Author: Raj

  • अणूंचा चित्रपट – अ बॉय ऍंड हिज ऍटम

    विज्ञानाची पार्श्वभूमी नसलेल्या लोकांचे संशोधनाबद्दल बरेच गैरसमज असतात. आईन्स्टाईनसारखे केस वाढलेले, विक्षिप्त स्वभाव आणि नेहमी विश्वाचा उगम कसा झाला यासारख्या गूढ आणि रहस्यमय प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंतलेले लोक म्हणजे वैज्ञानिक. यात एक गृहीतक दडलेलं आहे ते म्हणजे संशोधनाच्या विषयांबद्दल. कृष्णविवर, विश्वाचा आरंभ, बिग बॅंग, पॅरेलल युनिव्हर्स, स्ट्रिंग थिअरी किंवा नुकताच प्रसिद्धीला आलेला हिग्ज बोझॉन –…

    विज्ञानाची पार्श्वभूमी नसलेल्या लोकांचे संशोधनाबद्दल बरेच गैरसमज असतात. आईन्स्टाईनसारखे केस वाढलेले, विक्षिप्त स्वभाव आणि नेहमी विश्वाचा उगम कसा झाला यासारख्या गूढ आणि रहस्यमय प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंतलेले लोक म्हणजे वैज्ञानिक. यात एक गृहीतक दडलेलं आहे ते म्हणजे संशोधनाच्या विषयांबद्दल. कृष्णविवर, विश्वाचा आरंभ, बिग बॅंग, पॅरेलल युनिव्हर्स, स्ट्रिंग थिअरी किंवा नुकताच प्रसिद्धीला आलेला हिग्ज बोझॉन – यासारखे विषय सामान्य जनतेमध्ये बरेच लोकप्रिय असतात. किंबहुना पुणे-मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागातील शास्त्र शाखेतील बऱ्याच मुलांचे स्वप्न खगोलशास्त्रज्ञ व्हायचे असे असते. (यात एकेकाळी लेखकाचाही समावेश होता.) आणि यामागे त्या काळात सकाळच्या पुरवण्यांमध्ये येणाऱ्या लेखांचा बराच प्रभाव आहे असे वाटते. यात अर्थातच गैर काहीच नाही, उलट विज्ञानाची गोडी लागत असेल तर चांगलेच आहे. मुद्दा हा की विज्ञान म्हणजे फक्त हे ‘सायन्स फिक्शन’मध्ये नेहमी येणारे विषय नव्हेत, विज्ञानाच्या छत्रीखाली असंख्य शाखा आणि विषय येतात. त्यातले सर्व ‘कृष्णविवरात पडलं तर काय होईल?’ असे ‘ऑस्सम’ प्रश्न विचारत नसले तरी जाणून घेतलं तर बरेचदा रोचक माहिती मिळू शकते. मागच्या लेखात आलेलं ‘बटरफ्लाय इफेक्ट’चं उदाहरण ‘नॉन-लिनियर डायनॉमिक्स’ या शाखेखाली येतं. या शाखेतील परिणाम बरेचदा इतके विस्मयकारक असतात की शास्त्रज्ञांना या शाखेला विज्ञान म्हणून स्वीकारायला बराच वेळ लागला. किंवा ‘कंडेन्स्ड मॅटर फिजिक्स’ या वेगळ्या शाखेमध्ये ‘सुपरकंडक्टिव्हिटी’ किंवा बोस-आईन्स्टाईन कन्डेन्सेट सारखे अनेक रोचक गुणधर्म बघायला मिळतात. याखेरीज काही शाखा अशा आहेत की ज्यांच्या संशोधनावर या शतकाचं भवितव्य अवलंबून आहे, उदा. सौर उर्जा आणि इतर पर्यायी मार्गाने उर्जा मिळवण्यावर चाललेलं संशोधन.

    मिडियामध्ये विज्ञानाच्या सगळ्या शाखांना सारखी प्रसिद्धी मिळत नाही हे इतर शाखांमधील वैज्ञानिकांच्या लक्षात येऊ लागलं आहे. या दिशेने एक प्रयत्न म्हणून आयबीएमच्या शास्त्रज्ञांनी एक लघुचित्रपट तयार केला. फक्त चित्रपट केला असता तर फारसं काही आश्चर्यकारक नव्हतं. हा चित्रपट बनवण्यासाठी शास्त्रज्ञांनी चक्क अणू वापरले. अणूंच्या साहाय्याने चित्रे काढून त्याचा चित्रपट बनवण्यासाठी स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोपचा (एसटीएम) वापर करण्यात आला. एसटीएमबद्दल आधी एक लेख आला आहे. यात अत्यंत टोकदार अशा सुईमार्फत पृष्ठभागावर असणारे अणू किंवा रेणू हवे तसे नियंत्रित करणे शक्य होते. तांब्याच्या पृष्ठभागावर कार्बन मोनॉक्साइडचे १३० अणू ठेवण्यात आले. या अणूंच्या रचनेमधून एक चित्र तयार झाले. नंतर अणूंची स्थिती बदलून या चित्रात बदल केले गेले आणि त्यांची चित्रे घेऊन त्यापासून चित्रपट तयार करण्यात आला. यासाठी २४२ फ्रेम्स चित्रित करण्यात आल्या. तांब्याच्या पृष्ठभागाचे तपमान -२६८ C इतके होते कारण नेहमीच्या तपमानामध्ये अणू पृष्ठभागावर स्थिर राहणे अशक्य असते.

    आयबीएमसाठी पृष्ठभागावरील अणू हवे तसे नियंत्रित करणे नवीन नाही. एसटीएमचा शोध आयबीएममध्येच लागला आणि त्यासाठी १९८४ साली नोबेल पारितोषिकही देण्यात आले. मात्र एखादी कथा सांगणारा चित्रपट – मग भले ती कथा कितीही साधी असो – अणूंच्या मार्फत चित्रित करणे ही गोष्ट विस्मयकारक आहे आणि केवळ मनोरंजन हा यामागचा उद्देश नाही. अणूंवर हवे तसे नियंत्रण मिळवता येणे नवीन प्रकारचे ‘मेमरी डिव्हाइस’ बनविण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. याखेरीज या तंत्रज्ञानाचे अनेक उपयोग वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र अशा अनेक शाखांमध्ये वापरले जात आहेत.

  • विनोदाच्या शोधात

    विनोदी लेखकांना नेहमीच कमी दर्जाचं स्थान मिळालेलं आहे. दरबारात विदूषकाचं जे स्थान तेच साहित्यात विनोदी लेखकाचं. विनोद निर्माण करायला फारसे कष्ट पडत नाहीत असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. ज्या निष्काळजीपणे लोक विनोदनिर्मिती करतात त्यात हे दिसून येतं. इथे गैरसमज नको. रोज आपण बोलताना ज्या चकाट्या पिटतो त्या काळजीपूर्वक पिटाव्यात असं म्हणणं नाही. पण विनोदी चित्रपट,…

    विनोदी लेखकांना नेहमीच कमी दर्जाचं स्थान मिळालेलं आहे. दरबारात विदूषकाचं जे स्थान तेच साहित्यात विनोदी लेखकाचं. विनोद निर्माण करायला फारसे कष्ट पडत नाहीत असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. ज्या निष्काळजीपणे लोक विनोदनिर्मिती करतात त्यात हे दिसून येतं. इथे गैरसमज नको. रोज आपण बोलताना ज्या चकाट्या पिटतो त्या काळजीपूर्वक पिटाव्यात असं म्हणणं नाही. पण विनोदी चित्रपट, मालिका किंवा विनोदी लेख यात कोणत्याही प्रकारचा विनोद थोड्या तरी प्रमाणात असावा ही अपेक्षा गैर नाही. बरेचदा लेख वाचल्यानंतर ह्यात विनोद कुठे होता असा प्रश्न पडतो. पुलंच्या ‘गाळीव इतिहासातील’ कोणतंही पान उघडून वाचावं. उच्च पातळीचा विनोद कसा असावा, ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत प्रतिभावंत कवींवर किंचितही ओरखडा न येऊ देता त्यांचं विडंबन कसं करावं अशा अनेक गोष्टी यात ज्या सफाईने साधलेल्या आहेत त्याला तोड नाही. (“ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम वगैरे संतमंडळींचे महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहेत. त्यांनी लिहिले नसते आणि संत व्हायचे सोडून भलत्या नादाला लागले असते तर ‘ओल्ड मराठी’च्या पेपरचे वांधे झाले असते.” “नामदेव पंजाबात लोकप्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. अजूनही मराठी लेखकाला अन्य भाषेत लोकप्रियता मिळाली तरी तेच होते.”) पण हे सगळं करण्यासाठी प्रतिभा लागते हेच मान्य नसतं. विनोद काय, कुणीही, कधीही करू शकतं.

    पुलंवर भरपूर टीका झाली आणि होते आहे. पण त्यांचे टीकाकार एक गोष्ट लक्षात घेत नाहीत. त्यांना इतकी लोकप्रियता मिळण्यामागे मूलभूत कारण त्यांचा विनोद जातिवंत होता हे आहे. इथे लगेच आक्षेप येतो की आजच्या काळात त्यांचा विनोद शिळा झाला आहे. असा आक्षेप घेण्यामागे विनोदाच्या कार्यकारणभावाबद्दल अज्ञान दिसतं. कोणताही विनोद पहिल्यांदा ऐकताना जो परिणाम होतो तो परत ऐकताना होत नाही. विनोदाचं बलस्थान हे त्याच्यामध्ये जी अनपेक्षित कलाटणी असते तिच्यात असतं. ती कलाटणी एकदा कळली की विनोदाचं अर्धं आयुष्य संपतं. परत ऐकताना हसू येऊ शकतं पण कमी प्रमाणात येतं आणि तरीही लोक त्या विनोदाला ऐकत-वाचत राहिले तर त्यामागे दाद देण्याचा हेतू असतो. दुसरा मुद्दा – काही वेळा विनोद हा ‘ऑब्झरव्हेशनल कॉमेडी’ – आजूबाजूला जे दिसतं आहे त्यातील विसंगती शोधून त्यावर विनोद करणे – या प्रकारात येतो. जिम कॅरीपासून साइनफेल्डपर्यंत सर्व ‘स्टॅंड-अप’ कमेडियन्स या प्रकाराचा अवलंब करतात. पुलंच्या विनोदाचा काही भाग या प्रकारात मोडतो. साहजिकच या प्रकारच्या विनोदाला स्थल-कालाची बंधने असतात. त्या काळच्या पोस्ट खात्यावर केलेला विनोद आज जर ते पोस्ट खातं अस्तित्वातच नसेल तर कळायला कठीण जाणार. पण याचा अर्थ त्या विनोदाचा दर्जा कमी आहे असा होत नाही. आणि तरीही त्यात शाब्दिक कसरती, कोट्या वगैरेंची इतकी रेलचेल असते की त्या काळचं पोस्ट खातं बघितलं नसेल तरी आनंद लुटता यावा. पुलंचा इतर विनोद माणसांच्या स्वभावातील विसंगती (विसंगत्या?), भाषेच्या गमतीजमती यामुळे आनंद देऊन जातो.

    विनोदाची एक गंमत असते. विनोदाचं सोंग घेता येत नाही. एखादी गोष्ट विनोदी असते किंवा नसते. असली तर लोकांना हसा म्हणून सांगावं लागत नाही, ते आपणहून मनमुराद हसतात. पण विनोदी नसेल तर त्या गोष्टीचं अस्तित्वच धोक्यात येतं. गंभीर लेख जमला नाही तर त्याचं खापर लोकांच्या माथी मारून सुटका करून घेता येते. विनोदी लेखाला लोक हसले नाहीत तर तो विनोदी नाही हे सिद्ध होतं, आणि मग त्याचं स्वरूप केविलवाणं होतं. अशा लेखातल्या तथाकथित ‘पंचेस’वर (असले तर – काही लेखांना पंच, बोलर, बॅट्समन काहीच नसतं.) हसू येत नाही, लेख विनोदी आहे हे सिद्ध करण्याची पराकाष्ठा केल्यामुळे आता तो गंभीरही होऊ शकत नाही. शांती न मिळालेल्या अतृप्त आत्म्याप्रमाणे बिचारा मध्येच कुठेतरी लटकत राहतो. जेरी साइनफेल्डनं यावर अनेकदा टिप्पणी केली आहे. (“It’s hard being a standup comic- sometimes they don’t laugh.” – Elaine Benes) एकदा जेरी अर्धवट झोपेत असताना त्याला एक विनोद सुचतो आणि तो लिहून ठेवतो. उठल्यावर त्याला काय लिहिलं आहे ते वाचता येत नाही. पूर्ण एपिसोड तो डॉक्टरांपासून नर्सपर्यंत सर्वांना काय लिहिलं आहे ते वाचायला सांगतो. शेवटी जेव्हा उलगडा होतो तेव्हा त्यात काहीच विनोदी नसतं. त्या वेळेला त्याला जे विनोदी वाटलं तो नंतर फुसका बार निघतो.

    गंभीर लेखकांवर ‘एक्सपायरी डेट’ नसते. शंभर वर्षांनंतरही त्यांच्या लिखाणातील सखोलता वगैरेंवर लोक चर्चा करतात. बिचाऱ्या विनोदी लेखकाला मात्र लगेच कालबाह्य व्हावं लागतं. एकदा हसून झालं की लोक नवीन काय म्हणून विचारतात. पण गंभीर लेखकाइतकेच कष्ट विनोदी लेखकालाही घ्यावे लागतात याचा सोईस्करपणे विसर पडतो कारण विनोदी लेखकांना उच्चभ्रू वर्तुळात प्रवेश नाही. एखादा वुडी ऍलन अपवाद. हेच थोड्याफार फरकाने मनोरंजन करणाऱ्या लेखकांबद्दलही दिसतं. अगाथा ख्रिस्तीच्या कथा एकाच साच्यामधून आलेल्या आहेत अशी तिच्यावर टीका होते. पण इतक्या कथा लिहूनही लोकांना त्यात अजूनही रस आहे त्याअर्थी त्यात काहीतरी रंगतदार आहे आणि ते निर्माण करण्यासाठी कौशल्य लागत असेल हे मान्य होत नाही 1.

    विनोदी लेखनाच्या शोधात असताना एक जुनं पुस्तक सापडलं. कव्हर अर्धं फाटलेलं, पिवळी पानं, आत “GODFREY ATUDO 23RD MAY 1981” असं नाव आणि सही होती. अशा पुस्तकांचा प्रवास इतका झालेला असतो की आपल्या हातात ते नेमकं कसं आलं हे कळणं अशक्य असतं. पुस्तक होतं, वुडहाऊसचं “Leave it to Smith.” वाचायला सुरुवात केली आणि बरेच दिवसांनी मनमुराद हसण्याचा आनंद मिळाला. कथानक कोणत्याही मसाला चित्रपटाची कथा म्हणून शोभून दिसेल. ब्लॅंडींग्ज कॅसलच्या मालकिणीचा मौल्यवान हार आणि तो चोरण्यासाठी आलेले हौशे, नवशे आणि गवशे. वुडहाऊसच्या शाब्दिक कसरती अफलातून आहेतच, शिवाय प्रसंगनिष्ठ विनोदही लाजबाब आहे. वुडहाऊस, पुलं यासारख्या लेखकांचं एक वैशिष्ट्य हे की विनोदनिर्मितीसाठी त्यांनी वापरलेले शब्द अगदी अचूक असतात. उदा. कथेतील मुख्य पात्र स्मिथ – याला मासे अजिबात आवडत नसतात. त्यासाठीच तो मासेमारीच्या कंपनीतील नोकरी सोडतो. नंतर वर्तमानपत्रात नोकरीसाठी तो एक जाहिरात देतो. याबद्दल बोलताना तो सांगतो, “I am confidently expecting shoals of replies.” शोल चा अर्थ आहे माशांचा थवा. इथे वुडहाऊस इतर कोणताही शब्द वापरू शकला असता पण मग ते वाक्य सामान्य झालं असतं. शोल हा शब्द वापरल्यामुळे आधीचा माशांचा संदर्भ इथे अचूकपणे येतो.

    वर्षानुवर्षे पुस्तकं वाचत असाल तर आपल्या आवडीनिवडींमध्ये कसा बदल होत जातो हे बघणं मनोरंजक असतं. आवडीनिवडींमागे असलेले छुपे पूर्वग्रह प्रभावी असतात. वुडहाऊस वाचणं सोडून दिलं होतं – कथानकात येणारा तोचतोपणा हे कारण असावं. फार मोठी चूक. वुडहाऊसची सूक्ष्म ते स्थूल अशी विनोदनिर्मिती किंवा अगाथा ख्रिस्तीचं ‘वॉटरटाइट प्लॉट’ अशा अनेक गोष्टी लक्ष दिल्या तर दाद देण्यासारख्या असतात. पण त्याऐवजी आपण आपल्याला काय हवं आहे ते शोधत बसलो तर हातात काहीच पडत नाही.

    1. बरेचदा इंग्रजी पुस्तकांच्या पहिल्या दोन-तीन पानावर अवघड शब्दांचे अर्थ मराठीत लिहिलेले आढळतात. इथे पुस्तक विद्रूप होणे ही बाब सोडली तर कुणीतरी प्रयत्नपूर्वक इंग्रजी वाचन करत आहे ही गोष्ट चांगली असते. दुर्दैवाने चार-पाच पानातच हा उत्साह संपलेला दिसतो. आजवर एकाही पुस्तकात सुरुवातीपासून शेवटापर्यंत शब्दांचे अर्थ लिहिलेले आढळलेले नाहीत. असं का झालं याचं उत्तर लगेच मिळतं. इंग्रजीत वाचायला सुरुवात करताना जर नायपॉल किंवा अमर्त्य सेन पासून सुरुवात केली जर अडचण दुहेरी होते. भाषेचा अडसर असतोच, शिवाय विषयही दुर्लभ असतो. त्याऐवजी वुडहाऊस, अगाथा खिस्ती किंवा हॅरी पॉटर यापासून सुरुवात केली तर सोपे जावे. किंवा कॉमिक्स याहूनही उत्तम. दुसरा मुद्दा – वाचताना प्रत्येक अडलेला शब्द बघण्याची गरज नाही. तसं केलं तर अर्ध्या तासातच शीण येईल. उलट अडलेले शब्द सोडून संदर्भावरून किती आकलन होते ते बघावे. एखादा शब्द परतपरत येत असेल तर बघायला हरकत नाही. ↩︎
  • फुरसत के रात दिन

    डेक्कन कॉलेजचं नाव बहुतेक लोकांना पुरातत्वशास्त्र, भाषाशास्त्र किंवा संस्कृत डिक्शनरी प्रोजेक्टच्या संदर्भात माहीत असतं. जे लोक तिथे सकाळी येऊन संध्याकाळी परत जातात त्यांना तिथली फक्त एक बाजू दिसते. आमचं सगळं लहानपण डेक्कन कॉलेजचा ११० एकर परिसर मनसोक्त हुंदडण्यात गेलं.

    डेक्कन कॉलेजचं नाव बहुतेक लोकांना पुरातत्वशास्त्र, भाषाशास्त्र किंवा संस्कृत डिक्शनरी प्रोजेक्टच्या संदर्भात माहीत असतं. जे लोक तिथे सकाळी येऊन संध्याकाळी परत जातात त्यांना तिथली फक्त एक बाजू दिसते. आमचं सगळं लहानपण डेक्कन कॉलेजचा ११० एकर परिसर मनसोक्त हुंदडण्यात गेलं. आता तिथे जंगल झालंय, पण पूर्वी तिथे डेक्कन कॉलेजमध्ये काम करणार्‍यांसाठी घरं होती. आम्ही रहायचो तिथून साधारण एक-दीड मैलावर डेक्कन कॉलेजची हद्द संपायची आणि जय जवान नगर सुरू व्हायचं. जय जवान नगरमध्ये सगळ्या प्रकारचे लोक रहायचे, अजूनही राहतात. वाण्यांची दुकानं, दवाखाने – यासाठी डेक्कन कॉलेजमध्ये राहणार्‍यांना दुसरा पर्याय नव्हता. तिथेच पांडू लमाणाची वस्ती होती. त्याचा दारू गाळण्याचा धंदा होता, अजूनही असावा.

    आता डेक्कन कॉलेजची सगळी जमीन वन विभागाला लीजवर दिली आहे, त्यांनी वाटेल तिथे, वाटेल तशी झाडं लावली आहेत. त्याआधी घराजवळच्या प्रत्येक झाडाशी डायरेक्ट ओळख होती. बागेतलं मेंदीचं झाड (मुळाशी मुंगळ्यांचं बिळ आहे), घराच्या समोरचं बोराचं झाड (चढायला सोपं, उतरताना उडी मारावी लागते), रस्त्याच्या पलिकडचं अगडबंब चिंचेचं झाड, (चढणं या जन्मी अशक्य!), देवळातलं चाफ्याचं झाड, घरासमोरचं ‘एल’ शेप असलेल झाड (दोन पाय दोन्हीकडे टाकून टेकून बसायला मस्त!), टेकडीवरच्या बंगल्याच्या समोरचं पिवळ्या फुलांचं झाड (चढायला सर्वात सोपं, चढ्ल्यानंतर फांदीला लोंबकळून उतरायचं), रस्त्यावरच्या दोन बाकांच्या जवळचे वड आणि पिंपळ. इथं संध्याकाळी बसलं तर कधी सांकलिया तर कधी मुल्कराज आनंद फिरायला जाताना दिसायचे. नंतर घर बदलल्यानंतर नवीन बागेत आंबा, कढीपत्ता, चिक्कू, जांभूळ, पेरू, फणस आणि एक बांबूचं बेट. पावसाळ्यात बांबूचे कोंब जमीन फोडून बाहेर यायचे आणि दर दिवशी अर्धा फूट वेगानं वाढायचे.

    मी गाण्यांचे दोन प्रकार केले आहेत. एक म्हणजे जी आपल्याला आवडतात आणि आपण मुद्दाम ऐकण्यासाठी लावतो ती. दुसर्‍या प्रकारची गाणी म्हणजे जी आपल्याला सहज ऐकू येतात ती. बसमधला रेडीओ, एखाद्या हाटेलात चहाची वाट बघत असताना वाजणारं सिलसिलाचं गाणं, रात्री बाराला किर्रर्र शांतता असताना एखाद्या कारमधून वाहत आलेलं किशोर-लताचं ‘हम और तुम’, इटलीमध्ये त्रिएस्तेच्या बारमध्ये कॉफी पिताना ऐकलेलं ‘समर ऑफ सिक्टीनाईन’. तुम्ही स्वत:हून गाणं लावता तेव्हा तुमच्या अपेक्षा ठरलेल्या असतात, अशी अचानक ऐकलेली गाणी तुम्हाला बेसावध पकडतात. या जय जवान नगरमधल्या लोकांना लाउडस्पीकरवर गाणी वाजवायला फार आवडायचं. लग्न, बारश्यापासून होळी, दिवाळीपर्यंत प्रत्येक वेळी तेव्हाची हिट गाणी ऐकायला मिळायची. अमर अकबर ऍंथनी, याराना, कुर्बानी, डॉन – एकेका गाण्यासोबत आठवणींचं गाठोडं बाधलं आहे. याशिवाय घरी रेडीओ होताच. या आठवणी आणि ही गाणी का जोडली गेली माहीत नाही. पावसाची गाणी आणि पाऊस समजू शकतो, पण ही गाणी ऐकल्यानंतर ते क्षण लख्ख आठवतात हे मात्र खरं.

    दुपारी शाळेत जाताना आलेला महाभयंकर कंटाळा – अनहोनी को होनी करदे, होनी को अनहोनी, एप्रिल-मे, सुट्ट्या, दुपारी रस्त्याकडं पाहीलं की उन्हाच्या झळया दिसायच्या – एक अकेला इस शहर में. उन्हाळ्यात ऊन शिगेला पोचलेलं असताना अचानक ढग दाटून यायचे आणि वळवाचा पहिला पाऊस सुरू व्हायचा – रेडिओवर दिल ढूंढता है चाललेलं. पावसाळ्यात डेक्कन कॉलेज हिरवंगार झालेलं असायचं. घराच्या समोरच टेकडी होती, तिथे बरेच खडक होते. प्रत्येक खडकही ओळखीचा. ओली झाडं, पहावं तिकडे गवत पसरलेलं, खडकांमध्ये पाण्याची तळी साचलेली, अजूनही भुरूभुरू पाऊस चालू आहे – न जाने क्यूं, होता है ये जिंदगी के साथ, रिमझिम गिरे सावन. ढग दाटून आलेले, पाऊस येईल की नाही माहीत नाही, बागेत गार वारा सुटलेला, कॉनटिकी वाचणं चालू आहे – जिंदगी के सफर में, गुजर जाते है जो मकाम.

    काही चित्रं सायलेंट आहेत. कधीही आठवतात. मेंदूला या प्रतिमाच का महत्वाच्या वाटल्या त्यालाच ठाऊक! मेंदूचं ऑपरेशन करताना विशिष्ट भागांना विद्युतप्रवाह दिला तर पेशंटला असंच काहीही आठवतं म्हणे.

    हिवाळ्यात बागेचा मूड बदलायचा, सकाळी धुकं पडायचं, मांजरं अंथरूणं शोधत यायची. थंडी पडलेली, स्वेटर घालून मच्छरदाणीत हिंदीचा गृहपाठ चाललेला. चार-साडेचारचा सुमार, घराचं दार उघडं, एस.वाय.बी.एस्सीचं केमिस्ट्रीचं पुस्तक हातात, दारातून दिसणारा मावळतीचा सूर्य. बॉटनीचा अभ्यास करताना पुस्तकात ठेवलेले गाण्यांचे, गझलांचे, कवितांचे कागद – रेडिओवर ऐकत असताना घाईघाईत लिहून घेतलेले – मीर तकी मीरची ‘दिखाई दिए यूं’, आनंद मधली ‘मौत तू एक कविता है’, मेरी आवाज ही पहचान है गर याद रहे, सीने में जलन, ये जीवन है इस जीवन का, आने वाला पल. रविवार संध्याकाळ, दूरदर्शनवर कुठलातरी चित्रपट चाललेला, बदाबदा पाऊस कोसळतोय, रस्त्यावरच्या पुलाच्या बाकावर कसलीही फिकीर न करता एक माणूस शांतपणे भिजत बसलाय – जाळीच्या खिडकीतून दिसणारं धुकट वातावरण, वडाच्या झाडाखाली त्या ओल्याचिंब माणसाची आकृती. पाऊस थांबल्यावर हवेत गारवा यायचा, एखाद वेळेस सूर्य डोकवायचा, स्वच्छ, ओली पानं उन्हात चमकायची. आणखीन एक भिजलेली रविवार संध्याकाळ, टीव्हीवर मृणाल सेनचा ‘एक दिन अचानक’. परीक्षेचा हंगाम पण त्याच वेळेला दूरदर्शनवर सत्यजित रे महोत्सव सुरू – रात्री जागून बघितलेले प्रतिद्वंदी, जोलसाघर, अरण्येर दिन-रात्री, महानगर, नायक – परीक्षेचा निकाल काय लागला मेंदू सोईस्करपणे विसरून गेलाय. भर दुपारी टळटळीत उन्हात भाषाशास्त्र विभागाच्या गच्चीवर बसून सगळा परिसर न्याहाळायचा. संध्याकाळी टेकडीवरून सूर्यास्त झाल्यावर बुध-गुरू-शुक्र-मंगळ दिसतात का बघायचं. उन्हाळ्यात वीज गेल्यावर रात्री बाहेर येऊन नक्षत्रं बघायची, सप्तर्षींच्या दिशेने टॉर्च मारून तो प्रकाश तिथे कधी पोचेल याचा विचार करायचा.

    अमेली चित्रपटात एक हृद्य उपकथानक आहे. अमेलीला तिच्या घरात एक चोरकप्पा सापडतो. त्यात एक खेळण्यांची पेटी असते, त्या घरात पूर्वी रहात असलेल्या दोमिनिक ब्रोतोदोची. जुने फोटो, गोट्या, खेळणी. अमेली शक्कल लढवून (स्त्राताजेम!) ती पेटी त्याला मिळेल अशी व्यवस्था करते. पन्नास वर्षांनंतर ती खेळणी अचानक समोर आल्यावर ब्रोतोदो सैरभैर होतो, कोलमडतो. ती पेटी इतर कुणासाठीही कवडीमोलाची, पण ब्रोतोदोसाठी तो अमूल्य खजिना आहे.

    या चित्रांचं असंच काहीसं आहे. इतर कुणासाठी या सगळ्याचा फारसा अर्थ नाही. अशा आठवणी सगळ्यांच्याच असतात – स्मरणरंजन, गेले ते दिवस अशी लेबलं लावून झटकन पुढे जाता येईल. मात्र ज्या मेंदूत अशी चित्रं कोरली गेलेली असतात त्याला असं नाही करता येत. नोस्टाल्जिया ही भावना अशी आहे की जी सुखद किंवा दु:खद अशा काटेकोर वर्गवारीत बसत नाही. हिचं वर्णन करायला गेलं तर अनेक ठिगळं लावलेली गोधडी शिवतोय असं वाटायला लागतं. या लेखात बहुधा तसंच काहीसं झालंय. या भावनेला व्यक्त करणं कवी लोकांनाच चांगलं जमतं.

    दीड-एकशे वर्षांपूर्वीची दिल्ली; चार-साडेचारचा सुमार; मे महिना आणि दिल्लीचा उकाडा पण आज मात्र ढग आलेत; वारा सुटलाय, हवेत काहीसा गारवा आहे; बल्लीमाराच्या एका गल्लीतलं एक छोटसं घर; अंगणातल्या खाटेवर मिर्झा; हातात पेला, समोर हुक्का; वार्‍याची एक मंद झुळूक, बरोबर ओल्या जमिनीचा सुगंध येतो; एक टपोरा थेंब मिर्झाजींच्या मनगटावर पडतो; आठवणींमध्ये हरवून गेलेले मिर्झा त्या थेंबाकडे क्षणभर बघतात आणि सहजपणे त्यांच्या तोंडून शब्द निघतात,

    जी ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन


    ” You know, you are born in a place and you grow up there. You get to know the trees and the plants. You will never know any other trees and plants like that. You grow up watching a guava tree, say. You know that browny-green bark peeling like old paint. You try to climb that tree. You know that after you climb it a few times the bark gets smooth-smooth and so slippery you can’t get a grip on it. You get that ticklish feeling in your foot. Nobody has to teach you what the guava is. You go away. You ask, “What is that tree?” Somebody will tell you, “An elm.” You see another tree. Somebody will tell you, “That is an oak.” Good; you know them. But it isn’t the same. Here you wait for the poui to flower one week in the year and you don’t even know you are waiting. All right, you go away. But you will come back. Where you born, man, you born.”

    – The Mimic Men by V S Naipaul