावंच लागतं. पण या अग्निपरीक्षेतून एक वर्ग अलगदपणे सुटला आहे आणि ते कुणाच्या फारसं लक्षातही आलेलं दिसत नाही. वर्तमानपत्रात वेळोवेळी झळकणाऱ्या ‘जगप्रसिद्ध’ शास्त्रज्ञांची यातून सुटका झाली आहे. यामागे अर्थातच वेगवेगळी कारणे आहेत. एकतर शास्त्रज्ञ म्हणजे कुणीतरी ‘लार्जर दॅन लाईफ’, विसराळू, प्रयोगशाळेत तासनतास काम करणारा प्राणी अशी जनमानसात (यात संपादकही येतात) प्रतिमा असते. त्यामुळे शास्त्रज्ञांनी कोणतंही विधान केलं तर ते तपासून न बघता हेडलायनीत टाकायचं हा शिरस्ता असतो. दुसरं म्हणजे शास्त्रज्ञाच्या कारकीर्दीचं मूल्यमापन करण्यासाठी संशोधन नेमकं कसं चालतं याची किमान तोंडओळख असणं गरजेचं असतं. लोकांकडे इतका वेळ किंवा इच्छा नसते त्यामुळे जगप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञाने कुठलातरी शोध लावला अशी बातमी वाचली की संपादक, वाचक सगळे खूश होतात आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातात. शोध नेमका काय आहे, जागतिक पातळीवर त्याचं स्थान काय या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं.

    लेख लिहिण्याचं कारण म्हणजे नुकतंच डॉ. राव यांनी आयआयटी मद्रास येथे बोलताना काही विधानं केली. कलाकार, लेखक यांची विधाने तर्कसंगत नसतील तर समजू शकतो, शास्त्रज्ञांचं सगळं आयुष्य मोजून-मापून विधाने करण्यात गेलेलं असतं. त्यामुळे शास्त्रज्ञांकडून भोंगळ विधाने आली तर आश्चर्य वाटतं. डॉ. राव यांचा पहिला मुद्दा होता की शास्त्रज्ञांनी ‘सेफ’ विषयात काम करू नये, त्याऐवजी जास्त संशोधन न झालेल्या वाटा चोखाळाव्यात. “In research, we must not want to do safe work.” सल्ला उत्तम आहे पण खुद्द डॉ. राव यांच्या कारकीर्दीकडे पाहिलं तर काय दिसतं? डॉ. राव यांच्या संशोधनामध्ये विशेष प्रसिद्धी मिळाली असं संशोधन ‘हाय टेंपरेचर सुपरकंडक्टिव्हिटी’ आणि ‘नॅनोटेक्नॉलोजी’ या दोन विषयात होतं. हे दोन्ही विषय त्या-त्या काळात सर्वात लोकप्रिय होते. विज्ञानात तत्कालीन लोकप्रिय विषयात संशोधन करण्याचा फायदा हा की संशोधनासाठी निधी चटकन मिळू शकतो. हे अर्थातच डॉ. राव यांनाही चांगलंच ठाऊक असणार. मुद्दा हा की डॉ. राव यांनी अनवट वाटा चोखाळून किती संशोधन केलं? मी रसायनशास्त्रज्ञ नाही त्यामुळे या मुद्द्यावर इतर मते जाणून घ्यायला आवडेल.

    पुढचा मुद्दा. हा तर सिक्सरच आहे. शास्त्रज्ञांनी निधी किंवा नोकरी यांच्याकडे लक्ष न देता निरलसपणे काम करावं. “He emphasized the importance of working without seeking benefits, money and grants, calling to mind exemplary scientists such as Newton and Faraday.” इतकं विनोदी वाक्य बरेच दिवसात ऐकलं नव्हतं. आणि जर असं असेल तर खुद्द डॉ. राव यांनी हा सल्ला अमलात का आणला नाही? सी. व्ही. रामन यांनी एक स्पेक्ट्रोमीटर घेऊन जे जागतिक दर्जाचं संशोधन केलं तसं डॉ. राव यांनी का केलं नाही? त्यांना प्रचंड निधी, अनेक सहकारी, पोस्टडॉक्स, विद्यार्थी यांची गरज का पडावी? आजपर्यंत डॉ. राव यांनी संशोधनासाठी जो निधी मिळवला तो करदात्यांच्या पैशातून आला होता. बंगलोरमध्ये डॉ. राव यांनी ‘जवाहरलाल नेहरु इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. त्यासाठीही सरकारकडून निधी मिळाला होता. मग इतरांनी हे करू नये असा सल्ला ते कसा देऊ शकतात? प्रयोगशाळा, संगणक इ. न वापरता आजच्या काळात न्यूटनसारखं संशोधन शक्य आहे का? आणि पैशाचा मोह न बाळगता संशोधन करायचं तर शास्त्रज्ञ आणि त्याच्या कुटुंबीयांनी खायचं काय? नोबेलविषयी बोलताना डॉ. राव म्हणाले, “If you want to get a Nobel prize, you must live very long, as long as you can,” म्हणजे काय? दीर्घायुष्य = नोबेल हे समीकरण कोणत्या तर्कात बसतं? उलट बहुसंख्य शास्त्रज्ञांनी त्यांच्या तरुणपणी केलेल्या कामाबद्दल त्यांना नोबेल मिळालं आहे. नोबेलसाठी जे गुण आवश्यक असतात त्याचा डॉ. राव यांनी उल्लेखही करू नये याचं आश्चर्य वाटतं.

    वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या संशोधनाच्या बातम्या आणि प्रत्यक्षात चालणारं संशोधन यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. डॉ. राव यांनी १५०० हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केले याचा उल्लेख प्रत्येक बातमीत आला होता. अधिकाधिक निबंध = सर्वोत्तम संशोधन हा निकष बहुतेक वेळा फसवा असतो. याचं एक उत्तम उदाहरण फ्रेडरिक सॅंगर याचं आहे. (जॉन बार्डीनही चालू शकेल.) बायोकेमिस्ट्रीमध्ये संशोधन करणाऱ्या सॅंजरने आयुष्यभरात राव यांच्या तुलनेत फारच कमी निबंध प्रकाशित केले पण या संशोधनातून त्याला दोन वेळा नोबेल पारितोषिक देण्यात आलं. संशोधनामध्ये सध्याचं स्पर्धात्मक युग बघता ‘पब्लिश ऑर पेरिश’ याला तरणोपाय नाही. पण केवळ संख्येवर लक्ष केंद्रित केलं तर गुणवत्ता खालावते हे कटू सत्य आहे.

    डॉ. राव यांचा गौरव करताना सगळीकडे त्यांना ‘फादर ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी इन इंडिया’ असं संबोधित करण्यात येत होतं. यात एक ग्यानबाची मेख आहे आणि ती फक्त या विषयातील शास्त्रज्ञांनाच कळू शकेल. नॅनो तंत्रज्ञान म्हणजे काय? आपल्याला डोळ्यांनी जी लहानात लहान वस्तू बघता येते तिचा आकार सुमारे ५० मायक्रॉन असतो. १ मायक्रॉन म्हणजे एका मीटरचे दहा लाख भाग केले तर त्यातील एका भागाची लांबी. आपल्या केसाची जाडी साधारण ५० ते २०० मायक्रॉन असते. एक मीटर लांबीचे शंभर कोटी भाग केले तर त्यातील एका भागाच्या लांबीला एक नॅनोमीटर असं म्हणतात. या नॅनो पातळीवरचं जग आपल्या नेहमीच्या जगापेक्षा बरंच वेगळं असतं. ‘ऍलिस इन वंडरलॅंड’मध्ये फिरताना ऍलिस जशी पावलोपावली आश्चर्यचकित होते तसंच या नॅनोजगतात फिरताना आपणही भांबावून जातो. तिथे जायचं झालं तर तिथली सृष्टी, तिथले नियम यांची ओळख करून घ्यावी लागते. आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने या अतिसूक्ष्म जगाचं नुसतं निरीक्षणच नाही तर त्या जगात मनसोक्त विहार करता येणंही आता शक्य झाले आहे. यासाठी जे तंत्रज्ञान आणि ज्या संकल्पना वापरल्या जातात त्यांना एकत्रितपणे ‘नॅनोटेक्नॉलॉजी’ असं नाव दिलं गेलं आहे. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र, नवीन औषधांची निर्मिती अशा अनेक क्षेत्रांमध्ये या नॅनो तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आहे. डॉ. राव रसायनशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी नॅनोपार्टीकल्स या विषयात बरंच संशोधन केलं आहे. पण नॅनोपार्टीकल्स हा नॅनोतंत्रज्ञानाचा एक भाग आहे. नॅनो तंत्रज्ञानामध्ये नेहमी वापरला जाणारा एक महत्त्वाचा घटक ‘स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप’ आपल्या पुणे विद्यापीठात तयार करण्यात आला. नॅनोतंत्रज्ञानामध्ये ज्या अनेक शाखा येतात आणि ज्यावर भारतातील अनेक शास्त्रज्ञ काम करत आहेत त्यांच्याशी डॉ. राव यांचा दूरान्वयानेही संबंध नाही. अशा परिस्थितीत डॉ. राव यांना ‘फादर ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी इन इंडिया’ म्हणून संबोधित करणे फक्त अतिशयोक्तीच नव्हे तर साफ चूक आहे. डॉ. राव यांच्या विकीवरील पानात नॅनोटेक्नॉलॉजी हा शब्दही सापडत नाही.

    डॉ. राव यांनी नेहमीच भारतीय राजकारण्यांची विज्ञानाबद्दलची उदासीनता आणि भारतातील विज्ञानाची खालावलेली पातळी यावर प्रखर टीका केली आहे. टीका योग्य आहेच पण इथेही एक तळटीप आहे. डॉ. राव यांनी आजपर्यंत अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहे. यापैकी एक म्हणजे पंतप्रधानांना वैज्ञानिक सल्ला देणाऱ्या समितीचं अध्यक्षपद. इंदिरा गांधी, राजीव गांधी, देवेगौडा, गुजराल आणि मनमोहन सिंग या सर्वांच्या कार्यकालात डॉ. राव यांच्याकडे हे पद होतं. दर वर्षी बजेटमध्ये कुठल्या संशोधनाला किती निधी द्यायचा, देशाचं वैज्ञानिक धोरण ठरवायचं यासारख्या कामांमध्ये डॉ. राव यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. (ते एकटेच नव्हे, त्यांच्याबरोबर काम करणारे समितीमधील सर्व शास्त्रज्ञ.) याखेरीज देशाचं वैज्ञानिक भवितव्य ठरविणाऱ्या असंख्य कमिट्यांवर डॉ. राव यांनी काम पाहिले आहे. याचा अर्थ काय होतो? आज भारतीय विज्ञानाची जी परिस्थिती आहे त्याला काही अंशी तरी डॉ. राव जबाबदार आहेत. गेल्या पन्नास वर्षात भारतीय विज्ञानाची जी परिस्थिती झाली आहे त्याला कोण जबाबदार आहे? फक्त राजकारण्यांवर सगळा दोष ढकलणे कितपत योग्य आहे?

    संशोधन मुख्यत्वे दोन ठिकाणी चालत असतं. संशोधन संस्था आणि विद्यापीठं. संशोधनासाठी कुणाला किती निधी द्यायचा हे डॉ. राव ज्या कमिट्यांवर असतात त्या कमिट्या ठरवितात. यात बहुतेक वेळा विद्यापीठांना सावत्र वागणूक मिळते. विद्यापीठात संशोधन करण्यासाठी निधी मिळवणे किती दुरापास्त असतं हे तिथल्या प्राध्यापकांना चांगलंच ठाऊक असतं. संशोधनातील हे नाजूक कंगोरे कधीच समोर येत नाहीत पण त्या-त्या वर्तुळांमध्ये हे सुपरिचित असतं. भारतातील विद्यापीठांमध्ये आणि संस्थांमध्ये कमीत कमी निधीमध्ये, अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करत उत्तम संशोधन चालतं पण दुर्दैवाने याला मिळायला हवी तेवढी प्रसिद्धी कधीच मिळत नाही.

    “With great power comes great responsibility.” देशाच्या विज्ञानाचं भवितव्यं अनेक वर्षे हातात असताना या जबाबदारीचा नेमका कसा वापर केला गेला याचं शक्य तितक्या निष्पक्षपणे मूल्यमापन होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सध्याची ‘गुण गाईन आवडी’ संस्कृती बघता हे शक्य नाही हे ही तितकंच खरं आहे. कदाचित आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर एकही नोबेल का नाही याचं एक कारण या दृष्टिकोनामध्ये दडलं असावं.

  • क्लॅप्टन इज गॉड

    एरिक क्लॅप्टनचा जन्म इंग्लंडमधल्या रिपली नावाच्या एका लहानशा खेड्यात झाला. लहानपणीच त्याला आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे जाणवलं. तो खोलीत आला की सगळे लोक क्षणभर स्तब्ध व्हायचे. त्याच्याबद्दल नातेवाइकांमध्ये कुजबूज चालू असायची. शेवटी त्याला कळलं की ज्यांना तो आई आणि बाबा म्हणतो ते त्याचे आजी-आजोबा आहेत. त्याची सख्खी आई त्यांची मुलगी. युद्धादरम्यान एका सैनिकाबरोबर झालेल्या…

    एरिक क्लॅप्टनचा जन्म इंग्लंडमधल्या रिपली नावाच्या एका लहानशा खेड्यात झाला. लहानपणीच त्याला आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे जाणवलं. तो खोलीत आला की सगळे लोक क्षणभर स्तब्ध व्हायचे. त्याच्याबद्दल नातेवाइकांमध्ये कुजबूज चालू असायची. शेवटी त्याला कळलं की ज्यांना तो आई आणि बाबा म्हणतो ते त्याचे आजी-आजोबा आहेत. त्याची सख्खी आई त्यांची मुलगी. युद्धादरम्यान एका सैनिकाबरोबर झालेल्या प्रेमप्रकरणातून एरिकचा जन्म झाला. त्या काळी इंग्लंडमध्ये अनौरस संतती निषिद्ध मानली जात असे म्हणून त्याच्या आईने त्याला गुपचूप आजी-आजोबांकडे सोपवलं आणि ती निघून गेली. या धक्क्यातून एरिक कधीच सावरला नाही. याचा अर्थ त्याचं बालपण डिकन्सच्या कादंबरीसारखं खडतरच होतं असा नाही. आजी-आजोबांनी त्याच्यावर भरपूर प्रेम केलं. लहानपणीच त्याला संगीताची गोडी लागली. आधी रेडिओ आणि नंतर ग्रामोफोन. मग आजी-आजोबांच्या मागे लागून त्याने एक गिटार विकत घेतली. आवडलेलं गाणं अनेकदा ऐकायचं, मग ते गिटारवर वाजवण्याचा प्रयत्न करायचा. मनासारखं झालं की छोट्याश्या टेपवर ते रेकॉर्ड करायचं आणि मूळ गाणं आणि त्याचं गाणं यांची तुलना करायची. गाणं मनासारखं वाजवता येईपर्यंत एरिकची तपश्चर्या चालू राहायची. एकदा गिटारची एक तार तुटली, नवी घ्यायला पैसे नव्हते मग त्याने पाच तारा वापरून सराव चालू ठेवला. एकलव्याने द्रोणाचार्यांना गुरू मानून साधना केली होती, त्या काळातील जॅझ आणि ब्लूज संगीतकार यांना एरिकने गुरू मानलं. एरिकने कोणत्याही शिक्षकाडून संगीताचे धडे घेतल्याची नोंद नाही. असं दुसरं चटकन आठवणारं उदाहरण किशोरकुमारचं. रोलिंग स्टोन्स मासिकाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या सर्वोत्कृष्ट गिटार वादकांच्या यादीत एरिकचा क्रमांक दुसरा किंवा तिसरा असतो. (पहिला अर्थातच जिमी हेंड्रिक्स.)

    अभ्यासाकडे एरिकचं फारसं लक्ष नसायचं, अपवाद इंग्रजी भाषा आणि साहित्य. हे दोन्ही विषय त्याला आवडायचे. ब्रिटिश लोकांच्या छापील शब्दावरच्या प्रेमाशी हे सुसंगतच आहे. याखेरीज सिनेमाचीही त्याला आवड आहे. याचा परिणाम म्हणून एरिकच्या बोलण्यात डिकन्सपासून जपानी सिनेमा आणि ‘ब्लेड रनर’सारखे उल्लेख सहजपणे येतात. जवळच्या पबमध्ये गाणाऱ्या संगीतकारांना ऐकत-ऐकत स्वत: स्टेजवर जाऊन त्यांना साथ करणं त्याने सुरू केलं. हळूहळू लंडनच्या पबमध्ये कार्यक्रमांची आमंत्रणे यायला लागली. आधी ‘यार्डब्रेकर्स’ आणि नंतर ‘क्रीम’ या दोन ग्रूपमुळे ६० च्या दशकात एरिकला बरीच लोकप्रियता मिळाली. त्या दिवसात बीटल्सना जगाने डोक्यावर घेतलं होतं. ब्लूज संगीताशी नाळ असलेल्या एरिकला बीटल्सचं पॉप संगीत उथळ वाटायचं, आणि तरुणवर्गाने त्यांच्याप्रमाणे कपडे घालणं त्याला वेडपट वाटत असे. यथावकाश बीट्ल्सशी त्याचा बराच संबंध आला, त्यातही जॉर्ज हॅरिसनशी त्याची गाढ मैत्री झाली आणि ती शेवटपर्यंत टिकली. एकदा एका ग्रूपबरोबर असताना एक निग्रो खोलीत आला. मित्राने त्याची एरिकशी ओळख करून दिली. त्याचं नाव होतं जिमी हेंड्रिक्स. नंतर स्टेजवर जिमीला गिटार वाजवताना पाहून एरिकला आयुष्यात पहिल्यांदाच असुरक्षिततेची जाणीव झाली. याआधी त्याने असं काही पाहिलं नव्हतं. नंतर हेंड्रिक्स आणि त्याची चांगली मैत्री झाली. हे दोघे कोणत्याही क्लबमध्ये जाऊन प्रेक्षकात बसायचे. थोडा वेळ तिथलं संगीत ऐकल्यावर हे दोघे गिटार घेऊन स्टेजवर यायचे. क्लॅप्टन आणि जिमी हेंड्रिक्स एकत्र असल्यावर त्यांच्यासमोर वाजवू शकतील असे वादक अस्तित्वात नसावेत. त्या दुर्दैवी बॅंडचा कत्ल-ए-आम केल्यानंतर पुढचा क्लब.

    बहुतेक कलाकार कोणत्या न कोणत्या व्यसनाच्या आहारी गेलेले दिसतात. रोज दहा मैल धावून कादंबरी लिहिणारा मुराकामी एखादाच. आत्मचरित्र वाचत असताना आपण एरिकचा कबुलीजबाब ऐकत आहोत असं वाटायला लागतं. आपल्या चुका समोर ठेवताना तो कुठेही स्पष्टीकरण देत नाही. त्या काळच्या संगीतकारांमध्ये व्यसनाधीन असणं ही मामुली गोष्ट होती. अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे अनेक उत्तमोत्तम संगीतकार अकाली काळाच्या पडद्याआड गेले – एल्व्हिस प्रिसली, जिम मॉरिसन, जिमी हेंड्रिक्स. पुढची पंचवीस-तीस वर्षे एरिक वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी गेला होता. अनेकदा त्याला स्टेजवर आपण काय करत आहोत याचंही भान नसे. एकदा उभं राहणं शक्य नव्हतं म्हणून त्याने सगळा कार्यक्रम स्टेजवर पडून केला. बहुधा प्रेक्षकही त्याच्याइतकेच ‘टाइट’ असावेत कारण यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. दोनदा व्यसनमुक्ती केंद्रात गेल्यानंतर अखेर एरिक पूर्णपणे बरा झाला. आज त्याने उघडलेल्या संस्थेमुळे अनेक रुग्णांना फायदा होतो आहे.

    १९९१ साली मॅनहॅटनमध्ये एका बिल्डिंगमध्ये एरिकचा चार वर्षांचा मुलगा कॉनर लपंडाव खेळत होता. एका खोलीतील खिडकी साफसफाई चालू असल्याने उघडी होती. खिडकी छतापासून जमिनीपर्यंत होती आणि तिला कठडा नव्हता. कॉनर धावत धावत आला आणि सरळ खिडकीमधून ४९ मजले खाली पडला. यानंतर काही महिने एरिक बधिर झाला होता. त्याच्या निकटवर्तियांना तो परत व्यसनाच्या आहारी जातो की काय अशी भिती वाटत होती. सुदैवाने तसं झालं नाही. एरिकने संगीतामध्ये कॅथार्सिस शोधला. रोज तो गिटार घेऊन बसायचा आणि गाणी लिहायचा. ही गाणी लोकांसाठी नव्हती. नंतर एका चित्रपटाच्या निर्मातीने ‘टीअर्स इन हेवन’ गाणं ऐकलं आणि ते चित्रपटात घातलं. हे गाणं एरिकचं सर्वाधिक लोकप्रिय गाणं ठरलं आणि यासाठी त्याला तीन ग्रॅमी पारितोषिकं मिळाली.

    एरिकने कधीही व्यावसायिक गणितं मांडून कलेशी प्रतारणा केली नाही. ज्या ब्लूज संगीताने त्याला प्रेरणा दिली त्याच्याशी तो नेहमी प्रामाणिक राहिला. बी. बी. किंगसारख्या संगीतकारांबरोबर काम करून त्याने आपल्या परीने हे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. आजच्या संगीताविषयी तो म्हणतो, “The music scene as I look at it today is little different from when I was growing up. The percentages are roughly the same—95 percent rubbish, 5 percent pure.”

    सुरुवातीच्या चित्राविषयी. १९६५ च्या सुमारास इंग्लंडमध्ये एरिकची लोकप्रियता शिखरावर असताना इज्लिंग्टनमध्ये ‘Clapton is God’ असं लिहिलेली ग्राफिटी दिसू लागली. त्या काळात घेतलेलं हे चित्र आयकॉनिक ठरलं. तंगडी वर करणारा कुत्रा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरतो. एक अर्थ एमिली डिकिन्सन म्हणते तसा ‘Fame is a fickle food.’ एरिकच्या व्यसनाधीन होण्यामागे अचानक मिळालेली प्रसिद्धी हाताळता न येणं हे ही एक कारण होतं. “My fear of loss of identity was phenomenal. This could have been born out of the “Clapton is God” thing, which had put so much of my self-worth onto my musical career.” ही ग्राफिटी त्याच्या अध:पाताला कारणीभूत ठरली असं मानलं तर तो कुत्रा दैव किंवा नियतीचं प्रतीक आहे असं मानता येतं. याखेरीज ६० च्या दशकातील सर्व बंधने आणि प्रस्थापित कल्पनांना धक्का देणाऱ्या हिप्पी विचारसरणीची ही एक प्रकारे नांदी होती असंही म्हणता येतं.